गौरी आणि खजिना (भाग-५)

Marathi blog, Marathi katha, gauri and treasure, treasure hunt

      गौरी पुन्हा तीन दिवस प्रवास करून शौर्यपूर राज्यात पोहोचते. राज्यात आल्यावर पाहते तर काय सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. राजा स्वतः तिच्या स्वागतासाठी आलेला असतो. गौरीचं स्वागत मोठ्या जल्लोषात होतं. लहान मुलं गौरी दीदी, गौरी दीदी करत तिच्या आजूबाजूला नाचत बागडत असतात. मोठे लोक आशीर्वाद देतात; आणि आता राजा पुढे येतो! तू तुझं वचन खरंच पूर्ण केलंस! खूप लोक इथे येऊन गेले पण त्यांनी आमची मदत केली नाही; तू खरंच खूप शूर आणि धाडसी आहेस. मी तुला नक्कीच आता जादुई नदीचा रस्ता सांगतो..... "राज्याच्या बरोबर मध्यभागी एक ओस पडलेला वाडा आहे आणि त्याच्या मागूनच जादुई नदी वाहते; पण तिची एक खासियत आहे, वाडा सुरु होतो तिथूनच तिचा उगम आहे आणि वाडा संपतो त्याच्या पुढे नदीचं रूपांतर सामान्य नदीत होतं जी सगळ्या गावांत वाहते. गौरी राजाचे आभार मानते आणि नदीच्या शोधात पुढचा प्रवास सुरु करते. 

          थोडं अंतर पार केल्यावर तिच्यासमोर तीन रस्ते येतात, आणि बाजूच्या झाडावर असणार माकड गौरीचा रस्ता अडवतो. माकड म्हणतं; "मला माहितेय तू जादुई नदीच्या शोधात इथे आली आहेस मी तुला योग्य रस्ता सांगीन पण त्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल." गौरी माकडाला प्रश्न विचार म्हणून सांगते. माकड:- "अशी कोणती गोष्ट आहे जी सगळे जिथे जातील तिथे सोडून येतात पण तरीही ती कायम सोबतच असते." गौरी उत्तर देते बोटांचे ठसे! माकडाला गौरीचे चातुर्य आवडते आणि माकड गौरीला सांगतं या दुसऱ्या रस्त्याने जा.... हा रस्ता तुला वाड्यापर्यंत घेऊन जाईल. गौरी माकडाचे आभार मानते आणि पुढे जाते. अवघ्या वीस मिनिटात ती वाड्याच्या समोर येते. गौरी आता वाड्याच्या आजूबाजूला बघत बघत वाड्याच्या मागे जाते तिथे जादुई नदी तिला दिसते. इथे त्या नदीचं पाणी सोनेरी असतं. आजूबाजूला गाणारी फुलं, बोलणारे पक्षी, उडणारे मासे असं सगळंच चमत्कारिक असतं! गौरी अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. ती नदीजवळ येते आणि पाणी घ्यायला हात पुढे करते इतक्यात नदीतून एक सुंदर स्त्री बाहेर येते आणि म्हणते; "थांब! मीच ती जादुई नदी! तुला जर माझ्यातून पाणी घ्यायचं असेल तर आधी माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दे! जर बरोबर उत्तरं दिलीस तरच तू यातून पाणी घेऊ शकतेस नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही." गौरी होकार देते. नदी प्रश्न विचारायला सुरुवात करते; "आम्ही दोघे आहोत भाऊ भाऊ, आमच्यातला एक जरी हरवला तरी दुसरा काही कामाचा नाही सांगा पाहू मी कोण?" गौरी लगेच उत्तरते, बूट. आता नदी दुसरा प्रश्न विचारते; "मी लिहिण्याच्या, वाचण्याचा दोन्ही कामी येतो, पण मी कागदही नाही आणि पेनही नाही ओळखा पाहू मी कोण?" गौरी उत्तर देते, चष्मा. 

            गौरीची दोन्ही अचूक उत्तरं ऐकून नदी म्हणते तू खरंच हुशार आहेस पण माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकलेलं नाही, बघूया तुला तरी जमतंय का! आणि प्रश्न विचारते; "तुम्ही न बोलावताही मी येणार, घरभाडे हि नाही देणार, घराच्या कोणत्याही खोलीत जाणार, तुम्ही मला पकडू शकत नाही पण तरीही माझ्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, सांगा पाहू मी कोण?" गौरी थोडा विचार करते आणि उत्तर देते, हवा. नदी म्हणते तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस घे आता पाणी! गौरी लगेच पाणी घेऊन तिच्याकडच्या तुकड्यावर शिंपडते. पाणी शिंपडल्यावर लगेच त्या तुकड्यातून सोनेरी प्रकाश निघतो आणि नकाशा दिसू लागतो. गौरी स्त्रीरूपी नदीचे आभार मानते. ती स्त्री लुप्त होते.आता गौरी नकाशा नीट पाहते, नकाशाच्या मागे लिहिलेलं असतं यात जो रस्ता आहे तो तुला दुसऱ्या नकाशाच्या तुकड्या पर्यंत घेऊन जाईल. 

         नकाशात आता पुढचे राज्य मोतीपुर कडे जाणारा रस्ता असतो. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यानुसार तिथला राजा सहजासहजी कोणाला मदत करणारा नाहीये आणि त्यामुळेच मोतीपुर चे मित्र कमी आणि शत्रू फार आहेत. 

        

       काय वाटतंय.... आता काय होईल?? गौरीला पुढचे नकाशाचे तुकडे मिळतील?.... पाहूया पुढच्या भागात...  आजचा भाग कसा वाटला comment करून नक्की सांगा.....