प्रवास - पाळणाघर ते वृद्धाश्रम...

Story of a couple, they drop their 8 months old baby girl to baby sitting where she gets new family grand parents. Later grand parents explains that why it is important to give time to our children.

            " हॅलो होम स्वीट होम पाळणाघर ? मिसेस आशाताई कदम सोबत बोलू शकते का मी " - अदिती

आशाताई - " हो मी मिसेस आशाताई कदम बोलतोय पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हे पाळणाघर नाहीये फक्त होम स्वीट होम जिथे आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सांभाळतो. "

अदिती - " हो मलाही त्या बद्दलच तुमच्याशी बोलायचं आहे. माझी मुलगी आता आठ महिन्यांची झाली आहे आणि मला आता ऑफिस जॉईन करायचा आहे.  तर मी तिला तिथे ठेवू शकते का ?आणि त्या साठी काय प्रोसिजर आहे? तुमची फी किती आहे ?"

आशाताई - " तुम्ही उद्या दुपारी मला येऊन भेटा आल्यावर आपण सविस्तर बोलू यात . " 

असं म्हणून आशाताई फोन ठेवतात. आदिती तिच्या आठ महिन्याच्या मुलीला म्हणजे ओवीला घेऊन आणि तिला बोलत असते .

आदिती - " माझ्या ओवी ला आता नवीन फ्रेंड्स मिळणार ती आता खूप मजा करणार. " 

प्रशांत हे सगळं बघत असतो त्याला खरंतर हे काही पटलं नव्हतं म्हणून  आदितीला कन्व्हिन्स करण्यासाठी तो तिला बोलू लागतो. 

प्रशांत - " आदिती तू परत विचार कर ओवी फक्त आठ महिन्यांची आहे तू तिला कसं दुसऱ्या कोणाच्या ताब्यात देऊ शकतेस. एवढी लहान आहे ती. ती अजून स्वतःच्या पायावर चालत नाही बोलत नाही ती आई बाबां शिवाय कसं काय राहू शकेल ? " 

आदिती - " हो मला कळतय पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये माझी सुट्टी संपते आणि यापेक्षा जास्त मला सुट्टी मिळणार नाही. तुझ्याकडे दुसरा काही पर्याय असेल तर सांग "

प्रशांत - " आपण आई बाबांना बोलूयात का आपल्याकडे ? " 

आदिती - " नाही नको. आपलं वन बीएचके घर आहे ते आले तर उगाच घरामध्ये अडचण होईल आणि तसं पण ते दादा वहिनी कडे सेट झालेले आहेत .ओवी आता लहान आहे एक दोन वर्षांचा तर प्रश्न आहे परत  स्कूल चालू होईल मग काही टेन्शन नाही. " 

प्रशांत - " एक-दोन वर्ष तुला थोडी वाटतात का ? ती कशी राहील आपल्या शिवाय ?ती किती लहान आहे तिचा तरी विचार कर. "

अदिती - " माझा निर्णय झाला आहे आपण उद्या दुपारी होम स्वीट होम मध्ये जाऊन फॉर्मॅलिटी पूर्ण करूयात. "

प्रशांत - " तुझं सगळं ठरलं आहे तर मी काय बोलणार होऊ दे तुझ्या मनासारखं. " 

आदिती प्रशांतच काही ऐकत नाही ती तिच्या निर्णयावर ठाम असते. दुसऱ्या दिवशी ते होम स्वीट होम मध्ये जाऊन आशाताईंना भेटतात.

आदिती - " नमस्ते आशाताई मी मिसेस आदिती मोरे. हे माझे मिस्टर प्रशांत मोरे आणि ही माझी मुलगी ओवी. " 

आशाताई - " नमस्ते. तर तुम्हाला ओवी ला आमच्याकडे ठेवायचा आहे. " 

आदिती - " हो. " 

आशाताई - " ठीक आहे समोर ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या बाकी डिटेल्स ते तुम्हाला सांगतील. कधीपासून तुम्ही ओवीला आमच्याकडे पाठवणार आहे ? "

अदिती - " मला पुढच्या तीन दिवसांमध्ये ऑफिस जॉईन करायचा आहे तर त्या दिवशी पासूनच सोडेल. " 

आशाताई - " तुम्ही आजपासूनच ओवीला इथे ठेवा . आज उद्या आणि परवा तुम्ही थोडा वेळ थांबा म्हणजे तिची इथे थोडी ओळख होईल. " 

आदिती - " ठीक आहे आम्ही फॉर्मलिटी पूर्ण करून येतो. "

आदिती ओवीला प्रशांत कडे देऊन ऑफिसमध्ये जाते. प्रशांतला हे अजिबात पटलं नव्हतं पण तो काही बोलू शकत नव्हता कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आशाताईंनी सांगितल्याप्रमाणे आदिती आणि प्रशांत ओवीला घेऊन तिथे थांबतात तिथे लहान मुलांसोबत ज्येष्ठ नागरिक होते .ओवीला त्यांची ओळख व्हावी म्हणून ते सगळ्यांकडे तिला देत होते. संध्याकाळी ते घरी जातात. घरी गेल्यावर परत प्रशांत आदितीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही. पुढचे दोन दिवस आदिती ओवीला घेऊन होम स्वीट होम मध्ये जाते . 

       अदिती ऑफिस जॉईन करण्याचा दिवस येतो. ओवीला होम स्वीट होम मध्ये ठेवून ऑफिसला निघते. ओवीला तिच्या सोबत काय होतं आहे आणि तिची आई तिला सोडुन कुठे गेली आहे हे कळतच नव्हतं. ती घाबरून रडायला लागली. आशा ताई तिला घेऊन फिरतात आणि तिला शांत करतात. तिथे एक वृद्ध जोडपं होते घाडगे आजी आजोबा. 

 घाडगे आजी - " आशाताई मी घेऊ का बाळाला ? " 

आशाताई - " हो घ्या ना. ओवी नाव आहे हीच. " 

आजी ओवी ला घेतात आणि तिच्याकडे पाहत आशाताईंना बोलतात - " माझी नात पण एवढी झाली असेल आता. मागे मुलाचा फोन आला त्या वेळी ती पाच महिन्यांची होती. " 

आशाताई - " तुमच्या भावना मी समजू शकते म्हणून तर मी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना एकत्र सांभाळण्याचा निर्णय घेतला. उतरत्या वयामध्ये नातवंडांचा हात हातामध्ये असला की म्हातारपण म्हातारपण वाटतच नाही. आणि लहान मुलांना ही आजी-आजोबा असतील तर त्यांचं बालपण खूपच छान जातं. "

घाडगे आजी ओवीला  घेतात आणि तिला फिरवतात. आजी-आजोबांना  ओवी मध्ये त्यांची नात दिसत होती तर ओवीला आजी-आजोबांना मध्ये एक प्रेमाचा हात मिळाला होता. 

आता ओवीचा दिनक्रम झाला होता. सुरुवातीला आदिती ओवीला सोडून गेल्यावर ओवी रडायची पण आता  तिथे रुळली होती. आदिती ने ओवीला तिथे सोडल्यावर आता ओवी रडत नसे .तिथे तिच्या वयाची आणि तिच्यापेक्षा जरा मोठी बरीच मुलं होती आणि आजी-आजोबाही होते बरेच. पाहता-पाहता दोन वर्षा झाले होते. आणि ओवी तीन वर्षांची झाली होती .आता  आदिती घ्यायला आल्यावर ओवी तिच्यासोबत जात नसे. 

       असंच एके दिवशी आदिती घ्यायला आल्यावर ओवी घाडगे आजींच्या मागे लपून बसली. 

आदिती  - " ओवी चल लवकर "

ओवी - " मला नाही तुझ्या सोबत यायचं मला आजी जवळच थांबायचं आहे. "

अदितीने  सांगितलं ओवी ऐकत नाही म्हणून आदिती तिला हाताला धरून ओढत बाहेर घेऊन जाते ओवी मोठ्याने रडत होती.

घाडगे आजी - " पोरी थांब कशाला तिला रडवतेस ? " 

आदिती - " काय करू काकू . ऑफिसमध्ये एवढं काम टेन्शन परत घरी जाऊन घरचं काम त्यात ही असा त्रास देते. "

आजी - " तुझ्याकडे वेळ असेल तर आणि तुला राग येणार नसेल तर तुला एक गोष्ट सांगू का ? " 

अदिती - " बोला ना काकू. " 

आजी - " तुझ्याकडे बघून मला माझे दिवस आठवतात. मी पण नोकरी करत होते म्हणून दोन्ही मुलांना पाळणाघरातच ठेवलं होतं. ते कधी मोठे झाले मला माहितीही नाही मला ऑफिस  आणि घर काम यामधून त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. आमच्या रिटायरमेंट नंतर मी  मुलांना विचारलं आम्ही दोघे  कोणाकडे राहू ?  यावर दोघे मुले बोलले आम्ही तुमची सोय वृद्धाश्रमात करून देतो. आम्हाला ऑफिस आणि आमच्या पर्सनल लाईफ मधून तुमच्या कडे बघायला वेळ मिळणार नाही. त्यापेक्षा तुम्ही वृद्धाश्रम आतच राहा. आम्ही यांना बोललो आता आमचे वय झाले आहेत आणि आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. यावर माझा थोरला मुलगा बोलला आम्हाला ज्यावेळी तुमची गरज होती त्यावेळी होतात का तुम्ही ? आठ महिन्याचा असता पासून मला पाळणाघरात ठेवलं होतं तिथे माझं मीच चालायला शिकलो बोलायला शिकलो पडलो तर हात दिला का तुम्ही ? माझं मीच स्वतःला सावरला आहे आता तुम्ही पण तुमचं तुम्हाला सावरून घ्या. " 

हे सगळं सांगत असताना आजींना खूप भरून येते. त्यांचे डोळे पाण्याने ओले होतात. आदितीला हे सगळ ऐकून खूप धक्का बसला होता तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. 

आजी - " मुलांना लहान असताना आई ची सगळ्यात जास्त गरज असते . अगदीच आई नाही तर आजी-आजोबा असतील तरीही  मुलांचे लहान पण छानच जातं .या वयामध्ये जर त्याच्या वर प्रेम करणारं कोणी सोबत नसेल तर त्यांच्या मनामध्ये प्रेम ही भावनाच निर्माण होत नाही. मी जी चूक केली ती तु करु नकोस. ओवीला तुझी गरज आहे तिला वेळ दे. " 

हे सगळं ऐकताना  अदितीचे डोळे पाण्याने वाहू लागतात. आजी तिचा हात हातामध्ये घेऊन तिला समजावून सांगतात. 

आजी - " आपण ज्या घरासाठी पैसे कमावतो त्या घराला दिवसभर कुलूप असतात.  मुलं दिवसभर पाळणा घरांमध्ये आणि आई वडील वृद्धाश्रमांमध्ये.  तू मला सांग काय उपयोग आहे अशा पैशांचा आणि अशा घराचा. आम्हीपण खूप पैसा कमावला स्वतःचं घर आहे पण काय उपयोग झाला एवढा पैसा कमवून स्वतःचं घर विकत घेऊन आम्ही त्या भिंतींना घरपण नाही देऊ शकलो . पैशाने सगळी सुख विकत घेता येत नाहीत आणि वेळ तर अजिबातच विकत घेता येत नाही. मुलांचे भविष्य चांगला जावा म्हणून पैसा कमावता पण  त्यावेळी त्यांना वर्तमनामध्ये आपली गरज असते हेच आपण विसरून जातो. आपली संस्कृती आपला वारसा आपण त्यांना देऊ शकत नाही मग त्यांचं तेच मोठी होतात आणि त्यांचं एक वेगळं विश्व तयार होतं त्या विश्वामध्ये नंतर आपल्याला जागा राहत नाही आणि मग आपल्या म्हातारपणाला मध्ये त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमांमध्ये ठेवलं म्हणून आपण त्यांच्या पिढीला दोष देतो. आपण त्यांना वेळ दिला प्रेम दिलं तर तेही आपल्याला वेळ देतील प्रेम देतील. ऑफिस मधून घरी आल्यावर जो वेळ असतो त्यापैकी जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवा. मी असं नाही म्हणत की तुम्ही काम सोडून द्या फक्त घरी बसा आणि मुलांना सांभाळा. आणि हे फक्त आईनेच करायचं असं नाहीये वडिलांची तेवढी जबाबदारी असते त्यांनीही मुलांना वेळ दिला पाहिजे. ज्या वेळी मुलांना तुमची गरज आहे  त्यावेळी त्यांना वेळ दिला पाहिजे . ओवीचे आजी आजोबा असतील तर त्यांना बोलावून घे. आणि तुम्ही दोघे पण तिला जास्तीत जास्त वेळ दे. "

आदितीला तिची चूक लक्षात येते. घरी गेल्यावर ती प्रशांतला आजीने जे काही सांगितले आहे ते  सांगते आणि बोलते

आदिती - " आपण आई बाबांना इथे बोलावून घेऊयात. "

प्रशांत लगेच आई बाबांना फोन करून बोलावून घेतो.  अदिती आणि प्रशांत काही दिवसांसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतात आणि ओवी ला वेळ देतात.