Login

घे भरारी आकाशी

निर्मला घरी गेली तेव्हा संस्थेचे अध्यक्ष घरी येऊन बसले होते
"घे भरारी आकाशी

पुष्पा, कला, वैजू, निमू, अशा चौघीजणी सागर गोट्याचा डाव मांडून बसल्या.
'अग आज शामा अजून आली नाही ?...
भांडी घासायची आहे आज तिला बहुतेक -- असे म्हणेपर्यंत शामा हजर .
"बघ आली माझी जोडीदार निमू ने शामाचा आवाज ऐकून म्हटले".... मग खरा डाव रंगला. उपली, सुपली करत खेळ चौथ्या फेरीपर्यंत आला .
"ए-- काल मी तुझ्यावर हुंडी चढवली होती..."
'' मग त्याचं काय ...आज नवा खेळ आहे पहा पहा आज मी चढवते की नाही हुंडी" निमूने आपल्या खणखणीत आवाजात उत्तर दिलं'
. एका हाताने सागर गोटे जमिनीवर पसरून एक गोटा हवेत उडवून दोन ची जोडी उचलली, तेवढ्यात,
निमो-- पुरे खेळणं, अंधार पडायला लागला .आणि किती हा कल्ला? केव्हाची मी आवाज देते आहे पण तुम्हा पोरींना ऐकू जाईल तर ना'.?
'हो आजी एवढा डाव पुरा करून येते.' निमूने तेवढ्याच जोरात उत्तर दिले ,आणि हसत हसत गोटा हवेत उडवला. आता हुंडी पूर्ण झाली त्याच आनंदात जोरजोरात टाळ्या वाजवत मी जिंकले असे म्हणू लागली...
तेवढ्यात आजी आतून काठी घेऊन येताना दिसली तशी सर्व सख्यांनी बाहेर धूम ठोकली.
निमू चा कान धरत 'अगं काय हा तुझा आवाज किती बडबडत असते बाहेर पर्यंत तुझं हसणं ऐकू जातं .'
'अग आजी मी एकटीच थोडी'-- 'जरा तोंडात तीळ भिजत नाही तुझ्या आणि आवाज तो केवढा? मुलीच्या जातीने जरा हळू बोलावं पुढे जाऊन त्रास होईल आजीची बडबड चालू होती.
नीमू पटकन सागर गोटे गोळा करून आत पळाली.

रात्री आईचं काम आटोपेपर्यंत निमू बाबांजवळ असायची बाबा रोज तिला झोपताना एक गोष्ट सांगत नवीन नवीन गोष्टी अगदी रंगवून रंगवून ऐकण्यात निमूला खूप मजा येत असे .एक दिवस बाबा म्हणाले 'आज तू सांग बर गोष्ट निमे आत्तापर्यंत मी तुला कितीतरी गोष्टी सांगितल्या. मग बराच वेळ निमूने विचार केला व एक गोष्ट मनाने घडवून सांगितली. वा sवाs माझ्यापेक्षाही छान सांगितली आणि आवाज किती स्पष्ट आणि आवाजात ही गोडवा. बाबांनी शाबासकी दिली व म्हणाले
बघ निमे गोष्टसांगताना गोष्टीच्या आत शिरायचं असतं.
आई झोपायला आली कि 'झोप ग आता निमो किती बडबडते तोंड दुखत नाही कां?'
आई तोंडात तीळ भिजवायचं म्हणजे काय ग? आजी म्हणत होती निमूच्या प्रश्नावर आईने तोंडावर बोट ठेवून दिवा बंद केला.
निमू चे बाबा घरात धाकटे होते. वर दोन काका, घरात खूप माणसं दोन्ही काकांचे दोन दोन मुलगे , निमू मात्र एकटी च होती.
बाबा शाळेत मास्तर जरा नव्या विचारांचे निमू ला खूप शिकवायचे असे म्हणत.
पण एक दिवस निमू शाळेतून घरी आली तो दारात बराच गोंधळ माजलेला दिसला.
बाबांना खोलीत झोपवले होते. आणि पुजारी बाबा झाडत होते त्यांच्या हातात एक पिसांचा झाडू होता, बाबांना साप चावला व ते विष उतरवण चालल होत नंतर डॉक्टरांना बोलावले गेले पण उशीर झाला सापाचं विष पूर्ण शरीरात भिनल.
बाबांचं शरीर काळ नीळ झालं होतं. सकाळी निमू उठली घरात सर्वजण रडत होते संध्याकाळपर्यंत बाबा तिला सोडून गेले.
रात्री निमुला झोप येत नव्हती. शाळेतून येताना किती आनंदात होती निमू.आज बाल सभेत तिने गोष्ट सांगितली होती. बाई, हेड बाई सर्वांनी खूप खूप कौतुक केले. हेड बाई तर म्हणाल्या तुझी गोष्ट ऐकताना अगदी डोळ्यासमोर घडत आहे असे वाटते .
त्यांनी कौतुकाने एक पेन ही बक्षीस म्हणून दिला तो बाबांना दाखवायचा होता पण--
सकाळी बाबांना उचलून घेऊन जाऊ लागले आई आजी सर्व घर रडत होतं निमू बावरून गेली.
नमस्कार कर बरं म्हणताच निमू बाबा जवळ गेली हातातलं पेन हळूच बाबांच्या पायाशी ठेवून दिलं.
त्यानंतर बाबा कधीच दिसले नाही. त्यांचा फोटो खोलीत होता निमू झोपताना मग रोज बाबांना एक गोष्ट सांगू लागली .

निमू ची दहावीची परीक्षा संपली. अभय दादा निमुचा चुलत भाऊ त्याचे लग्न ठरले .घरात आनंदी वातावरण होते. निमुला नवीन वहिनी खूप आवडली .
वहिनी मंगळागौरीसाठी म्हणून माहेरी गेली आणि परत आली ते निमूसाठी स्थळ घेऊन.
मधुसूदन सोमण नाव त्यांचं शिक्षण चालू होतं वडील वकील दोन मोठे भाऊ चांगल्या नोकरीत घरदार खूप छान निमु ला खरंतर अजून शिकायचे होते पण बापा विना पोरगी ,आईलाही वाटलं चांगलं स्थळ बिना हुंड्याचं चालून आलआहे मग कशाला उशीर करायचा?
आणि निमू ही निर्मला मधुसूदन सोमण होऊन या घरी आली.

या घरातही ती धाकटी होती दोन मोठ्या जावा त्यांचे दोन मुलगे मुली एक आत्या घरात, सासू-सासरे अशी बरीच माणसं. निमु ला माहेरी सवय माणसांची पण इथे जरा वेगळं वातावरण घर म्हणजे मोठा बंगला प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या, पण स्वयंपाक घर एकच.प्रत्येक जण आपापल्याच विश्वात. मधुसूदनांचे शिक्षणात फार लक्ष नव्हतं त्यांना नाटक सिनेमा हेच आवडायचे त्यामुळे रखडत रखडत बी.ए. झाले.

बायकोला घेऊन फिरावे असाही फारसा उत्साह नव्हता. , नाटक सिनेमातल्या नट्यां पाहून बायको अगदीच सामान्य वाटे.
निर्मला दिवसभर कामात गुंतून राहत असे रात्री मात्र तिला कंटाळा येई मधुसूदन रात्री बरेच उशीरा येत. जावेची मुलं काकू काकू करून तिच्या अवतीभवती फिरत.
ती त्यांना गोष्टी सांगत असे म्हणून त्यांची ती आवडती काकू झाली रोज गोष्ट सांगताना निमुला बाबांची आठवण येत असे सासऱ्यांची जुनी कागद कोर्टाच्या केसेसची बरीच असत त्याच्या दुसऱ्या कोऱ्या बाजूला निमू एक गोष्ट लिहून ठेवू लागली.

पुढे तिचा संसार वाढीस लागला एक मुलगा व एक मुलगी झाली. आता जावेची मुलंही मोठी झाली त्यांना काकूच्या बालकथांपेक्षा मोबाईल जास्त आवडू लागला.

दिवस मुलांच्या संगोपनात जात होते.
मधुसूदनांची अभ्यासातली प्रगती पाहून सासर्‍यांनी त्यांना एक किराणा मालाचे दुकान काढून दिले .निर्मलाही त्यात बरेचदा जाऊन बसे.
हळूहळू मुलं मोठी होत होती जुनी खोडं काळाच्या पडद्याआड गेली नी भाऊ भाऊ विभक्त झाले. प्रत्येकाला दोन दोन खोल्या व आपल्या मिळकतीप्रमाणे घर चालवणं सुरू झालं.

मधुसूदनांचे दुकानातही फारसे लक्ष नव्हते म्हणून निमुला दोन्ही गढ सांभाळावे लागत.
घर स्वतःच असल्याने ठीकठाक चालले होते मुलं अभ्यासात हुशार निघाली.
एक दिवस रात्री सिनेमा पाहून येताना मधुसूदनांचा एक्सीडेंट झाला आणि ते गेले .
आता सर्व जबाबदारी निर्मलावर होती. घरातले व मुलांचे सर्व नीट करून ती दुकान सांभाळू लागली.

एक दिवस दुकानात एक समाजसेवी गृहस्थ आले, ते सामान घेता घेता फोनवर कोणाशी तरी बोलत होते.
"अहो एक कार्यक्रम आहे त्यात स्पर्धा ठेवतोय कथाकथनाची.
'निर्मला ने त्यांना विचारले त्याची काही फीस आहे कां? आणि वय मर्यादा?

' नाही हो-- जिंकणाऱ्याला बक्षीस. '
वयस्कर लोकांची आहे .'
निर्मला ने त्यांच्याकडून पत्ता लिहून घेतला.

ठरल्या दिवशी निर्मला त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेली.

अशा कार्यक्रमात भाग घेण्याचा निर्मला चा पहिलाच प्रसंग. सभागृह समाजाच्या मेंबर्सनी खचाखच भरला होता.
हॉलमध्ये खुर्च्या मांडल्या होत्या. निर्मला स्पर्धेच्या आयोजकांजवळ गेली व आपले नाव नोंदवले .
बरेच स्पर्धक येऊन कथाकथन करून गेले खूप खूप छान कथा होत्या प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला .
निर्मलाचे नाव घेतात ते स्टेजवर आली.

माझा हा पहिलाच प्रयास आहे तेव्हा काही चुकल्यास क्षमस्व असे म्हणून तिने
प्रथम आपल्या पूज्य वडिलांचे स्मरण केले व कथनाला सुरुवात केली ती मनाने जवळजवळ 25 वर्ष मागे गेली.
डोळ्यासमोर बाबा दिसत होते चिमुकली निमू त्यांना कथा सांगते असेच तिला जाणवत होते. कथाकथन संपल्यावर काही क्षण हॉलमध्ये एकदम शांतता पसरली निर्मलाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी धूसर पडदा पडला होता आणि काही क्षणानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. बरेच प्रेक्षक आपले डोळे पुसत होते .
निर्मला जागेवर येऊन बसली तरी डोळ्यातून पाणी वाहतच होते आयोजकांनी स्पर्धेचा निकाल दोन दिवसांनी होईल असे जाहीर केले.

दोन दिवसांनी निर्मला दुकानातून घरी आली तेव्हा घरी संस्थेचे अध्यक्ष येऊन बसले होते त्यांनी निर्मलाला स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाल्याचे सांगितले व अभिनंदन केले पुरस्कार संस्थेच्या कार्यालयात मिळेल ते घ्यायला यावे अशी विनंती केली.
ही आनंदाची बातमी घरी मुलांनी ऐकली त्यांनाही आईच्या या गुणाचं कौतुक व आश्चर्य वाटलं मुलगी म्हणाली " आई आम्हाला तर तू कधीही गोष्ट सांगत नसेअसे कां?
काय सांगणार निर्मला घर दुकान व मुलांचा अभ्यास घेण्यातच तिचा दिवस निघून जात असे गोष्ट सांगायलानिवांत वेळच नाही मिळाला.

एक दिवस निर्मलाला भेटायला एक गृहस्थघरी आले.
" मी जगन्नाथ कस्तुरे ,"
निर्मलाला हे नाव खूप ऐकल्यासारखे वाटले .
'मी आपले कथाकथन ऐकले फारच छान कथन करता आपण आपण माझ्या कथांना आपला आवाज द्यावा अशी माझी इच्छा आहे आता निर्मलाला आठवले ह्या नावाने असलेल्या बऱ्याच कथावाचल्या आहे.
' मला जमेल का पण?'
आपण सुरुवातीला ऑडिओ करू नंतर पुढे ऑडिओ व्हिडिओ दोन्ही.'
' मी घरी बोलते व मग कळवते.' निर्मला म्हणाली.
मोठे दीर म्हणाले पहा मुलांकडे दुकानाकडे दुर्लक्ष न होता जमले तर कर .'

हा टप्पा निर्मला ने व्यवस्थित पार पाडला. मुलांचे शिक्षण पूर्ण होतात मुलगा नोकरीला लागला व मुलीचेही लग्न झाले आता बऱ्याच जबाबदाऱ्या कमी झाल्या घर व दुकान संभाळून निर्मलाला भरपूर वेळ मिळू लागला
आता निर्मला चे नाव एक चांगली कथाकथन करणारी म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले एक दिवस समाजाकडून ती एका बाल व महिला आश्रमात गेली तिथे आठवड्यातून एक दिवस मुलांना गोष्ट सांगायला ती जात असे आश्रमाच्या संचालकांनी एक दिवस तिला एक बातमी दिली एक कथाकथनाची आंतरराष्ट्रीयस्पर्धा आहे त्यात तुमचं नाव देण्याचा विचार आहे.
निर्मलाला आतून भरून आला बाबांनी जे बी रुजवलं होतं, तिच्या मनात त्याचे सुंदर असे झाड तयार झाले नी त्याची गोड फळे ही तिला मिळत आहे.
घरी येऊन तिने बाबांच्या फोटो समोर विमानाचे तिकीट ठेवले तेव्हा... "घाबरू नको, 'घे भरारी' असे बाबा म्हणतात आहे असे तिला वाटले….
-----------------++++++++++++++++