लढा अस्तित्वाचा.. भाग- ७
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की शंकरने माध्यमिक शिक्षणासाठी मंगळवेढा इथे प्रवेश घेतला होता.. खेळाडू असल्याने नवीन शाळेतही फार लवकर तो लोकप्रिय झाला.. घरच्या मंडळींनी त्याच्या लग्नाचा विचार केला..अनुरूप मुलगी पाहून शंकरचं लग्न ठरवलं आता पुढे..
लढा अस्तित्वाचा.. भाग- ७
पूर्वीच्या काळी मुलांना पसंती वैगेरे विचारण्याची पद्धत नव्हती.. आणि मुलंही आईवडील ज्याच्या सोबत लग्न लावून देतील त्याच्या सोबत बोहल्यावर चढायची.. आईवडील जे करतील ते योग्यच असेल अशी भूमिका असायची.. शंकरचंही तसंच झालं..मे महिन्यात सुट्टीत तो सर्वांना भेटायला गावाला आला. आणि आईवडिलांनी त्याच्या लग्नाची बातमी देऊन धक्का दिला.. दहावीची परीक्षा सहा महिन्यांवर आलेली.. आधीच अभ्यास पूर्ण झालेला नव्हता.. त्यात ही मध्येच अनपेक्षितपणे लग्नाची घाई.. शंकरला काय करावं ते सुचेना.. आजवर कधीच आईवडिलांचा शब्द खाली पडू दिला नव्हता.. लग्नाला उभे राहिलो तर पुढच्या शिक्षणाचं काय? त्याने पाहिलेल्या स्वप्नांचं काय? सारंच मातीमोल होणार..!! शंकर दुःखी कष्टी झाला.. लग्न करायचं नव्हतं पण आईवडिलांच्या इच्छेखातर तो लग्नाला तयार झाला..
मंगळवेढा तालुक्यातील डोणज गावचे संभाजी..गावी दुष्काळ पडला आणि भाकरीच्या शोधात ते मुंबईत येऊन माजगाव डॉक येथे मजुरी काम करत होते.. मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.. गावातल्याच भल्या माणसानी त्यांना त्यांच्या मुलीसाठी 'सुलक्षणा" साठी शंकरचं स्थळ सुचवलं.. सुशिक्षित शंकरला कोणी नकार द्यायचा प्रश्नच नव्हता.. संभाजीची मुलगी 'सुलक्षणा'... नावाप्रमाणेच गुणी, गोरा रंग, दिसायला नाकी डोळी नीटस, पाहता क्षणी कोणालाही आवडेल अशीच होती…शंकरच्या कुटुंबीयांना ती आवडली आणि मुलगी पसंत आहे असं कळून लग्नाची तारीख काढायला सांगितली.. संभाजी ही बातमी ऐकून खूप आनंदी झाले..आणि लग्नाच्या पुढच्या तयारीला लागले..
१० जून १९६३ साली शंकरचा विवाह सुलक्षणाशी सुनिश्चित करण्यात आला.. लग्नाच्या वेळीस अवघी बारा वर्षांनी पोर ती.. लग्न, नवरा, सासर हे सारं उमजत होतं की नाही कोणास ठाऊक..!!पण आईवडिलांचा मान राखून लग्नाला तयार झाली.. मुलीच्या दारी म्हणजे माजगाव, भायखळा, मुंबई येथे विवाहसोहळा पार पडला.. शंकरचे आईबाबा, दिगंबर काका, काकू आणि मोजक्याच पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला..
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सुलक्षणा शंकरची धर्मपत्नी बनून, कुलवधू बनून आपल्या पतीसोबत, सासू सासऱ्यांसोबत आपल्या सासरी आली.. माप ओलांडून गृहप्रवेश झाला.. सासरी आपल्यावर लग्नानंतरच्या विधी झाल्या.. देवदर्शन झालं.. रोजचा दिनक्रम सुरू झाला.. शंकर परत शाळेत जाण्यासाठी निघाला.. सर्व कुटुंबीयांना निरोप देऊन शंकर आपल्या वसतिगृहात मंगळवेढा सोलापूरला आला.. वसतिगृहात आल्यावर सर्व मित्रांनी अभिनंदन केलं.. थोडी चेष्टा मस्करी झाली.. आणि थोड्यावेळाने सर्वजण आपापल्या वर्गात शाळेच्या तासाला जाऊन बसले. शंकरही स्वतःच आवरून आपल्या वर्गात जाऊन बसला.. इतक्यात शाळेतला शिपाई त्याच्या वर्गात आला आणि मुख्याध्याकांनी शंकरला बोलावले आहे असा निरोप देऊन आपल्या कामाला निघून गेला.. शंकर मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेर थांबला.. त्यावेळी भालेवाडी गावच्या तुकाराम पाटीलांचे सुपुत्र गोविंदराव पाटील हे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते.. त्यांनी शंकरला आत बोलवलं.. रागवल्यासारखे वाटत होते ते शंकरला जोरात ओरडून म्हणाले," तुला वर्गात बसता येणार नाही आधी आईवडिलांना भेटायला घेऊन ये..ते आल्याशिवाय शाळेत पाय ठेवायचा नाही..जा निघ..!!" शंकर घाबरला.. ताबडतोब एसटी थांब्यावर गेला.. लागलीच दुसऱ्या एसटीने गावाला निघून आला.. पाटील गुरुजींचा निरोप शंकरने घरी आईवडिलांना सांगितला..
दुसऱ्या दिवशी शंकर आई-वडिलांना घेऊन शाळेत आला.. मुख्याध्यापकांनी बोलून घेतलं गेणू आणि चंपा दोघेजण थोडे चिंतीत होते..काय झालं असेल? का बोलावलं असेल? शंकर सहित दोघेही संभ्रमात होते.. पाटील गुरुजींनी गेणूला दरडावत विचारलं," गेणू, तुम्ही शंकरचं लग्न केलंत..?तेही तो शिकत असताना.? इतक्या लहान वयात.? कधी सुधारणार तुम्ही? की आयुष्यभर असंच किड्यामुंग्यांसारखं जगत राहणार..? शिकून सवरून पुढं जायचं सोडून असंच दलदलीत खितपत पडणार? आता हा शंकर पुढे शिकणार नाही.. हा काही आता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही.. काढून टाका याचं नाव शाळेतून..आणि घरी बसवा.. शेतात नांगर ओढायला ठेवा.. काही होऊ शकत नाही आता याच्याकडून.. मला असा विद्यार्थी माझ्या शाळेत नको.. नापास होऊन शाळेचं नाव खराब करेल.. घेऊन जा त्याला तुमच्या बरोबर.." पाटील गुरुजी खूप संतापले होते.. प्रत्येक शब्दांचे वार गेणू आणि चंपाच्या हृदयावर होत होते..दोघेही भयभयीत झाले.. क्षमायाचना करत होते.. गेणू हात जोडून विनवणी करत म्हणाला,"गुरुजी चुकी झाली.. आमच्या घराण्यात शंकर माझा शाळा शिकलेला पहिला मुलगा.. आजपर्यंत कुणीच नाही इतकं शिकलं.. आमची लई आशा हाय त्याच्यावर.. एवढ्या बार माफ करा गुरुजी.., माझा शंकर लई हुशार हाय.. तो करील अभ्यास.. हुईल पास.. मेहरबानी करून त्याला नको शाळेतनं काढू" पण पाटील गुरुजी खूप चिडले होते.. तो कोणाचंच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हते..त्यांनी त्या सर्वांना जायला सांगितलं.. शंकर आपल्या आईवडिलांना घेऊन परत आपल्या गावी निघाला.. पूर्ण रस्ताभर शंकरचे डोळे वाहत होते.. डोळ्यांपुढे फक्त अंधार होता.. "संपलं सगळं…!! आपलं भविष्य आता अंधारमय होणार..माझी स्वप्नं धुळीस मिळणार.. माझ्या एका चुकीमुळे सारं उध्वस्त होणार" शंकर मनातल्या मनात स्वतःशीच बडबडत होता..
भालेवाडीला परत आल्यावर गेणूने गोविंद पाटलांच्या वडिलांची म्हणजेच तुकाराम पाटलांची गाठ घेतली.. सगळी परिस्थिती कथन केली.. आणि शंकरसाठी त्यांच्या मुलाला म्हणजेच गोविंदराव पाटील गुरुजींना समजावून सांगण्यासाठी गयावया करू लागला.. तुकाराम पाटलांनी 'मी बोलतो गोविंदशी.. तू काळजी करू नकोस" असं बोलून त्यांनी गेणूला निश्चिंत राहण्यास सांगितलं..
दुसऱ्या दिवशी शंकर आपल्या वडिलांसोबत पुन्हा पाटलांच्या वाड्यावर आला.. तुकाराम पाटलांनी आपल्या मुलाला समजावून सांगितलं.. "या वयात मुलांची लग्न होतात त्यात काही विशेष नाही.. लग्नाचा शंकरच्या शिक्षणावर काही परिणाम होणार नाही.. तो करेल अभ्यास आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल.. मला खात्री आहे..तू त्याला एक संधी दे.." आपल्या वडिलांचे बोलणं ऐकून गोविंद गुरुजी थोडे शांत झाले.. त्यांचा रागाचा पाराही हळूहळू कमी होत गेला.. आणि शंकरला त्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी वर्गात बसण्याची परवानगी दिली.. शंकरला आणि गेणूला अत्यानंद झाला.. डोळ्यांत आसवं उभी राहिली आणि दोघांनीही मनोभावे हात जोडून गुरुजींचे आणि तुकाराम पाटलांचे मनापासून आभार मानले.. मनात देवाचे, आणि दोघा बापलेकांचे आभार मानत घरी परतले..
शंकरही मनातून खूप आनंदून गेला होता..तो जोरात अभ्यासाला लागला.. दिवसरात्र एक करून अभ्यास करू लागला..
काय होतं पुढे? शंकरला आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागेल का? पाहुया पुढील भागात..
क्रमशः
©®निशा थोरे..