जीवनाच्या उतारवयात... सोबती तू आणि मी

Apan bhagyshali aahot jivnachya utarvayat hi sobat aahot he mahtwach

गणपतराव दारात आले आणि सुटकेचा श्वास घेतला.


गणपतराव: “माधवी काय ती गर्दी?अग खूप मोठी लाईन लागली होती, तरुण मुलं- मुली धक्के मारून समोर जायचे. कशीबशी दोन तिकिटे मिळाली. आज रात्री उशीरा झोपावं लागेल, नऊ ते बाराची तिकिटे मिळालीत.”


माधवी: “काय हो तुम्ही? संध्याकाळची तिकिटे आणायची ना, रात्री जागरण होत नाही.”


गणपतराव: “असू दे ग,आपण काय रोज- रोज जातो का? आज किती तरी वर्षानंतर आपण पिक्चरला जाणार आहोत.”


माधवी आणि गणपतराव पासष्टी उलटलेले सुखी दाम्पत्य. मुला- मुलींचे लग्न झाले आणि ते आपापल्या संसारात रममाण झालेत.


समीर(मुलगा) आणि नेहा( सून) दोघेही नोकरी करायचे.सुरवातीला नेहा घरातल्या कामात माधवीला मदत करायची. पण हळूहळू ते कमी झालं.


नेहाची कामात कुठलीच मदत होत नसल्यामुळे माधवी दिवसभर काम करून थकून जायची.


एकदा माधवी समीरला बोलली,


माधवी: “समीर अरे नेहाला सांग ना, सकाळी नाहीतर संध्याकाळी तरी मला कामात मदत करत जा.मला आता वयानुसार तेवढं काम होत नाही रे.”


समीर: “आई ती दिवसभर ऑफिस मध्ये काम करून थकते ग,अजून आल्या आल्या कुठे काय काम करणार आहे, तू दिवसभर असतेस ना घरीच असं किती काम असतात. आम्ही गेल्यावर दोघेच असता ना घरात. आई मी तिला नाही सांगू शकत,ती पण थकलेली असते.”


समीरच्या बोलण्याने माधवी निराश झाली, बाहेरून गणपतरावांनी सगळं ऐकलं, ते माधवी जवळ गेले, त्यांनी माधवीला समजवलं.


“ माधवी जे जस सुरू आहे तसच राहू दे उगाच आपली लुडबुड नको.”


माधवी: “अहो पण.”

गणपतरावांनी माधवीला समोर काही बोलूच दिल नाही.
माधवी डोळे अश्रूंनी भरले. “आयुष्यभर मी कामच करत आले आणि आताही करते तरी मुलगा म्हणतो दिवसभर काय करते.”

माधवी स्वतःशीच बोलू लागली.


गणपतरावांना माधवीच्या मनाची घालमेल समजत होती, थकलेलं शरीर दिसत होतं.


माधवी आणि गणपतरावांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
रात्री ते समीरच्या खोलीत गेले.


गणपतराव: “समीर आम्ही गावाकडे जायचं म्हणतोय.बरीच वर्षे झालीत तिकडे जाण झालं नाही, आधी नोकरीनिमित्त जाणं होतं नव्हतं, आता घरच्या व्यापामुळे. आता काही महिने आम्ही तिकडेच राहू, माधवीलाही थोडा आराम मिळेल, तिचंही शरीर थकलं, तिच्याने काम होत नाही.”


समीर: “अहो बाबा पण असं अचानक?”


गणपतराव: “ अचानक नाही रे खूप दिवसापासून मनात इच्छा होती ती आता पूर्ण करतो.”


समीर समोर काही बोलणार तेच नेहाने त्याचा हात पकडून त्याला गप्प बसण्यासाठी इशारा केला.


माधवी आणि गणपतराव खोलीतून निघून गेले.


समीर: “नेहा अग मला का अडवलस?”


नेहा: “ते जात आहेना,मग जाऊ दे. थोडा आपल्यालाही एकांत मिळेल.”


दोघांनीही एकमेकांना मिठीत घेतलं.
समीर: “अग पण तो आपल्याला मिळतो की, बर ठीक आहे, नाही अडवत मी त्यांना.”


दुसऱ्या दिवशी गणपतराव आणि माधवी तयार होऊन निघाले.
गावाला गेले, तिथे त्यांचं शेतात छोटंसं घर होत, शेतात काम करणार जोडपं कल्पना आणि मंगल ते दोघे तिथेच राहायचे.
गणपतराव आणि माधवीला बघून त्यांना खूप आनंद झाला.
ते शेतातलं घर,  ती हिरवळ बघून खूप प्रसन्न वाटायचं. दोघांचेही दिवस खूप छान चालले होते.


माधवीला तिथे काहीच काम करावं लागतं नव्हतं. दोघेही छान आरामात राहत होते.

........................

माधवी नसल्यामुळे घरातलं सगळं काम नेहा वर पडलं.
समीरला काम करायची सवय नसल्यामुळे त्याची काहीच मदत होत नव्हती.समीर लहानाचा मोठा झाला पण कधीच त्याने कुठलंच काम केलं नाही, स्वतःसाठी पाणी तरी घ्यायचा नाही, माधवी सगळं हातात द्यायची.


नेहाला सकाळी उठून नाश्ता, स्वयंपाक सगळं करावं लागायचं, तिची चिडचिड व्हायला लागली.


नेहा: “समीर काही तरी हेल्प कर ना रे, कधीची मी एकटीनेच सगळं करतीये.”


समीर: “ये नेहा मला यातली काहीच सवय नाही ग,मी कधीच कोणतं काम केलं नाही, आई सगळं हातात द्यायची.”


नेहाला सगळी काम करून वैताग यायचा. दोघांनाही आईची कमतरता भासायला लागली.


नेहा: “समीर आई होत्या तर किती काम करून घ्यायच्या, आपण त्यांना उगाच बोलायचो की तुम्ही दिवसभर घरीच असता.घरी असूनही त्या दिवसभर कामच करायच्या रे, हे आपल्या लक्षात आलंच नाही.”


समीर: “हो ग , मी पण उगाच बोललो आईला.मी फोन करतो आपण बोलूया तिच्याशी, त्यांना समजावून इकडे बोलवूया.”

समीरने बाबांना फोन केला.


समीर: “हॅलो बाबा, समीर बोलतोय.कसे आहात तुम्ही?आई कशी आहे?.”


गणपतराव: “ठीक आहोत आम्ही दोघेही,  मस्त आनंदात आहोत. तू सांग आज आमची आठवण कशी आली?”


समीर: “बाबा मी काय म्हणतो , बरेच दिवस झालेत तुम्ही तिकडे जाऊन आता या ना परत. आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे.”


गणपतराव: “आमची आठवण येतेय की तुमच्याने घरची कामं होत नाही आहेत म्हणून आठवण येत आहे.”


समीर: “नाही नाही बाबा, तस नाही आहे.”

समीर अजून काही बोलणार बाबांनी फोन ठेवला.

फोन ठेऊन गणपतराव पलटले तर मागे माधवी उभी होती, तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात आनंदाश्रु होते.
गणपतरावांनी  माधवीला जवळ घेतलं.


गणपतराव: “आता रडायचं नाही, जीवनाच्या या उतारवयात तू आणि मी सोबती आहोत आणि नेेहमी राहू.”


काही महिन्यानंतर गणपतराव आणि माधवी शहरात फ्लॅट मध्ये राहायला आले.


पेन्शन असल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू भक्कम होती, त्यांना कुणाच्याही आधाराची गरज नव्हती. दोघेही एकमेकांना सांभाळायला समर्थ होते.
......................
गणपतराव आणि माधवी पिक्चरला गेले. पिक्चर बघून थेटर मधून बाहेर आले तर त्यांना बघून टवाळकी मूलं हसायला लागली.


“हे बघा दोघे म्हातारे, पिक्चर बघायला आले.हे वय आहे का?”
अस म्हणून ते जोरजोरात हसायला लागले.
त्यांचं बोलणं ऐकून गणपतरावांना राग नाही आला उलट ते त्या मुलांकडे गेले.

गणपतराव: “मुलांनो अगदी बरोबर बोललात तुम्ही? हे वय आहे का?पण मुलांनो मी आज तुम्हाला सांगतो. मी लहान होतो तेव्हा माझा सगळा वेळ शिक्षण आणि अभ्यास यात गेला त्यामुळे मी कधी पिक्चरला गेलोच नाही, त्यानंतर नोकरी लागली मग घरच्यांना मदत म्हणून बाहेर कधीच पैसे उडवले नाहीत. मग लग्न झालं संसार सुरू झाला, मुलं झाली त्यांनतर त्यांच्या संगोपनात काही कमी पडू नये म्हणून आम्ही कधीच बाहेर खर्च केला नाही.
आता मुलांची लग्न झाली, ते त्यांच्या संसारात रममाण झालेत.
आता आमच्याकडे वेळही आहे आणि पैसाही आणि अजून एक महत्वाच जीवनाच्या या उतारवयात आम्ही सोबत आहोत. हे सुख खूप कमी लोकांना मिळतं.
आम्ही भाग्यशाली की आम्ही सोबत आहोत.”


समाप्त: 


खरच जीवनाच्या उतारवयात कोणी सोबत नसलं तरी चालतं, पती- पत्नी सोबत असायला हवेत. त्यांना एकमेकांचा आधार असतो, मुलं स्वतःच्या स्वार्थसाठी आई वडिलांना जवळ ठेवतात आणि स्वार्थ संपला की दूर लोटतात. त्यांनी दूर करायच्याआधीच  स्वतःच दूर गेलेलं बर. गणपतराव आणि माधवीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे शेवटचे दिवस सुखकर झालेत, एकमेकांना वेळ देता आला, काही क्षण एकमेकांसोबत जगता आले.
तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा, लाईक, कंमेंट, शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद