कांचनयोग

गोबारसाची अत्यंत करूणामय कथा.

कांचनयोग.

©®राधिका कुलकर्णी.

"आईऽऽ...आईऽ ते गाईचं पिल्लू बघ ना केव्हाचे हंबरतेय मोठमोठ्याने,त्याला भूक लागलीय का गऽऽ..? "

"आपण त्याला काही खायला देऊयात का!!!"

रमण रडवेल्या सूरात निरागसपणे आपल्या आईला विचारत होता. त्याची अनुकंपा पाहून रमाचे आतडे पिळवटले.

दिवाळी सूरू झाली आज वसुबारस पण घरात अन्नाचा दाणा नव्हता.कोरोना मूळे कामं सुटली होती.नवरा म्हणजेच श्रीहरीचेही कारखान्याचे काम बंद पडलेले.दिवसभर मोलमजूरी करून जे मिळेल त्यात किडूकमिडूक सामान आणुन त्यातच कसेबसे दिवस ढकलणे चाललेले होते.आता लहानग्या लेकराची कशी समजूत घालावी??रमाला काही केल्या समजत नव्हते.

उसने हसु चेहऱ्यावर आणत ती रमणला म्हणाली,"अरे त्याची आई हरवलीय नाऽऽ म्हणून ते आपल्या आईला शोधण्यासाठी जाोरजोराने हंबरतेय.तु नाही का मला हाका मारतोस तसेच.मिळेल हंऽऽ त्याची आई लवकरच.चल तू ये बघू.दोन घास खाऊन घे आणि दारातच बैस.मी जरा पलिकडच्या आळितील राणेबाईंची जास्तीची भांडी घासून येते.तू घरातच बैस हंऽऽ..घर सोडून जाऊ नकोस कुठे…"

रमणची खोटी समजूत घालत त्याला भाकरी वाढून रमा डोक्यावरचा पदर सावरत कामाला गेली सुद्धा.

इकडे त्या पाडसाचे करूण रूदन ऐकुन रमणला काही जेवण जाईना.त्या लहानग्या वासराची सैरभैर अवस्था बघून तो रडवेला झाला.आपल्या ताटातली भाकरी घेऊन पळतच तो दारापूढे थांबलेल्या वासराजवळ आला.त्याच्या अंगावर मायेने हात फिरवताच ते थरथरले.रमणने बघितले तर वासराच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.त्याला खूप वाईट वाटायला लागले.

बिचारे किती वेळचे असेच भटकतेय.देवा त्याची आई त्याला लवकर मिळू दे.मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने आपल्या हातातली चतकोर भाकरी वासरासमोर धरली.त्याने दोन तिनदा हुंगून तोंड फिरवले.कदाचित एवढा लहान तूकडा हातातून खाता येत नसेल म्हणून रमणने तो जमिनीवर त्याच्या पुढ्यात ठेवला पण त्याने तरीही तोंड लावले नाही उलट पून्हा हंबरडा फोडत ते समोरच्या दिशेने पळत सुटले.

दर दोन चकरा मारल्या की ते पून्हा रमणच्या घरापूढे येवुन विसावे.रमणने दिलेली भाकरी त्याने खाल्ली नाही म्हणून ती उचलून कागदात गुंडाळली आणि त्याने ती देवडीत ठेवली.

मग विरंगूळा म्हणुन चूलीतल्या राखेतला एक कोळसा घेतला आणि कागदावर वासराचे गाई सोबतचे चित्र काढण्यात तो मग्न झाला.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

राणे बाईंचे काम संपवून रमा घरी आली तेव्हा रमण दारातच झोपी गेला होता.तिने त्याला उचलले आणि घरात बाजेवर निजवले तोच त्याची झोप चाळवली आणि तो डोळे चोळतच विचारला," गेले की आहे ते पिल्लू अजून?

त्याला त्याची आई मिळाली का गं?"

"नाही रे राजाऽ..ते काय बिचारे थकून दारातच निजलेय."

आता एव्हाना दूपार टळून गेली होती.तिने आपल्या ताटात डोरलीत उरलेली भाकर वाढून खायला सुरवात करणार इतक्यात तिला सहज आठवले,"रमण जेवलास का रे तू? मी जाताना वाढून गेले होते ना?"

त्यावर रमणचा चेहरा रडवेला झाला.तिने ताट बाजूला सारत लेकराला आपल्या कुशीत घेतले तसे त्याचे डोळे पाणावले.रडवेल्या चेहऱ्याने तो म्हणाला,"आईऽऽ गं मी तूला न विचारता माझी भाकरी त्या वासराला दिली.मला भूक लागली तर तू तरी आहेस नाऽऽ पण त्याला तर बोलताही येत नाही आणि द्यायलाही कोणीच नाही.सकाळपासुन आईला शोधून शोधून त्यालाही भूक लागली असेल पण ते कूणाला सांगणार?म्हणून मी माझी भाकर त्याला दिली पण त्याने तोंड पण नाही लावलं गंऽऽ….!!"

"आईऽऽ त्याला त्याची आई मिळेल ना गंऽऽ?" रमण बोलता बोलताच रडू लागला.

रमाला एकीकडे आपल्या लेकराचे कौतूक वाटत होते तर दूसरीकडे ते आज उपाशीच आहे म्हणून दू:ख वाटत होते.तिने त्याला जवळ घेतले आणि समजावले.हे बघ तु ना जेव आणि मग देवबाप्पाजवऴ मनोभावे प्रार्थना कर..लहान मुलांचे देवबाप्पा लगेच ऐकतो.बघ त्याला त्याची आई नक्की परत मिळेल.."

आईच्या बोलण्याने रमणची हिरमुसलेली कळी खूलली.त्या आनंदातच त्याने आईच्या हाताने दोन घास खाल्ले आणि तिकडेच बागडू लागला.अर्ध्या कोरीतली चतकोर रमणला देऊन उरलेल्या चतकोर भाकरीला तिखट मिठाच्या पाण्यात कुस्करून तिने तसेच घश्याखाली उतरवले.

आता ऊन्हं कलून संध्याकाळचा संधीप्रकाश सगळीकडे विखूरला होता.तिने देवापुढे उदबत्ती ओवाळली आणि मनातली खंत डोळ्यावाटे नकळत पाझरू लागली.

"देवाऽऽ..दर दिवाळीला लेकराला निदान शर्ट तरी घ्यायचे ह्यावेळी तर कोरोनाने अशी कंबर मोडली की तूला दिवाबत्ती करायलाही घरात तेल नाही तर दारात पणती कशी लावू??"

"तू तर सगळेच जाणतोस.माझी अडचणही समजून घे हं देवा.वसुबारसेच्या दिवशी माझ्या दारी एक पाडस आईविना भुकेले पडलेय.निदान त्याची तरी दया कर.आज खरे तर त्यांना डाळ गूळ खाऊ घालून पूजा करायला हवी पण मी इतकी कमनशिबी हाय की दारासमोर गोबारस असुन माझ्या घरात त्याला चारायला पसाभर धान्य नाही.."

ती डोळे मिटून प्रार्थना करत असतानाच रमण धावत धावत आईला बिलगला.तो रडून रडून सांगत होता.आई बघ ना मी बाप्पाला प्रार्थना करून किती वेळ झाला तरी बाप्पाने अजून त्याची आई शोधून नाही दिली.तु सांग ना गं बाप्पाला की रमणचे ऐक म्हणून...ते पिल्लू बघ जमिनीवर कसे पडलेय.मला खूप कसेतरी होतेय गंऽऽ...रमणच्या धक्क्याने देवाच्या देव्हाऱ्याला धक्का लागला आणि रमाच्या ओंजळीत एक कागद पडला.तिने काय म्हणुन उघडून पाहिले तर कागदाच्या घडित पन्नासची नोट होती. आनंद आणि आश्चर्य एकाचवेळी चेहऱ्यावर पसरले रमाच्या.

"देवा तुझी करणी अगाध आहे रेऽऽ.!!वेळेला अडचणीला लागले तर असु द्यावेत म्हणून मीच कधी तरी मागे सरकवलेले पैसे तु मला असे परत केलेस होय रेऽऽ." 

"खरच तु गरीबांचा कैवारी आहे.आत्ता जाते अन् वाण्याच्या दूकानातून तेल,डाळ-गूळ आणते."

"माझी वसुबारसेची पूजा तु चुकवू नाही दिलीस ह्या बारीलाही,खरच तुझे आभार मानावे तितके कमी हाय..असाच पाठिशी रहा सतत आम्हा गरीबांच्या."

पदराने डोळे पुसत रमणला बोटाला धरून ती घाईघाईने वाण्याच्या दूकानात गेली.हवी ती सगळी सामग्री आणली.

दोन पणत्या दारी लावल्या.रमणने कोळशाने काढलेल्या गाय गोरसाचे चित्र देवघरात मांडून त्याची पूजा केली.त्यालाही डाळ गूळाचा नैवेद्य चढवला.एव्हाना सूर्य मावळून आता अंधार पडायला सुरवात झाली होती.तिने एका ताटात गोबारस पुजेची सर्व तयारी केली.

गूळ-डाळ,पाणी,हळदीकुंकवाचा करंडा थोडी परसाच्या अबोलीची दोन फूले सगळी तयारी करून त्या बछड्यापाशी आली.आईविना ते पाडस शोधून थकून मलूल होऊन पडले होते.ती त्याच्या जवळ गेली.त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला.त्याने किंचित थरथर केली अंगाची पण उठले नाही जागचे..तिने त्याच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा लावला.त्याच्या पुढल्या खूरांवर पाणी टाकले.त्याची पूजा केली.त्याला हाताच्या ओंजळीने डाळगूळ भरवू पाहिले पण त्याने फक्त हुंगुन मान फिरवली.तेवढ्यात काय झाले माहित नाही, त्याने त्याचे लांब लांब मोठे कान टवकारून टुणकन उठुन उभा झाला.

टपोऱ्या डोळ्यांनी रस्त्याच्या विरूद्ध दिशेकडे बघत मोठ्याने हंबरायला सुरवात केली.थोड्याच वेळात दुरून कुठुनतरी तसाच हंबरायचा अस्पष्ट ध्वनी कानी येऊ लागला.रमा आणि रमणनेही त्या दिशेने बघितले आणि काय आश्चर्य एक काळा ठिपका दुरून जवळ जवळ येत होता.तीच त्याची आई असावी.ती सगळे बळ एकवटून आपल्या पिल्लाच्या ओढीने आवाजाच्या दिशेने धावत येत होती.जसजशी ती जवळ येऊ लागली पाडस आनंदाने उड्या मारू लागले.

आता गाय पिल्लाच्या जवळ आली आणि त्याच्या सर्वांगाला प्रेमाने चाटू लागली.पिल्लाच्या प्रेमाने तिच्या अचळातून दूधाच्या धारा स्त्रवू लागल्या.पिल्लू जवळ जाऊन आईला लुचू लागले.तो माय लेकाराच्या भरत भेटीचा विहंगम सोहोळा पाहून रमाच्या डोळ्यातुनही धारा वाहू लागल्या तर रमण टाळ्या वाजवून नाचून आनंद व्यक्त करू लागला.वासरू आईचे दूध पिऊन तृप्त होत होते तसतसे गाईच्या चेहऱ्यावरही समाधान विलसू लागले.ती शांत उभी पाहून रमाने पून्हा गाेबारसाची एकत्रीत पूजा केली.त्यांना आरतीने ओवाळून डाळ गूळ खायला घातले.रमणलाही काहीतरी आठवले.आईचा हात सोडून तो घरात गेला.घराच्या देवडीत कागदात गुंडाळलेला सकाळचा भाकरीचा तुकडा घेऊन त्यानेही तो गाईला खाऊ घातला.गाईने मटामटा सर्व साफ केले.तसा रमणही आनंदाने उड्या मारू लागला.रमा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती.घरात तर भाकरी शिल्लक नव्हती मग ही भाकरी कुठून आली?

त्यावर रमण लगेच म्हणाला,"सकाळी तू मला खायला दिलेली भाकरी ह्या पिल्लाला दिली ना,पण तो खातच नव्हता म्हणुन मी तिला कागदात गुंडाळून देवडीत ठेवली म्हणजे नंतर भूक लागली तर त्याला द्यायला होईल ना...बघ आली ना कामी! नाहीतर दुसऱ्या कोणीतरी खाऊन संपवली असती.."

आपल्या लेकराचा गोड पापा घेत गाईला नमस्कार करून ती घरात परततच होती की दारात एक आलिशान कार थांबलेली दिसली.

कोणीतरी वाटसरू पत्ता विचारत आले दिसतेय म्हणत ती तिथेच थबकली.गाडीतुन एक ऊंची साडी नेसलेली सुंदर स्त्री साेबत एक तितकाच उमदा तरूण पुरूष गाडीतून खाली उतरले.

अंधारात चेहरे नीट दिसत नव्हते पण ते रमेच्याच दिशेने येत होते.रमा चक्रावून त्या दोन आकृत्यांकडे निरखून पहात विचार करत होती की हे कोण लोक आहेत आणि इकडे का येताहेत????"

जसजसे ते जवळ आले तसे रमा चकीत झाली.

ती ज्या मालकीणबाई कडे काम करायची कोरोनाच्या आधी त्या तिला शोधत आल्या होत्या.तिला मनोमन आश्चर्यच वाटले की त्यांना ह्या नव्या जागेचा पत्ता कोणी दिला.

दिव्या मॅडम आणि देव साहेब दोघेही आता तिच्या अगदी निकट पोहोचले.

जवळ येताच दिव्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली."काय ग रमाऽऽ असा फोन बंद का ठेवला आहेस तु..?काल पासुन शंभरवेळा फोन केला पण तुझा फोन स्विच्डऑफच लागतोय..बर घरी जाऊ म्हणले तर तु घरही बदललेस.मग नवा पत्ता कळवायचास तरी नाऽऽ..आता कुठे कुठे शोधायचे गं तूला ऐन सणात?"

"तुझ्या नवऱ्याला श्रीहरीलाही किती फोन केले. तोही फोन उचलत नाही..काय चाललेय काय..हेऽऽ???"

रमा मान खाली घालुन निमुटपणे फक्त ऐकत राहीली.काय उत्तर देणार होती ती…!!

तेवढ्यात दिव्या पून्हा म्हणाली,"आता आम्हाला दारातच उभी करणारेस की आत पण बोलावणारेस ??"

आत्ता कुठे रमा भानावर आली.तिला वरमल्या सारखे झाले.एवढी मोठी बंगल्यात राहणारी माणसं...कोणच्या तोंडाने त्यांना आत या म्हणावे.??आत बोलावले तर बसायलाही वीतभर मोकळी जागा नाही.पण तरीही तिने चटकन बाजेवर एक साडी अांथरून त्यावर दोघांना बसायला दिले.मग दिव्याने पून्हा विचारले,"काय गं फोन का बंद तुझा?"

रमाने कसनुसे तोंड करत सांगितले,"आता काय सांगु मॅडमऽ फोनमधला बॅलन्स संपला तसा तो बंदच हाय.माझी अशीही सगळी कामं सुटली मग मला काय करायचा फोन म्हणून म्या बंदच ठेवला.धन्याचा फोन चालू हाय.तेवढा बस होतो निरोप पाण्याला."

"बरंऽऽ मग जूने घर का बदलले?"

त्यावर डोळ्यातले पाणी पुसत ती म्हणाली,"त्या घराच भाडं थकलं होतं.मालक पैसे भर म्हणुन तगादा करू लागला.तशातच पावसाने त्याची एक भिंत कोसळली मग मालकाने घर खाली करायचा तगादाच केला.म्हणुन नाईलाजान इकडं याव लागलं रहायला.हे माझ्या आईचं खोपटं हाय.सध्या ती बी गावी पोराकडं अडकली कोरोनामुळं म्हणुन ती येऊस्तोवर राहतोय.ती आली की पून्हा दुसरीकडं जाण लागलं. "

दिव्याचेही डोळे तराळले पण ते लपवतच ती म्हणाली,"बरं ते सगळे जाऊ दे.मी काय सांगते ते ऐक,उद्यापासुन तु माझ्याकडं कामाला यायचे.दिवाळी बिवाळी काही कारणं चालणार नाहीत हं मलाऽऽ..माझं ऑफीस सूरू झालेय आता.मला स्वैपाकापासुन सगळ्या कामाला तु हवीएस.श्रीहरी कुठेय गं दिसत नाही?" दिव्याने सहज इकडे तिकडे डोकवत विचारले.

"मॅडम,त्याचं बी काम सुटलं.आता सकाळीच बाहेर पडतो.जे मिळलं ते काम करून रातच्याला घरी येतो.ज्या दिवशी पैसे मिळतात त्यादिवशी चूल पेटतीया,नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपतोय.काय करणार??कोरोनानं लई कंबर मोडलं बघा गरीबाचं…"

रमाच्या डोळ्यातुन पाणी पाझरू लागले आपली दीनवाणी अवस्था सांगताना.

त्यावर दिव्या ही सावरत लगेच म्हणाली,"बरं बरंऽ आता रडतच बसणारेस की आम्हाला चहा पण विचारणारेस?"

तिच्या ह्या बोलण्यावर रमाला काय बोलावे समजेना घरात तर दुधाचा पत्ता नव्हता कुठुन बनवणार चहा पण हे त्यांना कसे सांगणार..??

तिच्या मनात हे विचार चालू असतानाच देवही दिव्याकडे डोळे वटारून बघत होता.बिचारीची परिस्थिती काय अन् तु काय तिला चहा मागतेस असा त्या बघण्यामागचा हेतू होता.

त्यावर दिव्या रमाला लगेच म्हणाली,"चहा कर पण आम्हाला तो दूधातला चहा चालत नाही बरं का..आम्ही डाएटवाला चहा पितो माहितीय ना तूला…"

रमा आता अजून बुचकळ्यात पडली.तिच्याकडे तो डिपवाला पाऊच कुठुन असायला..पण तिची अडचण दिव्यानेच सोडवली.

"हे बघ मी सांगते तसा चहा कर…

पहिल्यांदा पाणी उकळायला ठेव.त्यात अगदी पाव चमच्यालाही कमी चहापत्ती टाक.हम्म्ऽऽऽऽ..आता त्यात थोडं आल किसुन,घाल असेल तर.नसल तर राहूदे."

"हो हो,आहे की,आत्ता घालते."

रमाने थोडं आल किसुन त्यात घातलं.

"सोनेरी रंग येताच आच बंद कर.आता तो चहा गाळ दोन कपात आणि दे आम्हाला."

रमाला तेवढ्यात दुरडीत एक लिंबू दिसले.

"मॅडम लिंबू पिळू का त्यात थोडे.?"

"असले तर चालेल.नसले तर गरज नाही."

"मॅडम आहे की.थांबा पिळते."

तिने लगेच पाव फोड दोन कपात पिळुन तो चहा दोघांना दिला.

मिटक्या मारत चहा संपवताच दिव्या म्हणाली, "श्रीहरीला फोन लावुन बोलावुन घे.आम्हाला त्यालाही भेटायचेय."

"मॅडम फोनमधे बॅलन्स नाही माझ्या.."

"बघ फोन लावुन लागेल आता."

तिने नंबर लावल्याबरोबर लागला.तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.पण दिव्याने तेवढ्या वेळात तिचा फोन रिचार्ज केला होता.

"येतोय मॅडम,रस्त्यातच हाय."

थोडावेळ ह्या त्या गप्पा झाल्या तसा श्रीहरी पण घरी आला.गमचाने अंगाची धूळ खकाणा आणि घाम पुसतच तो समोर बसला.

तसे देव साहेब बोलले,"हे बघ श्रीहरी माझ्या ऑफीसमधे चपराशाची जागा रीकामी आहे तर तु येणार का तिकडे उद्यापासुन?मला खूप नड आहे सध्या प्रामाणिक काम करणाऱ्याची.

महिन्याला दहा हजार देईन."

घर चालत काम आलेले पाहून अत्यानंदाने श्रीहरीच्या डाेळ्यातुन धारा बरसु लागल्या.तो देव साहेबांच्या पायावर डोक टेकत म्हणाला,"नड तर माझी हाय साहेब.सहा महिने झाले दिवसाआड चूल पेटतीय घरात.लेकराच्या पोटी घालायलाही अन्नाचा दाणा नाही.डोक्यावर छप्पर नाही.फार वाईट हाल चाललेत हो.तुम्ही अगदी देवासारखे धावुन आलात.तुमचे उपकार कसे मानू काही कळत नाही..फार कृपा झाली साहेब गरीबावर."

पायावर डोक टेकवतच श्रीहरी मनातली व्यथा बोलत होता.

"आणि होऽऽ,बरं का गं रमाऽ आमचे आऊट हाऊस आता रिकामेच पडलेय.तुम्ही तुमचे बिऱ्हाड तिकडेच हलवा.म्हणजे मला सारखे सारखे फोन करायला नको...काय!!मग उद्याच सगळे सामान घेऊन तिकडे या .."

"आणि काय रे रमण आल्यापासुन बघतेय असा का आईला बिलगून बसलाय.दिव्या काकूला विसरलास होय रेऽऽ..??"

"हे बघ दिव्याकाकुने तुझ्यासाठी काय आणलेय…!!!"

 म्हणतच दिव्याने त्याला गाडीकडे नेले.खूप सारे बॉक्सेस घेऊन दोघेही पून्हा घरात आले.दिव्याने सगळ्यांसाठी कपडे,फराळ,रमणसाठी फटाके,मिठाई आणि त्याच्या आवडीचे चित्रकलेचे सर्व साहित्य आणले होते.

श्रीहरी रमा फक्त भिजल्या नेत्रांनी दोघांकडेही कृतज्ञतेने बघत होते.

रमाच्या डोक्यात लख्खकन विचार तरळला. त्या कामधेनूचेच हे आशीर्वाद नसतील नाऽऽ... वसुबारसेच्या संध्याकाळी जशी तिची पावले ह्या दाराला लागली तसा कधी नव्हे ते हा कांचनयोग घर चालत आला.

दिव्या आणि देव साहेबांच्या रूपाने कामधेनूनेच आशीर्वादांची बरसात केली ह्या अंगणी.

रमा डोळे टिपतच परसाकडे धावली.

गाय आणि तिचे बछडे त्यांची कृपादृष्टी टाकुन केव्हाच अंतर्धान पावली होती.

~~~~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी…..!

वसुबारसेच्या निमित्ताने सहज सुचलेली ही  कथा.

कशी वाटली?

 हे जरूर कमेंटमधे कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन.माझ्या नावासहित कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all