हे बंध रेशमाचे - भाग 22

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 22


वृषालीताईंनी टीव्ही बंद केला आणि नेहाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागल्या. 

"ये ना बाळा बस.. काय ग ?" त्यांनी विचारलं


"नाही म्हणजे........" ती बोटांची चाळवाचाळव करत होती. पटकन काय बोलावे तिला सुचेना.


"अग बोल की.... काय झालं " वृषालीताई


"आई , ही मिताली आपल्याकडे नेहमी येते का ?" 


" हो अग... खूप वर्षांनी मितु आणि आनंद भेटले त्यामुळे असतात मधेच एकत्र....पण तू काही वाटून घेऊ नको हो..." त्या म्हणाल्या

"नाही तसं नाही...पण तिच्याशी बोलताना हे अगदी खुश असतात...पण माझ्याशी....." तिला कसं सांगायचं कळेना

"तुझ्याशी काय ? तुझ्याशी तो नीट वागत नाही का ? बोल ना ... " आता त्यांना काळजी वाटायला लागली.

"आई , तुम्हाला कसं सांगू ........हे माझ्याशी नीट वागतात तसे ...पण त्यांनी अजूनही बायको म्हणून मला स्वीकारलेलं नाही..." अस बोलून ती रडू लागली आणि तिनं लग्नाच्या दिवशी पासून आनंद तिच्याशी कसं वागतो बोलतो याबद्दल सगळं वृषालीताईंना सांगितलं. 

आनंदला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं हे त्यांना माहीत होतं पण आपल्या शब्दाखातर त्यानं लग्नही केलं पण तो तिच्याशी असं वागत असेल असं वृषालीताईंना वाटलं नाही. अरेंज मॅरेज मध्ये ही दोघे अनोळखीच असतात की पण मग हळूहळू त्यांचं नातं फुलू लागत त्यामुळे आनंद आणि नेहाच्या बाबतीतही तसच होईल असं त्यांना वाटलं. पण नेहाचं बोलणं ऐकून मात्र त्या अस्वस्थ झाल्या.

" अग त्याला खरंतर इतक्यात लग्न करायचं नव्हतं पण मलाच तुला सून करून घ्यायची घाई झाली होती म्हणून माझ्यासाठी तो लग्नाला तयार झाला...पण नंतर सगळं नीट होईल असं मला वाटलं.... या सगळ्याला मी जबाबदार आहे गं...." असं बोलून त्या रडू लागल्या..

त्यांच्या अशा अचानक रडण्याने ती भांबावली. तिला काय बोलावं सुचेना.

"आई तुम्ही प्लिज रडू नका....माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून ते असे वागत असतील माझ्याशी...." नेहा

"नाही ग बाळा....मलाच कळायला हवं होतं..आनंद नको म्हणत असताना मी लग्न लावलं तुमचं....तुझ्या या परिस्थितिला मी कारणीभूत आहे..." त्या रडत रडत सांगत होत्या.

"पण मी तरी काय करू गं.... आनंद कोणाशीच धड बोलायचा नाही. श्रीकांत गेल्यापासून तर त्यानं स्वतःला कोंडूनच घेतलं होतं. माझा हसता , खेळता आनंद हरवला होता गं.... म्हणून म्हटलं लग्न झाल्यावर तरी तो पुन्हा एकदा सर्वांशी पहिल्यासारखा वागेल......तू त्याला समजून घेशील आणि तूच त्याला सांभाळू शकशील असं वाटलं म्हणून मी हे लग्न ठरवलं....आणि......."  बोलता बोलता त्या मध्येच थांबल्या.


"आणि काय आई ?? " नेहाने काहीच न कळून विचारलं. वृषालीताईंनी इकडे तिकडे पाहिलं. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्या बोलू लागल्या. 


" आनंदच्या नंतर पाच वर्षांनी आम्हाला मुलगी झाली होती. मला आणि श्रीकांतना मुलीची फार हौस...पण सातव्या महिन्यात जन्मालायआल्यामुळे ते बाळ गेलं त्यामुळे आम्ही दुःखात होतो. ही गोष्ट कोणालाही माहीत नाही. अगदी आनंदला सुद्धा. थोड्या दिवसांनी नीलिमा गेल्याच कळलं तेव्हा आम्ही आप्पासाहेबांना भेटायला गावी आलो होतो. तेव्हा तू चार वर्षांची होती. आम्ही तेव्हाच तुला आमच्याकडे घेऊन येणार होतो.पण आप्पासाहेब देखील धक्क्यातून सावरले नव्हते. म्हणून मग तुला इकडे आणायचा विचार सोडून दिला आणि श्रीकांतंनी तुला सून म्हणून आमच्या घरीआणायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी आप्पाना तसं वचनही दिलं. तुझ्यामुळे आम्हालाही मुलीची माया मिळणार होती आणि आम्हीही तुझ्यावर तितकंच प्रेम केलं असतं... पण त्या आधीच श्रीकांत..........!!! " एवढं बोलून त्या ढसाढसा रडू लागल्या. 

" आई तुम्ही शांत व्हा. मी आहे. मी तुमची मुलगीच आहे. तुम्ही रडु नका प्लिज... मी आहे ना..सगळं ठीक होईल नका काळजी करू..." ती त्यांना समजावत म्हणाली. वृषालीताई देखील हळूहळू शांत झाल्या. त्यांनी आपले डोळे पुसले. 

"ते बाळ गेल्यामुळे श्रीकांत आपल्या एकुलत्या एका मुलाला जास्त जपू लागले. ते आनंदचा मित्र झाले. त्यामुळे श्रीकांतंच्या जाण्यामुळे आनंद असा चिडचिडा आणि एकलकोंडा झालाय गं.... मिताली भेटल्या पासून तो आता जरा हसतोय बोलतोय तरी..." त्या बोलत होत्या

"मिताली आणि त्यांच्यात.....??? " नेहा विचारू पाहत होती

"नाही गं तसं काही मनातही नाहीये त्याच्या..तसं असत तर तो माझ्याशी तेव्हाच बोलला असता...त्याच्यासाठी ती फक्त त्याची मैत्रीण आहे बाकी काही नाही...." त्यांनी सांगितलं.


त्यांच्या बोलण्यानं नेहाला जरा हायस वाटलं. आनंद असं का वागतो याचं कारण तिला थोड्या प्रमाणात कळलं होतं. त्यामुळे आनंदशी जर बोलायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याला त्याची मैत्रीण व्हावं लागेल असं तिला वाटलं. 


.........................

मिताली आणि आनंदने पार्टीची सगळी तयारी केली. नेहाचं देखील NGO चं काम चालु झालं होतं. त्यामुळे पार्टीच्या तयारीत काही मदत हवीय का विचारायला सुद्धा ती गेली नाही. किंबहुना आनंदला ते आवडलं नसत असं तिला वाटलं. त्यामुळे ती आपलं काम करत होती. पार्टीचा दिवस उजाडला. इव्हेंट मॅनेजमेंटवाली माणसं सकाळ पासूनच तयारीसाठी आली होती. त्यांनी लॉनच्या बाजूने खांब रोवून त्यावरती लायटिंगच्या माळा सोडल्या. एका बाजूला जेवणासाठीची टेबल्स वगरे मांडण्यात आली. मधला लॉन मोकळा ठेऊन त्यावर एक छोटंसं स्टेज तयार केलं. बाजूने असलेली झाडं देखील छान सजवली गेली. एका बाजूला म्युझिक सिस्टीम ठेवली गेली..त्यामुळे रात्रीची पार्टी छान रंगणार असं दिसतं होतं...!!! विकली ऑफ धरून पार्टी ठेवल्याने आनंदची कॉलेज फ्रेंड्स, इंटर्नशिपच्या वेळचे फ्रेंड्स, हॉस्पिटलचा स्टाफ त्यात वोर्डबॉय ते नव्याने जॉईन झालेले डॉक्टर्स आणि इंटर्नशिपचे विद्यार्थी देखील होते. तसेच 'घरकुल ' मधली देखील काही मंडळी येणार होती. आनंद त्या दिवशी हॉस्पिटल मधून संध्याकाळीच घरी आला. येताना त्यानं आईसाठी छान साडी आणि नेहासाठी एक लाँग वन पिस आणला होता. 


क्रमशः...

🎭 Series Post

View all