कस्तुरी.. भाग ६

गोष्ट अलवार प्रेमाची


पंधरा दिवसात कस्तुरी स्टेबल होते. तिला घरी घेऊन येतात. तिची औषध जेवण सगळ वेळेवर होत असत. श्रीपतराव,शालिनीताई,वत्सला आज्जी आणि घरातील नोकर चाकर मंडळी सगळेच तिची मनापासून काळजी घेत तिला जपत असतात.

"बाबा, मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे." कस्तुरी

"बोल ना बेटा!" श्रीपतराव

"आई बाबा, आज्जी..मला माफ करा. मी चुकले. सुचेतच्या खोट्या प्रेमात आंधळी झाले होते. प्रेमाच्या फसव्या जगात तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम,काळजी मला कळलीच नाही. बाबा.. तुम्हाला तर नको नको ते बोलले मी आणि आज्जी..तुलाही. आई..खरच चुकले अग मी. घरातून सगळ घेऊन गेले. आपल्याच घरात चोरी केली. तू सारखं सांगून पण मी त्या गोष्टी जुमानल्या नाहीत. मी खूप उद्घट उर्मठपणे वागले. नात्यांचा, वयाचा.. कसलाच आदर न करता मुर्खासारखी वागले. खरच मला माफ करा.. माफ करा मला." कस्तुरी हात जोडून रडत रडत माफी मागत होती.

"बाळा..ज्या दिवशी मी तुला माझं कार्ड दिलं ना.. त्या दिवसापासून माझी नजर होती तुझ्यावर. तू कुठे जातेस? काय करतेस? ही सगळी खबर मला मिळत होती. ज्या दिवशी तू घरातून सामान घेऊन निघालीस त्या दिवशी पण आपली माणस तुझ्या आणि त्याच्या मागावर होती. ते ही तुला कळू न देता. त्या दिवशी तू त्याच्या घरातून निघालीस तेंव्हा आपल्या सर्जा ने मला फोन करून प्रत्येक वेळेची खबर दिली होती. त्याला सांगून ठेवलं होत काही चुकीचं दिसल्यास ताबडतोब तुला अडवायला. माझी लेक कशी आहे हे मला माहीत होत. आता झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा. नव्याने आयुष्याला सुरुवात कर. जे काही करशील त्याचा योग्य विचार कर." श्रीपतराव बोलले

"बाळा, आता बाबा सांगताहेत तसच कर. झाल्या गोष्टींचा. जास्त विचार करू नको आणि पुन्हा असा जीव द्यायचा विचार करायचा नाही. त्या सुचेतला आपण योग्य ती शिक्षा देऊच." शालिनी ताई बोलल्या.

"तुला काही झालं तर आम्ही कुणाकडे बघायचं ग?" वत्सला आज्जी डोळ्याला पदर लावत बोलल्या.
कस्तुरीने कान पकडून माफी मागितली आणि तिघांनाही मिठी मारली.

"बाबा..मला काही सांगायचं आहे. मी.. विजय सोबत लग्न करायला तयार आहे."कस्तुरी.

"कस्तुरी..बेटा, विजय खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला काही देणार म्हणून तो लग्नाला तयार नाही झालाय. तुला जर अस वाटत असेल तर आपण दुसरा मुलगा बघुया." श्रीपतराव

"नाही बाबा..मी जे बोलले होते ते रागात बोलले होते. आता माझी काहीच हरकत नाहीये बाबा." कस्तुरी बोलली

"ठीक आहे बेटा. मी पुन्हा एकदा त्याच्या आई जवळ आणि त्याच्या जवळ बोलून घेतो." श्रीपतराव बोलले.
झाल्या गोष्टी विजयच्या आईच्या कानावर घालत घरच्या मोठ्यांनी त्यांचं लग्न ठरवलं आणि काही दिवसातच कस्तुरी आणि विजयच लग्न अगदी थाटात पार पाडलं.

लग्नानंतरच्या सगळ्या रीती, सगळे सोहळे करून दोघांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला.

"कस्तुरी..तू एकदम निर्धास्त रहा. जो पर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत मी कुठल्याच प्रकारे तुझ्या जवळ येणार नाही. तुझ्यावर हक्क गाजवणारा नाही. तुझ्या मनाला किती त्रास झालाय ते मी समजू शकतो. तू बेडवर झोप मी इथे सोफ्यावर झोपतो." बेडवरची उशी आणि चादर घेऊन विजय बोलला. तिच्या उत्तराची वाट न बघताच तो सोफ्यावर जाऊन आडवा झाला सुद्धा.

मोठ्या घरात राहिलेली.. लाडाकोडात वाढलेली कस्तुरी, विजयच्या घरात अगदी आपलेपणाने रमली आणि रुळली सुध्दा.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all