साधारण १५ दिवसांची सुट्टी घेऊन तन्वी मुंबईला निघाली. घरी फोन करून आधीच कळवलं होतं तिने. विमानात सतत घराचे विचार येत होते. ३ वर्ष झाली मुंबई बघितलीही नाही. या गेल्या वर्षात तिला मुंबईची आठवण आली नाही असं नाही. मुंबईच्या कटुगोड आठवणी तिला नेहमी अस्वस्थ करायच्या.
मुंबईचा पाहिला पाऊस, नरिमन पॉईंट, पहिल्या पावसात समुद्र किनाऱ्यावर खाल्लेलं कणीस, तिची शाळा आणि समीर अशा अनेक आठवणींनी तिच्या मनात गर्दी केली. समीरला आपण फोन नाही केला हे तिच्या पटकन लक्षात आलं. घरी गेल्यावर पहिले त्याला फोन करायला हवा आणि सांगायला हवं मी आले आहे. ती मुंबई सोडून जाताना जर कोणाला खरंच निर्मळ आनंद झालं असेल तर तो फक्त समीरच होतं. तिला भेटायला तो न चुकता यायचा. तिची आस्थेने विचारपूस करायचा. आणि तिच्या नशिबाने तन्वीच्या घरीही तो आवडायचा. तेवढाच काय तो आनंद होता तिला.
या सगळ्या विचारांच्या गर्दीत तन्वी मुंबईला पोहोचली. विमानतळावर सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून बाहेर आली तर तिच्यासाठी गाडी आलेलीच होती. तन्वीने ड्रॉयव्हर काकांना नमस्कार केला. त्यांना खरंच खूप आनंद झालं होता तिला इतक्या वर्षांनी बघून. त्यांची खुशाली विचारात ती गाडीत बसली. अर्थात तन्वीच्या घरचं कोणीही तिला घ्यायला आलं नव्हतं. तन्वीने घरच्यांबद्दल पण काकांना विचारलं. त्यांच्या बोलण्यातून तिला जरा विचित्र वाटलं. नक्की घरी सगळं ठीक आहे ना? आईचं असं अचानक घरी बोलवून घेणं, ड्रॉयव्हर काकांचा तोकडा प्रतिसाद, बाबांशी तर गेल्या कित्येक महिन्यात बोलणंही झालं नाही. तन्वीला आता भीती वाटू लागली. कधी एकदा घर गाठते आणि सगळ्यांना डोळे भरून बघते असं झालं तिला.
घरी पोहोचल्या पोहोचल्या बाहेरच तनयने तिला मिठी मारली. तन्वीला खूप आनंद झालं त्याला बघून. मागच्या वेळी ती आली तेव्हा तो अमेरिकेमध्ये होता आणि तो आला तोपर्यंत तिने इराण ला पोस्टींग घेतलं होतं.
''I missed you so much'' तो तिला मिठीत घेत म्हणाला.
''मला नव्हतं माहिती तू इथे आहेस.'' तन्वीचा आनंद लपत नव्हता.
म्हणूनच आईने घरी बोलावलं वाटतं अगदी आग्रह करून. तिने विचार केला.
''surprise, चल आता आत जाऊया नाहीतर बाकी सगळे बाहेर येतील आपण कुठे गेलो हे बघायला.'' तो खिदळत म्हणाला.
तनय हा तन्वीचा जुळा भाऊ. त्यांचं बऱ्यापैकी जमायचं. निदान इतक्या वर्षांनी एकमेकाला भेटल्यानंतर मागचे वाद उकरून काढण्यात कोणाला रस नव्हता. कदाचित तन्वीच लांब राहणं तिच्या पथ्यावर पडलं होतं. दुरून डोंगर साजरे असा काहीसा प्रकार होता.
आईच्या मिठीत गेल्यानंतर मात्र तन्वी सगळ्या जगाला विसरली. या मायेच्या स्पर्शाला ती केवढी मुकली होती.
तेवढ्यात देवेन तिचा मोठा भाऊ भारे आला. तन्वीने सारे काही विसरून त्यालाही मिठी मारली. बाबा अर्थातच घरात नव्हते पण ते २ दिवसांनी येणार होते. नंतर सगळा वेळ असाच गप्पा गोष्टींमध्ये गेला. तन्वीने बरीच खरेदीही केली होती इराणमध्ये पण त्या गोष्टींचा फारसं कोणाला कौतुक नव्हतं. तरीही तिने आवडीने एकेक वस्तू दाखवल्या. तिने ड्रॉयव्हर काकांसाठी वगैरेही काय काय आणलं होता. निदान यांना तरी बारा वाटेल, तिने विचार केला.
रात्री झोपायला ती तिच्या खोलीत आली. केवढ्या प्रचंड आठवणी होत्या इथे. तन्वी खोलीतून बाहेर कमी वेळा यायची. तिथेच अभ्यास आणि खाणं पिणं असायचं तिचं. आज सगळ्यांबरोबर जेवताना तिला तिचे जुने दिवस आठवले. ते दिवस वाईट नव्हते. फक्त तिला त्यांचं अप्रूप नव्हतं. तन्वी खूप दमली होती. समीरला मेसेज करावा का, अशा विचारात असतानाच तिला झोप लागली.
सकाळी उठल्या उठल्या ती नाश्ता करायला बाहेर आली आणि बघते तर समीर आधीच तिथे आला होता. समीर आणि तनय बोलत होते.
''Here she is'' समीर म्हणाला आणि त्याने तन्वीला मिठी मारली.
"समीर, अरे खूप घाई झाली त्यामुळे तुला कळवायच राहून गेलं यावेळेला, पण मी आज तुला फोन करणारच होते'' तन्वीला वाईट वाटलेलं.
''अगं मला आधीच माहिती होतं. तनय म्हणाला होता, तू येते आहेस.'' समीर खुश होता.
समीर हा तनय आणि तन्वीचा शालेय मित्र होता. दिवसभर तिघांनी भरपूर गप्पा मारल्या. शाळा, कॉलेजच्या आठवणी निघाल्या, समीर आणि तनय मुलींबद्दल बोलत होते, तन्वीही बाकीच्या मित्रांबद्दल विचारात होती. नंतर कामाचा विषय निघाला आणि तन्वी व समीरच्या गप्पा अजून रंगल्या. तनयला त्यांच्या कामाबद्दलच्या गप्पांमध्ये रस नव्हता. त्यामुळे तो उठून गेला
खूप वर्षांनी भेटल्यावर खरंच खूप बरं वाटत होतं.
२ दिवसांनी बाबांना बघितल्यावर तन्वीला काय बोलू आणि काय नको असं झालं. त्यांना बरंच काही सांगायचं होतं पण सुरुवात कुठून करावी. त्यांनी आपल्याला माफ केलं आहे का याचा विचारच ती सतत करत असायची. इतक्या वर्षांनी घरी आल्यावर तिला घराचं महत्त्व कळलं होतं. आपण उगाचच इतके लांब राहिलो. सगळे आपल्याशी किती चांगलं वागत आहेत. अगदी देवेनपण आपली काळजी घेतोय. तन्वीला उगाचच अपराधी वाटत होतं.
एके दिवशी जेवताना आईने विषय छेडला.
''तन्वी, लग्नाचा काय विचार आहे?''
''आई?? आता कुठे माझं करीयर सुरु झालाय आणि आता कुठे मी लग्नाचा विचार करू?'' तन्वीने हसत हसत उडवलं.
''तू २८ पूर्ण झाली आहेस. लग्न वेळेत व्हायला हवं गं.''
''आई, तू कधीपासून एवढा विचार करायला लागलीस? आज काल २८ नॉर्मल वय झालं आहे. मला फक्त अजून थोडा वेळ हवा आहे.''
आई शांत झाली पण तिच्या मनात असंख्य विचार चालू होते.
तन्वीला मागमूसही नव्हता की त्यांच्या मनात काय आहे.
दुसऱ्या दिवशी आईने पुन्हा विषय काढला. आज बाबा, देवेन आणि तनयपण होते. तन्वीच्या लक्षात आलं की हे गंभीर प्रकरण आहे. आईने नक्की याचसाठी घरी बोलावलं असणार.
''तुला एक चांगलं स्थळ सांगून आलं आहे. लग्न करायची अजिबात घाई नाही पण निदान ठरवून तरी ठेवूया.'' आई म्हणाली.
''माझी तयारी नाहीये लग्नाला. नाहीच अज्जीबात.'' तन्वी निग्रहाने म्हणाली. तिला भयंकर राग आला होता.
''अगं पण मुलगा तरी बघ कोण आहे'' बाबा म्हणाले.
''कोण आहे?'' तन्वीची उत्सुकता जरा जागी झाली. लग्न जरी आत्ता नसेल करायचं तरी कोणता मुलगा आपल्याला मागणी घालतोय हे बघायचं होतं तिला.
''चिराग दीक्षित'' बाबा शांतपणे म्हणाले.
"चिराग????'' तन्वी तीन ताड उडाली..
(क्रमशः)