Login

हाराकिरी भाग ३

Investigation Of a Murder

हाराकिरी भाग ३

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, इन्स्पेक्टर राघव सत्याच्या शोधात आहे. त्यासाठी त्याने समीर, रोहित यांचा जबाब घेतला आहे. आर कोण आहे याचा शोध सुरू आहे. आता पुढे...

इन्स्पेक्टर राघव सूर्यवंशीने तपासाला एका निर्णायक वळणावर आणले होते. मेघनाच्या मृत्यूचे गूढ सुटण्याऐवजी अधिक गडद होत होते. आर या व्यक्तीचा उल्लेख, रोहित, समीर, आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली अनोळखी व्यक्ती, या चौघांमध्ये प्रकरण अडकलेले होते. याशिवाय अर्धवट जळालेले पत्र आणि शेखर नाईक नावाच्या व्यक्तीचा फोन क्रमांक या सगळ्या गोष्टींनी तपासात नवीन गुंता तयार केला होता.

अनोळखी फोन क्रमांकाच्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी राघवने पोलिस यंत्रणा कामाला लावली. शेखर नाईक या व्यक्तीची माहिती गोळा करण्यात आली. ती व्यक्ती मुंबईतल्या गजबजलेल्या धारावीच्या झोपडपट्टीत राहत असल्याचे समजले. राघवने एका पथकाला शेखरला तातडीने शोधून आणण्याची सूचना दिली.

दुसऱ्याच दिवशी सकाळी शोध पथक शेखरला घेऊन आले. तो घाबरलेला होता, चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट जाणवत होते.

“तू मेघनाला का सारखे फोन करत होतास?” राघवने कडक आवाजात विचारले.
शेखर गडबडला.
“साहेब, मला काहीच माहीत नाही."
" मग तू तिला सारखे फोन का करत होतास?"
" मी त्यांच्या कंपनीत क्लीनर होतो. तिची काही खाजगी कामे मी केली होती साहेब."
"कसली खाजगी कामे? जे काही आहे ते सगळे खरे खरे सांगून टाक. नाहीतर तुझी रवानगी तुरुंगात करेन."
" कंपनीतील एक फाईल गायब करण्यासाठी तिने माझ्याकडे मदत मागितली होती.”
“कुठली फाईल?”
“माहित नाही साहेब; पण त्या ऑफिसमध्ये काहीतरी मोठे प्रकरण चालू होते. तिने मला सांगितले होते की, ती मोठ्या संकटात सापडली आहे.”

राघवच्या मनात शंका आली .' फाईल गायब करण्याचे कारण काय असावे? मेघना कोणाला घाबरत होती? त्या फाईल मध्ये काय होते?'

मनात आलेल्या शंकेमुळे राघवने रोहित वर्माला पुन्हा चौकशीसाठी बोलावले. यावेळी राघवने अधिक तीव्रपणे प्रश्न विचारले.
“तू मेघनाशी शेवटच्या कॉलमध्ये काय बोललास? नीट आठवून सांग.”
“साहेब, ती खूप घाबरलेली होती. तिने मला भेटायला बोलावले होते, पण मी घरी होतो. यापेक्षा अधिक मला खरंच काही माहीत नाही,” रोहित म्हणाला.
पण राघवला रोहितचा स्वर अजूनही संशयास्पद वाटत होता.
“तू खोटं बोलतोयस!” राघवने आवाज वाढवला. रोहित राघवचा स्वर ऐकून घाबरला. रोहितकडे नंतर बघू असा विचार करत राघव ने त्याला घरी जायला सांगितले.

समीर सावंतही राघवच्या दृष्टीने संशयित होता. ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मेघनाने मागे त्याला गैरवर्तनाची तक्रार करण्याची धमकी दिली होती.

“समीर, तू त्या रात्री कुठे होतास?” राघवने समीरला थेट विचारले.
“मी घरीच होतो. माझी पत्नी हे सिद्ध करू शकते,” समीरने उत्तर दिले.

तो खरे बोलतोय का याचा शोध घेण्यासाठी राघव त्याचवेळी समीरच्या घरी गेला.
समीरच्या घरातील चौकशीत काही वेगळेच समोर आले. पोलिसी खाक्यासमोर समीरच्या पत्नीचा खोटेपणा फारवेळ टिकू शकला नाही. अखेर समीरच्या पत्नीने सांगितले की, "तो त्या रात्री काही वेळासाठी घराबाहेर गेला होता."
“त्याने मला सांगितले होते की, ऑफिसचे महत्त्वाचे काम आहे. मला नेमके काहीच माहीत नाही,” ती म्हणाली.
" हे उत्तर आधीच का दिले नाही? खोटे का बोलला?" असा प्रश्न राघवने तिला विचारला.
" समीरनेच तसे सांगायला सांगितले होते." असे तिने उत्तर दिले.

समीर त्या रात्री नेमका कुठे गेला होता? त्याने राघवपासून ते का लपवले? हे नवीनच प्रश्न जरी राघवला पडले असले तरी यांची उत्तरे शोधण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत याची राघवला खात्री होती.


मेघनाच्या फॉरेन्सिक तपासणीत आणखी एक महत्त्वाचा पुरावा समोर आला. तिच्या हातावर एका विशिष्ट प्रकारचे रसायन सापडले होते. हे रसायन औद्योगिक क्षेत्रात वापरण्यात येते, आणि ते तिच्या ऑफिसच्या एका विशिष्ट विभागात आढळत असल्याचे उघड झाले.

राघवने त्या विभागाच्या हेडशी बोलायचे ठरवले. या विभागात मेघना नेमकी काय शोधत होती?


मेघनाच्या फ्लॅटमध्ये अजून एका पुराव्याचा शोध लागला होता. बेडरुमच्या एका कोपऱ्यात पडलेली USB ड्राईव्ह. ती तपासण्यासाठी तंत्रज्ञान विभागाकडे पाठवण्यात आली.

ड्राईव्हमध्ये मेघनाच्या कंपनीच्या काही गोपनीय फाईल्स होत्या. त्यात आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाची माहिती होती. राघवला कळले की, मेघना या प्रकरणात बरीच आतपर्यंत पोहोचली होती. तिच्या मृत्यूचा संबंध या गोष्टींशी होता का? याचा शोध त्याला घ्यायचा होता. या केसमधील गुंता आता आणखी वाढला होता.

सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासण्यात आले. अनोळखी व्यक्तीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवताना, त्याच्या कपड्यांवर कंपनीच्या लोगोचा काहीसा अंश दिसला. हा तोच विभाग होता ज्याची मेघनाने USB ड्राईव्हमध्ये माहिती जमा केली होती.

राघवची आता खात्री पटली होती की, ही आत्महत्या नव्हती. कोणीतरी नियोजनबद्ध पद्धतीने मेघनाचा खून केला होता. कोण होते यामागे? यामागील सूत्रधार एकच होता की अनेक? अधिकच गडद झालेल्या या रहस्याचा उलगडा करण्यासाठी राघव विचारपूर्वक एक एक साखळी जोडून पहात होता.

रोहित, समीर, आणि शेखर....हे तिघेही आता संशयाच्या भोवऱ्यात होते. राघवने तिघांची माहिती गोळा करून एकत्रित पुरावे तपासले. तिघांमध्ये एक गोष्ट सामाईक होती. कोणती गोष्ट ते पुढे समजेलच.

मेघनाने या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता. तिला त्याबद्दल धमक्या मिळत होत्या हे स्पष्ट झाले होते; पण तिचा खून नेमका कोणत्या गोष्टीसाठी झाला होता? याचे कोडे सोडविण्यासाठी राघव प्रयत्नशील होता.

पुढील भागात आपण पाहूया,
राघव सर्व संशयितांच्या चौकशीतून सत्य उघड करण्याच्या जवळ पोहोचतो का?
मेघनाच्या मृत्यूचे मूळ कारण तो शोधून काढतो का?
की रहस्य अधिकच गडद होत जाते? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


🎭 Series Post

View all