शेवटची इच्छा
रामाला फाशी देणार असतात इतक्यात रामा हात जोडून बोलू लागतो; “महाराज मला काहीतरी बोलायचं आहे. मी तुमच्यासमोर याचना करतो पण एकदा माझं ऐकून घ्या.”
त्याचं बोलणं ऐकून राजा खूण करतो. त्याबरोबर त्याची मान फाशीच्या दोरीतून आणि चेहऱ्यावरील काळे कापड बाजूला काढले जाते.
“बोल. काय सांगायचं आहे तुला?” महाराज विचारतात.
“मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय महाराज की, आचार्य तथाचार्य एक एवढे मोठे विद्वान पंडित आहेत तरी त्यांनी तुम्हाला याबाबत सांगून सावध कसे केले नाही? सांगा आचार्य.” रामा म्हणाला.
“अरे काय सांगू?” आचार्यने गोंधळून विचारले.
“हे तुम्ही मला विचारताय? तुम्ही तर सर्वज्ञात विद्वान आहात. तुम्हाला तर हे माहीतच असेल.” रामा म्हणाला.
“अरे आधी काय माहित आहे हे तर आम्हाला कळू दे.” आचार्य म्हणाला.
“हेच की आत्ता मलाच काय कोणालाही मृत्युदंड देता येणार नाही. यावेळी राहू आणि शनी एकमेकांच्या जवळून जात असतात त्यामुळे अशी ऊर्जा निर्माण झालेली असते ज्यामुळे कोणाचेही प्राण घेतले तर ते महापाप होतं असं शास्त्रात म्हणलं आहे महाराज.” रामा म्हणाला.
“हा खरं बोलतोय का गुरुजी?” धनीने विचारलं.
“अरे तू कोणाला विचारतोय? हा म्हातारा कधी शास्त्राचा अभ्यास करतो का?” मणी त्याच्या कानात कुजबुजला.
आचार्यने जरा विचार केला आणि बोलू लागला; “हो! हो महाराज. हा पंडित म्हणतोय ते बरोबर आहे.”
“आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराज. जर माझ्या मनात कोतवालला फाशी देणे असते तर मी आज त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आलोच नसतो. मी तुम्हाला विनंती करतो महाराज मला थोडा वेळ मिळावा. मी जर या वेळात खऱ्या चोराला तुमच्या समोर आणू शकलो तर ठीक अन्यथा जसे महाबली सम्राट योग्य समजतील ते.” रामा हात जोडून म्हणाला.
“ही फाशी फक्त तेवढाच वेळ थांबवली जाईल जेवढा वेळ ही वाईट वेळ सुरू आहे.” राजाने आदेश दिला.
लगेचच रामाची फाशी थोड्या वेळासाठी स्थगित केली गेली जाते. राजाने वाळूचे घड्याळ लावले होते. रामा इथे तिथे फिरत होता आणि फिरता फिरता तो महामंत्री उभे होते तिथे येऊन थांबला.
“तू तर म्हणत होतास सगळ्यांसमोर त्या चोराला उघडं पाडेन. कुठे आहे तुझा चोर?” महामंत्र्यांनी हळूच विचारलं.
“नाही माहित महामंत्री जी. आत्ता पर्यंत तरी तो यायला हवा होता.” रामा म्हणाला.
“यायचं असतं तर तो केव्हाच आला असता. आज तुझा मृत्यू निश्चित आहे.” महामंत्री म्हणाले.
“माझा पूर्ण विश्वास आहे तो येतच असेल.” रामा कुजबुजला.
आचार्य त्या घड्याळावर लक्ष ठेवून होताच. जशी त्यातली संपूर्ण वाळू खाली आली तो लगेचच ओरडला; “वेळ संपली. महाराज आता कसलाच विलंब न करता याला फाशी द्या.”
लगेच पुन्हा रामाला तिथे उभे करण्यात आले.
काहीतरी विचार करून तो पुन्हा म्हणाला; “दयाळू, न्यायप्रिय शासक! मरणाऱ्याची एक शेवटची इच्छा देखील पूर्ण करणार नाही काय?”
“कसली शेवटची इच्छा महाराज? ज्याला मेल्यानंतर नरकात जायचे आहे त्याची कसली आली आहे शेवटची इच्छा? माझं ऐका फाशीची शिक्षा देण्याचा आदेश द्या.” आचार्य म्हणाला.
“क्षमा करा मुनिवर पण काही प्रश्न तर आम्हालाही विचारायचे आहेत.” महामंत्री पुढे येऊन म्हणाले.
आचार्यने फक्त होकारार्थी मान हलवली.
“कोतवाल चोर आहे हे तुम्हीच सगळ्यात आधी सांगितलं होतं ना?” महामंत्री म्हणाले.
“नाही! नाही! याने सांगितलं होतं.” आचार्य रामाकडे बोट दाखवून म्हणाला.
“पण त्या गोष्टीला तुमचं समर्थन तर होतं.” महामंत्री म्हणाले.
“आमच्या तोंडून ते बोलून घेतलं होतं. या कपटी पंडितने अशी शब्दांची जादू केली की आम्ही त्याच्या बोलण्यात आलो. आत्ताही बघा महाराज आपल्या सगळ्यांना या बोलण्यात अडकवून फाशी पासून कसा स्वतःचा बचाव करता येईल याचे विचार याच्या डोक्यात फिरत असतील. आमची आचार्य तथाचार्यची तुम्हाला विनंती आहे महाराज फाशीची कारवाई सुरु व्हावी.” आचार्य म्हणाला.
“होणार! फाशीची कारवाई होणार आणि याच क्षणी होणार आचार्य पण जर या अपराध्याची काही अंतिम इच्छा असेल तर ती ऐकून घेणं आणि शक्य असल्यास पूर्ण करणं देवराय यांचे कर्तव्य आहे. बोल काय आहे तुझी शेवटची इच्छा?” राजा म्हणाला.
“अरे सांग ना शेंडी दान द्या.” बंधू म्हणाली.
“त्याला जीवनदान म्हणतात.” रामा म्हणाला.
“अरे बुद्धू शेंडी दान केल्यावर जीवनदानही मिळेलच.” बंधू म्हणाली.
रामाने तिला गप्प केलं आणि बोलू लागला; “शेवटची इच्छा आहे महाराज. एकदाच पूर्ण होणार आहे अशी कशी मागू. दोन क्षण विचार करू दे.” असे म्हणून रामा तिथेच मांडी घालून खाली बसला.
‘कुठे राहिलास तू मल्लूदेवा.’ रामा मनातच म्हणाला.
**********************************
इथे दुसरीकडे अजूनही मल्लूदेवा तो लाल रंगाचा दगड शोधतच होता. त्याच्या मनात तो दगड मागेच तर नाही ना राहिला असा विचार आला आणि तो मागे फिरला.
***********************************
“महाराज हा याचा नवीन प्रपंच आहे. याच्या डोक्यात फाशी पासून कसे वाचायचे याबद्दल विचार सुरु आहेत.” आचार्य म्हणाला.
**********************************
इथे दुसरीकडे अजूनही मल्लूदेवा तो लाल रंगाचा दगड शोधतच होता. त्याच्या मनात तो दगड मागेच तर नाही ना राहिला असा विचार आला आणि तो मागे फिरला.
***********************************
“महाराज हा याचा नवीन प्रपंच आहे. याच्या डोक्यात फाशी पासून कसे वाचायचे याबद्दल विचार सुरु आहेत.” आचार्य म्हणाला.
“बास! आता अजून वेळ आम्ही देऊ शकत नाही. या पंडितला लगेच फाशी देण्यात यावी.” राजाने आदेश दिला.
मंत्री देखील मनातून चपापले होते. त्यांनाही रामाला फाशी मिळावी असे वाटत नव्हते पण त्यांच्या हातात देखील काहीही नसल्याने ते फक्त जे समोर होतंय ते पाहत होते. आचार्य मात्र आनंदी झाला होता.
‘मल्लूदेवा आता तरी ये.’ रामा मनात म्हणाला.
इतक्यात त्याच्या तोंडावर पुन्हा काळे कापड टाकण्यात येत होते. ते टाकून होते न होते तोवर कसलासा आवाज झाला आणि रामाने हात झटकून त्या माणसाला बाजूला केलं. तो किंचित पुढे आला. राजाही त्याच्या आसनावरून उठून उभा राहिला होता आणि सगळेच जमिनीकडे आश्चर्याने बघत होते. काही क्षणात एक माणूस जमीन फाडून बाहेर आला. त्याच्या डोळ्यात माती गेली असल्याने त्याचे डोळे अर्धेच उघडे होते. त्याला पाहून महामंत्री आणि आचार्य देखील चकित झाले होते कारण शेवटी तो गोपण्णा होता.
“ही तर खजिन्याची जागा वाटत नाही. कुठे आहे खजिना?” तो म्हणाला आणि हळूहळू डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न करू लागला.
इतक्यात रामाने त्याला हाक मारली; “मल्लूदेवा!”
त्याने तिथे पाहिले. त्याला रामाला तिथे बघून आश्चर्य वाटत होते.
“हे सगळं काय आहे पंडित? तू तर माझ्या मागे असायला हवा होतास. इथे काय करतोयस? आणि तू म्हणाला होतास हा गुप्त रस्ता विजयनगरच्या खजिन्याच्या इथे उघडतो. कुठे आहे खजिना?” त्याने चिडून विचारलं.
“विजयनगरचा सगळ्यात मौल्यवान आणि खरा खजिना तुझ्या मागे आहे मल्लूदेवा.” रामा म्हणाला.
त्याबरोबर खुश होऊन त्याने मागे पाहिले. मागे राजा त्याच्याकडे रागाने बघत होता.
“मल्लूदेवा!” राजा रागाने म्हणाला.
“धोका! तू मला खूप मोठा धोका दिला आहेस पंडित.” तो रागाने म्हणाला.
इतक्यात महामंत्र्यांनी शिपायांना आदेश दिला आणि तो पळून जाणार इतक्यात त्यांनी त्याला पकडले.
“महाराज! हाच आहे कुख्यात आणि खरा चोर मल्लूदेवा. इतकंच नाही महाराज याने आजवर जितक्या चोऱ्या केल्या आहेत ते सर्व ऐवज कुठे ठेवलं आहे तेही मी सांगू शकतो. आत्ता या क्षणी जर त्याचे खिसे तपासले तर हाच मल्लूदेवा असल्याचे पुरावे देखील मिळतील.” रामा म्हणाला.
लगेचच महामंत्र्यांनी कोतवालला फक्त आवाज दिला तसे त्याने त्याचे खिसे तपासले.
“हे बघा महाराज तेच चिन्ह” कोतवाल म्हणाला.
“माफ करा महाराज. मी कबूल करतो ज्या चोराच्या तुम्ही शोधात होतात तो मीच आहे; चोर मल्लूदेवा. मी कबूल करतो शहरात ज्या चोऱ्या झाल्या त्या मीच केल्यात आणि एवढंच नाही तर महरणींची शाही फणी पण मीच चोरली. मी माझे सगळे गुन्हे कबूल करतो पण मला मृत्यदंड नका देऊ. मला माफ करा.” तो हात जोडून रडत म्हणाला.
“बघ बघ हा पंडित पुन्हा बाजी मारून गेला आणि आता म्हाताऱ्याचं तोंड बघ कसं झालंय जसा नासका आंबा चोखून कोणीतरी फेकून दिला आहे तसं दिसतंय.” धनी कुजबुजला.
“माफ करा महाराज सत्य तुमच्यासमोर आणायला खूप वेळ लागला पण माझ्याकडे हाच एक मार्ग होता या खऱ्या चोराला सगळ्यांसमोर आणायचा. हा निश्चिंत आणि निर्भय व्हावा म्हणूनच मी कोतवालवर खोटे आरोप लावले. सगळ्यांसमोर चोराला वाईट बोललो जेणेकरून याचा खोटा स्वाभिमान दुखावला जाईल आणि हा माझ्या जाळ्यात अडकेल. झालंही तसंच महाराज! याने माझे माझ्या कुटुंबासहीत अपहरण केले आणि माझ्यासमोर याचा खरा चेहरा उघड झाला. मला कळून चुकले की चोर दुसरा तिसरा कोणी नसून हा गोपण्णा आहे. मी याच्या लोभी वृत्तीचा फायदा करून घेण्याचे ठरवले. याला मी राजवाड्यात असलेल्या शाही खजिन्याची काल्पनिक गोष्ट सांगितली आणि या गुप्त भुयारी मार्गाचा रस्ता दाखवला. याचा परिणाम तुमच्या समोर आहेच.” रामा म्हणाला.
आचार्य डोक्यावर हात ठेवून याने चांगलंच डोकं लावलं आहे अश्या आविर्भावात सगळं बघत होता.
“हा बरोबर बोलतोय महाराज. याने आम्हाला आधीच याची सर्व योजना सांगितली होती आणि आमच्याकडुन मदत मागितली तेव्हा आम्ही या भुयारी मार्गाबद्दल याला सांगितले म्हणजे जे सत्य आहे ते तुमच्यासमोर येईल.” महामंत्री म्हणाले.
“घेऊन जा याला.” राजाने आदेश दिला.
तो “मला माफ करा महाराज, मला मृत्युदंड देऊ नका.” असे बडबडत होता पण शिपायांनी त्याला खेचत नेले.
आता राजा रामाकडे वळला. तो सिंहासनावरून खाली उतरला आणि बोलू लागला; “पंडित रामाकृष्णा! ज्या बुद्धी चातुर्याने तू खऱ्या चोराला पकडले आहेस आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केले आहेस ते खूप प्रशंसनीय आहे आणि आम्ही प्रसन्न आहोत.”
बोलता बोलता राजाने त्याच्या गळ्यातील सोन्याची माळ काढली आणि रामाला देऊ केली. आचार्य आणि त्याच्या शिष्यांचे तोंड बघण्यासारखे झाले होते तर रामाने साश्रू नयनांनी ती भेट स्वीकारली.
“हे माझं सौभाग्य आहे महाराज.” रामा म्हणाला.
सगळ्यांनी राजाचा जयजयकार केला. राजा तिथून जाऊ लागला तसे रामा म्हणाला; “पण महाराज माझे कुटुंब अजून मल्लूदेवाच्या लोकांच्या ताब्यात आहे.”
“काळजी करू नकोस. आता तुझ्या कुटुंबाची जबाबदारी आमची. आम्ही वचन देतो लवकरच तुझे कुटुंब सुखरूप तुझ्याजवळ असेल. महामंत्री जी!” राजा म्हणाला.
“आपले सैनिक आधीच त्याच्या ठिकाणावर जायला निघाले आहेत.” महामंत्री म्हणाले.
“धन्यवाद महाराज.” रामा म्हणाला.
राजा जाऊ लागला पण काहीतरी विचार करून तो पुन्हा मागे आला.
“पंडित रामाकृष्णा एक सांग, जर हा चोर इथे आलाच नसता आणि तुला शिक्षा झाली असती तर तुझी शेवटची इच्छा काय असती?” राजाने विचारलं.
“तर महाराज मी तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीचा मृत्यू देण्याची इच्छा व्यक्त केली असती.” रामा म्हणाला.
“इच्छा नक्कीच पूर्ण केली गेली असती पण नेमका कश्या प्रकारचा मृत्यू?” राजाने विचारलं.
“म्हातारपणीचा मृत्यू महाराज किंवा खोकला, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कंबरदुखी, गुडघेदुखी यातला कोणत्याही प्रकारचा मृत्यू चालला असता महाराज.” रामा म्हणाला.
त्याच्या बोलण्याने राजा खळखळून हसला. त्याचे बघून सर्वच हसू लागले.
“पंडित रामाकृष्णा खरंच तू असामान्य आहेस. आजवर आम्ही कोणत्याही माणसाला मृत्यू या विषयावर एवढा विनोद करताना नाही पाहिले. आम्ही खूप प्रसन्न आहोत तुझ्यावर. माग काय हवे ते माग. जे मागशील ते मिळेल.” राजा खुश होत म्हणाला.
रामाने काहीतरी विचार केला आणि बोलू लागला; “महाराज थोडे गवत मिळाले तर…”
“गवत?” राजाने आश्चर्याने विचारले.
“हो महाराज गवत.” रामा म्हणाला.
“महामंत्री जी! यांना गवत द्या. अजून?” राजाने विचारलं.
“गवत तर मिळाले पण गवत कोणाला खाऊ घालू? बकऱ्या तर नाहीयेत माझ्याकडे. बकऱ्या मिळाल्या तर.” रामा म्हणाला.
राजाने लगेच महामंत्र्यांना सांगितले. असे करता करता त्याने जीवनावश्यक वस्तू, थोड्या सुख सोयी, घर असे सर्व मागून घेतले.
“महामंत्री जी! याला काय हवे आहे ते तुम्ही आणि आम्ही समजून गेलो आहोत. याने जे मागितले आहे ते आणि जे मागणार आहे ते सर्व याला द्या.” राजा हसत हसत म्हणाला.
“जरूर महाराज.” महामंत्री म्हणाले.
त्याने एवढी मोठी भेट मिळवली हे बघून आचार्यला चक्करच आली. धनी मणीने त्याला धरले आणि सरळ उभे केले.
“जर तुमचे झाले असेल तर आम्ही येऊ?” महाराज म्हणाले.
“हो महाराज. धन्यवाद.” रामा हात जोडून म्हणाला.
राजा पुन्हा पुढे गेला आणि मागे आला.
“आचार्य!” राजाने तथाचार्यला बोलावले.
तो लगेच पुढे आला.
“आजकाल आपल्या दरबारातील वातावरण गंभीर झाले आहे. कोणतेही मनोरंजन नाही, कोणतेही विनोद नाहीत.” राजा म्हणाला.
“बरोबर आहे महाराज.” आचार्य म्हणाला.
“मग जो विचार आम्ही करतोय तोच तुम्हीही करताय का?” राजाने विचारलं.
“कोणता विचार महाराज?” आचार्यने विचारले.
“हाच की पंडित रामाला आपल्या दरबारात रुजू करून घ्यावे.” राजा म्हणाला.
आचार्यचे तर तोंड पडले पण रामा मात्र खुश झाला.
क्रमशः…..
Credit:- Sony SAB Tenali Rama serial.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा