तोंड असून मुकेपणा अनं कान असून बहिरेपणा

Haravat Chalalela Sanvad
तोंड असून मुकेपणा अनं कान असून बहिरेपणा

(हरवत चाललेला संवाद)

आनंदराव आणि मालतीताई यांनी आजवरचं उभं आयुष्य एकमेकांच्या सोबतीने घालवलं,पण आता नाईलाजाने त्यांना एकमेकांपासून वेगळं राहावं लागणार होतं. उतरावयात हातपाय थकल्यावर दोघेही आपल्या मुलांवर ओझं बनले होते. आनंदराव आणि मालती यांना एकूण तीन मुलं, त्यापैकी अजय विजय हे दोन मुलगे तर शामली नावाची एक मुलगी.

या दोघांनी अख्खं आयुष्य आपल्या मुलांसाठी खर्ची घालवलं, म्हातारंपणाला आधार म्हणून आपल्याजवळ काहीच शिल्लक ठेवलं नाही. आता ते पूर्णपणे आपल्या मुलांवर अवलंबून होते. त्यांना आपल्या मुलांवर खूप विश्वास होता.
पण शेवटी जे नको होतं ते अघटित घडलं. शामली लग्न होऊन सासरी गेली. काही काळाने अजय विजय यांचीही लग्न झाली.

आता खरा घनप्रश्न उभा राहिला की आईबाबांनी राहायचं कोणाकडे? कारण दोन्ही मुले आपआपल्या बायकोसह नोकरीच्या ठिकाणी जाऊन राहू लागली. आता गावी आईबाबाकडे बघणार तरी कोण?
म्हणून अजय विजय यांनी एक क्लुप्ती काढली की, सहा महिने आई एकाकडे आणि बाबा एकाकडे, मग पुन्हा अदलाबदली.

मनाविरुद्ध का असेना असाहाय्य झालेल्या आनंदराव आणि मालती यांना हा निर्णय मान्य करावा लागला.
ठरल्याप्रमाणे दोघेही वेगवेगळ्या शहरात राहू लागले.
गावंच साधं कौलारू घर आता पोरकं झालं.

अख्ख आयुष्य गावात माणसांच्या सानिध्यात घालवलेल्या त्यां दोघांची अनं इथल्या माणुसरूपी यंत्राची काही जमेना. गावात सहज कोणी दारावरून निघालं तरी त्याला ख्याली खुशाली विचारणारी संस्कृती ही दोघं पाहत आणि जगत आली होती.
पण आता माणसांच्या गर्दीतला एकटेपणा त्यांना असह्य होतं होता.
इथं सगळंच फास्ट होतं. माणसं,गाड्या, रेल्वे, विमान सगळंकाही वाऱ्याच्या वेगाने धावत होतं. पण संवाद मात्र कुठेतरी धूळ खात कोपऱ्यात पडला होता. अखेरची घटका मोजत होता.
मेट्रोमध्ये उभ्या उभ्याच शेजारी उभा असणाऱ्याला व्हॉट्सअँपवर गुड मॉर्निंग म्हणणारी ही आजची पिढी. हा आजच्या पिढीचा मुका झालेला संवाद. आपल्या वाणीतून होणारा संवाद आता बोटांद्वारे होऊ लागला आणि आपल्या स्वरयंत्राला गंज चढला. त्यातून मधुर वाणी बाहेर पडणं बंद होऊन फक्त विखार बाहेर पडू लागला.
हे सगळं पाहून आनंदराव आणि मालती आपापल्या मुलांच्या घरात घुसमटत दिवस मोजत होते.
दोघांनाही संवाद साधून खूप काळ लोटल्यासारखं भासू लागलं. त्यांनी आपल्या मुलांना विनवणी केली की आम्हाला दोघांना एकमेकांना भेटायचं आहे. आमची भेट घालून द्या.
पण अशा कामासाठी आमच्याकडे सध्या वेळ नाही असं सांगत त्यांनी जबाबदारी झटकली.
आंनदराव आणि मालती यांना बोलता येत असतानाही मुक्यासारखं जगत होते. तर कान ठीकठाक असूनही त्यांना काहीच शब्द कानावर पडत नव्हते. कारण संवादच मुका आणि बहिरा झाला होता.
अशा परिस्थितीत घरात सगळ्या सुविधा असूनही विचार मागासले होते. विचारांनाचं खिळ बसली होती.
मनातल्या गोष्टी बोलायला कोणीच नसल्याने दोघानाही वेड लागायची वेळ आली होती. आंनदरावाकडे आणि मालतीकडे सध्या मोबाईल असूनही नसल्यासारखंच होतं.कारण त्यांच्या मोबाईलवर फक्त इन्कमिंगचं सुरु होतं. आऊटगोइंगची गरजच काय त्यां दोघाना? असं त्यांच्या मुलांचं मत होतं. ही मुलं त्यांना फक्त काही सूचना देण्यासाठीच फोन करायची आणि मग पुन्हा नवीन सूचनेपर्यंत मोबाईलची रिंग नाही वाजायची.

न राहवून एकदा आनंदराव आपल्या अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाकडे गेले आणि त्याला विनंती करून त्यांनी मालतीला फोन केला.
दोघांच्यात फक्त दोनच मिनिट बोलणं झालं. दोघानींही एक निश्चय केला आणि फोन बंद केला. पूर्वी मरगळलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आता तेज दिसू लागलं होतं.

संध्याकाळी अजय आणि विजय आपापल्या घरी येऊन पाहतात तो काय! आई आणि बाबा घरी नव्हते.
पण दोन्हीकडच्या टेबलावर एक चिट्ठी होती, त्यातील मजकूर असा…..

प्रिय अजय/विजय

बाळांनो आम्ही आजवर आमची कर्तव्य विनातक्रार आणि पद्धतशीर पार पाडली.
दिवसभर काम करून कंटाळून आल्यावरही तुमचे लाड पुरवले, दुखलं खुपलं ते सार पाहिलं. कधीकधी रात्री एक दोन वाजता डॉकटरच्या दारावर थाप मारून दरवाजा उघडायला लावला आणि तुमच्यावर उपचार केले.
पण कालांतराने तुम्हाला पंख फुटले आणि आमच्या पंखातलं बळ कमी पडू लागलं. तेव्हा तुम्हाला आम्ही जड झालो. तुम्ही आईबापाचीही वाटणी केलीत रे.
चला हेही आम्ही मान्य केलं होतं रे.
पण तुम्हाला आम्हाला घरातील एक अडगळ असल्यासारखं वागवू लागलात. ना कोणी आमच्याशी बोलत होता ना आमचं काही ऐकत होता. अरे गावात रस्त्यावरून कोणीही चालला असेल तर घरातून बाहेर येऊन आम्ही त्याची खुशाली विचारत होतो रे. कारण विचारपूस करणारे ते दोन शब्द अंगात नवा उत्साह भरून जायचे. नाती बळकट व्हायची. हीच संवादाने जोडलेली नाती पुढे आपल्या अडचणीत आपल्या पाठीशी उभी राहायची.
पण आज रक्ताची नाती आम्हाला वाऱ्यावर सोडून जाताना मरणयातना होतं होत्या. असं किड्या मुंगीसारखं जगून मग कोपऱ्यात मरून जाण्यापेक्षा आम्ही गावाकडे जाऊन उरलेले शेवटचे चार दिवस आनंदाने जगायचे आहेत. म्हणून आम्ही आमच्या चालत्याबोलत्या जगात परत जात आहोत. आमचे दोघांचे मोबाईल नेहमी चालू राहतील. कधी वाटलं तर चार आपुलकीने चौकशी करणारा एक फोन करा. सक्ती नाही.
तसेच आम्ही मेल्यावर आमच्यासाठी येऊ वाटलं तर या,नसेल तरी आपुलकीच्या संवादाने जोडलेली आमच्या गावातली आमची लोकं आम्हाला बेवारस म्हणून टाकून देणार नाहीत याची खात्री आहे.

तुमचेच संवादासाठी आसूसलेले
आईंबाबा.


ही चिट्ठी वाचून अजय, विजय आणि त्यांच्या बायका सुन्नपणे विचार करत बसले होते.

वाचकहो तुम्हाला काय वाटतं यामुळे त्यांच्या वागण्यात काही बदल होईल का? नक्की कमेंट मध्ये कळवा.


कॉपीराईट : सह्याद्री