Login

जन्म बाईचा भाग २८

कथा मालतीच्या जीवनाची

जन्म बाईचा भाग २८
"मालती, आई किशोरचं कौतुक करत होती. किशोर, खूप काळजी घेतो, लक्ष देतो बोलत होती." श्रीकांत म्हणाला.

"हम्म." मालती.

"मालती, अजूनही रागावली आहेस?" श्रीकांत तिचा हात पकडत म्हणाला.

"नाही, मी कशाला राग धरू. मी त्या दिवशी बोलून मन मोकळं केलं. जे ही मनात होतं ते बोलली."

"मालती, त्यादिवशी तू व्यक्त झाली ते बरं केलं. कुठेतरी मी तुझाही अपराधी आहे. बाबा, तुझी बाजू सावरून घेत होते तसं जमलं नाही. आईला वाईट वाटेल हा विचार तुझी बाजूच घेऊ देत नव्हता. खरंच चुकलो मी. मला जाणीव झाली आहे."

त्याचा चेहरा बरंच काही सांगत होता.

"मालती, जेव्हा मला साथ द्यायची होती मी दिली नाही. मला माफ करशील?"

त्याचा आवाज जड झाला.

"किशोरचे बाबा, प्लिज माफी वैगेरे नका मागू, फक्त कोणाचं ऐकून किशोर आणि माझ्यावर राग नका काढू. आपल्या कुटूंबातील एकी हीच आपली ताकद आहे. असेही मी सगळं पाठीमागे सोडलं आहे. आता खूप पुढे निघून आली आहे. भूतकाळाचं ओझं घेऊन जगणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं.
मी खुश आहे माझ्या परिवारात, तुम्ही आणि किशोर हेच माझे आधारस्तंभ, ते डगमगता कामा नये."


"यापुढे असं अविचारिपणे वागणार नाही मालती." त्याने वचन दिलं.

त्यालाही मनात कुठेतरी निलेश आला नाही हे वाईट वाटत होतं.

'चार महिन्यात एकही दिवस दादाला आईसाठी मिळाला नाही का?
त्याचं ऐकून किशोरवर मी रागराग केला, शेवटी आईची काळजी माझ्या किशोरनेच आणि मालतीने घेतली.'


वाईट वेळ खऱ्या अर्थाने चांगली असते, आपलं कोण आणि परकं कोण हे वाईट वेळ सांगते.

इथे सुमन देखील उदास होती.

आयुष्यभर नयन आणि निलेशसाठीच जगत राहिली. निशाचा खऱ्या अर्थाने सांभाळ तिनेच केला होता. जीव गुंतला होता.


तिला श्रीपंतरावांची खूप आठवण येत होती.

त्यांच्या फोटोकडे पाहून ती खूप रडत होती.

तितक्यात श्रीकांत आला.


"आई, काय झालं? काही त्रास होतोय का?"

मालती देखील दारापाशी आली.
दोघांचं बोलणं ऐकू लागली.


"हो श्रीकांत खूप त्रास होतोय. आयुष्यभर डोळ्यावर झापड होती. आता मात्र ती झापड नाहीशी झाली."

"कसली झापड?"

"श्रीकांत, तुझे बाबा मला नेहमी म्हणायचे मालती हिरा आहे. तिचं खूप कौतुक करायचे. मला तेव्हा राग यायचा. माझ्यासाठी माझ्या भावाची मुलगी जवळची होती. मालतीला मी कधीच नीट वागवलं नाही. तिच्याशी प्रेमाने दोन शब्द कधी बोलले नाही. फार विचित्र वागले. मला नेहमी असं वाटायचं परक्याची पोर ती. मला काय जीव लावणार? नयनच मला जीव लावणार,सांभाळ करेन; पण झालं उलटं. मी इथे आल्यापासून एकदाही ती भेटायला आली नाही. निलेश देखील आला नाही. निशाने तर एकदाही फोन केला नाही. फार आशेने मी वाट बघत होते; पण निराशा झाली.
किशोरला माझा सहवास लाभला नाही, तरी देखील त्याचा किती जीव आहे माझ्यावर.
खरंच माझे डोळे उघडले श्रीकांत. आयुष्यभर चुकीचं वागत राहिले. मालतीला नेहमी टोचून बोलत राहिले, तिच्या माहेरच्याना देखील कधीच मान, सन्मान दिला नाही. इतकं करून देखील त्यादिवशी मालतीची आई मला भेटायला आली, विचारपूस केली. मला माझीच लाज वाटली. मी किती विचित्रपणे वागत राहिले, तरी देखील माझ्यासाठी मालतीने इतकं केलं. श्रीकांत, तुझ्या बाबांचे शेवटचं वाक्य काय होतं माहीत आहे?"

"काय?" श्रीकांत.

मालती देखील हे सारं पाणावलेल्या डोळ्यांनी ऐकत होती.

"श्रीकांत, तुझे बाबा मला म्हणाले श्रीकांत, मालतीला कधीच अंतर देऊ नको. मला तेव्हा आश्चर्य वाटलं; पण आता चांगल्या पद्धतीने समजलं ते असं का म्हणाले. त्यांना माहीत होतं तू आणि मालतीच माझा सांभाळ करणार. तुझे बाबा माणसं ओळखण्यात पटाईत होते. श्रीकांत फार पश्चाताप होतोय."

मालतीला तर असं वाटत होतं ती स्वप्न बघते आहे की काय.

तिला स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.

तिने तर अपेक्षाच सोडली होती.

तिच्यासाठी हा एक सुखद धक्का होता.

आता सगळंच बदललं होतं.

सुमनसाठी मालती जवळची झाली होती.

तिचा स्वभाव खूप बदलला होता.

मालतीसाठी तिच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं.
मालतीला जमेल तशी ती मदतही करू लागली होती.

आधी सुमनच्या सहवासात नकारात्मक वाटायचे, ह्रदय धडधडायचे आता मात्र तिचा सहवास हवाहवासा वाटू लागला.

किशोर देखील आजी आणि आई मधील बहरलेलं नातं बघून सुखावला.


एक दिवस निलेश आणि नयन भेटायला आले.

सुमन मात्र इतकी काही खुश नव्हती.

नेहमीच नयन नयन करणारी सुमन आता मात्र मालती मालती करू लागली. नयनच्या ते लक्षात आलं आणि आश्चर्य देखील वाटलं.
मालतीने जादूची कांडी फिरवली की काय असं तिला वाटत होतं.

दोन तास बसले.

"आई, निघतो मी." निलेश म्हणाला.

"आला आहेस तर राहा." सुमन म्हणाली.

"हो दादा राहा. लगेच निघालास." श्रीकांत म्हणाला.

नयन निलेश दोघे एकमेकांकडे बघू लागले.

"आम्ही नंतर पुन्हा येऊ. ते काय आहे ना नयनची मैत्रीण आहे तिच्या मुलाचे लग्न आहे, तिने बोलावलं आहे."

ह्याचा अर्थ ते दोघं लग्नासाठी आले होते.

सर्वांच्या लक्षात आलं.

"निलेश, नयनच्या मैत्रिणीच्या मुलाचे लग्न आहे म्हणून तुम्ही आलात." सुमन.

"आत्या, तसं नाही. तुम्हाला भेटायचे होते." नयन म्हणाली.

"मी आजारी पडून चार महिने झाले आणि ह्या चार महिन्यात एकही दिवस मिळाला नाही का?
आता लग्न आहे म्हणून आला आहात."

"आई, तुझा गैरसमज होतोय." निलेश.

"निलेश, गैरसमज होत होता आता सगळंच समजलं आहे. निघा, लग्नाला उशीर होईल. हो आणि माझी काळजी करू नका, ह्यापूढे भेटायला आला नाही तरी चालेल, कारण इथे माझा मुलगा,सून आणि नातू आहे. खूप छान पद्धतीने सांभाळ करतात."


"आई, काय बोलतेय हे सगळं?" निलेश.


सुमनने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि खोलीत निघून गेली.


"भाऊजी, त्यांची तब्येत ठीक नाही. असू द्या मनावर घेऊ नका." मालती म्हणाली.

"हो दादा, तू आईचं बोलणं मनावर घेऊ नको."

निलेश आणि नयन दोघेही घराबाहेर पडले.

एकमात्र होतं आता सुमनच्या मनात निलेश आणि नयनसाठी स्थान नव्हतं.

सुमनच्या मनात आता मालतीच सर्वोच्च स्थानावर होती.

क्रमशः
अश्विनी ओगले.
अंत भला तो सब भला असंच होतंय कथेमध्ये.
कथेचा शेवट लवकरच होईल. पुढचे भाग अजिबात मिस करू नका. आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा.

सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन


🎭 Series Post

View all