किमया म्हणाली,
" डॉक्टर मला काही झालेले नाही,मी ठीक आहे. माझा विजय ठीक होईल का हो? तो कोमातून बाहेर येईल ना हो? फार हळवा आहे हो तो, थोड जरी लागलं ना तरी खूप कळवळतो.प्लीज सांगा ना डॉक्टर,तो ठीक होईल ना?"
" हे बघा, तुम्ही स्वतःला सावरा.तुम्हालाही जरा मुका मार लागलेला आहे .जरा काळजी घ्या.आम्ही विजय शुद्धीवर येण्याचीच वाट बघतोय.खर तर मेंदूतून एवढा रक्तस्त्राव होऊनही तो जिवंत आहे हेच आश्चर्य आहे.आता सगळं देवाच्याच हातात आहे. हे बघा विजयला सद्ध्या खंबीर साथीची खूप गरज आहे.खर तर मानवी भावनांमध्ये खूप ताकद असते.तुम्ही त्यांच्या भावी पत्नी आहेत असे मी ऐकले आहे.आता तुम्हीच देवापुढे जाऊन विजयला शुद्धीवर आणू शकता असे मला वाटते."
" पण ते कसे काय?"
" रोज विजयशी बोलायचं,खळखळून त्याच्यासमोर हसायचं. अस वागायचं जसे की काहीच झाले नाहीये."
तेवढ्यात नर्स धावत आली,
"डॉक्टर,विजय शुद्धीवर येताय.किमया ताई तुम्ही पण चला."
डॉक्टर आणि किमया विजयकडे जातात.खर तर किमया विजयला पाहताच ढसा ढसा रडायला लागते.विजय शुद्धीवर येतो पण त्याचे सेन्से्स काहीच प्रतिसाद देत नसतात.त्याचे केवळ डोळेच उघडे असतात.
डॉक्टर म्हणतात,
" हे बघा तुम्ही असे रडून विजयला आणखी निगेटिव्ह ऊर्जा देत आहात.मी तुम्हाला सांगितले ना तुम्हाला खंबीर राहून विजयला साथ द्यावी लागेल, तरच काही तरी चमत्कार घडू शकेल.प्लीज सावरा स्वतःला."
किमया डोळे पुसत ,स्वतःचे मन घट्ट करत होकरार्थी मान डोलवते आणि बाहेर बसते.
थोड्याच वेळात विजय आणि किमयाचे कुटुंबीय हॉस्पिटल मध्ये पोचतात.किमयाची आई म्हणते,
" किमया बेटा तू बरी आहेस ना? विजय कुठे आहे?"
" आई मी बरी आहे.पण विजय सद्ध्या कोमामध्ये आहे. तो जरा शुद्धीवर आलाय.पण डॉक्टरांनी सांगितलय की तुम्हाला खंबीर व्हावे लागेल तरच विजय लवकर बरा होईल.पण आई मला ना हिमंत धरवतच नाहीये.काय करू ग मी?"
" हे बघ किमया,प्रेमात खूप ताकद असते. खरय डॉक्टरांचं! तू मनोभावे देवाला विजयसाठी प्रार्थना कर .आता तुमचे हे प्रेमबंधच तुम्हाला परत एकत्र आणू शकतात.तू अशी जर निराश झालीस तर कसं चालेल? हे बघ तुमच्या दोघांचे एकमेकांवर खरे खुरे प्रेम आहे. आहे की नाही?"
"हो आई अतोनात प्रेम आहे आमचे एकमेकांवर!"
"मग चल.देवाचे नाव घे आणि विजयला साथ देत, त्याला बरे करण्याच्या लढाईला सुरुवात कर.तुमचे हे अतूट प्रेमबंध तुम्हा दोघांनाही यासाठी खूप ताकद देत राहतील,असा मला विश्वास आहे."
" हो आई तू म्हणते ते बरोबर आहे.माझ्या विजयवरच्या प्रेमात खूप ताकद आहे आणि देवाला विजयला ठीक करावेच लागेल.कारण मीही हार मानणारी मुलगी नाही. खरं तर डॉक्टरांनी आणि तू आता मला अधिकच खंबीर केले आहे."
तेवढ्यात विजयची आई किमयाचे हे संभाषण ऐकून म्हणते," खरच किमया किती प्रेम करतेस ग तू माझ्या विजयवर! खरच तुझ्यासारखी मुलगी विजयला मिळाली म्हणजे त्याचे भाग्यच उजळले बघ! प्लीज वाचव पोरी माझ्या विजयला!"विजयची आई रडू लागते.
" हे पहा आई.तुम्ही शांत व्हा . माझे आणि विजयचे प्रेम बंध अगदी घट्ट आहेत.मी इतक्या सहजासहजी देवाला माझ्यापासून त्याला हिरावू देणार नाही."
विजयची आई म्हणते,
"थँक्यू ग पोरी.पण मला एक सांग एवढ्या रात्री तुम्ही गाडी घेऊन कुठे गेले होते?"
" आम्ही लाँग ड्राईव्ह ला गेलो होतो, अशोकामार्गच्या रस्त्यावर!"
"काय ?"
"अहो पण एवढा निर्जन रस्ता असूनही आमची गाडी अचानक एका ट्रकने उडवली."
इतक्यात नर्स येते.
" किमया कोण आहेत? त्यांनी लवकर पेशंटकडे चला.त्यांची थोडी हालचाल पुन्हा होत आहे."
किमया धावत धावत विजय कडे गेली.
विजयची हालचाल आता पुन्हा बंद झाली होती,त्याचे फक्त डोळे उघडे होते. किमया त्याला म्हणाली,
"विजय,तू कसा आहेस? अरेच्चा! बघ मी वेडी काय विचारतेय तुला! अरे तू तर एकदम ओके आहेस.तुला माझे स्मितहास्य आवडते ना! बघ ना माझ्याकडे एकदा.प्लीज! तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे ना रे,मग असा शांत बसू नकोस.मला मिठीत घेऊन सांग.तुला माहीतीये, मी तुझा आवडता ड्रेस उद्या घालणार आहे.अरे लग्न ठरल्यापासून आपण एवढे फिरलो तरी एकदाही तू मला पिक्चरला नेले नाहीस.जाऊ दे आपण दोघेही उद्या लॅपटॉप वर छान पिक्चर बघुया."
ती त्याला असे म्हणाली,पण लगेच उठली आणि कोपऱ्यात जाऊन पुन्हा रडू लागली.ती म्हणाली,
" देवा ,मला ही कठीण परीस्थिती हाताळायला बळ दे,मी अजूनही सावरण्याचा प्रयत्न करतेय,देवा मला खंबीर बनव ,ताकद दे.माझ्या विजयला लवकर बर कर.माझ्या विजयला लवकर चालते बोलते कर! आमच्या प्रेमबंधांची ताकद बळकट होऊ दे आणि इथून पुढे येणारे सूख- दुःख झेलयची ताकद आम्हा दोघांनाही दे "
देवाकडे अगदी प्रांजळ मनाने मागितलेली इच्छा सावकाश का होईना पण नक्की पूर्ण होते.म्हणून देवही विजयला सतत छोट्या छोट्या हालचाली करण्यासाठी जणू काही बळ देत होता.
किमया पुन्हा विजय जवळ आली,त्याचा हात हातात घेत गोंजारू लागली.
पण आता ती रडत नव्हती,तर एखादी प्रेमळ आई जशी आपल्या आजारी लेकरासाठी खंबीर पणे उभी राहते, त्याप्रमाणे ती आता त्याच्यामागे खंबीरपणे उभी होती.
एवढ्यात किमयाला फोन येतो.
" थांब हा विजय मला एक कॉल आलाय."
किमयाला कोणाचा फोन येतो? या कार अपघाताचा काही सुगावा लागेल का?किमया याचा शोध घेऊ शकेल का? विजय नक्की बरा होईल का? तो तिच्या प्रांजळ प्रयत्नांना दाद देईल का? हे प्रेमबंध टिकतील का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे माहित करण्यासाठी नक्की वाचा पुढील भाग..
माझा हा कथा मालिका लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न ! त्यामुळे प्रिय वाचकहो , कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.लाईक आणि शेअर जरूर करा.
धन्यवाद!
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कॅटेगिरी- कथामालिका
सब कॅटेगिरी- प्रेमकथा
जिल्हा- नाशिक