केतकीच्या वनी,नाचला ग मोर.अंतिम भाग
हिरवीकंच लाल काठाची साडी,विविध फुलांपासून बनवलेले अलंकार कमरपट्टा, बाजूबंद, माळा ,केसात सुगंधी मोगऱ्याची सर आणि दिवसभरात आल्याने चेहऱ्यावरील वात्सल्याचे तेज.आज वेणू फुलरणीच भासत होती.अक्काबायने लागलीच नजर उतरवली.उमाबाईंनी स्वतःच्या डोळ्याचे काजळ तर्जनी वर घेऊन वेणूच्या कानामागे लावले.
डोहाळेजेवण सोहळ्यासाठी नाना-सुलभाताई खाऊ, विविध भेटवस्तू घेऊन आले.मंजू तर वहिनीचा थाट करण्यासाठी दोन दिवस आधीच उत्साहाने देशमुख वाड्यात हजर झाली होती.कालच चांदण्यातली डोहाळे जेवण झाले होते आज उद्यानातले म्हणजे घरच्या बागेतील डोहाळे जेवणाचा मुहूर्त होता. म्हणून वाड्याच्या बागेतच उमाबाईंनी मुकुंदाकरवीे झोपाळा बांधून घेतला होता. हौसेने पाना फुलांनी सजवला देखील होता.योग्य मुहूर्त साधत सुलभाताई ने प्रथम ओटी भरली नंतर बाकी चार ओटी भरून झाल्यावर, झाकलेल्या जिन्नस काढावयाचा वेळ आली. चौफुली चौरंगावरील तबकात पाच जिन्नस वाटीत झाकून तयारच होते.
"चला वहिनीबाई उघडा एक वाटी."मंजू तबक वेणू समोर सारत म्हणाली.वेणुने हळूच स्वारिंकडे पाहिले ,मुकुंदाने नजरेनेच होकार भरला.सगळ्यांना उत्सुकता होतीच. वेणूने एका वाटीवरील झाकण सरकवले त्यात साखरपेठा निघाला ."वा वहिनी बाई खुश केलत घ्या तुम्हालाच भरवते".
वेणूच्या सगळ्या हौशी उमाबाईंनी आवडीने पुरवल्या. वेणू अगदीच आनंदाने हरखून गेली.उदरातील इवल्याशा जीवाने ही हालचाल करून आनंदाची गवाही दिली.
नवव्या महिन्यात डोहाळे जेवन असल्याने जास्त बसून वेनुस कमरेस रग लागली होती . अक्काबाईचा हात धरत हळूहळू सज्जात येऊन निवांत बसली.
"आम्ही मुकुंदास पाठवितो ,आम्हास जरा आवराआवर करावयाचे आहे" म्हणत अक्काबाई बागेत आल्या मुकुंदास म्हणाल्या "जरा सज्जात जा बरे .वेणू एकटी बसून राहिली तर मन हळवे होईल.या दिवसात अंतर्बाह्य बदल घडत असतात स्त्री मध्ये. अशा अवस्थेत तूच सावरू शकतोस वेणूस."
मुकुंदा सज्जात येऊन वेणू समोर वेताची खुर्ची ओढून बसला." आज तुमच्यामुळे सगळेजण किती भरून पावले आहेत ,ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय". वेणू च्या हातावर हात ठेवत मुकुंदा म्हणाला.
" हे सुख इथे आहात म्हणून अनुभवता येतय तुम्हास " होय हो खरं आहे पण आता तो विषय,ती खंत ठेवू नका मनात आम्ही शब्द दिलाय तुम्हास. स्वप्नांची तुम्ही दाखवलेली वाट भावली आम्हाला. त्या अनुषंगाने आम्ही मार्गस्थ आहोत आणि यशस्वी होत आहोत. पुरे आता खोलीत जाऊन पडा जरा वेळ .आराम जीवास दगदग जास्त नको."
सांजवेळी सुदामा धापा टाकीत देशमुख वाड्यावर आला.आक्काबाय गौरीस कळा सुरू झाल्या आहेत." हे ऐकताच मुकुंदा म्हणाला बग्गी जुंपून वहिनींना इथे दिंडी दरवाजाच्या बाजूच्या खोलीत घेऊन ये .येथे सोयीस्कर होईल अक्काबाय,अनुभवी दाई आहेतच मदतीला. घाबरू नकोस ,सगळे सुखरूप होईल ."मुकुंदा सुदामास धीर देत म्हणाला.
थोड्याच अवधीत गौरीचे सुखरूप सुटका झाली कन्येच्या रूपात लक्ष्मी आली.अक्काबाय लगेच वर कामाला लागल्या. गरम-गरम रव्याचा घाटा गौरीस करून दिला.
सगळे आटोपून नीजावयास गेले.रात्रीची पहिली प्रहर उलटल्यावर वेणूूस पोटात कळ जाणवली.थांबून थांबून कळांचा वेग वाढू लागला तशा वेणूच्या कण्हण्याने मुकुंदास जाग आली.त्याने त्वरित अक्काबाय,उमाबाईस उठविले .आक्काबायने वेणूसाठी बाळंतीणीची खोली आधीच तयार ठेवली होती.हळूहळू चालत तीस खोलीत आणले.मायफळाची मात्रा उगळून दिली, साजूक तूप घालून शेवयांचे कढत पाणी बळेच प्यावयास दिले.
कळा असह्य झाल्याने वेणू वैतागली.आम्हाला नाही सहन होत आहे हो आता. वेदनेने कळवळत वेणू बोलली.
"तुम्ही सहनशील आहात हे सहन करण्याची ताकद तुमच्यात आहे, अजून थोडा अवधी धीर धरा,हे आवाहन तुम्ही समर्थपणे पेलू शकता .काळजी करू नका."मुकुंदा वेणूस म्हणाला. कळांच्या वेदनेने वेणू दमली. शुद्ध हरपत चालली होती तीची.आक्काबाय वेणूस गालावर थोपटत जागृत करीत होत्या.पण पुन्हा तेच....प्रसंगाचे गांभीर्य मुकुंदाच्या लगेच लक्षात आले होते पण वैद्य म्हणून कसोशीने यथायोग्य प्रयत्न करणे कर्तव्य होते.योग्य काळजी घेऊनही समयी बाळ आडवे झालेच.दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसाच ..मोठी पंचाईत येऊन ठेपली वेणूस असह्य वेदना होऊ लागल्या.कठीण अवस्थेत बाळ अडकले .
आक्काबाय तर घामाघूम झाल्या. प्रसंग जिकरीचा येऊन उभा राहिला.सगळेच तगमगीत होते.दाईच्या मदतीने मुकुंदाने हळुवार बाळाची दिशा बदलली लगेचच वेणुस तीव्र कळ आली ,हाताची बोटे घट्ट आवळली गेली त्यासरशी बाळ मुकुंदाच्या हाती आले.बाळास त्वरित आक्काबायच्या हाती सोपवत मुकुंदाने जड मनाने पुढील सोपस्कर पार पाडले.
उमाबाईंनी अंघोळ घातली कोमट पाण्याचे हबकारे मारले, चिमटे काढले पण बाळाचा आवाज काही निघेना .मनात शंकेची पाल चूकचुकली.त्यांनी घाबराघुबरे होत ,मुकुंदास जोरात हाक दिली .
मुकुंदा उद्विग्नपणे दिंडी दरवाजाबाहेर उभा होता.नयनात अश्रु साचले होते.मागून सुदामा ने खांद्यावर हात ठेवीत विचारले "काय झाले? असा का उभा आहेस?"
वेणूच्या प्रचंड वेदना पाहून मन हेलावले रे आमचे. किती डोंगरा पेक्षाही मोठ्या वेदना सहन कराव्या लागल्या त्यांना आम्ही एक वैद्य असूनही त्यांची तळमळणे पाहून आमचे मन हेलावले.नियती पण कसे उलटेपालटे फासे टाकीत असते आधी मरणप्राय यातना आणि मगच वात्सल्याचे दान?जणू काही काळाच्या द्वारातून पुन्हा परत येऊन उपहारातील जीवन जगणेच. या सगळ्यांनी मन उदासले आहे.
"कारण त्या तुझ्या अर्धांगिनी आहेत .अर्धभार्या म्हणजे तरी काय रेआपल्याच प्रतिरुपीदेहात वावरणारा आपलाच आत्मा. देह जरी भिन्न असले तरी भावभावनांना समरसून जाणारे चैतन्य एकच ...भर दुपारी सावली देखील आपली नसते तेव्हा एकमेकांच्या शिरावर सावली धरणारे हे अद्भुत नाते असते आणि अथांग सागरासारखे हळूहळू फुलत-उलगडत जाते त्यास किनारा असा नाहीच ".
"खरंय याची खात्री पटली आज आम्हास. कारण वेदना त्यांना होत असल्या तरी आम्ही कळवळत होतो.
तोच उमाबाईंची हाक आली .
"बघ रे मुकुंदा मुकुंदा बाळ निपचित पडलंय.आम्हाला तर भीती वाटतेय "...
मुकुंदाने बाळास हाती घेतले.हळूहळू थापटा मारल्या,.... हलवून पाहिले.......,बाळाची प्रतिक्रिया शून्यचं...क्षणावर तोही घाबरलाच....
नाडी परिक्षण केले.सरते शेवटी बाळाच्या तळपायास एक टिचकी मारली .त्याबरोबरच टयाह....टयाह....आवाज देशमुख वाडाभर घुमला आणि सगळ्यांनी एकच सुस्कारा सोडला..डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
इवल्याशा बाळाच्या स्पर्शाने मुकुंदा हर्षभरीत झाला.स्वतः जाऊन वेणूच्या बाजूला बाळास ठेवले.वेणू प्रसूती वेदनांनी थकून म्लान झाली होती तरी बाळास पाहताच सरसावली...टपोरे डोळे, गोबरे गाल ,काळेशार जावळ पाहून तिचा थकव्याचा शीण क्षणात विरला.तीने पटकन बाळास जवळ घेतले.अतीव वात्सल्याने हर्षविभोर झाली.त्याक्षणी झाडावर भारला चकोर दिसला आणि देशमुखांचा वारस वेणूच्या मांडीवर खुदकन हसला.
मुकुंदा मनातच म्हणाला वेणूच्या रूपात गोंदणनक्षीचे अत्तर कुपिच लाभली आहे आपणास.आयुष्यभर काळजा पाशी जपून ठेवूया.
कधी गहिवरते ,कधी धीर सुटतो,तर कधी पापणीत साचते,कधी अंतरंगात रंगते,स्वप्नरंगात थांबते.असेच तर असते ना सहजीवन.....आणि या सर्वांना जोडणारा प्रेमळ रेशीमधागाच तर असतो.अशाच खाचा खळग्यातुन ,गोड कडू प्रसंगातून ,उभयतांचे सहजीवन प्रेमाने अधिकाधिक घट्ट होत असते. एकमेकांच्या सोबतीने,मदतीने आयुष्याचा अवघड गड मजल दर मजल सर होत असतो,बरोबर ना?
©
आपल्याच परिचयाच्या
चौधऱ्यांच्या सुनबाई (गायत्री)
गाठभेट
सस्नेह वाचक,
विषय मिळाला होता लग्नानंतरचे प्रेम त्याअनुषंगाने प्रपंचातील परंपरा ,सण,मैत्री,नाते,सृष्टी सृजन ,स्त्री भावविश्व,स्वप्न ,खमंग पदार्थांची मेजवानी,हुलकावणी देणारी संकटे असे बरेच काही साध्य करण्याचा प्रयत्न करत शब्दश्रुखला आपल्यासमोर येत गेली.. .....आशा आहे आपणास आवडली असेलच.कथेतील कुठला प्रसंग जास्त भावला कंमेंट करून नक्की कळवा.......अशीच नवीन एखादी कथा वाचायला आवडेल का आपणांस?
भेटू पुन्हा नवीन कथेसह......
छान छान वाचत राहू,आनंदी राहू.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा