Login

काना मागून आली आणि तिखट झाली (अंतिम भाग))

एक कथा
कानामागून आली आणि तिखट झाली. भाग ३

साायलीचा उत्साह दिवसेंदिवस वाढत होता. पण तिच्या लक्षात येत नव्हतं की संपदा मात्र एका अंतर्गत संघर्षातून जात होती. एकीकडे संस्थापक सायलीच्या कल्पनांचं कौतुक करत होते, तर दुसरीकडे संपदाला आपल्या अनुभवाची किंमत हरवते आहे असं तिला वाटत होतं.
एके दिवशी श्रीधरजींनी दोघींना एका नव्या सजवण्यासाठी लागणा-या घरसजावटीच्या ब्रँडसाठी संकल्पना तयार करण्याचं काम दिलं.
श्रीधरजी म्हणाले,
“मला तुमचं संयुक्त सादरीकरण हवं आहे. संपदा तुमची अनुभवी दृष्टी आणि सायलीचा ताजातवाना दृष्टिकोन एकत्र आला तर काहीतरी अफलातून घडेल.”
सायली आनंदाने म्हणाली,
“मॅडम, आपण एकत्र काम करूया. तुमचं अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”
संपदा थोडं हसून म्हणाली,
“ठीक आहे. तू कल्पना मांडतेस तशा मीही पाहते, काय करता येईल ते बघू.”
त्या प्रकल्पावर काम करताना संपदाने सायलीचं निरीक्षण केलं – तिच्या कल्पनांमध्ये विचारांचा ताजेपणा होता, पण अंमलबजावणीतील काही त्रुटी संपदाला स्पष्ट दिसत होत्या.
संपदा म्हणाली,
“सायली, तुझी संकल्पना छान आहे. पण रंगछटा ही श्रीमंत वर्गासाठी थोडी सौम्य आणि पारंपरिक वैभव दाखवणारी असली पाहिजे. ग्राहक सूक्ष्म संपन्नता शोधतोय, तुकतुकीत झगमगाट नव्हे.”
सायली: “हो! अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. हे मी लक्षात घेतलं नव्हतं. धन्यवाद मॅडम!”
त्यानंतर दोघींनी मिळून एक संतुलित सादरीकरण तयार केलं. एका बाजूला आधुनिक देखावे, दुसऱ्या बाजूला सादरीकरणामधील अनुभवाचा पोत.
सादरीकरणाच्या दिवशी श्रीधरजी भारावले.
श्रीधरजी: “हेच म्हणतात खऱ्या अर्थाने समन्वय! तुमचं दोघींचं काम म्हणजे ब्रँड विचारांची दोन टोकं जोडलेली दोरी आहे – एक ठाम, दुसरी लवचिक.”
सायली: “माझ्या सादरीकरणात जो आधार होता, तो संपदा मॅडममुळेच. त्यांच्या सूचनांनी मला योग्य दिशा दिली.”
संपदा: (हसून) “आणि मला नव्या पद्धतीने विचार करायला तू प्रवृत्त केलंस.”
त्या दिवसाच्या शेवटी संपदा तिच्या केबिनमध्ये बसली होती. खिडकीबाहेर हलकासा पाऊस पडत होता. ती स्वतःशीच हसून म्हणाली –
“हो, काना मागून आली आणि तिखट झाली… पण कामाला चव तर त्यामुळेच आली ना.”संपदाने हसत इझीचेयरवर मागे मान टेकवून डोळे मिटले.

समारोप
प्रत्येक बदल काही ना काही कारण घेऊन येतो. एखादा तिखट अनुभव सुरुवातीला जळजळीत वाटतो, पण त्यातूनच घडतो तो नव्याने आलेला आत्मविश्वास. अनुभव आणि नवता हे एकमेकांचे विरोधक नसून पूरक असतात – हेच सायली आणि संपदाच्या सहकार्यातून अधोरेखित होतं.