Login

कळसुबाई - "एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र"

journey to Kalsubai was more than just a trek — it was the fulfillment of a childhood curiosity born from a schoolbook. Through this story, I’ve tried to capture the emotional highs and lows, the physical challenges, and the quiet strength it takes to chase a beauty of sunrise . It’s a reflection of how a small line in a geography book can turn into a deeply personal adventure years later. I hope readers feel the same mix of excitement, struggle, and satisfaction that I experienced on this unforgettable climb.
Part -1

पाचव्या इयत्तेत असताना भूगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं – "महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई." तेव्हा मनात विचार आला होता – हे शिखर नेमकं कसं दिसतं असेल? .भंडारदऱ्याजवळील इगतपुरी तालुक्यात आहे. ५४०० फूट उंच असलेलं हे शिखर.

१३ एप्रिल २०२५ रोजी, पहाटे 3.45 Am , मी माझा पहिलाच ट्रेक ग्रुप बरोबर पण वैयक्तिक असा ट्रेक सुरु केला. मनात उत्साह होता, आनंद होता, पण थोडीशी घालमेलही होती. पहाटेचा गार वारा आणि पायथ्याशी लागलेल्या कुडांची घर पाहून मन काहीसं स्थिर झालं.या आधी मी छोटे-मोठे ट्रेक केले होते त्यात मला माझ्या शूजवर विश्वास थोडासा कमी होता.

टॉर्चच्या प्रकाशात आम्ही सर्वजण सपाट रस्ता मागे टाकत होतो. पावले निसर्गाच्या दिशेने चालत होती. सुमारे २५ मिनिटांनंतर उत्साहाच्या प्रत्येक पावलात आता थकवा जाणवू लागला होता. मग प्रत्येक चार पावलांनंतर विश्रांती घ्यावी अशी भावना होऊ लागली. क्षणभर थांबत, श्वास सावरत, प्रवास चालूच ठेवत होतो.

एका ठिकाणी तर श्वास एवढा जड झाला, आणि थकवा एवढा वाढला, की वाटलं – 'बस, आता नाही जमणार, इथेच थांबूया.' क्षणभर वाटलं की, पाठीवरचं बॅगेचं ओझं इथेच ठेवून मुक्तपणे चालत राहिलो, तर कदाचित त्रास कमी होईल. पण त्याच ओझ्यात माझ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत . त्या सोडून देणं अशक्य वाटतं. माझ्याबरोबरचे लोकही स्वतःचं ओझं सांभाळत चालत होते . कुणाची बॅग जड, कुणाची हलकी. शरीर थकत होतं, पण मनाला थकू द्यायचं नव्हतं. मन म्हणत राहिलं – 'आपण हे करू शकतो!' मात्र एकट्याने चढणं अवघड वाटत होतं, विशेषतः जेव्हा तुम्हाला नेहमी कोणाच्या आधाराच्या हाताची सवय असते. दोन वेळा पाय घसरला, पण स्वतःला सावरलं .

"प्रत्येक थांब्यावर थोडं दमायला हरकत नाही,
पण थांबणं म्हणजे हार नाही.
शिखर अजून दूर असलं तरी,
मनातली आग सोबत असली की, वाट सुद्धा सोबती होते."

या जगात लोकांकडून धोका मिळतोच. पण माझ्या नव्या टॉर्चने तर माझाच अपेक्षाभंग केला. बंद पडली ती मध्येच. मग एक सोबती होता, ज्याच्या डोक्याला मोठी टॉर्च लावलेली होती. त्याच्याबरोबर एक टप्पा पार केला.
मी ना अगदी पुढे होते, ना खूपच मागे – कुठेतरी मधोमध, स्वतःच्या लयीत.

काही लोक तुमच्याबरोबर थोड्या वेळासाठी तुमच्या प्रवासात सोबत असू शकतात आणि ते तुमचे सोबती बनतात. एका ठिकाणी रस्ते वेगळे होतात आणि मग स्वतःचा प्रवास स्वतःच करायचा असतो. तसंच झालं. मोठी टॉर्च लावलेला माझा सोबती आता मागेपुढे होता. मी आता माझ्या फोनची टॉर्च वापरत होते.

आता मध्येच एक उंच टप्पा आला, अगदी कमरेच्या आसपास. मी माझा उजवा पाय वर दगडावर ठेवला, हात दगडावर टेकवले. हाताच्या आधाराने उजवा पाय हवेत उचलला, आणि त्याच वेळी कोणीतरी मागून माझ्या बॅगला उचलून धरलं. आणि मी क्षणांत तो टप्पा पार केला.माझ्या तोंडातून "थँक्यू" आपोआप निघून गेला. मी पुढे चालत राहिले. मागे वळूनही पाहिलं नाही आणि ते लक्षातही राहिलं नाही.

कधी कधी आयुष्यात अशीच लोकं येतात – जी न ओळखता आपल्याला जीवनाच्या सगळ्यात कठीण काळात मदत करतात, काहीही अपेक्षा न करता.
नंतर मला जाणून घ्यायचं होतं की मला कोणी मदत केली. पण आता याची जाणीव आहे, की मलाही अशी मदत कुणाला तरी करायला आवडेल.

आता हळूहळू अर्ध्याहून अधिक ट्रेक पूर्ण झाला होता. त्यामध्ये दोन लोखंडाच्या शिड्या पार केल्या होत्या. त्या उंच, तीव्र आणि भितीदायक होत्या.

मी एका खडकावर बसले. अंधारात चमकणारे तारे आणि पौर्णिमेचा सुंदर चंद्र होता. सगळं कसं आवडीचं जुळून आलं होतं. थंडगार हवेच्या लाटा म्हणाव्यात, ते दृश्य सुंदर होतं.

हातात लिंबू सरबताचा ग्लास आणि समोर मनमोहक दृश्य .प्रत्येक घोटात सुरुवातीपासून केलेला प्रवास वाहत होता. शरीरात नवीन ऊर्जा तयार होत होती. तो अस्मरणीय क्षण होता.

एकटं असणं म्हणजे शांतता शोधणं – एकाकीपणाच नसतो, ती स्वतःशी असलेली मैत्रीही असते.


एका लिंबू सरबताने एवढं प्रोत्साहित केलं होतं की थकवा निघून गेला होता. बस, आता फक्त शिखरावर पोहोचणं आणि सूर्योदय पाहणं एवढंच स्वप्न डोळ्यांत होतं.

उंचावरून दिसणारे डोंगरांचे दृश्य, ढगांची सुंदर नक्षी हे सर्व पाहण्याच्या मोहाने पाय आपोआप झपाट्याने चालत होते.आता शेवटचा टप्पा दिसू लागला होता. सकाळचे पाच पंचवीस वाजले होते. आभाळात पिवळसर, केशरी रंगांच्या छटा तयार झाल्या होत्या. शेवटी सगळे हळूहळू एकाच रस्त्यावर भेटू लागलो होतो. शेवटी "कळसुबाई – एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र" ला पोहोचलो.

आजूबाजूला होती निसर्गाची अद्भुत सुंदरता, आणि चेहऱ्यावर "आई डिड इट" सांगणारा आनंद.

सगळ्यांच्या नजरा आता एकाच दिशेने – पूर्वेकडे.

आता फक्त आतुरता होती सूर्योदयाची .निसर्गाची जादू आम्ही आमच्या डोळ्यांमध्ये, शिवाय मोबाईलमध्येही टिपत होतो.

अंधार हळूहळू मागे सरत होता आणि एक केशरी प्रकाशाच्या रेषा क्षितिजावर उमटू लागल्या. तो क्षण – जणू सृष्टी स्वतःच्या नेहमीच्या गतीने, पण माझ्यासाठी थांबली होती. समोर सूर्याचे पहिलं किरण आल्यानंतर सगळ्या कष्टांना अर्थ मिळाला. अंगावर थंडी असूनही मनात एक ऊब जाणवत होती. सगळं खाली दिसणारं विश्व खूप लहान वाटत होतं आणि मन मात्र खूप मोठं झालं होतं. शांत झालं होतं .

ते शिखर – जे एकेकाळी पुस्तकात फक्त नावाने ओळखलेलं होतं – आता माझ्या पावलांखाली होतं, माझ्या डोळ्यांसमोर होत.

"The journey isn’t over yet… To be continued."