जगण्यावर शतदा प्रेम करावे

This Is A Young Man Story Who Is Suffering From Destiny And Just Two Incident Change His Thinking Process Toward Life
                                 सुर्यदेवता मावळतीला आले होते. दिवे लावण्याची वेळ झाली होती. सावित्रीने नेहमी प्रमाणे देवाजवळ दिवा लावला. स्वतःशीच हळू आवाजात काही तरी पुटपुटली. तिला आता हृदयाचा जास्त त्रास जाणवत असल्याने सारखे थकल्या सारखे वाटत होते. पण परिस्थिती जेमतेम असल्यामुळे डॉक्टरांनी सांगीतलेले ऑपरेशन पुढे ढकळावे लागत होते. आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने ती सतीशकडे तब्येतीची कोणतीच तक्रार करत नव्हती. पती अकाली गेल्यामुळे सतीश एकटाच तिचा सहारा होता. त्याला वाढवण्यात व शिकवण्यात तीच अखं आयुष्य खर्ची झालं होतं. सतीशला चांगली नोकरी लागल्यानंतर त्याच लग्न लावू व नंतर नातवंडासोबत खेळत पूढील आयुष्य आनंदानं जगू असं तिने मनाशी ठरवलं होतं. पण सतीशचे शिक्षण पूर्ण होऊन एक वर्ष उलटलं. एक कुरियरची नोकरी सोडली तर त्याला योग्य ते यश, चांगली नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे सावित्री नेहमी काळजीत राहत होती. पण सतीशची सध्याची मानसिक स्थिती पाहुन ती त्याला काहीच कळू देत नव्हती.

                      आज नेहमीपेक्षा खूप उशीर झाला. सतीश अजून घरी आला नव्हता म्हणून सावित्रीला हुरहूर वाटत होती. सतीश आल्यानंतर त्याच्या आवडीचं वांग्याचं भरीत करू! असं ठरवून ती त्याची वाट पाहत होती. रात्र चढत होती मात्र सतीशचा अजूनही काही पत्ता नव्हता. अशास्थितीत वाईट विचार तिच्या मनात घोळू लागले.  "सततच अपयश येत असल्याने सतीशने काही वेड-वाकड तर केलं नसेल ना" या विचाराने ती थक्क झाली. आता तिला घड्याळाच्या कट्टयाचे टकटक आवाज ऐकू येऊ लागले. तेवढयात तिला सतीशच्या सायकल ठेवण्याचा आवाज ऐकू आला. सतीशला पाहून तिचा दिवसभराचा थकवा एका क्षणात दूर झाला.

                  सतीश फ्रेश होईपर्यंत तिने सतीशच्या आवडीचे भरीत केले. जेवताना विषय नको म्हणून ती न बोलता सतीशला वाढत होती. पण आज मात्र आईची काळजी व तगमग सतीशच्या नजरेतून सुटली नव्हती.
"आई तू पण जेऊन घे ना माझ्या सोबत"
असं बोलून त्याने आईला बोलते करण्याचा प्रयत्न केला.
"नको बाळा तू करून घे जेवण.. मी करेल नंतर" बोलता-बोलता आईने त्याला भाकर वाढती घेतली. 
"आई आता बस झालं जेवण! पोट भरलं ग बाई माझं"
सतीश ने जेवण संपविले.

                 आई झोपली होती. मात्र सतीशला त्या रात्री झोपच लागत नव्हती. तो सारखा आईकडे पाहत होता. व स्वतःला दोष देत होता. तो ही आता हतबल झाला होता. रोज सकाळी नव्या उमेदीन उठून कुरियरची नोकरी करायची व चांगल्या नोकरीच्या शोधात राहायचे पण सरते शेवटी नेहमी प्रमाणे निराश.. रिकाम्या हाती घरी येणं हे त्याला सारख रुतत होत. अजूनही आपण आईच्या शिवणकामाच्या भरवश्यावर जीवन जगत आहोत हा विचार त्याला सहन होत नव्हता. त्यातच आईची दिवसंदिवस खालावत चाललेली तब्येत त्याला पाहवत नव्हती. घरची अशी परिस्थिती व आपल्या पदरी पडणारे सारखे अपयश यामुळे तो सारखा खचून जात  होता. अशा बिकट परिस्थितीत आपण अजून जास्त काळ तग धरू शकणार नाही याची जाणीव त्याला होत होती. "आत्महत्या करावी" हा विचार त्याच्या मनात घर करू लागला. पण आईकडे पाहून त्याला
आत्महत्या देखील करता येत नव्हती. तेव्हा त्याला सतत "भावनिक दृष्ट्या आत्महत्येचं ही स्वातंत्र्य असत तर कीती बरं झालं असत" असं सारखं वाटत होते. "आत्महत्या करावी वाटून देखील आत्महत्या न करता येन" माणसाने एवढे ही हतबल होऊ नये असे त्याला वाटत होते.

                  सतीश पूर्ण हताश झाला होता. याच मानसिक स्थितीत तो कुरियर सेंटरला गेला. पण काम करत असताना देखील त्याच्या मनातून आत्महत्येचे विचार काही करून जात नव्हते. आज मनोज न आल्याने कुरियर पोहवण्याची जबाबदारी सतीशकडे आली होती. सर्व कुरियर शॉर्टइंग करून सतीशने कुरियर वाटण्यास सुरुवात केली. दिवसभर कुरियर वाटून झाल्यावर थकलेला सतीश हताश मनानं चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी बसला होता.  तेवढ्यात त्याच्या पायाला काही तरी टोचत आहे याची जाणीव त्याला झाली.  "बाबा एक कप चहा पाजा ना.?" या आवाजानं तो थोडा शुद्धीवर आला. पाहतो तर काय एक मळलेले कापड घातलेला उतारवयातील आंधळा माणूस हातात काठी घेऊन सतीशकडे चहा साठी विनवणी करत होता. त्याची अशी स्थिती पाहून सतीशला त्याची दया आली. त्याला चहा देऊन सतीश घराकडे निघालाच होता. तर त्याला जाणवले की आणखी एक कुरियर देण्याचे बाकी आहे. "समाधान गणपत सोळुंके" "पत्ता जुनी झोपडपट्टी" शेवटचे कुरियर देऊन सरळ घरी जाऊ अस म्हणत त्याने सायकल काढली. मात्र आत्महत्येचे विचार काही करून त्याच्या मनातून जात नव्हते. त्या विचारातच तो करियरच्या पत्त्यावर पोहचला.

               एक झोपडी ती ही पडत्या स्वरूपात होती. केव्हा पडेल याचा काही अंदाज नव्हता. जेमतेम एक खोली एवढी जागा. ..तेवढ्यात रेडिओवर गुलझार ने रचलेल किशोर कुमारच  "आणेवाला पल जाणे वाला है"  हे गाणे सुरू होते. त्या मागेच आजोबाही तेच गाणे आनंदाने गुणगुणत होते. सतीशने आवाज दिला.
"समाधान गणपत सोळुंके आपणच का.?"
"हो मीच "समाधान"....बोला काय काम काढलं आजोबा कडे"
"काही नाही तुमचं कुरियर आहे."
"अरे वा! आलं का कुरियर.?" अस म्हणून आजोबाने
"कौशल्या आलं ग! बाई कुरियर" असं म्हणत-म्हणत आजोबा आत गेले व आनंदाने सतीशला विचारलं...
"बहाद्दर चहा घेतोस का.? ..पण दूध नाही काळा चहा.. घेतोस का.?"
नकळत सतीशच्या तोंडून "हो आजोबा",
"थांब मी ठेवतो, तुझी आजी खूप दिवसापासून आजारी आहे."
अस म्हणत आजोबा चहा ठेवतच बोलत होते.
"हा चहा मला आनंद झाला म्हणून तुला देत आहे पोरा..खूप दिवसानी मनीषची मानिऑर्डर आली 500 रु पाठविले मुलाने, तो शहरात नोकरीवर आहे. सून बाई नातवंड तिथेच राहतात. आमची अडचण होत होती त्याला, म्हणून आम्ही निघून आलो." असं म्हणत आजोबाने सतिशच्या हातात चहाचा कप दिला..चहा चा घोट घेत सतीश ने विचारल...
"आजी कधी पासून अंथरुणाला पडली आहे आजोबा.?"...
"खूप दिवस झालेत ल.आता जास्त दिवस तिची सोबत राहणार नाही"
असं म्हणत आजोबा आत गेले. बाहेर येताच सतीशने विचारलं..
" आजोबा,या अशा परिस्थितीत देखील तुम्ही एवढे आनंदी कशे काय राहता.?"
आजोबा बोलता बोलता.. बोलत गेले म्हणाले,
"सुख भोगा की दुःख भोगा ते भोगण्यासाठी तुम्ही जिवंत आहात हेच खूप आहे. आयुष्य म्हंटल की पडता काळ येतो आणि जातो ही.. सदा सर्वकाळ सर्व दिवस सारखे राहत नाहीत. मनुष्य म्हटलं की तो जन्मला येणार आणि मारणार देखील"..अस म्हणून आजोबा आत गेले.

           सतीश बराच वेळ तिथंच सुन्न बसून राहिला...आज त्याने दोन प्रसंग पाहिले होते , एक आंधळ्या माणसाचा प्रसंग व दुसरा आजोबा व अंथरुणाला खिळलेली त्यांची पत्नी हा प्रसंग...दोन्ही प्रसंग त्याच्या समोर डोकावू लागले.. मानवि स्वभावची वृत्तीच  मुळात तुलना करण्याची असते. मानवी प्रकृतीच्या या नियमाला सतीश ही अपवाद नव्हता. त्याच ही मन नकळत ,त्याच्या परिस्थिती ची तुलना त्या दोन प्रसंगाशी करू लागले. व एवढ्या कठीण परिस्तिथी वर मात करून एक आंधळा माणूस व स्वतःचा मुलगा असून देखील तो जवळ नाही ,पत्नी आहे पण काही दिवसाची सोबती ती ही अंथरुणाला खिळलेली..डोंगराएव्हढे दुःख पचवून दोन्ही व्यक्ती समाधानी जीवन जगत आहेत व आपण खचून जात आहोत, आपण तर आई जवळ आहोत आणि परिस्थिती ही एवढी वाईट नाही...तर या सर्व परिस्थिवर आपण मात करू शकतो. आईचे ऑपरेशन करु शकतो. व आयुष्यात प्रगतीचा मार्गावर वाटचाल ही करू शकतो. हे  सकारात्मक विचार आता आत्महत्येच्या गढूळ विचाराला बाजूला सारून पुढे येऊ लागले. एक नवीन उमेद व ऊर्जा सतीशच्या मनात निर्माण होत होती. एवढ्यात रेडिओ वरून त्याच्या कानावर अरुण दातेचे बोल कानावर पडले .."या जन्मावर या जगण्यावर  शतदा  प्रेम करावे" हेच बोल गुणगुणत सतीश घराकडे निघाला..

..समाप्त..

✍️.....लेखक..
© जगदीश लक्ष्मण वानखडे.
Copyright
All Rights Reserved

संपर्क - jmunnaw@gmail.com