*पंच्याहत्तर म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह..*
काल एका औषधीच्या दुकानातून औषधे घेत होतो.तिथे पंधरा-सोळा वर्षांचा एक मुलगा आला.त्याने पण काही औषधे घेतली. तो दुकानदाराला म्हणाला ,"काका किती रुपये झाले?" दुकानदार म्हणाला 75. मुलगा गोंधळला. 75 म्हणजे नेमके किती हे त्याला कळेना. तो हळूच म्हणाला,"काका! इंग्रजीत सांगा ना!"दुकानदार म्हणाला *सेवेंटी फाइव* मग मात्र त्याने नेमके पैसे काढले आणि दिले.हा सगळा प्रकार मी उघड्या डोळ्यांनी बघत होतो. महाराष्ट्रातील मराठी भाषिक मुलाला 75 रुपये म्हणजे किती? हे कळू नये याचं नवल वाटलं. हे अपयश नेमकं कुणाचे? असा प्रश्न पडला.महाराष्ट्राचे,मराठी भाषेचे, त्या मुलाच्या पालकाचे,की एकूणच शिक्षण व्यवस्थेचे.नेमके कुणाचे? हे आणि असे अनेक प्रश्न क्षणात माझ्या डोक्यावर मधमाशांसारखे डंख करत होते. काहीसा असाच अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल, येत असेल किंवा येईल.
*कॉन्व्हेंटीकरण* झालेल्या ह्या पिढीला मराठीतील अंक कळत नाहीत. त्यांना मोबाईल नंबर मराठीत सांगितला तर तो लिहिता येत नाही. ह्या मुलांची घरी मराठी भाषा असते. शाळेत ते इंग्रजी माध्यमातून शिकतात. आणि शाळेत आपसात हिंदी भाषा बोलतात. एकाच वेळी मराठी,इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषांची *खिचडी* त्यांच्या बोलण्यात आणि व्यवहारात आपल्याला दिसून येते.भाषा ही चांगली वा वाईट नसते तर भाषा ही भाषा असते.
बोलताना वा लिहितांना कुठलीही एक भाषा निवडावी. मात्र अट ही असावी की ती नीट बोलता यावी. निदान त्या भाषेचे ज्ञान आत्मसात करण्याची तयारी तरी असावी.भाषांची अशी घुसळन काही ठिकाणी ठीक आहे परंतु सर्वच ठिकाणी योग्य नाही.
दैनंदिन जीवनातील व्यवहार ज्यावेळी ह्या पिढीला करावे लागतील आणि त्यांचा संबंध आणि संपर्क पूर्णतः मराठी किंवा वर्हाडी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींशी येईल त्या-त्या वेळी 75 म्हणजे किती? हा आणि असे अनेक प्रश्न या पिढीला पडत राहतील यात शंका नाही. पालकांना वाटत माझा मुलगा खूप छान english बोलतो पण मुळात मराठी भाषिक लोकांना इंग्रजी भाषेच इतकं वेड का आहे? आपली भाषा चार चौघात बोलायला लाज वाटावी अशी नाही तिचा अभिमान असावा अशी आपली भाषा आहे.. आपल्या मराठी भाषिक लोकांनी मुलांना आवर्जून मराठी भाषा बोलायला शिकवावी.