गुरू रे निर्गुण

आयुष्यात आलेले गुरू


गुरू रे निर्गुण..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

प्रसंग पहिला..


" लक्षात ठेवा मुलांनो.. आपल्या आयुष्यात व्याकरण खूप महत्त्वाचे आहे.. चिता आणि चिंता यामध्ये फक्त एका टिंबाचा फरक असतो पण अर्थ खूप वेगळा होतो. दिन आणि दीन एक वेलांटी आणि सगळे वाक्य चुकीचे. अजून एक माणसे भेटतात, वस्तू मिळतात किंवा सापडतात.. मग यापुढे मराठी लिहिताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजले?" इयत्ता चौथीचा स्कॉलरशिपचा वर्ग. पहिलाच तास. मराठी भाषेचे नियम का वापरावेत हे परबबाईंनी उदाहरणासह दिलेले प्रात्यक्षिक.. त्या चिमुकल्यांच्या डोक्यात फिट्ट बसले. "या परिक्षा लाखो मुले देतात. यात आपला क्रमांक आला तर खूपच छान. पण नाही आला तर हे लक्षात ठेवा. या म्हणी, वाक्प्रचार, गणित हे आज नाहीतर पुढच्या आयुष्यात नक्की उपयोगी पडेल. ज्ञान कधीच वाया जात नाही.."

प्रसंग दुसरा..

" अग काय करते आहेस?"
" काका, पाने मांडते आहे."
" ही अशी? कशाच्याही बाजूला काहिही? ती भाजी श्रीखंडात चालली आहे बघ.. आता ते ताट तूच घे जेवायला. दुसरी पाने मी सांगतो तशी वाढायला घे.." ती बघतच राहिली..

प्रसंग तिसरा..

" सासूबाई आम्ही जरा डॉक्टरकडे जाऊन येतो." आई सासूबाईंना म्हणाली.
" का? काय झाले?" आजीने आपल्या नाती आणि पणतीकडे बघत विचारले.
" अग, सकाळपासून नुसती सर्दी झाली आहे तिला. अंग पण तापले आहे." पहिलटकरीण नात आजीला सांगू लागली.
" अग, ऋतु बदलला की होते असे. लगेच कशाला डॉक्टरकडे घेऊन जातेस? मी धुरी देते उद्या तिला ओव्याची. नाहीतर लसणाची माळ घाल गळ्यात. पटकन सर्दी निघून जाईल.." पणजीने पटकन बटव्यातली औषधे सांगितली.
" नाही हां आजी. मला कसलीही रिस्क नाही घ्यायची बाळाबद्दल. आम्ही येतो जाऊन. " बाळ, बाळाची आई आणि आजी डॉक्टरकडे जाऊन आल्या. महिन्याभराची ती तान्हुली औषधे घेताना आकांत करायला लागली की पणजी बाहेर निघून जायची. रात्रीची वेळ. दुसर्‍या दिवशी असलेल्या बारशासाठी जमलेले नातेवाईक. कधी न रडणारी छकुली आज मात्र कुरकुरत होती.
" काय ग का रडते आहे आज ही?"
"काय माहित आजी.. पोटपण कडक झाले आहे. एवढ्या रात्री डॉक्टरांना फोन तरी कसा करू?"
" शी केली होती तिने?"
" नाही. कालपासून औषध बदलले आहे. म्हणून केली नसेल.."
" सूनबाई, जरा विड्याचे साधे पान आणून दे.."
" आजी काय करतेस?"
" काही इजा होणार नाही तुझ्या लेकीला.. काळजी करू नकोस.." आजीने पानाचा उपयोग केला. छोट्या बाळाने शी केली. दूध पिऊन शांत झोपी गेली. तिच्या आईने रडत आजीला मिठी मारली.

प्रसंग चौथा..

सूनबाईंनी यावेळेस श्रावणातल्या पुरणपोळ्या मीच करते असे सांगितले. घरी आलेल्या मेहुणासोबत घरातले इतर गप्पा मारत बसले. सूनबाईंनी आधीच कणीक मळून ठेवली होती. पुरण केले होते. पुरणपोळ्या मात्र नेहमीसारख्या होईनात. तशी सूनबाईला पोळ्या करायची म्हणजे लाटायची सवय होती. पोळ्या टम्म फुगायच्या. पण आज मात्र त्यांनी असहकार पुकारला होता. लाटल्या जात नव्हत्या. फुगणे तर लांबची गोष्ट. बरं बाहेर जाऊन सासूबाईंना विचारावे तर सगळे हसणार हे नक्की. शेवटी तिने दीर्घ श्वास घेतला.. आई कशी पोळ्या करायची ते आठवले.. कणीक थोडी सैल केली. किंचित पातळ झालेले पुरण ओव्हन मध्ये ठेवून घट्ट केले.. पुरणपोळ्या छान झाल्या. सूनबाईंनी स्वतःलाच शाबासकी देऊन घेतली..


गोंधळलात? काहीतरी असंबद्ध आहे म्हणून.. तर नाही.. हे आहेत माझ्या आयुष्याला वळण देणारे चार प्रसंग..
बाईंनी शिकवलेले मराठी व्याकरण डोक्यात एवढे छान बसले होते की लिहिताना पावलोपावली त्यांची आठवण येते. आज जेव्हा माझ्या लेखनाचे कौतुक होते तेव्हा कुठेतरी त्यांनी दिलेले धडे आठवत राहतात. भाषेला दिलेले वळण हे आयुष्याला वळण लावून गेले..

दुसरा प्रसंग घरचाच.. एकत्र कुटुंबपद्धती. भाच्यांना, पुतण्यांना शिकवताना, ओरडताना त्यांच्या आईवडिलांची परवानगी न घेण्याचे दिवस होते. पाने कशी वाढावीत ही मोठ्या काकाने शिकवलेली गोष्ट आयुष्यात प्रत्येक काम नीटनेटकेपणानेच झाले पाहिजे ही गोष्ट शिकवून गेली.

प्रसंग तिसरा..
नुकतीच बाळंतीण झालेली मी बाळाला काहीही झाले तरी लगेचच डॉक्टरकडे जायचे. आजी ओरडायची की लहान लहान गोष्टींसाठी औषधे देऊ नकोस. थोडी घरगुती औषधे पण देत जा. आधी तयार नसायचे. पण एक अनुभव सगळे शिकवून गेला. आज जेव्हा मी घरी बनवलेल्या फेसपॅकचे सगळेजण कौतुक करतात तेव्हा परत एकदा आजीने शिकवलेले कुठे वाया गेले नाही याची खात्री पटते..

प्रसंग चौथा..
स्वतःकडून काहीतरी शिकण्याचा. कधीतरी उत्साहाच्या भरात आपण मोठे पाऊल उचलतो. अशावेळेस फजिती होण्याची सुद्धा शक्यता असते. मग कधीतरी मेंदूत जपून ठेवलेल्या गोष्टींची आठवण येते आणि एखाद्या कुशल गुरूसारखे आपणच आपल्याला शिकवत जातो. एकलव्य जसे द्रोणाचार्य कसे शिकवायचे हे बघून शिकत गेला तसेच कधीतरी आपण बघितलेल्या गोष्टी बघूनच शिकत राहण्यात पण एक वेगळीच मजा असते. अनपेक्षित संकट आले तरी त्यातून वाट काढता आलीच पाहिजे हे त्यावेळेस नव्याने समजले..
असे म्हणतात की दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले. आपल्या आयुष्यात सुद्धा आलेला प्रत्येकजण काहीना काही शिकवून जातोच. कोणाकडून किती आणि काय घ्यायचे हे आपण ठरवायचे. एखादी गोष्ट दिसायला अगदी छोटी असली तरी तिचे परिणाम मात्र डोंगराएवढे असतात. गुरू अनेक असतात. पण प्रत्येकवेळी प्रत्येकाचा उल्लेख करणे शक्य नसते. अशाच काही गुरूंची आठवण ताजी करण्याचा हा प्रयत्न. आयुष्यातील सगळ्याच गुरूंना शिक्षकदिनाच्या मानवंदना..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई