लढा अस्तित्वाचा.. भाग- १४
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, सुधाकररावांच्या निधनानंतर कमलाबाई निराधार झाल्या.. कमलाबाईंच्या सावत्र मुलांनी त्यांची जबाबदारी नाकारली..वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं घर आणि संपत्ती बळकावून त्यांना बेघर करण्याचा कट होता.. पण शंकर कमलाबाईंच्या पाठीशी उभा राहिला त्यांना न्याय मिळवून दिला आता पुढे...
लढा अस्तित्वाचा.. भाग- १४
आज शंकर खूप आनंदात होता..कमलाबाईंना न्याय मिळवून देण्यात त्याला यश आलं होतं.. अन्यायाविरुद्धचा पहिला लढा तो जिंकला होता.. कंपनीतून दोघे बाहेर पडत असताना कमलाबाईंच्या डोळ्यांत आसवं होती.. शंकरविषयी कृतज्ञतेची भावना होती..एका मानस पुत्राने रक्ताचं नातं नसतानाही तिला मदत केली होती..एका निराधार स्त्रीचा तो आसरा बनला होता.. खरंतर 'कुणीच कुणाचं नसतं' हे खोटं असावं.. कुणीतरी कोणाचं तरी नक्की असतंच.. एक दिव्यशक्ती माणसाला माणसाशी जोडत असते.. कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या, कधी मैत्रीच्या.. पण कालांतराने रक्ताची नाती पुसट होऊन जातात पण हीच मानलेली, जोडलेली नाती मदतीला धावून येतात.. याचा प्रत्यय त्यांना येत होता.. समाधानाने त्या कंपनीच्या बाहेर पडल्या..दोघेही बस मध्ये बसले.. शंकरने जी.पी.ओ. पोस्ट ऑफिसची दोन तिकीटं बस वाहकाकडून मागून घेतली त्यांना तिकिटांचे पैसे दिले.. कमलाबाईंना समजेना.. त्यांनी शंकरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं..शंकरने स्मित हास्य करत हातानेच 'थोडा वेळ वाट पहा' असा इशारा केला..कमलाबाई शांतपणे बसच्या खिडकीतून बाहेरची वर्दळ पहात बसल्या..
काही वेळातच त्यांचा बसथांबा आला.. दोघेही पोस्ट ऑफिस मध्ये पोहचले.. शंकर म्हणाला," काकू तुमच्याकडे जी रक्कम आहे त्याची आपण मुदत ठेव करणार आहोत.. तुमची मुद्दल रक्कम जपून राहील आणि त्या रक्कमेवर प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या व्याजावर तुमचा खर्च भागेल.. तुम्हाला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही.. तुमचा नीट उदरनिर्वाह होईल" कमलाबाई लगेच तयार झाल्या.. त्यांची रक्कम जपून राहणार होती.. त्यांच्या भविष्यातील अडीअडचणीला ही रक्कम उपयोगी पडणार होती..आणि पोटा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला होता.. शंकरने मिटवला होता..
घरी आल्यानंतर कमलाबाईंच्या तोंडून आपल्या नवऱ्याचं कौतुक ऐकून सुलक्षणा हरकून गेली होती.. देवापुढे दिवा लावून साखर ठेवली.. सर्वांवरचं संकट दूर केलं म्हणून त्या ईश्वराचे आभार मानले.. रात्री कमलाबाईनी घरी गोडधोड बनवलं कमलाबाई खूप आनंदात होत्या. जोडलेल्या नात्याने खूप मोठा आधार दिला होता.. सर्वजण आनंदात होते..
रात्री झोपताना शंकरच्या मनात विचार येत होता.. " किती आनंद मिळाला मला..!! एका माऊलीला आपण न्याय मिळवून दिला.. 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' हे आताशिक कुठं उमगलं आपल्याला.., अशी कितीतरी पीडित दुःखी माणसं असतील आपल्या समाजात.. ज्यांना आपली गरज असेल.. त्यांना न्याय मिळत नसेल.. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं.. हा आनंद आपण मिळवायचा" या विचारात तो झोपी गेला..
दुसऱ्या दिवशी शंकर उठला तोच मुळी एक नवा ध्यास घेऊन..एक नवीन पर्व सुरू झालं होतं.. समाजसेवेच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं.. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना सर्वांची काळजी घेत असताना कामाचा व्याप सांभाळून त्याने स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं.. पोस्ट ऑफिसमध्येही सर्वांच्या अडचणी तो ऐकून घ्यायचा..खरंतर हल्ली ऐकून घेणारे कान हरवलेत.. चांगलंच माहीत होतं त्याला.. म्हणून तो त्यांचे 'ऐकून घेणारे कान' झाला.. शंकर सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना मार्गदर्शन करायचा..कधी आर्थिक मदत करून आधार द्यायचा..त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये तो सर्वांचा लाडका अधिकारी झाला होता.. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट कामगार युनियनचा तो अध्यक्ष झाला.. त्यामुळे कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढतच चालला होता.. कामे उरकण्यासाठी दिवस कमी पडू लागला..
इतका सारा व्याप वाढलेला असतानाही शंकर आपल्या आई वडिलांना, आपल्या गावच्या नातेवाईकांना कधीच विसरला नव्हता..शंकरचा धाकटा भाऊ , श्रीहरी कॉलेजला जात होता..शंकर कायम त्याला पैसे पाठवत असायचा.. प्रत्येक महिन्यात त्याची आपल्या वडिलांच्या नावे मनीऑर्डर असायची.. अधून मधून गावी गेला की त्यांना पैशांची मदत व्हायची.. आपल्या अशिक्षित भावांच्या मुलांच्या शिक्षणाची, मुलींच्या लग्नापासून सर्व जबाबदाऱ्या त्याने आपल्या खांद्यावर घेतली होती.. त्या पार पाडण्यासाठी आर्थिक दृष्टीने सक्षम होण्याची गरज होती आणि म्हणूनच शंकरने आता शिकवण्याही वाढवल्या होत्या.. त्याने वेळेचं आणि पैशाचं नियोजन अगदी योग्य रीतीने केलं... आता तो फक्त आठवी,नववी, दहावीच्या मुलांचे हिंदी आणि मराठीचे तास घेत होता..बऱ्यापैकी मोठं घर असेलतर वेगवेगळ्या ठिकाणी न जाता तिथेच बोलावून वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी उत्तम रीतीने हाताळत होता.. अशाच एका विद्यार्थ्यांला शिकवत असताना एक सुवर्णसंधी चालून आली.. आणि शंकरच्या नशिबाचे दार ठोठावू लागली.. आणि काय आश्चर्य..!! त्या संधीचा शंकरने पुरेपूर उपयोग करून घेतला.. आणि त्याचा भाग्योदय झाला..
शंकर माजगाव मध्ये राहणाऱ्या आठवीत शिकणाऱ्या जॉनची शिकवणी घेत होता.. त्याचे वडील नेव्हीमध्ये होते.. पूर्ण वर्षभर ते बोटीवरच असायचे.. आणि वर्षातून एकदा ते सुट्टीला घरी यायचे.. अगदी दोन तीन महिने आपल्या कुटुंबासमवेत राहून मग पुन्हा आपल्या कामावर निघून जायचे.. या वर्षीही ते घरी आले.. शंकरची त्यांची ओळख झाली.. स्नेह वाढला.. एक दिवस काय झालं..!! त्यांनी शंकरला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले.. शंकरने त्यांचं आमंत्रण मनापासून स्वीकारलं आणि तो घरी आला.. जॉनच्या आईने छान जेवणाचा बेत केला होता.. गप्पा गोष्टी करत जेवणं उरकली.. बोलता बोलता चर्चेत जॉनच्या वडिलांना हे समजलं की शंकर भाड्याच्या घरात राहतो.. कुटुंबाची जबाबदारी आहे..शंकर विनंती करत त्यांना म्हणाला," तुमच्या पाहण्यात एखादी खोली असेल तर सांगा.." जॉनच्या वडिलांनी विचार केला आणि म्हणाले," उद्या सकाळी येऊन भेटा" होकारार्थी मान डोलावून शंकरने त्यांचा निरोप घेतला..
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे शंकर जॉनच्या वडिलांना येऊन भेटला.. त्यांचे एक मित्र निवृत्त होऊन आपल्या गावी म्हणजे गोव्याला कायमचे परतणार होते.. त्यांची एक खोली रिकामी होणार होती आणि त्यांना ती विकायची होती.. जॉनच्या वडिलांनी शंकरला ही माहिती पुरवली.. त्या दोघांची भेट घालून दिली आणि व्यवहार बसवून दिला.. खोलीचा व्यवहाराची सोळा हजार रुपये ही रक्कम ठरली होती.. शंकरने जमवाजमव करून ती रक्कम त्यांच्या सुपूर्त केली आणि खोलीचा ताबा घेतला.. आणि मुंबई सारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी आपली स्वतःचं हक्काचं घर झालं..अजून एक स्वप्नं पूर्ण झालं होतं.. शंकर आता मुंबईकर झाला.. मग शंकर आपल्या कुटुंबासमवेत स्वतःच्या नवीन घरी राहायला आला.
काळ पुढे सरकत होता.. काही दिवसानंतर रात्रीच्या विद्यालयातून शंकर पदवीधर झाला.. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी शिकवत असताना अर्थ इंग्रजी भाषेतून समजून सांगताना ती भाषा त्याला कठीण जायची.. त्या विषयाचं त्याला दडपण यायचं त्याच विषयात तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.. एक एक यशाची पायरी तो चढत होता.. ध्येयवेड्या मुलाचा प्रवास दिवसागणिक अजूनच कठीण होत जात होता.. तरीही शंकर थांबला नाही..चालत राहिला.. न कंटाळता.. न दमता..
छोटासा राजराणीचा सुखी संसार सुरू होता..शंकरची मुलंही आता मोठी होत होती... प्रमोद, प्रसाद, प्रशांत आणि सई आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिकत होते.. कायम अभ्यासात अग्रेसर असायचे.. शंकरचा धाकटा भाऊ दिनकर त्यांचाही परिवार मोठा होत होता.. एका लहान खोलीत शंकर आणि सुलक्षणा आणि त्यांची चार मुलं त्याचबरोबर दिनकर आपल्या पत्नी समवेत राहत होता.. मुलं मोठी होत होती.. प्रमोदने शालेय जीवन संपवून महाविद्यालयात प्रवेश केला होता.. पाठोपाठ प्रसाद आणि सई सुद्धा पुढच्या वर्गात जात होते.. सई यावर्षी दहावीला गेली होती.. मुलांचा अभ्यास होत नव्हता...जागा अपुरी पडू लागली..
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात...
क्रमशः
निशा थोरे..