गोष्ट छोटी डोंगराएवढी

Respect For Teachers
गोष्ट छोटी डोंगराएवढी
"शिक्षक दिन...५ सप्टेंबर"

शिक्षक दिनाचं लेणं लेऊन सप्टेंबर महिना उत्साहाचा आणि आनंदाचा खजिना घेऊन आला आहे.

गुरु शिष्याचं एक जिव्हाळ्याचं समृद्ध नातं तयार करणे हेच शिक्षकी पेशा चं वेगळे पण आहे. उद्याचं भविष्य जे दररोज शिक्षकांच्या समोर विद्यार्थी रूपाने असते, ते भविष्य घडविण्याचे अत्यंत मोलाचं कार्य शिक्षक करीत असतात.

प्रत्येक शिक्षकाला आपल्या पेशाचा अभिमान वाटावा अशी थोर गुरुपरंपरा आपल्याकडे आहे. वडीलधाऱ्यांना मान देणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षकाचे स्थान विशेष आदराचे, मानाचे व जिव्हाळ्याचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रवाह वाहता ठेवून त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने शिक्षक कार्य करीत असतात.
शिक्षणाच्या यशस्वीतेवर राष्ट्राचा भविष्यकाळ अवलंबून असतो.
शिक्षक ज्ञान दाता तर असतोच पण विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करायला लावणारा सुद्धा असतो. विद्यार्थी, पालक, समाज यांच्यासाठी मित्र, मार्गदर्शक व प्रेरक असतो

म्हणूनच संस्कृत मध्ये शिक्षकाला "गातुवित" म्हटले आहे. म्हणजे "path finder". शिक्षकाने मार्गदर्शकाची भूमिका बजावून विद्यार्थ्यांना मार्ग दाखविणे ही काळाची गरज आहे. नुसती माहिती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबणे नव्हे. विनोबांनी शिक्षण विषयक कल्पना छान मांडलेली आहे. ते म्हणतात, "सर्व चराचर वस्तूंजवळ पूर्णत्व आहे. ते अप्रगट बिजावस्थेत आहे." पूर्णांकडून पूर्णाकडे", एका बीजभूत पूर्णत्वापासून प्रफुल्ल विकसित पूर्णत्वाकडे, कळीतून पुष्पाकडे, चंद्रकोरी पासून पूर्ण बिंबाकडे.........
कळीच्या विकासाला, चंद्रकोरीच्या प्रकाशनाला मदत करणे हेच शिक्षकाचे काम!
हळुवार फुंकर घालून पाकळीचे विकसन व्हायला मदत करणे महत्त्वाचे........."

आज शिक्षणात हेच अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना हळुवार फुलवत नेणे.
विद्यार्थी म्हणजे ज्याला विद्या या शब्दाचा अर्थ कळला तो विद्यार्थी.
आणि ही विद्या समजावून सांगणारे सर्व समावेशक ,सर्व चराचरात वावरणारे असे गुरु...

धुराने झाकीला अग्नी
जोडीने आरसा जसा!!
वारेने वेष्टीला गर्भ,
गुरु विना ज्ञान हे तसे!!!!!

गुरु हा शिष्याच्या मनावरची धूळ झटकून त्याच्या जीवनाला आकार देतो. ज्याप्रमाणे समुद्राच्या हृदयाला भरती येते, तेव्हा किनाऱ्यावरचे निष्प्रभ पडलेले दगड सुद्धा पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होतात!! त्याप्रमाणे गुरुने ओंजळी भरभरून शिष्याच्या मनाला ज्ञानाने पुलकित करावे!!
आजची पिढी ही मागील पिढीपेक्षा कितीतरी
पटीने शार्प आहे. त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा कितीतरी पटीने रुंदावल्या आहेत. नवीन नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी ही पिढी सज्ज आहे. गरज आहे ती फक्त त्यांच्या डोक्यात माहिती न कोंबता त्यांचे ज्ञान समृद्ध करण्याची!!
अंगी शहाणपण येणं हे ज्याच्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतं. आणि हा ज्ञानाचा पाया मजबूत करण्याची जबाबदारी गुरूंची म्हणजे आजच्या शिक्षकांची आहे
त्यासाठी आजच्या शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे..

"a lamp can\"t light another lamp, unless it continues to burn its own flame"

शिक्षक जोपर्यंत स्वतः ज्ञानाची ज्योत तेवत ठेवत नाही तोपर्यंत तो विद्यार्थ्याला ज्ञानाने समृद्ध करूच शकत नाही.
त्यासाठी शिक्षकांनी स्वतः त बदल करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक गोष्ट बदलत असते. हा सृष्टीचा नियम आहे.
आपण पाण्यासारखं प्रवाही असावं. मागील ज्ञानाचा आजच्या ज्ञानाशी सांगड घालून भविष्याकडे वाटचाल करणे आणि बदलाला समोर जाणं, ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना एकदा शिक्षणाची गोडी लागली की ते मार्गदर्शकाचे बोट सोडून स्वतःच शिकायला सुरुवात करतात. असा अनुभव आहे.

त्यासाठी गुरुजन हो! नवे ज्ञान आत्मसात करण्यासाठी सज्ज व्हा!!!!!!

छाया राऊत बर्वे