अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले..
हरवलेले प्रेम नव्याने गवसले..
केतकीने समजावल्यानंतर रागिणी शांत होते. हळुहळु अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. महिन्याभरात पेपर सुरू होणार होते. तिचेही पेपर ती व्यवस्थित देते. पण, आता तिचे सगळे लक्ष माधव कडे लागले होते.
पण, रागिणीची मामी शांत बसत नाही. तिला खूप बोलते आणि पुन्हा एक नवा डाव रचते. तिचे प्रेम तिने मिळू न देण्यासाठी ती भरपूर प्रयत्न करते.
माधवला परत येण्यासाठी एक दीड महिना होता. तेवढ्यात दिवसांत तिने रागिणच्या मामाला पटवले.
"अहो, रागिणीसाठी एक चांगले स्थळ आले आहे. मुलगा कंपनीत नोकरी करतो. पुण्यात आहे स्वतः चे घर आहे आणि मुळात म्हणजे रागिणीला स्वीकारायला तयार आहे."
मामांना फार आनंद होतो. की आपली बायको रागिणी साठी एवढं सगळं करत आहे. मामा लगेच तयार झाले.
"रागिणी बघ बाळा. तू माझी जबाबदारी होतीस. आता एका जबाबदारीतून तू मला मोकळं कर. तुझ्यासाठी छान स्थळ आलेलं आहे. नाही म्हणू नकोस रागिणी. आधीच तुझ्या चेहऱ्यावर जो डाग पडला आहे. त्याच्या सकट तो तुला स्वीकारायला तयार आहे. तेव्हा नाही म्हणू नकोस."
"पण, मामा मला सध्या लग्न नाही करायचे. मला एम. ए. करायचे आहे."
"अगं, शिक्षण तर होतंच राहिलं. पण, तुझं आयुष्य मार्गी लागेल ना बेटा. माझ्यावर विश्वास ठेव . मी फोटो पाहिला आहे. तुला अनुरूप अशीच जोडी आहे."
"पण, मामा माझे एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्यशीच लग्न करणार आहे . त्याचे नाव माधव आहे. तो शिक्षण पुर्ण करुन परत आला की मग बोलणार आहे तुमच्याशी."
"पण, तुझ्या चेहऱ्याविषयी त्याला, त्यांच्या घरच्यांना माहीत आहे का? नाही तर उगाचच आपले नुकसान होईल आणि चांगले स्थळ हातातून जाईल. तेव्हा विचार कर."
खरोखरच रागिणी अशा विचारात पडली. की उत्तर काही सापडेना. इकडे मामा मामी सारखा तगादा लावू लागले होते. तरीही शेवटी रागिणीने लग्नाला नकार दिला.
"पण, मामी मात्र हार मानायला तयार नव्हती. तिने रागिणीला लग्नासाठी बळजबरीने तयार केले. तिला हो म्हणायला भाग पाडले. कारण, समोरच्या स्थळाकडून तिच्या बदल्यात एक लाख रुपये मिळणार होते.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला. तो माणूस बघून रागिणीने लग्नाला नकार दिला. पण, मामीच ती. ती कसली ऐकते.
"अहो, मी सांगून ठेवते आता. रागिणीने जर त्या मुलाशी लग्न केले नाही तर. मी या घरात एक क्षण देखील राहणार नाही. "
अगं, असं काय करते? तो मुलगा नसून एक माणूस आहे आणि त्याच्या हातात रागिणीचा हात द्यायचा. आपण रागिणी म्हणते तसे तिचे ज्या मुलांवर प्रेम आहे. त्याची वाट बघू या. मग काय तो निर्णय घेऊ या."
पण, मामीने मामाचे काहीही ऐकले नाही. तिने छान योजना केली. मामा ज्यावेळी आठ दिवसांसाठी कामासाठी बाहेरगावी गेला होता. त्याचवेळी मामीने लग्नाचा घाट घातला.
बळजबरीने रागिणीचे लग्न लावून दिले. कारण, एकदा लग्न झाले की मामा काहीच करू शकणार नाही. हे मामीला चांगले ठाऊक होते. तिचे डोळे भरून आले. काही म्हणायच्या आतच मामीने घाईघाईने तिचे हात धरून वरमाला त्या मुलाच्या गळ्यात घालायला लावली. दोघांचे लग्न झाले आणि रागिणी सासरी निघाली. तेवढ्यात मामा आला. मामाच्या गळ्यात पडून रागिणी खूप रडली.
"अगं, का थांबली नाहीस रागिणी? माधव परत येणारच होता ना?"
पण, रागिणी नि:शब्द झाली होती. मामाचे मन आतल्या आत स्वतः लाच खात होते.
पण, माहेर सोडून चालली म्हणून रडावे की एका वयस्कर माणसाशी लग्न झाले म्हणून. काहीच समजत नव्हते. मामी आणि कांचनच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मामा मात्र हतबल झाला होता. तो काहीच बोलू शकला नाही. त्याने रीतसर तिची पाठवणी केली.
अगदी एखाद्या निपचित देहाप्रमाणे तिचे शरीर चालत होते. वरात निघाली आणि दोन तासांच्या प्रवासानंतर एका गावात येऊन पोहोचली.
लग्नानंतर काय होते तिच्या आयुष्यात. अजून काय वाढून ठेवले आहे रागिणीसमोर. पाहुया पुढच्या भागात....
©® आश्विनी मिश्रीकोटकर