एक क्षण वाटलं की माझा आणि माझ्या बायकोचा ह्या मुलीमुळे घटस्फोट घडणार.. ती जिन्यात आली आणि पुन्हा तिने एक गच्च मिठी मारली...
मी – ओ बाई , तुम्ही लांब व्हा..
मी तिच्या मिठीतून दूर झालो.. सोसायटीत असं मिठी मारणं तेही विवाहीत पुरूषाला. लोक काय म्हणतील याचा विचार डोक्यात घोंघावला .
ती – मला गरज आहे हो तुमच्या मदतीची.
मी – मी काहीही मदत नाही करू शकत सॉरी.
ती – मी आजच्या दिवस तुमच्या घरी येऊ शकते.
थेट तिने घरी येऊ का असं विचारलं . मी थेट गारच पडलो. ही कोण ? कुठून आली ? हिचं नाव काय ? काहीच माहीत नव्हतं. अश्या अनोळख्या मुलीला घरात आसरा देणं. तेही रात्रीच्या वेळी . पुन्हा लोकं काय म्हणतील याचा विचार.
मी – ओ बाई.. तुम्ही प्लीज जा इथून. हे बघा मला नाही तुमची मदत करता येणार .सॉरी.
ती – मी काय करू ? कुठे जाऊ ?
मी – जिथून आलात तिथे जा.
ती – असं कसं जाऊ ? मला मारतील ती माणसं..
मी – एक काम करा . जवळ एक देऊळ आहे त्या देवळात बसा. तिथे तुम्ही सुरक्षित रहाल.
ती – नाही नको.
मी – काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा ? पोलिस स्टेशनमध्ये जायला नकार देताय , देवाळात बसा सांगितलं तर तिथेही जायला नकार देताय ! माझ्या पाठून कशाला येताय ?
ती – भीती वाटते हो मला त्या लांडग्यांची !
मी – म्हणूनच म्हणतोय ना की पोलिस स्टेशनमध्ये जा !
ती – नाही जाऊ शकत !
मी – का ?
ती – मला नाही जायचंय ! कारण नाही सांगता येणार .
मी – ठिक आहे नका सांगू . प्लीज तुम्ही माझ्या समोरून जा. परत माझ्यासमोर येऊ नका.
ती – असं नका बोलू.. खूप भीती वाटत्ये.. मला फक्त तुमच्या आधाराची गरज आहे. मला तुमच्या घरी एक दिवसासाठी आसरा द्या खूप उपकार होतील तुमचे...
मी– तुम्ही ऐकणार नाही का ? पुढे एक चौक आहे. तिथे तुम्हाला टॅक्सी , रिक्षा मिळेल त्यात बसा आणि घरी जा तुमच्या. अनोळखी बाई माणसांना मी माझ्या घरात आसरा देत नाही.
ती अजून रडायला लागली. माझ्या छातीत अजून धडधडू लागलं. आता हळूहळू तिची दया येऊ लागली होती.
ती – ठिक आहे जाते मी.
ती एक पाऊल माझ्यापासून दूर गेली. तोच मला एक आयडीया सुचली.
मी – थांबा.
मी थांबवल्याने तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटलं.
मी – माझ्याकडे एक आयडीया आहे. पण खूप रिस्की आहे.
ती – सांगा तर..
मी – आमची सोसायटीची गच्ची. आज आमच्या सोसायटीच्या गच्चीवर झोपाल ?
ती – पण ..
मी – आता प्लीज नाही म्हणू नका. हा मार्ग दोघांच्याही फायद्याचा आहे.
ती – फायदा ?
मी – हो फायदा. म्हणजे तुम्हाला काहीतरी मदत केल्याचं मला समाधान मिळेल आणि तुम्ही त्या लांडग्यांपासून सुरक्षित असाल.
ती – तयार आहे मी.
मी – पण यात असणारी रिस्क म्हणजे तुम्हाला कुणी आमच्या सोसायटीतल्या व्यक्तीने पाहीलं तर प्लीज माझं नाव नका घेऊ...
ती – काळजी नका करू मी सगळं करेन मॅनेज.
मी – या माझ्या पाठोपाठ .
मी जिन्याची पायरी पटापट सावध रित्या चढू लागलो.. ती सुद्धा माझ्यापाठून येऊ लागली. जिना चढता चढता एक गोष्ट लक्षात आली की आपण तिचं नाव , गाव , पत्ता काहीच तिला विचारलं नाही... जिना चढता चढता तिला विचारलं..
मी – तुमचं नाव काय ?
ती चाचपली.
ती – नाव ?
मी – हां नाव. काहीतरी असेल ना तुमचं नाव !
ती – रावी.
मी – आँ ?
ती – रावी .माझं नाव. रावी काशिनाथ शिर्के.
मी – राहता कुठे?
ती – एकाच ठिकाणी नाही राहत.
तिचं असं बोलणं ऐकून मी जिना चढायचाच थांबलो.
मी – म्हणजे ?
ती – म्हणजे नोकरी निमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सारखं रहाण्याची जागा बदलावी लागते. कधी ठाणे तर कधी धुळे , कधी दादर तर कधी पुणे , कधी अमरावती तर कधी थेट सावंतवाडी... त्यामुळे एकाच ठिकाणी नाही राहत.
आता तिच्यात धीर येत होता. तिला मी माझ्या बोलण्यात गुंतवून ठेवलं होतं. मी आणि तिने पुन्हा जिना चढायला सुरुवात केली.मी – तुम्ही मुळच्या कुठल्या ?
ती – शहापूर.
आणि गच्चीच्या दारापाशी आम्ही आलो होतो... नशीब सेक्रेटरीने गच्चीच्या दाराला कुलूप लावलं नव्हतं. मी दाराची कडी काढली व आम्ही गच्चीत आलो. पाऊस कोसळत होता. रात्रभर इथे तिने पावसात भिजत थांबणं बरोबर नव्हतं. का माहित नाही काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. काहीतरी राहून जातंय. समोर आहे पण दिसत नाहीये.मी तिला निरखून बघितलं .
ती – असे का पाहताय ?
मी – सहजच.
ती – मी राहीन इथे . सकाळ झाली की जाईन निघून.
मी – पावसात ?
ती – सवय आहे मला.
मी – म्हणजे ?
ती – असं पावसात राहण्याची सवय आहे मला..
मी – का माहीत नाही पण तुम्हाला भेटल्यापासून खूप चुकल्यासारखं वाटतं.
ती – हं.
माझ्या बोलण्याचा तिला काहीच फरक नाही पडला. गच्चीत पाण्याच्या टाकीसाठी शेड होती . माझी नजर त्या शेडकडे गेली.
मी – तिथे शेड आहे . तिथे तुम्ही थांबा..
ती – हो जाते मी.
मी – पाऊस असाच कोसळत राहणार बहुतेक.
ती – जाईल लगेच..
मी – तुम्ही काय हवामान खात्यात आहात का ?
ती – नाही.
मी – हरकत नाही. मी निघू ?
ती – हो.
मी – तुम्ही प्लीज काळजी घ्या..कुणालाही कळू देऊ नका की मी तुम्हाला इथे रहायला दिलंय ते. आणि भिजू नका तुम्ही.
ती – हो.
मी तिच्याकडे एकटक बघत मागे वळलो आणि घरात आलो. संपूर्ण भिजलो होतो. फ्रेश झालो. आई आणि बायको दोघी माझी वाट पहात जाग्याच होत्या.
मी – काय गं आई , तुला माहीत आहे ना मला यायला उशीर होतो ते. उगाच कशाला माझी वाट पाहत असतेस. तब्येतीला आराम दे जरा..
आई – मुलाला बघितल्या शिवाय आईला कशी येईल झोप ?
मी – खरं आहे. गौरी आणि कौस्तुभ झोपले का ? आणि अभ्यास केला ना वेळेत ?
कौमुदी – झोपले दोघंही तुमची वाट पाहत.
मी – खूप दिवस झाले त्यांच्याशी गप्पाच नाही मारता आल्या. कुठे बाहेर फिरायला देखील जाता नाही आलं.
बायको एकीकडे मला जेवण वाढत होती . मी खूप समाधानी होतो. त्या मुलीला विसरूनच गेलो होतो. शांतता पसरली होती पूर्णपणे. ना कसला गोंधळ , ना कसलं काम. मी पटापट जेवण उरकलं आणि आज दिवसभरात काय खर्च केला याचा हिशेब जुळवत बसलो होतो. दिवाळी जवळ आली होती. घरातल्यांसाठी काहीतरी चांगली भेट घ्यायची होती. अनेक वर्ष झाली बायकोकडे फक्त ४ – ५ साड्या होत्या आणि खोटे दागिने ..तिला नवी साडी देऊ. एखादी नथ किंवा गळ्यातलं सोनाराकडून बनवून घेऊ. मुलांना नवीन कपडे , आईला एक नवं लुगडं.. साधी सोपी सुखी माणसाची स्वप्न पाहत होतो. नेहमीप्रमाणे मला स्वत:साठी काहीच नकोसं वाटतं होतं..बायको आणि आई एव्हाना झोपी गेल्या होत्या.. आणि ढगांचा गडगडाट ऐकू आला. मी बाल्कनीचा पडदा बंद करत होतो बाहेर अजूनही मुसळधार पाऊस कोसळत होता.. आणि लगेच मला तिची आठवण आली...
क्रमश :
लेखक - पूर्णानंद मेहेंदळे