गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ४)

शर्मिलाला तर ते अजिबात आवडलं नाही......

शर्मिलाला तर हे अजिबात आवडलं नाही. ती तर स्पष्टच म्हणाली, " आमच्यावर तर सूडच उगवलाय. आत्तापर्यंत आम्ही एवढं केलं, ". आतामात्र माई म्हणाल्या, " दिलं नाही कसं ग? दिलं की, तुला, तात्याला आणि मुलांनासुद्धा. तुला काय खोड काढायची सवय आहे का? आणि करण्यावद्दल म्हणशील तर, असं काय केलस ग? फक्त पैसे पाठवले ना? तेही कुरबुर करीत. " मग जीवनही म्हणाला, " बाबासाहेबांनी बरोबर मृत्युपत्रातून बाजूला ठेवलय. हे मृत्युपत्र खरं आहे की नाही, याचीच मला शंका आहे. आपण हे प्रकरण कोर्टात न्यावं. पाटील आणि वाडेकर यांनी मिळून हे केलेलं कारस्थान आहे. नाहीतर देवस्थानच्या विश्वस्तमंडळावर पाटलांचा सहभाग कसा आला? " मग मात्र तात्या चिडून म्हणाला, " तू वेडा आहेस का? विलवर बाबासाहेब्वांची सही आहे, ती मी ओळखतो. आणि वाडेकर वकिलाला काय मिळालं रे, कारस्थान करून? तुझं आपलं काहीतरीच, पाहिजे तर मी, मला मिळालेल्या वाटणीवरचा हक्क सोडून देतो. ते तू घे. मला कशाचीही गरज नाही. ".......


शर्मिला चांगलीच भडकली. " अहो, हरिश्चंद्र, उदारपणा पुरे आता. मला तर काही मिळालच नाही, पण तुमचा आणि निशी, रचनाचा हक्क तुम्हाला नको असेल ना तर भिकेचा कटोरा घ्या हातात. "...... "चूप " तात्या ओरडला, भानावर आहेस का? तोंडाला येतय ते बोलत सुटल्येस ती. आपल्याला हे नाही मिळालं तर असं किती अडणार आहे आपलं? कुठेतरी समाधान मानायला शीक.... त्यावर जीवन म्हणाला, " मिळालं नसतं म्हणजे असं बोलला असतास का? " तात्याने न बोलण्याचं ठरवलं. तो चडफडत गप्प बसून राह्यला. माईला ते बघवेना. ती म्हणाली, " असं करा, सगळ्यांनी च आपापले हक्क सोडा, आणि ज्यांना पाहिजे आहेत त्यांनाच ते द्या. आणि आता सगळे निघालात तरी चालेल. आमचं आम्ही पाहू. "....... दोन तीन दिवसातच सगळे गेले. शेवटी जाणारा तात्या होता. जाताजाता तो म्हणाला " माई, काही लागलं तर लगेच बोलावून घे, बरं का. वेळ घालवू नकोस. आता बाबा साहेब नाहीत. तेव्हा, मोकळे पणानं बोल. गप्प राहू नकोस..... " बोलता बोलता त्याचा गळा भरून आला. त्याने माईला मिठी मारली. तिलाही गलबललं. मग शर्मिला, तात्या, निशी आणि रचना या सगळ्यांनी नमस्कार केला. शर्मिला जाताना एकही अक्षर बोलली नाही.

आता घर अगदी सुनं सुनं झालं. एवढ्या मोठया घरात ते तिघेच होते. एकप्रकारची विक्षिप्त शांतता पसरली. सरला अजूनही तात्याच्या दूर जाऊन दिसेनाश्या होणाऱ्या मोटारी कडे पाहात होती. मोटार गेली तरी ती तशीच उभी होती. हा दिवस तर कंटाळवाणा गेला. समोरचा सीताराम लोहार डोकावून गेला. तो माईंना बहीण मानीत असे. बऱ्याच मेंबरांचा रोष पत्करून बाबासाहेबांनी त्याची बाजू घेऊन पंचायतीच्या खटल्यात त्याचं घर वाचवलं होतं. त्यामुळे तो कधीही उपयोगाला येई. तात्याला मुंबईत तोच भेटला होता. जेवणात घरातल्या कोणाचच मन लागत नव्हतं. अगदी इलाज नाही तरच ते बाहेर पडत होते. असेच सात आठ दिवस गेले. देवस्थानची अशी काही जमीन होती आणि फिक्स्ड डिपॉझिट मध्ये एवढे पैसे होते हे बाबासाहेबांनी सांगितलं नव्हतं. इतकी वर्ष संसार करून, या माणसाला सहन केलं तरी त्याच्याजवळ काय आहे हे त्यानी सांगितलं नाही याचा माईंना राग आला......... बाबासाहेबांना जाऊन आता महिना होत आला. एक दिवस माई म्हणाल्या, " शशांक आता जरा कामाचं पाहा. शेवटचं वर्ष नोकरी करूनही करता येईल तुला. माईंचं म्हणणं पटण्यासारख होतं. तोही त्याच तजविजीत होता. तो म्हणाला, " मी तालुक्याच्या गावी जाणारच आहे. इतरही काही कामं असतील तर सांग. " माईनी काहीच उत्तर दिलं नाही. दोन दिवसांनी शशांक गेला. दोघींनी घरात जो किराणा होता तो वापरून दिवस घालवला. उद्या त्यांना सामान भरणं भाग होतं. रतनशेठची मागची उधारी पण द्यायची होती. शशांक प्लेसमेंट सर्व्हिसेसना संपर्क करून जॉब पाहणार होता. सोमवारचा दिवस होता.

रात्रीची जेवणं झाली. माई आणि सरला अंथरुणं घालीत होत्या. वरच्या मजल्यावरच्या तिन्ही खोल्या बंद केल्या. तळ मजल्यावरची पण एक खोली बंद केली. माणसच नाहीत तर काय करणार? त्या एकमेकींशी फार बोलत नव्हत्या. माई तशा कुढ्या स्वभावाच्या. आणि बोलण्यासारखं काही नव्हतच म्हणा. अजूनही त्यांना वाटत होतं की आतून कुठूनतरी बाबासाहेब येतील आणि मोठ्या आवाजात म्हणतील, " अरे बोला काहीतरी, काय सुतक्यासारख्या बसलात? "...... पण तसं काहीही झालं नाही. दहा वाजत आले माईंना झोप लागली. हळूहळू बाहेरचे आवाज कमी झाले. रात्रीची खिन्न शांतता पडली. सरला जागीच होती. तिच्या मनात आलं. काही दिवसांपूर्वी घर कसं गजबजलेलं होतं. आजपर्यंत बाबासाहेबांच्या अस्तित्वामुळे तिला आजपर्यंत माईंचा मुखदुर्बळपणा जाणवला नव्हता. दिवस कसा तरी जातो, पण रात्र लवकर जात नाही. माणसाला आवाज हवे पण असतात आणि त्यांची भीती पण वाटते. नक्की माणसाला काय हवं असतं, कोण जाणे. कधी कधी आवाज त्याला गोंगाटासारखे वाटतात. आवाज तेच आणि तेवढेच असले तरी माणसाची प्रतिक्रिया दरवेळेला वेगवेगळी असते. असले दीडशहाणे रिकामे विचार तिच्या मनात येत होते..... शशांकही बुधवारशिवाय यायचा नव्हता. या विचारासरशी तिला जरा अस्वस्थ आणि एकटं वाटू लागलं. तिच्या मनाला अनामिक भीती क्रुरतडू लागली. जणू काही काहीतरी होण्याची तिला अपेक्षा होती. या विचारांमध्ये किती वेळ गेला तिला कळलं नाही. तेवढ्यात तिला झोप लागली. स्वप्न पडलं.......


...... बाबासाहेबांचा हात धरून स्वप्नात ती नदीजवळच्या भागात फिरत होती. ती लहान होती. बाबासाहेब कोणताही उंच भाग पाहून तिला उड्या मारून दाखवीत होते. ती हासत होती.. नदीवर वारा भयंकर सुटला होता. मग ती एका उंचवट्यावर उभी राहून उडी मारणार, इतक्यात बाबासाहेब दिसेनासे झाले. आणि दाराची कडी वाजत असल्याचा आवाज आला. ती स्वप्नातच होती. आणि ती स्वप्नातल्या स्वप्नात म्हणाली, " हे काय बाबासाहेब, मी घरी आले आणि तुम्ही बाहेर कसे राहिलात? लगेच आत नाही का शिरायचं? " आणि दार उघडायला म्हणून ती निघाली आणि धाडकन बिछान्यावर पडली. मग तिच्या लक्षात आलं, हे स्वप्न होतं. पण कडी मात्र वाजत होतीच. तिने हळूच अंथरूण चाचपून पाहिलं. ती बिछान्यावर असल्याची तिला खात्री झाली...... आता मात्र कडी जोरात वाजत होती. तिने बाजूलाच झोपलेल्या माईकडे पाह्य्लं. हिला कशी कडी ऐकू येत नाही? जरा वेळाने कडीचा आवाज थांवला.... भिंतीवरील घड्याळात एकाचा ठोका पडला....... पुन्हा कडी वाजू लागली. तिची छाती धडधडू लागली. घसा कोरडा पडला. दाराबाहेरची व्यक्ती अडखळत बोलत होती. शब्द नीट ऐकू येत नव्हते. ती आता पूर्ण जागी झाली होती. भीतीमुळे तिचं शरीर उठायला विरोध कतीत होतं. पण उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. कोण असेल एवढ्या रात्री? वेगवेगळी नावं तिनी घेऊन पाहिली. पण तिला अंदाज येईना.....

.... आता नात्र दाराबाहेरून आवाज ऐकू येऊ लागला. " ए, तुझ्यायला, दार उघड..... स.. रला.... चल उघड दा..... र... ए.... तुझ्या....... तू... झ्या.... सर... ̮... ̮ला. ती अंथरूणावरून उठली. जवळच्याच लोटीतलं पाणी ती प्यायली, पण घशाची कोरड काही जाईना. तिने उठून सावकाश भिंतीचा आधार घेत दिवाणखाना ओलांडला. आणि ती पुढल्या ओटीवर आली. आता तिला स्पष्ट ऐकू येऊ लागलं. बाहेरची व्यक्ती तिच्या नावानी शिव्या देत होती. ती मुख्य दरवाजाकडे सरकली. तिने दरवाजाच्या फटीतून पाहण्याचा प्रयत्न तिने केला. पण अर्धवट चंद्रप्रकाशात तिला फक्त अस्पष्ट आकृती दिसली. आता बाहेरची व्यक्तीच्या रडण्याचा आवाज तिला आला. ती हळू हळू विव्हळत होती. आणि शेवटी " आ.. य... ̮. ̮लव..... यू.... डियर..... स.... रला.... " आता तिने ओळखलं, हा वसंताचा आवाज होता. पाटलांचा एकुलता एक फुकट गेलेला मुलगा. गावाने त्याला वाळीतच टाकला होता. आपल्या कसा काय मागे लागला तिला कळेना. काही महिन्यांपासून तो तिच्या पाळतीवर असायचा. तिने एकदोनदा माईला सांगितलही होतं. पण गंभीर असं काहीच न घडल्याने तिकडे लक्ष दिलं गेलं नाही. बाबासाहेबांना ती बोलणार होती, पण ते रोगाने पछाडलेले. त्यांना काय त्रास द्यायचा, असा विचार तिनी केला. पण आता हे फार झालं. बारावा तेराव्याचा दिवस तिला आठवला. तिने पुन्हा फटीला डोळा लावला. वसंता फतकल मारून पायरीवर बसला होता. उघडण्यासाठी कडीवर ठेवलेला हात तिने आता मागे घेतला. ती मागे वळली...... आणि केवढी दचकली ती..... मागे माई उभी होती. तिने विचारले, "कोण आहे ग बाहेर?, आणि तू इथे काय करत्येस?." मग तिने माईला सगळं सांगितलं. दोघी बराच वेळ नंतर अंथरूणावर पडून बोलत राहिल्या. दाराबाहेरील वसंता केव्हा गेला, हे त्यांना कळलच नाही. माईनी मात्र यावर काय करायचं हे मनोमन ठरवलं. आणि त्या झोपी गेल्या. असेच काही दिवस गेले. अधून मधून तात्याचा फोन रिसबूड काकांच्या घरी यायचा. बाकी कोणालाच संबंध ठेवावा असं वाटत नसावं. विशेष काहीच घडत नव्हत. माई म्हणाल्या होत्या खऱ्या की शशांक आणि सरलाकडे मी पाहीन. पण प्रत्यक्षात त्यांना आर्थिक चिंता सतावू लागली. मध्येच एकदा तालुक्याहून कोर्टाचा माणूस आलाअ नोटिस देऊन गेला. नोटिस वाचल्यावर कळल की जीवन आणि शर्मिला यांनी मृत्युपत्राच्या खरेपणाबाबत आव्हान अर्ज दाखल केला होता. माईंनाही वकिला मार्फत हजर राहण्यास सांगितलं होतं. नोटिस ऐकून माईंच्या अंगाला चूडच लागली. त्या म्हणाल्या, " ह्या शर्मिलाची आणि जीवनची पण कमाल आहे. शर्मिला अशीच वागेल, पण जीवन आपला मुलगा, असा वागेल असं वाटलं नाही. तात्यानी पण आपल्याला काहीच सांगितलं नाही. एवढा दर आठवड्याला फोन करतो. दुःखात सूख म्हणजे, तालुक्याच्या गावी शशांकला सध्या अर्ध वेळ काम मिळालं होतं.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all