गुढी पाडवा

Gudhi Padwa


गुढी पाडवा

हिरवीगार मस्त आंब्याची पाने.. आणि पिवळी पिवळी फुले.. असे वोवुन दाराला तोरणमाळ.. साफसफाई , स्वच्छ केलेले असे अंगण.. त्यावर सडा आणि वर सुरेख अशी रांगोळी.. दारासमोर पाट ठेऊन त्यावर बांबूची काठी..तीच्या टोकाला सुंदर वस्त्र म्हणा किंवा शेला म्हणा गुंडाळून, कडुलिंब पाने, आंब्याची डहाळी आणि साखरेची पांढरी
शुभ्र मोत्यासारखी गाठी.. फुलांचा हार आणि त्यावर तांब्या पालथा ठेवून.. अशी उभारलेली ही गुढी..

ही.. आकाशाकडे झेप घेणारी गुढी म्हणजे.. विजयाचे आणि समृद्धीची प्रतीक.. बांबू जसा उंच असतो तसेच या घरातील व्यक्ती, उत्तुंग झेप घेऊन त्यांची गरुडभरारी होऊ दे. तसेच उत्तम आरोग्य लाभुन सर्व जण सुखा समाधानात नांदू दे..
\"शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी,
हिच सदिच्छा नेहमीच स्मरावी.\"

‍ केप्राचीन काळी मानवाने \"देव\" या कल्पनेतून पूजा करायला सुरुवात केली.. तीच मुळी देवीच्या रूपात.. स्त्रीच्या रूपात.. आणि ती स्त्री म्हणजेच आदिशक्ती, आदिमाता पार्वती, होय.. असे मानले जाते.. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले..
म्हणुन लग्नाच्या तयारीला या दिवसापासून सुरुवात होऊन तृतीयेच्या दिवशी लग्न झाले.. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या या शक्ती रूपाची पूजा करतात.. यालाच \"चैत्र नवरात्र\" असे म्हणतात..
लग्नानंतर पार्वती माहेरी \"माहेरवाशींण\" म्हणून महिनाभर माहेरी राहते, तेव्हा तिच्या कौतुका साठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते..
यानंतर अक्षय तृतीयेला ती परत सासरी जाते.. असा उल्लेख पुराणात आढळतो.

महाभारताच्या \"आदि पर्वात\" उपरिचर राजा..
याला इंद्राने कळकाची काठी दिली.त्याच्या
आदरार्थ ही काठी जमिनीत रोवली.. आणि तीची पूजा केली. नववर्ष प्रारंभाच्या दिवशीच तिची पूजा केली.या परंपरेचा आदर म्हणून.. काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, पुष्प माला घालून.. तिची पूजा करतात..


मराठी गुढी चे महत्व..

शालीवाहन संवत्सराचा पहिला दिवस म्हणजे.. ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त.. नवीन व्यवसाय.. नवीन वस्तू खरेदी.. काही नवीन कार्यारंभ.. सोने खरेदी..
अशाच काही नवीन कार्यांना या दिवशी आवर्जून सुरुवात करतात..

ब्रह्मदेवाने पहिली तिथी म्हणून सर्वात श्रेष्ठ घोषित केली.. पहिली म्हणून प्रतिपदा असेही म्हटले जाते. हिला \"युगधी तिथी\" असेही म्हटले जाते..
आधुनिक युगात ही या सणाला विशेष महत्त्व आहे.. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे.. पूर्वजांची काही उद्देश आहेत.. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुरुवात होते.. वातावरणात काही बदल होतात.. जुनी पान गळून पडतात.. नवीन पालवी फुटते.. आंब्याला मोहर येतो..उन्हामध्ये उष्णता वाढते..

उन्हामध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी,गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात.. आणि याच दिवशी ओवा, मीठ, हिंग, मिरी, आणि गुळ हे कडुलिंबाच्या कोवळ्या पानासोबत वाटून त्याच्या गोळ्या करून खातात..
काही ठिकाणी या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग, मध किंवा गुळ मिक्स करून हा प्रसाद केला जातो..

चिंच, गुळ आणि मीठ, भिजलेली चणाडाळ हिंग, ओवा, जिरे या सर्व मिसळून चटणीही तयार करून खातात.. हे सर्व शरीरात गेल्यामुळे भरपूर लाभ होतात.. पचनक्रिया सुधारते, पित्तशमन होते, तसेच त्वचारोग यामध्ये फायदा होतो.. कडुलिंब शरीराला थंडावा देणारा असून आरोग्याच्या दृष्टीने हितकर समजला जातो…

या दिवशीं पुरण पोळीचा, श्रीखंड पुरीचा किंवा आणखी काही गोंड करून गुढीला नैवेद्य
दाखवला जातो..