Login

कावळा शिवलेली आई

Kavla Shivleli Aai


अधोक्षज च्या बालपणीच काही शब्द कानावर पडले आई "बाहेरची" झालीय, आईला कावळा शिवलाय आईला शिवू नको, त्यावेळी फार नवल वाटायचं की हा नेमका काय प्रकार आहे, तो आईला विचारायचा मग कसा शिवला तुला? डोक्यावर आला का? वैगेरे वैगरे अशा प्रश्नानी ती सैरभैर व्हायची तिला त्याला काय आणि कसं सांगायचं समजायचं नाही, नाईलाजस्तव म्हणायची तू मोठा हो तुला कळेल, तरीही ती दोन भावंड अधोक्षज आणि प्रद्युम्न म्हणायचे तूला कावळा शिवायला तू बाहेरच का जातेस?? अजिबात जाऊ नकोस, तेंव्हापासून कावळा म्हणलं की फार त्वेषाने ते दोघं त्याच्याकडे बघायचे त्यांचं घर पौरोहित्य करून आपला उदरनिर्वाह करणार, त्यामुळे आपसूकच घरात ते चार दिवस पाळाव लागायचं.
             स्त्री ही मुळातच सोशिक, सहिष्णु,संवेदनशील त्यामुळे तिच्या विचारांना तिलांजली देऊन पुरुषी अहंकार वापरत भारतात आजही कित्येक घरी ही पाळनुक आहे त्यापैकीच त्यांचं घर.त्या चार दिवसात घरात आजी आत्या स्वयंपाक, घरची काम करायच्या, जेवायला दोघही आईबरोबर बसत असतं, आजी आईला वाढताना वरून वाढायची, लहान होते त्यामुळे भूक लागली की आईच्या ताटातल खायचं पण ती बिचारी कधी कधी अर्धपोटी जेवणावरून उठायची त्यात आई , आत्या आईला कमीच जेवण द्यायच्या त्यात ती दोन्ही भावंड, तरीही न काही बोलत मुकाट्याने ते सहन करायची त्यावेळी त्या दोघांना फार प्रश्न पडायचे का वरून वाढलं जात आईला? कुतूहल हे असायचं की का आईला वेगळं ठेवतात? का तिला शिवत नाहीत?  त्या स्त्रिया असून देखील एका स्त्रीशी असं कसं वागू शकतात हा त्या कोवळ्या जीवांना नेहमी पडलेला प्रश्न असायचा, पण त्याची तर काय चूक म्हणा समाजाने लावून दिलेल्या दांभिक चौकटीत त्या राहू पाहत होत्या.
           हळूहळू दिवस सरत होते साधारण  सातवी ला असतील आता त्यांचं कुटूंब वेगळे राहायला लागलं होत, पण सगळं तसच होत, जरी त्या दिवसात आईला शिवल तर अंघोळ करायला लागायची आणि  महत्त्वाचे जेवणाची अडचण व्ह्यायला लागलेली मग गल्लीतल्या काकू त्या दोघांकडे बघून द्यायच्या पण आपल्यामुळे लोकांना कशाला त्रास द्यायचा म्हणून त्यांच्याकडून जेवण आणण बंद केलं, दरम्यानच्या काळात एक गोष्ट चांगली झाली आईने सगळं जेवण अधोक्षज ला शिकवलं, भात, आमटी, भाजी आणि पोळी .
             दिवसा मागून दिवस  गेले तसं कळत राहील की निसर्गाने स्त्रीला एक  मोठं वरदान दिलय ती \"पाळी\" नसती तर आज हे लिहायला मीही नसतो.आज बाहेरच्या विश्वात फिरत असल्यामुळे, हाती पडत असलेल्या पुस्तकांमुळे विचारांमधील बदल, प्रगल्भता येणं अपेक्षित होत, कळालं की रजस्वला म्हणजे काय, काय होतं, त्या दिवसात नेमके कोणते प्रश्न डोळ्यासमोर असतात, आपल्या संस्कृतीचा नक्कीच त्यापाठीमागे एक विशिष्ट हेतू आहे असं मला वाटत,त्या काळात तिला मानसिक, शारिरिक थकवा येत असतो, म्हणूनच तिला कोणतंही काम न लावता निव्वळ आराम मिळावा यासाठी केलं असावं,आणि पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्यामुळे त्या काळी ते चालायचं,दरम्यानच्या काळात तिला फार मानसिक आधाराची गरज असते तो आधार तिचा सखा, प्रियकर बनून नवऱ्याने देणं अभिप्रेत आहे, स्वच्छता ठेवण फार महत्वाच, आजही त्यांची आई पाळते पण भविष्यात त्या दोघाच्या होणाऱ्या धर्मपत्नी चं काय ? त्यांना असच जगावं लागेल? त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करायला हवा ना ??  पण तरीही मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो तिला ते चार दिवस बाहेर बसवणं योग्य ?? तिला न शिवण योग्य? ज्या योनीतुन जन्म झाला ती खरंच अपवित्र असू शकते ??
शब्दांकन -  सुहास
सदर लेखात कोणाच्या भावना(धार्मिक) दुखवण्याचा हेतू नाही.