माझ्या सासुबाईंच्या माहेरचा गोतावळा मोठा. चुलत, सख्खे मिळून चौदा -पंधरा बहीण -भाऊ. घरची वडील माणसं चांगल्या पदावर काम करत होती. पैकी सासुबाईंचे वडील 'यशवंत मारुलकर' अतिशय हुशार. गावात त्यांचे घड्याळाचे दुकान होते. सगळ्या प्रकारची, हरतऱ्हेची घड्याळं दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंड होता. कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यावरील घड्याळ त्यांनी दुरुस्त केले होते. असेच बापू आजोबांकडे अनेक जण दुरून घड्याळ दुरुस्तीसाठी येत असत. त्यात राजे - रजवाडे, मोठ्या प्रसिद्ध व्यक्ती यांचा समावेश होता.
अत्यंत अवघड अशी जुन्या पद्धतीची घड्याळं त्यांनी लीलया दुरुस्त केली होती. केवळ चरितार्थ चालविण्यासाठी पैसा, बाकी मोठी ,मोठी कामं करून प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या कोल्हापुरातील एक ज्येष्ठ कलाकार म्हणता येतील अशा बापू आजोबांचा असाच एक आठवणीत राहणारा प्रसंग.
साधारण पंचावन्न, साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सकाळी सकाळी कोणीतरी कामासाठी आलंय म्हणून आजोबा दारात आले. "नमस्कार, मी खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. " समोरच्या व्यक्तीने आपली ओळख करून दिली. हे नाव ऐकून माहिती होतं. पण प्रत्यक्षात इतकी मोठी व्यक्ती आपल्या घरात आलेली पाहून आजोबांना फार आनंद झाला अन् आश्चर्यही वाटलं. देशासाठी काम करणाऱ्या या मोठ्या व्यक्तीचं आपल्याकडं काय काम असेल? असा प्रश्नही त्यांना पडला.
प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ 'डॉ. जयंत नारळीकर' केवळ नाव ऐकून आजोबांना शोधत थेट घरापर्यंत आले होते. महत्त्वाच्या कामासाठी लागणाऱ्या दुर्बिणीचा एक पार्ट नादुरुस्त झाला होता. देशात बऱ्याच ठिकाणी चौकशी करून देखील त्यांना तो पार्ट मिळत नव्हता. अगदी ज्या कंपनीने दुर्बीण बनवली होती त्या कंपनीत देखील तो पार्ट उपलब्ध नव्हता. डॉ. नारळीकरांनी आपली समस्या मारुलकरांपुढे मांडली.
"तुमचं नाव कळालं, तसा मी इथे आलो. ही दुर्बीण दुरुस्त झाली तर उत्तमच. मी पुढचे चार - पाच महिने परदेशात असेन. त्यामुळे इथे यायला जमणार नाही." डॉ. नारळीकर म्हणाले.
"मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या खेपेस आलात की दुर्बीण दुरुस्त होते की नाही ते कळेलच. तरीही मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन." आजोबांनी शब्द दिला आणि डॉ. नारळीकर आपल्या कामासाठी निघून गेले.
घड्याळ दुरुस्त करणाऱ्या बापू आजोबांना दुरुस्तीसाठी आलेली ही वस्तू नवीन होती. तरीही अभ्यास करून, अनेक प्रयत्न, खटपट करून दोन महिन्यांत ती दुर्बीण यशस्वीपणे दुरुस्त करण्यात अखेर त्यांनी यश मिळवलं.
जेव्हा डॉ. नारळीकर आपलं काम संपवून चौकशी करायला घरी आले तेव्हा त्यांना आपली दुर्बीण दुरुस्त झालेली पाहून खूप आश्चर्य वाटलं आणि फार फार आनंद झाला. ही दुर्बीण दुरुस्त होईल अशी डॉक्टरांची आशा मावळली होती. पण आजोबांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता इतर कोणालाही न जमलेली गोष्ट सहज करून दाखवली होती.
बापू आजोबांचं कौतुक करत, वारंवार आभार मानत डॉक्टर नारळीकरांनी त्यांना पैसे देऊ केले. पण "तुमच्यासारख्या देशासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञाचे काम करता आले हीच सौभाग्याची गोष्ट आहे." असं म्हणत आजोबांनी सविनय ते पैसे नाकारले. डॉ. नारळीकरांचे काम तर पूर्ण झाले होते. आजोबांना नमस्कार करत आनंदाने ते दुर्बीण घेऊन निघून गेले.
मात्र बापू आजोबांचं नाव त्यांना कोणी सुचवलं हे आजतागायत कोणालाही माहिती नाही.
काही आठवणी काळानुसार पुसट होत जातात. पिढ्या बदलत जातील तशा त्या नाहीशा होण्याचा संभव असतो. या आठवणी आपण जपून ठेवल्या तर पुढच्या पिढीला यातून प्रेरणादायी विचार मिळतील यात शंका नाही. सासुबाईंच्या माहेरच्या आठवणी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आणि ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.