गुरुपौर्णिमा.

About Guru


गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा.गुरुपूजनाचा दिवस . गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !

आध्यात्मिक, शैक्षणिक, दैनंदिन, व्यावहारीक इ.अशा सर्व क्षेत्रात आपल्याला चांगल्या मार्गदर्शकाची म्हणजे गुरुची गरज असतेचं.

जन्माला आल्यानंतर पहिला गुरु असतो तो म्हणजे आई .खाणे,पिणे,बोलणे, चालणे,वागणे इ. या सर्व गोष्टी आई शिकवते.संस्कार हे आईवडील या दोन्ही गुरूंपासून मिळत असतात. घरातील वातावरणात मुले खूप काही शिकत असतात आणि तसा त्यांच्या जीवनाला आकार मिळत असतो.शाळेतील सर, मॅडम आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडील ज्ञान देत असतात. त्यांच्या तील गुण पाहून त्यांना मार्गदर्शन करीत असतात. शालेय अभ्यासक्रमाबरोबर चांगल्या गोष्टी, चांगली नीतीमूल्ये शिकवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवित असतात.

गुरू -  अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते !

जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो आणि आपल्याला काही सुचत नाही तेव्हा आपल्याला ज्याचा आधार मिळतो ,ज्यामुळे आपण संकटातून सुटतो .अशा वेळी जो आपल्याला मदत करतो तो आपला गुरू.

आपले आईवडील, भाऊबहीण,नातेवाईक, मित्रमंडळी हे सर्व आपल्याला मदत करीत असतात ,मार्गदर्शन करीत असतात. प्रत्येक धर्मातील ग्रंथ हे प्रत्येकाने कसे वागावे ? हे सांगत असतात.पुस्तके वाचून खुप ज्ञान मिळते,अनेक महान व्यक्तींच्या यशस्वी जीवनाबद्दलचे वाचून शिकण्यास मिळते.आपल्याला कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकायचे असेल तर त्या क्षेत्रातील ज्ञान माहिती हवे आणि त्यासाठी चांगल्या गुरुची,मार्गदर्शकाची गरज असतेचं.उदाहरणार्थ.

नवीन चं स्वयंपाक शिकणाऱ्या आपल्या मुलीला आई tips देत असते ,म्हणजे करतांना चुका होऊ नये आणि स्वयंपाक चांगला व्हावा म्हणून.

रोजच्या दैनंदिन कामापासून ते एखाद्या विषयात पारंगत होण्यापर्यंत गुरू हवाचं!

गुरू आपल्या जवळ असलेले ज्ञान आपल्या शिष्याला देत असतो.त्याला आपण शिकवलेले सर्व यावे आणि आपण दिलेल्या विद्येचा त्याने चांगला उपयोग करावा असे प्रत्येक गुरुला वाटत असते.

आध्यात्मिक उन्नती करु इच्छिणाऱ्या साधकाच्या जीवनात गुरुचे महत्त्व अधिक असते.सामान्य पणे आध्यात्मिक क्षेत्रातला प्रत्येक जण गुरूमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतो.बरेच जण आपल्या कार्य सिध्दी साठी जसे नोकरी मिळावी ,विवाह व्हावा,संतती व्हावी, घर व्हावे,रोग बरे व्हावेत इ.कारणांसाठी गुरूमंत्र मागत असतात.

गुरूमंत्र म्हणजे एक अभिवचन असते ,गुरूला दिलेले वचन असते,सर्वार्थानं केलेलं निःसंशय समर्पण असतं.गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते.

गुरुमंत्र अशिष्याय न देयं।

आपल्या अस्तित्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ती म्हणजेचं गुरू .

\" तत्त्वं गृव्हाति इति गुरूः\" 

तत्त्व जाणणारा गुरु होय.


गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे.


सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।

इतरांची लेखा कोण करी ।।

असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक,उपासक,अभ्यासक यांच्यावर गुरु आशिर्वादाने गुरूतत्त्वाचा कृपावर्षाव होत असतो.

गुरूशिष्य परंपरेत अनेक नावे आहेत.

वशिष्ठ आणि राम

सांदिपणी आणि कृष्ण

निवृत्ती महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज

जर्नादन स्वामी आणि संत एकनाथ 

द्रोणाचार्य आणि एकलव्य

अशी अनेक उदाहरणे देता येतील.


अशा अनेक गुरुंमुळे त्यांच्या शिष्यांचे जीवन सफल झाले .


गुरुशिष्य परंपरा आपल्या कडे अनेक युगांपासून सुरू आहे.

आताही अनेक लोक गुरु करतात. गुरूदक्षिणा देत असतात.

पण फक्त गुरु करणे आणि गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूपूजन करणे  म्हणजे शिष्यत्व नाही.

गुरु हा ज्ञानी असावा ,सन्मार्ग दाखवणारा असावा.शिष्याचे हीत जाणणारा असावा आणि शिष्य ही गुरुने सांगितलेल्या मार्गाने जाणारा असावा .

गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवत असतो.

आईवडील, शिक्षक,ग्रंथ, पुस्तके, मानलेले गुरू यांच्या कडून तर आपण घडतचं असतो .पण जीवनातील अजून एक गुरू म्हणजे अनुभव.

अनुभव आपल्याला खुप काही शिकवून जातो.आपल्या साठी काय चांगले आणि काय वाईट हे अनुभवातून समजते.या गुरुची गुरूदक्षिणा खुप महागात पडते.खुप काही गमवून आपण त्याच्या कडून शिकत असतो.


\"वक्त और गुरू दोनों सिखाते है,

बस फर्क इतना है कि गुरु सिखाकर 

इम्तिहान लेता हैं और वक्त 

इम्तिहान लेकर सिखाता हैं।\"


आज गुरूपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व गुरुंना कोटी कोटी नमन


गुरूमुळे आयुष्यास मिळतो आकार

संकटाच्या वेळी मिळतो आधार

गुरुचे आपल्यावर अनंत उपकार

शब्द तोकडे पडतात मानन्यास आभार