हे बंध रेशमाचे - भाग 12

Love story

  हे बंध रेशमाचे - भाग 12

आनंदने मागे वळून पाहिलं.... तिथे नेहा आणि संगीताताई उभ्या होत्या.खरतर संगीताताईच नेहाला बळेबळेच आनंदच्या घराच्या इथे घेऊन आल्या होत्या..'आता ते ही तुझंच घर आहे मग तू नको का बघायला 'अस सांगून त्यांनी तिला आणलं होतं..येत असतानाच त्यांनी आनंदच बोलणं ऐकलं आणि नेहाच्या तोंडून सहज ती कल्पना बाहेर पडली.त्याने पाहिलं तस ती ओशाळाली आणि दुसरीकडे बघू लागली

'आपल्याला वाटली होती तितकीही काही बावळट नाही ही...' आनंद मनात म्हणाला 

"काका खरच नेहाने सांगितलेली आयडिया छान आहे आपण तसच करू ".....आनंद

"हो ....तुम्ही सांगाल ते मी काय फक्त लक्ष ठेवणार " आप्पा म्हणाले

"मी गेल्यावर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो. कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे वगरे ...." आनंद 

"अरे इतकी काही घाई नाही " अप्पा

"असुदे तरी पण ...काम करणाऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत त्यांचंही कुटुंब चालत असत त्यावर ...." आनंद बोलला

"हो खर आहे ...मी बघतो इकडंच सगळं तू काय काळजी करू नको..." अप्पा

"तुम्ही आहात म्हटल्यावर मला टेन्शन नाही...आम्ही निघतो आता ...म्हणजे वेळेत पोचू मुंबईत..." अस म्हणून आनंदने आप्पाना आणि संगीतताईंना वाकून नमस्कार केला...क्षणभर त्याने नेहाकडे पाहिलं तिचे डोळे आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहेत असं त्याला वाटलं... !!!! काय नव्हतं त्या नजरेत .....!!! सावकाश जा काळजी घ्या..अस जणू ती डोळ्यांनीच सांगत होती....!! आनंद आणि विशालची गाडी निघुन गेली ..तरी नेहा कितीतरी वेळ तिकडेच बघत उभी होती......

........................

इकडे मिताली मात्र आनंदच्या काळजीत होती... दोन दिवस झाले त्याचा काहीच पत्ता नव्हता.तो गावी गेल्याच त्यानं तिला काहीच सांगितलं नव्हतं आणि तिकडे मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे त्याचा फोनही बंद होता..हॉस्पिटलला सुद्धा तिनं फोन करून विचारलं पण आनंद सर बाहेर गेलेत एवढंच उत्तर तिला मिळालं.. आनंद आणि विशाल संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबईत पोहचले.विशालला घरी सोडून आनंद घरी आला..प्रवासामुळे त्याला थकवा आला होता त्यामुळे तो आईशी काहीही न बोलता खोलीत निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरून तो थकल्याच जाणवत होतं त्यामुळे वृषालीताईंनी देखील त्याला काही विचारलं नाही....रूम मध्ये जाऊन तो फ्रेश झाला आणि त्यानं बेडवरती अंग झोकून दिलं.... तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला...

"हॅलो ...." त्याच्यात बोलायचे पण त्राण नव्हते ..सहा सात तासांच्या ड्रायविंगने तो कंटाळला होता.. .

"हॅलो, कुठायस तू ...? पत्ता काय तुझा दोन दिवस....?? एक फोन करवत नाही का ??...." पलीकडून मिताली आनंदवर चांगलीच भडकली होती..

"मितु यार....मी खूप दमलोय आपण प्लिज उद्या बोलूया का ?.....बाय प्लिज ... " तीच बोलणं ऐकायच्या आतच त्याने फोन कट केला...

"हॅलो हॅलो आनंद ......" पलीकडून ती ओरडत होती...रागाने तिनं फोन फेकून दिला... खरतर आनंदची तिला फार सवय झाली होती त्यामुळे तो न सांगता गेला याचाच तिला राग येत होता..त्याच्याच विचारात तीही झोपी गेली......

............................

दोन दिवसांनी आनंदने भेटून मितालीला सगळं सांगितलं... घराच्या कामासाठी तो गावी गेला होता हे ऐकल्यावर तिचा राग शांत झाला..मग प्लॅन वगरे , काय काय सोई करणार घरात त्यानं तिला सगळं सांगितलं.. त्यामुळे तीही खुश झाली... डिसेंबर महिन्याचे दिवस होते...त्यामुळे चार पाच महिन्यात घराचं काम आटपल्यावर मे महिन्यात नेहा आणि आनंदच लग्न करायचं अस ठरलं....हॉस्पिटल आणि घर दोन्हीकडे आनंदला लक्ष द्यावं लागतं होतं.आप्पासाहेब मधून मधून त्याला फोन करून घराची प्रगती कळवित होते. घराचा पाया पूर्ण झाला होता आता भिंती उभारायच काम चालू होतं..वृषालीताईंनी देखीलआपल्या परीने लग्नाच्या तयारीला सुरवात केली.आयत्या वेळी काम आठवत नाहीत आणि कायतरी राहतं म्हणून त्यांनी सगळ्या कामांची लिस्ट काढायला घेतली.सुट्टीच्या वारी त्या मितालीला पण बोलवून घेत.लिस्टमध्ये काय कमी जास्त आहे का विचारत कोणतही काम राहायला नको अस त्यांना वाटे..त्यांच्या राहत्या घराला सुद्धा लग्नाआधी रंग काढून घ्यावा असं त्यांना वाटलं.श्रीकांतराव गेल्यापासून घरातलं हसत खेळत वातावरण कधीच कोमेजल होत.उरल्या होत्या त्या फक्त भिंती.!!!! त्यांच्या आणि आनंदच्या हसऱ्या आठवणी सांगतं  !!!.......त्यामुळे लग्नाच्या निमित्ताने का होईना त्या घराला पुन्हा एकदा नवीन रूप आणि आनंदी क्षणांची चाहूल अनुभवायला मिळणार होती......!!!!!

...........................

हळु हळु दिवस पुढे सरकत होते.डिसेंबर आणि जानेवारी महिने हा हा म्हणता सरले होते.घराचं काम निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण झालं होतं.भिंती उभारून वरती कौल चढवून झाली होती.घराच्या आतील भागाचं काम आता राहील होतं.. प्लॅस्टरही बऱ्यापैकी करून झालं.घरासाठी लागणार इतर सामान आनंदने मुंबईतून पाठवलं होतं.प्लॅन प्रमाणे घर आता आकाराला येऊ लागलं होतं....!!! दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारीही सुरू झाली होती.नातेवाईकांची यादी, लग्नाचं सामान , साड्यांची खरेदी, मानपान एक ना अनेक काम ....!!! वृषालीताई आपल्या परीने तयारी करत होत्या.आनंद फक्त आईच्या इच्छेसाठी हे लग्न करत होता..त्यामुळे लग्नाच्या तयारीत त्याला काहीच रस नव्हता..घरी आलं की लग्नाशिवाय दुसरा विषय नसे म्हणून तो जास्त वेळ हॉस्पिटलला राहू लागला....

.............................

आप्पासाहेबांनी आपण लग्न गावीच करूया असं सुचवलं होतं.त्याप्रमाणे गावी लग्न करून तिथल्याच नवीन घरात नेहाचा गृहप्रवेश करावा आणि मग मुंबईत यावं...आणि त्या आधी पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यावा अस दोन्ही बाजूनी ठरलं..त्यामुळे लग्न गावी करायचं तर निदान साखरपुडा तरी मुंबईत करावा असा वृषालीताईंना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी आप्पाना आपला विचार सांगितलं...त्यांनीही त्यासाठी होकार कळवला..मुंबईत घरातल्या घरात थोड्या नातेवाईकांसोबत साखरपुडा करायचा अस ठरलं...

................................

वृषालीताईंनी नेहासाठी छान नाजूक डिझाईन असलेली अंगठी घेतली.या सगळ्यात आनंद फक्त नावाला त्यांच्यासोबत होता..ते वृषालीताईना पण जाणवत होतं पण त्यांनी त्याला तस भासवलं नाही..उलट त्या लग्नाच्या सगळ्या कामात त्याला सहभागी करून घेत होत्या..'आमची निवड योग्य आहे हे त्याला एक ना एक दिवस नक्की पटेल ' अशी वृषालीताईंना खात्री होती.....!!

.........................

साखरपुडा ठरल्यामुळे नेहा फार खुश होती.कोणती साडी नेसायची, त्यावर दागिने कोणते घालायचे सगळ्याच ती प्लॅनिंग करत होती..साखरपुडा , लग्न हे दिवसच कीती सुखाचे असतात ना एका मुलीसाठी....!!! नवीन घरी जाण्याची...अनोळखी माणूस आपलंसं करण्याची ओढ.....!!! आणि तितकीच मनाला लागलेली अनामिक हुरहूर.....!!! आपण जणू हवेतच तरंगतोय अस नेहाला वाटत होतं....आनंद सारखा मुलगा आपला जोडीदार होणार याचंच तिला अप्रूप होत....!! 

सुन्या सुन्या मनामध्ये ....सूर हलके

नव्या जुन्या आठवणी .....भास परके

दारी सनईचे सूर....दाटे मनी हुरहुर

चाले विरहाचा पुढे वारसा........

अशीच काहीशी अवस्था नेहाची होती..थोडीशी हुरहूर आणि थोडीशी भीती...आणि आपल्या जोडीदारासोबतची नवीन स्वप्ने.....!!!! पण त्या बिचारीला काय माहीत ज्याची ती स्वप्न पाहत होत तो तिला कधी स्वीकारणारच नव्हता......!!!

क्रमशः....

🎭 Series Post

View all