"स्वतःचा नवरा पडल्यावर असं हसतात का?"
"सॉरी अगं, पण माझा नवरा आहे तो..त्याच्या चेहऱ्यावरून ओळखता येतं मला की त्याची वेदना सुसह्य आहे की असह्य..."
"काय ओळखता आलं गं तुला??"
"मी नाही मग कोण ओळखणार??"
"कदाचित तुला माहीत नसेल पण श्रीधरवर मी एकेकाळी प्रेम केलेलं..मी त्याचं पहिलं प्रेम..त्याची प्रत्येक गोष्ट तुझ्या आधी मला माहिती होती, त्याची आवड निवड, त्याचा स्वभाव हे तुझ्या आधी मी जाणून होते.. तुझ्यावर करत असेल तो प्रेम, पण पहिलं प्रेम ते पहिलं.. त्याची सर कुणाला नाही.."
एका दमात सावी बोलून गेली, गार्गी तिच्याकडे बघतच राहिली..सावी बोलून गेली पण भानावर आली तेव्हा तिला घाम फुटला, आपण हे काय बोलून गेलो??
गार्गी शांतपणे म्हणाली,
"पाहिलं दुसरं मला माहित नाही, पण मी बायको आहे त्याची, आणि त्याचं सर्वात जास्त प्रेम माझ्यावर आहे हे ठाऊक आहे मला.."
"शक्यच नाही.." सावी हसुन म्हणाली...
गार्गीने दीर्घ श्वास घेतला, आणि सावीला म्हणाली..
"विश्वास नसेल तर पुन्हा एकदा जिंकून दाखव त्याला.."
गार्गीने तिला चॅलेंज दिलं आणि ती आत निघून गेली..
इकडे सावी इरेला पेटली. श्रीधर वर दुसऱ्या कुणाचा हक्क आहे हे तिला सहनच होत नव्हतं. तिचं हे अवसान बघून तिचा नवरा...मयंक, तिला म्हणाला..
"सकाळी सकाळी काय शेजारच्यांशी भांडतेस? तुझी भांडायची सवय कधी सुटणार? आणि लोकांना माझ्याबद्दल काय काय सांगत असतेस चुकीचं? परवा तुझी बहीण मला म्हणत होती, की ताई ला त्रास देऊ नका...मी आजवर कधी त्रास दिलाय??"
"गप्प बस, मला जे करायचं ते मी करेन..माझ्यासोबत राहायचं तर रहा नाहीतर निघ.."
मयंकबद्दल तिने खूप बदनामी केलेली, कारण तिला त्याच्याशी लग्न करायचंच नव्हतं, ती श्रीधरमध्ये अडकली होती...पण मयंक मात्र आज ना उद्या ही आपल्यावर प्रेम करेल या आशेवर जगत होता...
सावी विचार करत बसली,
"इतकं बोलूनही गार्गी चिडली नाही की तिने आकांडतांडव केला नाही.याची दोनच कारणं असू शकतात, एक तर तिचा आपल्या नवऱ्यावर असलेला प्रचंड विश्वास किंवा आपल्या नवऱ्यावर तिचं अजिबात प्रेम नाही..यातलं कदाचित दुसरं कारण असावं.. नाहीतर आपल्या नवऱ्याची पूर्वप्रेयसी अशी समोर राहायला आलीये, तिच्याशी येता जाता बोलणं होतं हे कोणतीही बायको कसं सहन करेल?"