कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३रे भाग ७वा

एका धाडसी मुलींची कथा आहे.
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३रे भाग ७वा

काल दवाखान्यात भय्यासाहेबांजवळ कोणाला थांबू देत नव्हते.पण तरी प्रदीप थांबला होता.प्राचीनही त्याला थांबूदिलं.

प्राची संध्याकाळी कामीनी बाईंना घेऊन घरी आली येण्यापूर्वी कामीनी बाईंनी बाहेरूनच भय्यासाहेबांना बघीतलं.

आज प्राची कामीनी बाईंच्याच खोलीत झोपणार असते.कारण अजूनही त्यांना थकवा असतो.तन्मयला हर्षवर्धनच्या खोलीत झोपायला सांगते.

तन्मय आजच्या दिवसांतच एकदम मोठा होतो.आपण हट्ट करून आजोबांना बगीच्यात नेलं नसतं तर हे घडलं नसतं. याची टोचणी त्याला लागते. वरुन तो शांत दिसत असला तरी त्याच्या मनात खूप खळबळ माजलेली असते.तो हळूच पाय न वाजवता हर्षवर्धनच्या खोलीत जातो.

प्राची कामीनी बाईंना हळूच पलंगावर बसवते. नंतर हळूहळू त्यांना पलंगावर झोपवले.
" एक पेशंट कमी होता तुझ्या मागे म्हणून मीही आडवी पडले." कामीनी बाईंच्या स्वरात हताशपणा आणि दिलगीरी होती.

" आई काहीतरी काय विचार करता? तुम्ही एक-दोन दिवस आराम केलात की पुन्हा पूर्वीसारख्या व्हाल" प्राची समजावणीच्या सुरात म्हणते.
" कोणास ठाऊक!" कामीनी बाईं हताशपणे म्हणतात.
"आई तुमचं रणरागिणीचं रूप ही भय्यासाहेबांच्या दुखण्यावर चटकन आलेली प्रतिक्रिया होती. पण त्या आवेशामुळे तुमच्यातील बरीच ऊर्जा झटक्यात संपली त्यामुळे तुम्हाला थकवा आला. बाकी काही झालं नाही तुम्हाला.आराम केला की बरं वाटेल." प्राची हसून म्हणाली.


"गरम खिचडी करू का? तोवर तुम्ही झोपा म्हणजे जेवायला बसल्यावर थकवा जाणवणार नाही."
" हो." अजूनही त्यांच्या स्वरात थकवा होता.

प्राचीनी स्वयंपाकघरात येऊन कामीनी बाईंसाठी गरम गरम मुगाची खिचडी केली.थोड ताक केलं.नंतर त्यांच्याच खोलीत जेवणाचं ताट घेऊन गेली.

आज या प्रसंगात हर्षवर्धनला प्राचीनी थोड्याच वेळात घरी पाठवलं होतं त्यामुळे कामीनी बाईंबद्दल त्याला काही माहिती नव्हतं.आणि हे बरही होतं कारण कामीनी बाई हर्षवर्धनचा विकपाॅईंट होता. त्याच्या डोक्याला आणखी त्रास नको असं तिला वाटतं होतं.

तिनी त्यांना हळूच उठवून बसवलं. त्यांना बसून ताट हातात धरून जेवणं आज तरी जमणार नव्हतं हे लक्षात घेऊन प्राची त्यांना भरवू लागली.

अचानक कामीनी बाईंच्या डोळ्याला धारा लागल्या.ते बघून प्राची थोडी गडबडली.खिचडीचा घास घेतलेला चमचा पुन्हा ताटात ठेऊन तिनी त्यांचे डोळे पुसत विचारलं
" काय झालं आई...रडता का?"

"प्राची किती सगळ्यांसाठी धडडपडशील! तुझं लग्नं झाल्यापासून तुला इतरांना समजून घेण्यातच तुझं आयुष्य गेलं आता आमच्या दुखण्यात पुन्हा तूच सापडलीस आम्हाला सावरायला.परमेश्वरा हिचं आयुष्य हिचं म्हणून कधी जगता येईल हाच प्रश्न मी सतत त्याला विचारते.माझं मन तुझी धडपड बघून गलबलतं."

" आई तुम्ही सगळी माझी माणसं आहात.तुम्हाला दु:खाच्या वावटळीत सोडून मी कशी माझं आयुष्य जगू शकणार? दु:ख तर सुखाच्या बरोबरीने येतच.त्याला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायचं असतं.असं तुम्हीच नेहमी म्हणायच्या आठवतंय."
" हो" कामीनी बाई म्हणाल्या.
" मग हा विचार आता का करता? आता तन्मय मोठा झाला आहे. माझ्या सोबतीला आला आहे. तुम्हा सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम मला पुन: पुन्हा लढायला बळ देतं. तुम्ही माझी काळजी करू नका. माझ्या पाठीशी सतत उभ्या रहा.आता कुठलाही विचार न करता जेवायचं.जेवण झाल्यावर गोळ्या घ्यायच्या आहेत." प्राची कामीनी बाईंकडे बघून हसली आणि त्यांना खिचडी भरवू लागली.

"तू जेवलीस?" कामीनी बाईंनी विचारलं.
" तुमचं झालं की जेवीनं."

हळुहळू कामीनी बाईंचं जेवण आटोपलं.त्यांना गोळ्या देऊन अलगद पलंगावर झोपवलं.अंगावर पांघरूण घालून ती खोलीबाहेर पडली.

प्राची आता दिवसभराच्या धावपळीनी खूप दमली होती.तीही गरम खिचडी खाऊन लगेच झोपायला गेली.

तन्मयचं मगाशीच जेवण झालं होतं. तो हर्षवर्धनच्या बाजूला झोपला पण त्याला झोप येत नव्हती.त्याच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता तो म्हणजे बाबांच्या आयुष्यात असं काय घडलं असेल की बाबा इतके कमकुवत झाले.त्याला समजायला लागल्यापासून तो प्राचीलाच प्रत्येक प्रसंगात धीटपणे वावरताना आणि निर्णय घेताना बघत आला होता.

हे डोक्यात असलं तरी तो आता एका गोष्टीवर ठाम होता ते म्हणजे त्याने आईला कबूल केलं तसं कंपनीच्या कामात लक्ष द्यायचं.कंपनीचे सगळे व्यवहार समजून घ्यायचे.तिला मदत करायची.शेवटी हा सगळा व्याप पुढे जाऊन त्यालाच सांभाळायचा होता.हा निर्णय त्याने स्वतः घेतल्याने त्याला शांत झोप लागली.
***

सकाळी सकाळी प्राचीला. जाग आली ती आपलं आवरून स्वयंपाकघरात गेली.चहाचं आधण गॅसवर चढवून पुढच्या दाराला लावलेल्या पिशवीतून दुधाची बॅग काढून आत आणली.

चहा करता करता तिचं लक्ष सहज मोबाईल कडे गेलं तर राधाचे तिला वीस मिसकाॅल दिसले.एवढे मिसकाॅल बघून प्राचीला कळेना राधानी एवढे मिसकाॅल का दिले असावे? तिनी लगेच राधाला फोन लावला.

"हॅलो...अगं काय झालं?एवढे मिसकाॅल का दिलेस?"
" अगं काल तू येणार होतीस नं जागा बघायला.तू फोन का उचलत नव्हतीस?"
" साॅरी पण काल जरा रामायण घडलं."
"काय?" राधानी विचारलं. प्राची नी तिला काल घडलेलं सगळं सांगितलं.

" अरे देवा...अगं हा विश्वास कधी तुमच्या आयुष्यातून जाणार आहे?आता भय्यासाहेब कसे आहेत?तुझ्या सासूबाई कशा आहेत?"राधाच्या भडीमाराला मध्येच थांबवत प्राची म्हणाली
" सगळे ठीक आहेत.तू जागा केलीस का पक्की?"
" अजून नाही."
" का? अगं जागा अशी मोकळी पडून राहील का? कोणीतरी घेऊन टाकेल." प्राचीच्या स्वर जरा रागाचाच होता.

" प्राची शांत हो. त्याला टोकन अमाऊंट दिली आहे.पण तू हो म्हटलं की जागा फायनल करणार."
" हा काय वेडेपणा राधा?" प्राची जरा ओरडूनच म्हणाली.
" काॅलेजपासून माझ्या प्रत्येक गोष्टीत तू माझ्या बरोबर होतीस.इतकच काय तू शशांकला सिलेक्ट केलस म्हणून मी त्याला हो म्हटलं. विसरलीस का?"

" अगं बाई ते काॅलेजचे दिवस होते.इथे हा बिझनेस करतेय तू. यात माझ्यापेक्षा शशांकचं मत महत्वाचं नाही का?"
" शशांकनीच सांगीतलं प्राचीनी होकार दिला तर ही जागा घेऊ."
" परमेश्वरा तुम्ही दोघं माझ्या समजण्याच्या पलीकडे आहात.

प्राचीनी फोनवरूनच त्या दोघांना साष्टांग नमस्कार घातला.
"कधी येतेस सांग तसं त्या ब्रोकरला कळवीन." राधा म्हणाली.
" एक दोन दिवस थांब. भय्यासाहेब घरी येऊ दे.तोपर्यंत आईंना पण बरं वाटेल.मी सध्या घरूनच ऑफीसचं काम बघणार आहे. "
" ठीक आहे." राधानी फोन ठेवला आणि प्रची भूतकाळात शिरली.

तिला काॅलेज, राधाची मैत्री.नंतर त्यांच्यात आलेला शशांक हे सगळं अगदी कालच घडल्यासारखं वाटू लागलं.

राधाची पहिली भेट तिला आठवली. खूपच गमतीदार वाटली तेव्हा तिला राधा.

फस्ट इयरला मोठ्या संताजी काॅलेजला प्राचीनी प्रवेश घेतला होता. ती आज काॅलेजमध्ये टाईम टेबल फायदा आणि आपली क्लास रूम बघायला आली होती.तिनी नुकताच काॅलेजमध्ये प्रवेश केला होता आणि कुठे विचारावं या विचारात होती तेव्हा तिच्या कानावर कोणाचा तरी आवाज आला. कोणीतरी काहीतरी विचारत होतं. प्राचीनी वळून बघीतलं तर एक मुलगी तिच्याकडे बघून हसत विचारत होती

"तुम्हाला माहित आहे का ऑफीस कुठे आहे?" तिनी प्राचीला तुम्ही म्हटलं याचाच प्राचीला राग आला.
"ऐ तुम्ही काय म्हणतेस? मी तुझ्याच एवढी आहे.तुझ्यापेक्षा थोडी उंच आहे म्हणून तुम्ही नको म्हणाला." प्राची नाक मुरडत बोलली.
" अहो तसं नाही आपली ओळख नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं.आवडलं नसेल तर साॉरी." त्या मुलींचा केवीलवाणा चेहरा बघून प्राचीला दया आली.

"ओके.एवढ काही झालं नाही माझं नाव प्राची आहे."
"माझं नाव राधा आहे." दोघींनी एकमेकींशी हात मिळवला.

प्राचीला राधा हे‌नाव फार आवडलं. म्हणताना एक गोड नाद येतो हे तिला जाणवलं.
बोर्डवर टाइमटेबल आणि रूम नंबर बघून प्राची घरी गेली.
***
प्राची घरात शिरताच वासंती नी विचारलं"कळला का टाईम टेबल"
"हो" म्हणताना प्राची हसली.वासंतीला आश्चर्य वाटलं.
"प्राची यात होण्यासारखं काय झालं?"
" अगं आई तुला नाही हसले." प्राची नी राधा बद्दल सांगीतलं.
" अगं काही मुली असतात अश्या लाजाळू."
" अगं लाजाळू असली म्हणून तिनी मला अहो जाहो करायचं? कमाल आहे?"
"ओळख नसली तर एकेरी हाक मारणं ब-याच जणांना आवडते नाही. तसच असेल तिचं." वासंती काम करता करता हे बोलली.
"बघू ऊद्या भेटते का? "
वासंतीला आता या चर्चेत फार काही रस नव्हता कारण ती देवघरातील,देवांची स्वच्छता करण्यात गुंतली होती.

प्राची अजून बराच काळ भूतकाळात रमली असती पण चहा ऊतू जाण्याच्या आवाजाने ती भानावर आली.


चहा पाठोपाठ दूध पण ऊतू जाण्याच्या मार्गावर होतं.तिनी दोन्ही गॅस बंद केले. चहा दुस-या गंजात गाळला.कामीनी बाई उठल्या का हे बघायला त्यांच्या खोलीत गेली तर त्या पलंगावर उठून बसल्या होत्या.प्राची लगबगीनी त्यांच्याजवळ गेली.

" प्राची यांची तब्येत कशी आहे?"
" सकाळी प्रदीपचाच फोन होता. भय्यासाहेब ठीक आहेत.मी थोड्यावेळाने डाॅक्टरांशी बोलते. तुम्ही विचार करत बसू नका.तोंड धुयाला चालता? चहा तयार आहे." प्राचीच्या या विचारण्यावर कामीनी बाईंनी हो अशी मान हलवली आणि हळुहळू उठून उभ्या राहिल्या.

प्राची हळूहळू त्यांना बाथरूम पर्यंत घेऊन गेली. ती कामीनी बाईंना असं नेत असतानाच हर्षवर्धन तिथे आला.
"आईला काय झालं? आई कशी का करतेय?" हर्षवर्धन एकदम घाबरला.

"काही झालं नाही आईंना.भय्यासाहेबांच्या काळजीपोटी त्या थकल्या" प्राची नी सारवासारव केली पण हर्षवर्धनच्या मनात विचार सुरु झाले.प्राचीनी कितीही दक्षता घेतली तरी त्याचा उपयोग झाला नाही.
हर्षवर्धन अस्वस्थपणे कामीनी बाईंच्या पलंगावर बसला.तो विचारात हरवून गेला.
------------------------------------------------------------
क्रमशः
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३रे भाग ७वा.

🎭 Series Post

View all