हरवत चाललेला संवाद..

ईरा : लेखणी व शब्द यांचा सुरेख संवाद
हरवत चाललेला संवाद ...

संवाद ही मानवाची मूलभूत गरज आहे.अन्न , वस्र , निवारा या जशा मानवाच्या मुख्य गरजा आहेत तशी संवाद ही अत्यंत महत्वाची गरज आहे.विचारांची देवाणाघेवाण झाली नाही , भावनाना वाट मिळाली नाही की मनात विकृती निर्माण होते.यासाठी गरज असते संवादाची आणि तोच सध्या आपण हरवून बसलो आहोत.

संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचे महत्वाचे कारण आहे.आपल्या कुटुंबात राहणारे पिता - पुत्र , भाऊ - बहिण , पतीपत्नी यांच्यात संवाद नसतो.आपली सुखदुःख , भावना , विचार व्यक्त करायला वाव नसतो.याला कारण बदलती विचारशैली अहंभाव , हेकेकोरपणा आणि संस्कारहीन जीवन..!! यामुळे कोणालाही वैयक्तिक समस्यांवर संवाद करायला वेळ नाही.त्यामुळे चिडचिडेपणा करायचा , एकमेकांचा राग दुस-यांचावर काढायचा व केवळ अर्थहीन बडबड करुन वाद घालत बसायचे.अशा कारणामुळे घराघरात मानसिक संतुलन ढळले असून अनेक कुटुंबे संवादाअभावी उध्वस्त झाली आहेत.

पूर्विचा काळ आठवला कि मुले देवघराजवळ शुभंकरोती व पाढे म्हणत .आई - वडिल शाळेची आवर्जून चौकशी करत.मुलंदेखिल आनंदाने सर्वगोष्टी सांगत.आई - वडिल व मुलांच्यांत गोड संवाद होत.आजी आजोबासोबत मुलं छान गप्पा मारत.त्यामुळे भावनिक जवळीकता टिकून होती.नात्यांचा ओलावा बहरलेला होता.अनेक सण समारंभ , यात्रा यामध्ये भेटीगाठी होवून संवादाची सातत्यतता कायम ठेवली होती.आई मुलांच्याबरोबर बोलायला लागली की तिची माया प्रेम दिसून येत होते.तिच्या गोड हाकेत मार्दवता होती.सर्वजण एकत्र जेवणकरतेवेळी अनेक संस्काराच्या व उपदेशाच्या गोष्टी सांगत अनेक तक्रारींचे निवारण होई .बाबा प्रेमाने हृदयाला बिलगत व विचारपूस करत पण आता परिस्थिती विपरीत आली आहे संवाद हा संवाद राहिला नसून केवळ वादच वाढत आहे.

काळ बदलला , माणसांची सुखाची व्याख्या बदलली ,नविन तंत्रज्ञानाची भर , वाचनाचा अभाव , मोबाईल , टिव्ही , मानसन्मानाचा विसर , विभक्त कुटुबपद्धती यामुळे कोणत्याही गोष्टीत सहजता आली नाही.नाती कृत्रीम बनली.माध्यमांच्यामुळे सगळी जवळ आली पण मनाने दुरच राहीली.मोबाईलचा अतिरिक्त वापरामुळे समोरचा माणूस काय बोलतो आहे इकडेही लक्ष नसते.टीव्हीवरील अनेक कार्यक्रमामुळे एकमेकांतील बोलणच बंद झाले आहे.मुलांचे वागणे , बोलणे मोबाईमुळे पहिल्यासारखे होत नाही पर्यायाने संवाद हरवतच चालला आहे.

संवादामुळे नात्यातील ओढ वाढते.मनात चाललेलं द्वंद संवादामुळे थांबतं.कुटुंबाला चालना मिळते.कुटुंब सदृढ बनते.मग समाज सदृढ व्हायला वेळ लागत नाही आणि मग पर्यायाने देश बलवान व मजबूत होतो.यासाठी आपल्यातील संवाद नेहमी चालू ठेवला पाहिजे.आईवडिल व मुले , पतीपत्नी , बहिणभाऊ , मित्र , शेजारी यांच्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे.बदलत्या जीवशैलीत वेळोवेळी एकत्र येऊन चर्चा , संवाद व्हायला हवा.अशावेळी कुटुंबातील सर्वाँनी निश्चित वेळ ठरवून कौटुंबिक गोष्टीवर संवाद व चर्चासत्र यांचे आयोजन कुटुंबाला अनेक धक्यातून वाचवू शकेल.मित्रातील संवाद दोस्ती अधिक मजबूत करतो.मुले आणि शिक्षक यांच्यातील संवाद शिक्षण बळकट करतो.समाजसेवक आणि जनता यांच्यातील संवाद समाज सदृढ करतो.आशा विविध पातळीवरील संवाद हे जागृत झाले तरच मानवी जीवन उजळून निघेल.

अनेक माध्यमांव्दारे संवाद व्हायला हवे.वैचारिक क्षमतेने सक्षम असलेल्या विचारवंतानी जनतेशी संवाद साधून विचारात वैविधता आणली पाहिजे.अनेक व्यासपिठावर चर्चासत्राचे आयोजन केले पाहिजे.आम्ही ईरावरील लेखकमंडळी बरेचदिवस झाले एकत्र संवाद साधण्यासाठी प्रयत्न करता आहोत पण अजूनही ही सोनेरी वेळ आलेली नाही कारण लेखक , लेखिका आपल्या लिखाणात इतके सुरेख संवाद लिहतात की भान हरपून जाते , वाचक सुखावतात.हेच संवाद तुमच्या आमच्या जीवनातील असतात फक्त त्याला लेखणीच्या जादूई करामतीने हृदयस्पर्शी बनवले जाते म्हणजे संवाद हा ठायी - ठायी वसलेला आहे तेंव्हा त्या सहृदयी बनवा आणि जीवनाचे सार्थक करा.

शब्द , स्पर्श आणि वाणीतून
साधूया आपलेपणाचा संवाद
हरवलेल्या संवादाला देऊया
प्रेमळ मनाने अखंंड दाद

©नामदेवपाटील