भाग 1
पंडित च्या ऑफिस मध्ये पंडितला ला आज farewell पार्टी होती. सगळे जण भरभरून बोलत होते. त्याला कारणही तसंच होतं. पंडित, वर पासून खालपर्यंत लोकप्रिय होता. कामात अत्यंत हुशार, आणि कर्तव्य दक्ष होता. कोणालाही मदत करायला सदा सर्वदा तयार. तो ऑफिस मध्ये कितीही थांबायला कायमच तयार असायचा. मृदुभाषी आणि प्रेमळ. या त्यांच्या गुणांमुळे तो सर्वांनाच हवा असायचा. त्यांच्या कंपनी ने VRS जाहीर केली तेंव्हा पंडित ने लगेच फॉर्म भरून टाकला. त्याचा साहेब तर वेडाच झाला. त्यांनी तऱ्हे तऱ्हेने पंडितची समजूत काढायचा प्रयत्न केला पण पंडित आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांनीच त्याला खोदून खोदून कारण विचारलं पण तो म्हणाला की योग्य वेळी सांगेन. आज सगळे त्यांच्या बोलण्याची वाट पाहात होते. सर्वांनीच आपल्या भाषणात त्याला विनंती केली की त्यानी आज तरी कारण सांगाव म्हणून.
सरते शेवटी पंडित बोलायला उठला.
मला तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं की ते वर्णन करायला माझ्या जवळ शब्दच नाहीत. मी फार काही बोलणार नाही कारण बराच उशीर झाला आहे आणि जेवण वाट पहात आहे.
जेवणाचं सोड रे, आम्ही रात्रभर वाट पाहायला तयार आहोत. तू आम्हाला सोडून का चालला आहेस ते सांग. आम्हाला तुझा निर्णय तसाही मान्य नाहीये. त्यामुळे कारणही तसंच जोरदार असलं पाहिजे. कोणी तरी मध्येच उठून बोललं.
सांगतो, सांगतो. आज माझं वय ४५ आहे. इतकी वर्ष काहीही हातचं न राखता सर्व कामं केलीत. तुमच्या बरोबर काम करतांना आनंद वाटायचा. आता माझ्या जवळ बऱ्यापैकी पैसा साठला आहे आणि कंपनी ने VRS चा पैसा पण दिला आहे. त्यामुळे मी आता फार वर्षांपासून जोपासलेलं माझं एक स्वप्न आहे, ते पूर्ण करणार आहे. मी आता भारत भ्रमण करणार आहे. मला आता नुसतं फिरायचं आहे. तुम्हाला नेहमीच प्रश्न पडायचा की मी लग्न का करत नाही. तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी मला मुली पण सुचवल्या होत्या पण याच कारणांसाठी मी लग्न पण केलं नाही. कुटुंब नाही, कबिला नाही त्यामुळे जबाबदाऱ्या पण नाहीत. आता मी निवांत पणे जशी हवी तशी भटकंती करू शकतो आणि अनेक अमोल अनुभव गोळा करू शकतो. एकटाच असल्यामुळे मागे कोणी काळजी करणारं पण नाही. बस. हे एकच कारण आहे. हे सर्व करण्यासाठी मी योग्य वेळेची वाट पहाट होतो ती संधि मला VRS ने दिली. एवढंच. तुम्हा कोणालाच मी विसरू शकणार नाही. सगळ्यांनी माझ्यावर जे निरपेक्ष प्रेम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.
हॉल मध्ये शांतता पसरली होती. टाळ्या वाजवण्याचं कोणालाच भान नव्हतं. सर्व अगदी स्तब्द झाले होते. साहेबच प्रथम भानावर आले आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली आणि मग अख्खा हाल दणाणून गेला.
आठ दिवसांनी त्याचा जवळचा खास मित्र अरविंद त्याला भेटायला आला. म्हणाला की तो नसल्यामुळे ऑफिस ची रयाच गेली आहे आणि काम करायला मजा येत नाहीये. मग बोलता बोलता त्यांनी विचारलं की तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे केंव्हा निघणार आहेस प्रवासाला ?
आखणीच करतोय अजून आठ पंधरा दिवस तरी लागतील. मग निघेन. असाही विचार करतोय की फक्त पहिल्या प्रवासा बद्दल ठरवून निघाव बाकी जसं मनाला येईल तसा प्रवास करावा.
मग कुठून सुरवात ?
तोच विचार करतोय. पण अजून काही ठरत नाहीये. सगळ्याच ठिकाणी प्रथम जावसं वाटतंय
मी काही सुचवलं तर तुला आवडेल का ?
अरे तू माझा जिवा भावाचा मित्र, मग तुला अशी परवानगीची आवश्यकता कधी पासून भासायला लागली ? सुचव काय आहे तुझ्या मनात ते.
मला अस वाटतंय की सुरवात देवदर्शनापासून करावी. या साठी नर्मदा परिक्रमा हा उत्तम मार्ग आहे.
अरे मला तीर्थ यात्रेला आत्ताच जायचे नाही. आत्ता काही वर्ष मी नुसता भटकणार आहे. आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि तू हे काय सांगतो आहेस ?
हे बघ बसने परिक्रमा केलीस तर फक्त १५-२० दिवस लागतात. नंतर तू हवं तिथे जा. पण आयुष्याची नवी सुरवात करतांना तू हे करावस अस मला वाटतं. नर्मदा ही प्रवाही आहे आणि तू प्रवासाला निघणार आहेस. पुढच्या संपूर्ण प्रवासात तुझ्या बरोबर नर्मदा देवी असली तर तुझ्यावर संकट येणार नाही आणि सर्व निर्विघ्न पार पडेल असा माझा विश्वास आहे म्हणून म्हंटलं.
पंडित विचार करत होता. त्याचा या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण फक्त पंधरा दिवसांचाच प्रश्न होता, त्यांनी परिक्रमा करायचं ठरवलं. आणि तसं अरविंद ला सांगितलं. तो ही खुश झाला.
नंतरच्या दहा दिवसांत पंडित ने नर्मदा टूर चं बूकिंग केलं आणि आता तो ओंकारेश्वराला निघाला होता. तिथूनच परिक्रमा सुरू होणार होती. तिथे तो एका लॉज मध्ये उतरला. संध्याकाळी जेवणाच्या वेळी त्यांच्या शेजारी एक माणूस येऊन बसला. गोरा पण, दणकट देहायष्टीचा पन्नाशीच्या वयाचा, पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमा असा पेहराव. प्रथमदर्शनीच छाप पडावी असा प्रसन्न चेहरा.
नमस्कार, मी इथे बसलं तर चालेल ना ?
पंडित ने मान हलवली. तो माणूस हसला. देव दर्शनाला आलात ? त्यांनी विचारलं.
नाही मी परिक्रमेला चाललो आहे.
बस ने ?
हो. उद्या निघणार आहे.
मी पण परिक्रमा करायला चाललो आहे. पण मी पायी जाणार आहे.
पायी खूपच कठीण असते म्हणतात. वरतून सात आठ महीने लागतात अस ऐकलं आहे, मग बस ने का नाही ? चोर दरवडे पण पडतात म्हणे.
मी पण हेच ऐकलं आहे. पण नुसतं जगण्याला काय अर्थ आहे ? ते तर पशू पक्षी पण जगतात. अनुभव समृद्ध जीवन जगायचं असेल तर पायीच परिक्रमा करावी अस माझ्या गुरूंनी सांगितलं म्हणून पायी जाणार. अनुभव घेणार.
काय करता तुम्ही ?
मी पौरोहित्य करतो. वयाची चौदा वर्षे मी शृंगेरीला होतो. आता कोल्हापूरला असतो.
बापरे, अहो मी नावाचाच पंडित आहे तुम्ही खरोखर पंडित आहात. नाव काय तुमचं ?
मी कुलकर्णी. पण सगळे मला पुरोहित म्हणूनच ओळखतात. तुम्ही ?
मी पण कुलकर्णीच
पण आत्ता तर तुम्ही म्हणाला की तुम्ही पंडित ?
माझं नाव पंडित.
असं आहे होय !
एवढा मोठा निश्चय तुम्ही केला आहे, परिक्रमेची वाट माहीत आहे ?
होय. बरीच चौकशी केली आणि आता मार्ग तोंड पाठच झाला आहे. दिवसभरात किती चालायचं, कुठे मुक्काम करायचा कुठे काय सोई आहेत सगळं आखून झालं आहे. साधारण पांच ते सहा महीने लागतील परत ओंकारेश्वर ला यायला.
कोण कोण आहेत बरोबर ?
मी एकटाच. तुम्ही येता ?
नाहीतरी मी भटकंती करायलाच निघालो आहे, तेंव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला ? हा ही अनुभव घेऊन पाहावा.
अरे वा ! मग तर छानच होईल मला पण कंपनी मिळेल. बोलता, बोलता वाट कशी सरेल ते कळायचं पण नाही. परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचाच दिलासा असतो. विचार करा आणि सांगा.
जेवता जेवता बऱ्याच अवांतर गप्पा झाल्या, पंडितला पुरोहित एकदम आवडून गेला. गृहस्थाचा, पुरोहित असून संस्कृत शिवाय इंग्रजी आणि कन्नड आणि मराठीचा व्यासंग दांडगा होता. जेवण झाल्यावर पंडित म्हणाला की
कुठल्या रूम मध्ये आहात ?
मी चौदा नंबर मध्ये उतरलो आहे.
रात्री पंडित चौदा नंबरच्या खोलीत गेला. पुरोहित झोपायच्या तयारीत होता.
काय म्हणता पंडित ?
मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. केंव्हा निघायचं ?
उद्या तुम्हाला थोडी तयारी करावी लागेल. मग परवा निघू.
मी तयारच आहे. प्रवासाच्या तयारीनिशीच घरातून निघालो आहे.
एक पिवशी आणि त्यात जरुरीचे दोन जोडी कपडे एवढंच घेऊन चलायचं आहे. बाकी तुमचं सामान, मोबाइल, क्रेडिट, डेबिट कार्डस वगैरे इथेच ठेऊन जावं लागेल. वाटमारी चा धोका असतो. थोडे पैसे घ्या बरोबर.
आणि पैसे संपल्यावर ? खायचं काय ?
नाही तशी वेळ येत नाही. जितकी माहिती मी गोळा केली आहे त्या प्रमाणे ठिकठिकाणी आश्रम आहेत आणि कुठेही पैसे खर्च करावे लागत नाहीत. काळजी करू नका. बाकी राम भरोसे.
ओके. सामान कुठे ठेऊ ? लॉज मध्ये ठेवतील ?
इथे देवळात माझ्या ओळखीचे गुरुजी आहेत, मी त्यांच्याच कडे ठेवलं आहे. तुमची पण सोय होईल.
तिसऱ्या दिवशी प्रवासाला सुरवात झाली. ३०-३५ किलोमीटरवर नर्मदा तीरावर एक आश्रम होता तिथे थांबले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघ पुढच्या प्रवासाला निघाले. पंडित बघत होता की पुरोहित आवाज न करता काहीतरी म्हणत होता. कुतूहल वाटून त्यांनी विचारलं की काय म्हणत होता ते
अरे आमची संथा असते ती रोजच्या रोज म्हणावी लागते. नाहीतर विसरण्याचा धोका असतो. आणि आम्ही शपथ घेतली आहे की रोज पूर्ण पाठ झालाच पाहिजे म्हणून.
मग मोठ्याने म्हणा न. मलाही कळेल.
तुम्हाला काय येतं ?
भीमरूपी आणि रामरक्षा मी रोज म्हणतो.
नाही तेवढं पुरेसं नाहीये.
मग तुम्ही शिकवा, नाहीतरी आपण येती सहा महीने बरोबरच असणार आहोत. टाइम पास पण होईल आणि ज्ञानात भर पण पडेल.
आणि त्यांचा ट्यूशन क्लास सुरू झाला. सहा महीने झाले आणि त्यांची परिक्रमा पण पूर्ण झाली. विविध प्रकारचे, चांगले वाईट अनुभव आले. नाना प्रकारची माणसे भेटली, माणसांच्या स्वभावाच्या इतक्या तऱ्हा पाहून पंडितला अचंबित व्हायला झालं. सहा महिन्यात इतके अनुभव गोळा झालेत की लिहिलं असतं तर एक पुस्तक तयार झालं असतं. रात्री लॉज वर जेवण करतांना पुरोहित म्हणाला
पंडित, तू आता पूर्ण पुरोहित झाला आहेस. संपूर्ण पूजा पद्धती, विष्णु सहरत्र नाम, श्रीसूक्त, महीम्न, रुद्र, सप्तशती सर्व तुला येतं. खूप लवकर शिकलास तू. कसं वाटतंय ?
खूपच छान. परिक्रमा पण छान निर्विघ्न पार पडली. मला तर अस वाटतंय की मी आता एक वेगळाच माणूस झालो आहे. आमूलाग्र बदल झाल्यासारखा वाटतोय.
आपण आता अस करू इथून वाराणसी ला जाऊ काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ आणि आपल्या वाटेला लागू.
क्रमश: .........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा