लेखक - जी. ए. कुलकर्णी
प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
काजळमाया - एक गूढ वाचन प्रवास
वाचन हा जरी छंद असला तरीही यादरम्यान डिजीटल वाचनच जास्त होतंय.
भारावल्यासारखे तर ते दिवस होते १९८९ -९४ दहावी ते ग्रॅजुएशनपर्यंतचे जेव्हा बैठक लावून पानीपत , युगंधर , छावा , स्वामी , ययाती, नाचगं घुमा , सांगते ऐका , उपरा अशी खूप पुस्तकं वाचली. सुमती क्षेत्रमाडे, दुर्गाबाई ,पुलं, आणि अनंत तिबिले यांची खूप पुस्तकं वाचली. त्याचं रसग्रहण करणं सुचलं नाही कधी. मराठीचे शिक्षक स्वतः चांगले वाचक होते त्यामुळे ते पुस्तकांची नावे सुचवायचे.
मग वपु नावाने मनावर जे गारूड केलं ते मात्र कायमच राहिलं ,आजतागायत उतरलं नाही. वपूंच्या काही पुस्तकांची तर २-३ वेळा वाचन -यात्रा झालीय. वपु नेहमीसाठी आवडते लेखक झाले.
महत्वाचं वाचन म्हणजे त्यावेळी दरवर्षी येणार्या दिवाळी अंकातल्या कथा.
पण १९९४ पासून २५-२६ वर्षे मराठी वाचन कमी झालं , म्हणजे परप्रांतातगेल्याने किंवा प्राथमिकता बदलल्याने बंदच झालं म्हणाना.
एक हिन्दी शिक्षिका म्हणून करीयर निवडलं व ते इंग्रजी माध्यामाच्या शाळेत त्यामुळे स्वयं विकासा साठी हिन्दी व इंग्रजीचं विपुल वाचन झालं.
मग ठरवून एकेक कथासंग्रह कुठूनही मिळवून वाचायला सुरूवात केली.
पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन पण थोडं वाचलं की ते डोक्यावरून जायला लागलं.
मग तो शांत निवांत व पचवत वाचला. माझ्या बुद्धिच्या मानाने किती आकलन झालं ते सांगणं कठिण . . . पण खूप सुंदर अनुभव होता.
शांताक्काच्या मनाची कल्पना करवत नाही.
पतीला थोर माणूस समजून , त्याच्या सोबत तीस वर्षे राहूनही, तो गेल्यावर त्याच्याबद्दल जे काही सत्य उमगतं त्यानंतर तीस वर्षांचा तो मानसिक डोलारा ढासळतो आणि ज्या बहिणीला आयुष्यभर वेंधळी समजत राहिली ती कुंकवाची भागीदारीण होती हे कळतं ,ते किती मोठं दुर्दैव ! पोटच्या सख्या मुलाकडूनच शांताक्काला गलिच्छ आरोप व चारित्र्यावर शिंतोडे उडवून घ्यावे लागतात आणि तिला स्वतःचं पातिव्रत्य पटवून देता येवू नये ही विडंबना !
ज्या दिराला आयुष्य भर गुन्हेगार समजत राहीली त्या दिराने जाताजाता खर्या गुन्हेगाराचं नाव सांगावं . . . आणि ते अविश्वसनीय वाटावं आणि मग सगळंच असह्य होत जावं असं काहीसं घडतं!.
ज्या माणसाला सगळेजण महान मानतात त्या नवर्याने स्वतःच्या लग्नाच्या बायकोसाठी फुटकी कवडीही मागे ठेवू नये, हे किती त्रासदायक !
तोच माणूस किती ढोंगी , बहुरूपी, स्वार्थी, दुटप्पी होता हे त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या माघारी कळावं ही पण असहाय्य गोष्ट!
शुन्यातून निघून, पुन्हा शून्यातच मिळून, शून्य बनून राहण्याची जाणीव. . . . म्हणजे जिथून सुरूवात केली, तिथेच शेवटी येवून राहण्याचं दुर्भाग्य नशीबी असावं . . . म्हणजेच एक प्रदक्षिणा पूर्ण झाली . . .असं काहीसं आकलन माझ्या लघुबुद्धिला झालं.
एका ठिपक्याच्या हव्यासापायी व मंदिरासाठी शामण्णा ची अनाकलनीय धडपड व अशाश्वत प्रयत्न, त्याचाच विचित्र झालेला अंत व त्या प्रवासादरम्यान घडलेल्या त्या घटना. . . . वर्णनातीत आहेत. . . तो साधू , ते भाकित मग कवट्यांचा खेळ आणि राख. . . म्हणजे कळतं पण कळत नाही अशी गूढ रहस्य मयी कथा म्हणजे ठिपका!
याच संग्रहातील काही अन्य कथा , स्वप्न , कळसुत्र, पुनरपि, भोवरा, शेवटचे हिरवे पान, दूत, वंश, गुलाम , रत्न , कसाब !
सगळ्याच एकापेक्षा एक गूढ व सुंदर.
अशा कथांसाठी वाचावा असा कथासंग्रह!
दिनांक - २३ .१०. २२