होम मिनिस्टर

रात्री नात छकुली जवळ येऊन बसली."आजी गोष्ट सांग ना "आज कोणती बरं----चल आज मी तुला रामाची गोष्ट सांगते. रामाच्या राज्याभिषेकापर्यंत गोष्ट येते तोपर्यंत छकुली झोपून गेली_________________________
होम मिनिस्टर ?
भाजी ची पिशवी भरत आली तेव्हा, आसपास एखादी रिक्षा दिसते कां,असे पहात असतानाच पुष्पा ताईंना घोळीच्या भाजीचा ठेला दिसला.
नीताला त्यांच्या सुनेला खूप आवडते म्हणून मोल भाव करत घेतली व पिशवीत कशीबशी कोंबली . तेवढ्यात मागे एक स्कूटर येऊन उभी राहिली.

मावशी दे पिशव्या आवाज ऐकून पुष्पाताई ने मागे वळून पाहिले. नंदा त्यांची भाची स्कूटरवर?." "अरे वा तू आज भाजीबाजारात,"! बरेच दिवस झाले आली नाही घरी"?
अग हो--- मावशी मी येणार होते, पण --बरेच झाले तू इथे भेटली चल मी तुला घरी सोडते.

पुष्पा हाश्यहुश्श करत सोप्यावर टेकली, नंदाने स्वयंपाकघरात पिशव्या ठेवून फ्रीज मधून गारेगार पाणी दोघींसाठी आणले पंखा फुल स्पीड मध्ये लावून दोघी हॉलमध्ये बसल्या.
आज घरात एकदम सामसूम?नंदा ने विचारले?
अग नीताला सुट्टी होती ती बी.सी. ला गेली आहे .मुलं पार्कमध्ये खेळायला गेली, गौरव अजून ऑफिसमध्ये, हे बाहेर फिरायला गेले‌.
थोडं बरं वाटल्यावर पुष्पा
मावशीने दोन ग्लास कैरीचे पन्हे? व फरसाण आणले व दोघी खात-पीत गप्पा मारू लागल्या ‌.
"मावशी मी मध्ये आईकडे जाऊन राहून आले ग."
वा--माहेरपण झाले म्हणजे, काय म्हणतात सर्वजण?
सर्व ठीक आहे, वहिनी होती चार दिवस बरोबर ,पण--- मग तिला ही माहेरी जायचे होते.
हो बाई, सगळ्यांच्या वेळा ऍडजेस्ट करतच आज-काल माहेर पण घडते.
मावशी, "तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आई विषयी".
अग बाई !!,काय झाले कल्पनाला?
झाले काही नाही ग! पण अजूनही ती पूर्वीसारखेच वागते .सर्व निर्णय तीच घेते.
वहिनी काही बोलत नाही, पण आता बरीच वर्ष झाली तिला या घरात येऊन, काही गोष्टी तिलाही तिच्या मनाप्रमाणे कराव्या असे वाटते प-ण आईला पटवणे, म्हणजे कठीण. मग वादावादी नको म्हणून वहिनी माघार घेते.

पण -- कधी न कधी तिचाही धीर सुटेल, त्याचीच भीती वाटते ग.
""तू समजूत नाही काढली कां कल्पनाची"?
एक-दोनदा मी प्रयत्न केला, पण मग आई दुखावते .आणि मी चार दिवसा करता जाते, मग उगाचच त्या दोघींमध्ये बोलून काय फायदा.
हं-बरोबरच आहे म्हणा पण मग,?
मावशी तू आई पेक्षा मोठी आहे तूच काही-----.
हं--पाहते-- तू असं कर, तू घरी येऊन गेली हे कल्पनाला कळव , व माझी तब्येत बरी नाहीये मला तिला भेटावेसे वाटते असे मी तुझ्याजवळ बोलले हेही सांग, पुढचे मी पाहते.
हो मावशी आणखीन एक, दहा-बारा दिवसां करता आम्ही सर्व कोकणात जातो आहे, मुलींना सुट्ट्या व माझी पण शाळा बंद आहे तेव्हा.
अरे वा! छानच की, जमलं तर कोकम आण बाई इकडे काही तसे मिळत नाही.

दोन दिवसांनी--- कल्पनाचा फोन पुष्पा मावशींना आला.
काय होते ग ताई?
तसं ठीक आहे ग पण-- गळल्यासारखे वाटते, ये ना चार दिवस वेळ काढून, तुला खूप भेटावेसे वाटते.

कल्पनाची गाडी आली त्या वेळेस पुष्पाताई मुद्दाम झोपून होत्या सुनेने विचारले ही," आई काही होतंय का आज अजुन उठला नाही".
सहजच ग म्हणून पुष्पानी टाळले.
कल्पना आली ती सरळ ताईंच्या खोलीतच.
\"ताई काय होतंय एवढ्या तातडीने बोलावले? मला बाई तुला कधी पाहते असे झाले होते\".
आता बरी आहे गं ,आजारपणात मन जरा हळव होतं. पण छान झालं तू आलीस, आता पहा मी पटकन बरी होते. असे म्हणत ताई उठल्या.
बरं ताई तू उठ मी तूझा बिछाना आवरते.
अगं राहू दे जरा पसरलेला राहिलं तर काही बिघडत नाही.

चहा नाश्ता अंघोळ झाली. मुलगा, सून कामावर गेले मग दोघी बहिणी निवांत गप्पा मारत बसल्या.

अगं ताई स्वयंपाक?
तो झाला ग, सुनबाई करते आणि पोळ्यांना बाई येते.
तुला चालतात बाईच्या हातच्या पोळ्या?
हो सगळं चालतं ग बाई, केलं जन्मभर तेच तेच. आता मस्त आरामात राहायचं. आता हा संसार मुलांचा गरज असली तर करायचे नाही तर---.
पण मग करमत कसं तुला? मला बाई चैनच नाही पडणार.
"अग कल्पना या सगळ्या शिवाय पण जग आहे तिकडे मन वळवायचे, मग बघ कसा आनंद मिळतो."
ताई कडे काहीश्या विस्मयाने ! पहात राहिली कल्पना.

संध्याकाळी दोघी बाहेर पार्कमध्ये नातींलाघेऊन गेल्या. फिरून घरी आल्या तो सुनेचा स्वयंपाक तयार होता सहजच म्हणून कल्पना स्वयंपाक घरात डोकावली.
ताई तुझे स्वयंपाक घर किती बदलले ग.
अगं आज कालच्या पद्धतीचे मॉड्यूलर का काय ते आहे.
मावशी स्वच्छ करायला सोपे आणि पसाराही दिसत नाही आईंनी माझ्या वाढदिवसाला करून दिलं, सुनबाई ने कौतुकाने सांगितले.
हो कां? म्हणजे माझ्या बी.सी.च्या पैशात होईल .आमच्या रेखा ची कधीच इच्छा आहे ,कल्पना हिशोब करू लागली.

रात्री नात छकुली जवळ येऊन बसली."आजी गोष्ट सांग ना "
आज कोणती बरं----
चल आज मी तुला रामाची गोष्ट सांगते.
रामाच्या राज्याभिषेकापर्यंत गोष्ट येते तोपर्यंत छकुली झोपून गेली. पण दोघी बहिणी त्याच विषयावर बोलत बसल्या,
दशरथाने रामाला राज्य देण्याचा निर्णय घेतला त्यात कैकयीने जर खोडा नसता घातला तर राम तेव्हाच राजा झाला असता ताई म्हणाल्या .
!"अग पण इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी का टाकावी"!, कल्पना चा प्रश्न?
अगं पूर्ण विचारांतिच निर्णय घेतला असेल. दशरथाचे ही वय झाले होते काही निर्णय योग्यवेळी घेतलेलेच बरे, ताईंनी आपले मत मांडले.

दुसऱ्या दिवशी झोपायच्या आधी छकुली परत गोष्ट गोष्ट करत आली.
आज कोणती ?महाभारत कां ,कल्पना ने विचारले ?
नाही आज मुघल साम्राज्याची मग बाबर, हुमायूं, अकबर असे करत करत गोष्ट शहाजहां पर्यंत पोचली.
तोपर्यंत छकुलीचे हं --हं करण बंद झाले, तरी ताई आपल्याच धुंदीत बोलत होत्या.
शहाजहा वर फारच वाईट प्रसंग आला नाही का? कल्पना बोलली.
अगं शहाजहां ने
ही वेळेवरच योग्य मुलाला राज्यपद दिले असते तर त्याचे एवढे हाल नसते झाले बघ रामायण आणि मुगल साम्राज्य दोन्ही काळ वेगळे व घटना किती विरोधाभासी.
रामायणात वेळेवर राज्यपद देऊन जबाबदारीची जाणीव दिली पण मुगल साम्राज्यातऔरंगजेबने कपट करून सिंहासन बळकावले .
म्हणून म्हणते कल्पना \"काही गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच करणे योग्य असते \"असे मला वाटते पुष्पा ताई म्हणाल्या.

दुसरे दिवशी सकाळी सुनबाई म्हणाली आई आज संध्याकाळी आपण मावशींना घेऊन बाहेर फिरायला जायचे का यांनाही हाफ डे आहे .मॉलमध्ये जाउया कां?
हो चालेल ना "काय कल्पना चलायचं न"
चालेल पण तिथे बाई सगळं महाग असत ग.
असे नका आपल्याला नाही घ्यावसं वाटलं तर कोणी मागे थोडीच लागतं मजा येते बाहेर इतक्या गर्दीत फिरण्यापेक्षा तिथे छान पॉश वाटते. आणि तो जिना काय ते एस्केलेटर त्यावर चढण्यात वरखाली करण्यात जरा लहानपणात गेल्यासारखे वाटते
मॉल मध्ये फिरताना कल्पनाने एक सेट प्लास्टिक कंटेनरचा पाहिला .
बारा डबे एकात एक, अगं रेखासाठी घेऊन जाते म्हणजे तिला वस्तू शोधत बसायला नको. डबे घेताना पाहून पुष्पा ताईंना वाटले चला "आपली युक्ती सफल झाली .लवकरच रेखा" होम मिनिस्टर" होणार.
_
लेखिका सौ. प्रतिभा परांजपे
_________________________