गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

ते म्हणतात ना, शिक्षक हा वाट असतो आणि विद्यार्थी त्या वाटेवरचे वाटसरू. शिक्षक हा विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो पण, स्वतः मात्र आहे तिथेच राहतो. आज ह्या गोष्टीची सुध्दा पुन्हा नव्याने आठवण झाली.
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा


ते म्हणतात ना, शिक्षक हा वाट असतो आणि विद्यार्थी त्या वाटेवरचे वाटसरू. शिक्षक हा विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो पण, स्वतः मात्र आहे तिथेच राहतो. आज ह्या गोष्टीची सुध्दा पुन्हा नव्याने आठवण झाली.
अधिकारी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ह्या शाळेत पाऊल ठेवलं आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तसा पाठक सरांचा चेहरा डोळ्यासमोर येऊन उभा राहिला. पाठक सर आमच्या शाळेचे आदर्श शिक्षक होते. आणि पाचवीपासून आमचे क्लास टीचर होते. त्यांनी शिकवलं की खूप पटकन समजायचं. त्यांची शिकवण्याची पद्धत तर वेगळी होतीच पण शिक्षा करण्याचीही एक वेगळीच पद्धत होती. जर कुणी बेशिस्त वर्तन केले तर ते म्हणायचे की मी ही शाळा सोडून जाईल. आधी कुणी मनावर नाही घेतले पण ते एकदा खरच शाळेत आले नाही. आम्ही सगळे खूप अस्वस्थ झालो होतो. तेव्हा त्यांनी त्यांच्या एका कामासाठी रजा घेतली होती. पण हे तेव्हा आम्हाला कुठे कळत होतं. आम्हाला वाटलं की आपण सरांच्या मनाविरुध्द वागतो म्हणून सर शाळेला येत नाहीत. पण दुसऱ्या दिवशी सर शाळेला आले. आणि आम्ही सगळे जण जाऊन त्यांना बिलगलोच.
त्या दिवसापसून आम्ही शिस्त पाळू लागलो. आमचा वर्ग ही आदर्श वर्ग ठरला. आम्हाला दरवर्षी पाठक सरच आमचे क्लास टीचर हवे असायचे. त्यासाठी आम्ही काय काय उपद्व्याप केलेत... बापरे... आता आठवलं तरी हसूच येतं.
हळूहळू पाठक सरांच्या हातातली छडी बदलत गेली आणि आम्ही मोठे होत गेलो. नववीत असताना अचानक सरांची बदली झाल्याचं आम्हाला समजलं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते; माझ्याही... मी सरांना बिलगलो आणि रडत रडत त्यांना म्हणालो,
"सर... आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला दुसरी शिक्षा द्या ना... सर तुम्ही नका ना जाऊ आम्हाला सोडून."
त्यांनी त्यांचा चष्मा काढला. स्वतःचे अश्रु पुसले, आणि फक्त एक वाक्य त्यांनी मला सांगितले. ते म्हणाले,
"मी सोडून जातोय त्यापेक्षा मी तुमच्याकडे काय सोडून जातोय हे जास्त महत्त्वाचं आहे."

पाठक सरांच हे वाक्य आजही जसच्या तसं लक्षात राहीलं.

...समाप्त...

लेखिका :- कोमल पाटील
गोष्ट छोटी डोंगराएवढी
१८/९/२०२२