काटेरी वाटेवरून चालताना... भाग 76 अंतिम

Abhijit ne anadishi lagn kel ani sarv chan zal

काटेरी वाटेवरून चालताना भाग76 अंतिम


आधीच्या भागात आपण पाहिले की,

लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती, नवरदेव घोड्यावर बसून आलेला, मंगलाष्टक झालेली, पण हार घालायचा वेळी निनादने लग्नाला नकार दिला आणि त्याने आनंदीला कॅरेक्टरलेस ठरवलं. लग्न न करताच तो तिथून निघून गेला. मागोमाग त्याच्या घरचे गेले, त्यानंतर सगळे पाहुणे मंडळी निघून गेले. 

प्रिन्सिने आनंदीला सावरलं आणि तिला खोलीत घेऊन गेली.
“आनंदी काय झालं? तू मला सांगणार होतीस पण काही बोलली नाहीस. बोल आता, तो तुला कॅरेक्टरलेस का बोलला?”
प्रिन्सिने खूपदा विचारलं तेव्हा आनंदीने घडलेली सगळी घटना सांगितली.  प्रिन्सिने सगळं तिच्या आईबाबांना सांगायला सांगितलं.

आता पुढे,

दोघीही खोलीतून बाहेर यायला निघाल्या, तर दारात अभिजीत उभा होता. दोघींचं बोलण अभिजीतने ऐकलेलं होतं. तो लगेच आत आला आणि त्याने दार लावून घेतलं.
अभिजीतकडे बघून आनंदीने मान खाली घातली.

“सर तुम्ही इथे?”
“आनंदी इतकी मोठी घटना घडली आणि तू मला सांगितले देखील नाही.” अभिजीत

“सॉरी सर पण मी तुम्हाला काय सांगणार होते, निनाद सोबत माझं लग्न होणार होतं. त्यामुळे तो जसा म्हणेल तसं मला वागावचं लागलं, माझा नाईलाज होता. माझी इच्छा नसतानाही मी त्याच्यासोबत तिथे गेले आणि आता लग्न होणार म्हणून मी ही गोष्ट कुणालाही सांगितलेली नाही.” आनंदी


“आणि आता तू  तुझ्या आई बाबांना सांगणार होतीस?” अभिजीत

“हो, माझ्या समोर कुठलाही पर्याय नाही. त्यांना सगळं कळायला हवं. माझी काहीही चूक नसताना शिक्षा मला मिळत आहे. मी चुकीची नाही हे त्यांना कळायला हवं. माझी खरचं काही चूक नाही.” आनंदीला पुन्हा रडायला आलं.

“नाही, तू आता हे सगळं तुझ्या आई बाबांना सांगणार नाही आहेस?” अभिजीत

“पण का सर?” आनंदी


“आनंदी आधीच तुझ्या आईला किती त्रास, त्यात अजून भर घालू नकोस. त्या माऊलीने खूप सहन केलंय. आता त्यांना अजून काही त्रास व्हायला नको.” अभिजीत बोलत होता आणि आनंदी त्याच्याकडे बघत होती.
‘खरचं सर इतके चांगले असू शकतात? की इथेही माझा विश्वासघात होतोय. सर इतके चांगले बोलत आहेत, आई बद्दल इतका विचार करत आहेत.’ आनंदीचे विचार सुरू होते.

“काय विचार करत आहे आनंदी.”  अभिजीत
आनंदी विचारातून बाहेर पडली.

“तू बाहेर चल.” असं म्हणत अभिजीतने आनंदीचा हात पकडला आणि तो तिला बाहेर घेऊन गेला.
दोघेही बाहेर गेले, त्या दोघांना असं बघून विक्रम आणि निशाला आश्चर्य वाटलं.

ते बाहेर आले आणि सर्वांसमोर अभिजीतने बोलायला सुरुवात केली.

“मी आनंदीशी लग्न करायला तयार आहे.” असं म्हणून त्याने घोषणा केली.

आनंदी त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली, आनंदीला हे सगळं अनपेक्षित होतं. अभिजीतने डोळ्याच्या पापण्या हलवून इशाऱ्याने तिला दिलासा दिला.

निशा आणि विक्रम समोर आले,
“अभिजीत सर पण तुम्ही?” विक्रम समोर काही बोलणार अभिजीत बोलला.


“सर म्हणू नका बाबा, मी आता तुमचा जावई होणार आहे.”

“पण हे सगळं तुम्ही का करताय? यात तुमचा काय संबंध? असं तर नाही आहे ना की माझ्या मुलीचं लग्न तुटलं तर तुम्ही तिच्याशी लग्न करून उपकार वगैरे करताय?” विक्रमने शंका व्यक्त केली.


“बाबा हे स्थळ मी घेऊन आलो होतो आनंदीसाठी, त्यामुळे या सगळ्याला जबाबदार मी आहे. अश्या परिस्थितीत मी आनंदीला एकटं टाकणार नाही. मी आता आनंदीला असं वार्‍यावर सोडणार नाही. मी तिचा जीवनसाथी बनून तिला सांभाळेल. तुमची हरकत नसेल तर.?” अभिजीतने विक्रमला आणि निशाला बरच समजावलं.

त्यानंतर सगळे लग्नाला तयार झाले.
“पंडितजी करा सुरू.” विक्रम
पुन्हा मंगलाष्टके सुरू झाली, दोघांनी एकमेकांना हार घातले.  आनंदी आणि अभिजीतचं लग्न पार पडलं.
सप्तपदी झाली, वचनांची देवाणघेवाण झाली. दोघांनीही एकमेकांना वचने दिली.

सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आनंदीच्या पाठवणीचा क्षण आला. 
आनंदी निशा आणि विक्रमच्या पाया पडली. 
ती निशाला बिलगून खूप रडली, त्यांनतर विक्रम जवळही खूप रडली.
अभिजीत आणि आनंदी निघाले. 
गाडी अभिजीतच्या घरासमोर येऊन थांबली. अभिजीतच्या घरी कुणीही नसल्यामुळे साध्या पद्धतीने त्याने आनंदीचा गृह प्रवेश केला.
आनंदीने गृहप्रवेशाची जी काही स्वप्न बघितली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. अभिजीतने आनंदीला शब्द दिला की

“आनंदी यापुढे तुला कुठलाही त्रास होणार नाही. तुला कोणत्याही गोष्टीची काही कमी होणार नाही, हे मी तुला वचन देतो.”

सगळं छान पार पडलं.

विक्रम आणि निशा घरी आले, बाकीचे पाहुणे मंडळी सुद्धा आले.

हळूहळू आनंदी अभिजीतच्या घरी रुळायला लागली, अभिजीत सोबत मनमोकळेपणाने बोलायला लागली. सगळे छान सुरु होतं. दोघांनी ऑफिस जॉईन केलं, दोघेही सोबत जायचे.
विक्रमने निनादवर फसवणुकीचा केस टाकली. सगळ्या घटनेचा तपास झाल्यानंतर त्याला जेलमध्ये बंद करण्यात आलं. त्याला काही महिन्यांची शिक्षाही झाली.

बघताबघता महिने गेले, आनंदीला दिवस गेले, सर्वांना आनंदाची बातमी ऐकून खूप आनंद झाला पण का कुणास ठाऊक आनंदीला आनंद होत नव्हता.
“काय झालं आनंदी, तू आनंदात दिसत नाहीस.” अभिजीतने कारण विचारल्यावर तिने सांगितलं.
“अभिजीत खरंच हे बाळ आपल्या दोघांच आहे?”

“हा काय प्रश्न आहे? मूर्ख आहेस का तू?” अभिजीत

“निनाद.?” आनंदी समोर काही बोलणार अभिजीतने तिच्या ओठांवर बोट ठेवला.

“हे बाळ फक्त आपलं आहे, आपल्या दोघांचं. त्यामुळे सगळ टेन्शन विसर.” असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतलं.
अभिजीतने आनंदीला खुप जपलं, तो तिची खुप काळजी घ्यायचा.
बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि आनंदीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.


समाप्त:

नमस्कार वाचकहो,
ही कथा मी स्त्री वादी कॅटेगरी मध्ये लिहिली होती, स्त्रियांच्या आयुष्यात येणार वादळ, त्यातून त्या कशाप्रकारे मार्ग काढतात, पुरुषी वर्चस्व दाखवणाऱ्या पुरुषांवर मात करणे. त्यांच्या जाचातून स्वतःची मुक्तता करणे.  सगळ्याच स्त्रिया कुठल्या ना कुठल्या त्रासातून जात असतात. आपल्या कथेतील नायिका निशा तिलाही असाच त्रास सहन करावा लागला, कुमारी  आई बनण्याचं दुर्भाग्य तिला लाभलं. पण ती डगमगली नाही, की हरली नाही. तिने त्या निष्पाप जीवाला जन्म दिला. तिला वाढवलं, मोठं केलं. पण तेही सहज नव्हतं. लग्न न होता आई होणं, मुलगी जन्माला घालणं आणि वाढवणं हे समाज स्वीकारत नाही, निशाला समाजाचा खूप त्रास सहन करावा लागला, या कठीण काळी तिच्या सोबत तिची आई निर्मला खंबीरपणे उभी होती. एकट्या बाईने आयुष्य काढणे सोपे नाही, अश्या बाईकडे समाज वाईट दृष्टीने बघतो. निशा सोबतही अनेक प्रसंग घडले. वाईट आणि घृणास्पद प्रसंगांनाही तिने न घाबरता डगमगता तोंड दिलंय. पण मुलीवर कधीच कुठलीच दृष्टी पडू दिली नाही, तिला खूप जोपासलं. तिला तिच्या पायावर उभ केलं. तिला सक्षम बनवलं. मुलीच्या लग्नातही अडथळे आले,पण त्यातूनही मार्ग निघाला. मुलगी लग्न करून सासरी गेली आणि ती आनंदात होती. निशाचं जीवन सार्थक झालं. तिच्या हातून एका निष्पाप मुलीचं जीवन घडलं. त्यातच सगळं आलं.
या कथेतील सायली आणि अभिषेक यांनी मुलगा- मुलगी भेद नाकारून समाजकार्य केलं. समाजापुढे नवीन आदर्श ठेवला. त्यांनी फक्त मुलींसाठी कार्य केलं आणि सासूचे पण विचार बदलले.  मेघाला पुरुषवर्ग कधीच आवडला नाही, तिने लग्न न करता दोन मुलींना दत्तक घेतलं, तिलाही भरपूर त्रास सहन करावा लागला. पण ती ही न हरता न डगमगता तिने दोन्ही मुलीचं संगोपन केलं. त्यांना शिकवून सक्षम बनवलं.
या कथेतून मी एवढंच सांगू शकेन, एका स्त्रीने मनात आणलं तर ती काहीही करू शकते, तिच्या साठी काहीही अशक्य नाही. 

या कथेला तुम्ही छान प्रतिसाद दिलात, संपूर्ण कथा कशी वाटली नक्की कळवा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटू नवीन कथेसह.


धन्यवाद

🎭 Series Post

View all