लेक परक्याचे धन..

लग्न करून सासरी आलेल्या मुली आपली माहेरचं कर्तव्य आणि जबाबदारी विसरतात का?


"अहो ताई, गिफ्ट्स पॅक करायला घेऊया का आपण? तोवर ही पुरुषमंडळी त्यांचे लग्नात घालायचे कपडे ट्राय करतील." श्रेष्ठा म्हणते.

"हो,चालेल की. तू चहा बनवायला घे तोपर्यंत मी एक साईज चे रॅपर कटिंग करून ठेवते." वेदश्री

"हो चालेल म्हणून श्रेष्ठा किचनमध्ये जात असते तर तिची नजर बेडरूममध्ये जाते आणि ती तिथेच उभी राहून बोलते....अहो शेंडेफळ, मान्य आहे तुम्ही नवरदेव आहात पण तुम्हाला शेरवानी फक्त ट्राय करायला संगीतली आहे. फोटो च्या पोज लग्नमंडपात ट्राय करा. खूप काम आहेत आम्हाला आणि हो बॅग मध्ये फक्त कपडेच भरायचे आहेत स्टेजवरच्या पोज नाही."श्रेष्ठा दिराची मस्करी करत बोलते तसा एकच हशा पिकतो.

"ए आई, तुझ्या सुनेला सांग हां मी आता शेंडेफळ नाही. माझं लग्न आहे यार.....तुम्ही कोणी सिरियसली का घेत नाही." वेद जरा लाडात आणि रागात म्हणतो.

"अग्गोबाई..... हो की, माझा लेक आत्ता मोठा झालाय. ए कुणी शेंडेफळ म्हणणार नाही हं आत्ता त्याला. खबरदार कोणी शेंडेफळ बोललेले तर. माझ्या लेकाचा लग्न ठरलंय तरी तुम्ही त्याला शेंडेफळ म्हणता." प्रभा ताई

"आई....तू पण!!" वेद चिडून पुन्हा खोलीत जातो.
सगळे वेदच्या खोलीत जाऊन त्याला मस्का मारतात.

"अरे वेदुल्या..... आम्ही फक्त गंमत करत होतो. आता तुझं लग्न झाल्यावर तू पण मोठ्ठा होणार, तुझ्या दादासारखा,मग आम्ही कसं बर तुला शेंडेफळ म्हणणार. तुझ्या बायकोला आवडलं तर बरं, नाहीतर हकलेलं ती आम्हाला बाहेर. म्हणेल माझ्या नवऱ्याला शेंडेफळ म्हणतात."वेदश्री समजावण्याचा सुरात आणखी वेदला छेडत होती. बाकी सगळे मात्र तोंडावर हात ठेवून गालातचं हसत होते.

"हो ना, आता मी कशी दादाला आधी बाबू म्हणायचे आता
वेदांश म्हणते." प्रभा ताई वेदला समजवत बोलतात.

"हो आणि आता ती जागा वहिनीने घेतली आहे कारण वहिनी दादाला बाबू म्हणते." वेद आता त्याच्या वहिनीची आणि दादाची मस्करी करत होता. वेदचं बोलणं ऐकून वेदांश त्याच्या पाठीत धपाटा देतो आणि श्रेष्ठा मात्र सगळ्यांपासून नजर चोरून उभी असते.

"चला चला पटापट आवरा आता, मी चहा आणते सगळ्यांसाठी. श्रेष्ठा वेळ मारून नेत म्हणते. तसे सगळे
आवरून हॉलमध्ये येऊन बसतात.

"बरं आई....मी काय म्हणतोय लग्नात याजमान्यांच्या मान कुणाचा गं?" वेद

"कुणाचा म्हणजे,ताईंचा....."श्रेष्ठा

"अगं मी कशी बरं? मी पाहुणी या घरची. मला कुठे यजमानी वैगरे. नको गं बाई."वेदश्री

"द्या तुम्ही ते सगळं हातातलं काम इकडे आणि सोफ्यावर बसा." श्रेष्ठा

"का गं? "वेदश्री

"अहो आताच तर बोललात तुम्ही पाहुण्या,मग पाहुण्यांकडून आम्ही कामं कसं बरं करून घेणार. राहुद्या तुम्ही ते."श्रेष्ठा

"अगं श्रेष्ठा तशी रितचं आहे. मुलीचं लग्न झालं की ती फक्त पाहुणी असते.चार दिवस माहेरी यायचं आईवडील,भाऊ-बहीण,वहिनी आणि भाचरांसोबत वेळ घालवून परत आपल्या घरी जायचं."वेदश्री

"अहो ताई, मग हे घर कुणाचं आहे? मध्ये तुमचं भांडण झालं होतं दाजींसोबत तेंव्हा तुम्ही हक्काने इकडे निघून आलात. तुम्ही पाहुण्या असतांना पण अशा का आलात मग? कारण हे तुमचं घर आहे म्हणून ना? मुलगी जन्माला आली की आपण सहज म्हणतो. \"लोकाची पोरं आपण वाढवायची, आणि लग्न करून तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवायची\" मुलगी जन्माला आली की फक्त तिला नवऱ्याच्या घरी पाठवण्यासाठी आपण तिला सांभाळतो का? आईवडील सांगतात म्हणून आपण पण तीच पाटी गिरवतोय ताई.. \"लेक परक्याचे धन\" अहो असं काही नसतं. मुलगी परक्याचं धन असती तर आपल्या माहेरच्या नात्यांना भेटायला एवढी उत्सुक राहिली असती? आईवडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये त्यांच्या इस्टेटमध्ये आपल्याला हक्क हवा असतो, मग आपण आपली माहेरची कर्तव्ये आणि जबाबदारी घेताना *परक्याचे धन* हे का आठवतं. ताई,अहो आईबाबांनंतर तुम्ही मोठ्या आहात, मग हा मान पण तुमचाच आहे. तो तुम्ही आणि दाजींनी आनंदाने स्वीकारावा हीच इच्छा आहे आमची. हो आमची कारण माझ्या या निर्णयात तुमचा भाऊ पण आहे. "श्रेष्ठा

"श्रेष्ठा..... अगं तू वयाने लहान असलीस तरी विचाराने फार मोठी आहेस. लग्न म्हंटल की लोकांना मानमरातब हवा असतो मिरवायला,पण तु वेगळी आहेस सगळ्यांपेक्षा म्हणून कदाचित वेदांशला तू आवडलीस. आमचं सौभाग्य की तुझ्यासारखी समजूतदार मुलगी या घरात आली. माझ्या आईवडिलांनंतर पण माझं माहेर कायम टिकून राहील याची खात्री आहे मला.तू दिलेला हा मान मी आणि हे आनंदाने स्वीकारतोय वहिनी." वेदश्री श्रेष्ठाच्या हातात हात देऊन बोलते आणि तिला मिठी मारते.
लेकीचं आणि सुनेचं हे प्रेम बघून प्रभा ताई पण पदराच्या टोकाने डोळे टिपतात आणि त्यांचे यजमान गर्वाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या नंतर ही मुलं कायम सोबत राहतील असं नजरेने प्रभा ताईंना आश्वस्त करतात.
समाप्त..
लेखिका
श्रावणी लोखंडे.