गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ५

एका वृद्ध स्त्री ची कथा
गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ५

मागील भागात आपण बघीतलं की जानकी आणि मालती एकमेकींच्या जवळ कधी आल्या हे त्यांनाच कळलं नाही. पुढे बघू काय होईल.

जानकीला सुखानंद या आश्रमात येऊन आता जवळपास महिना झाला. सुरवातीला मालतीला कबूल करूनही जानकी विनयची वाट बघत असे.

विनयची आठवण झाली की जानकीची गती हळू व्हायची. खूप वेळ आपल्याच तंद्रीत असायची. जानकीच्या लक्षात आलं नाही पण मालतीला तिच्या वागण्यात मागचं कारण लक्षात आलं.

" जानकी भूतकाळात फार रमू नकोस.कोणाची वाटही बघू नकोस.तूच दु:खी होशील."

एक दिवस मालती जानकीला म्हणाली.

मालतीचं बोलणं ऐकताच स्वतःला कसंबसं सावरत जानकी म्हणाली,

" नाही ग असं काही नाही. मी जरा वेगळ्या विचारात होते. "

" तुझा वेगळा विचार कोणता आहे मला कळलय. जानकी उगीच सारवासारव करून नकोस. मीही या परिस्थितीतून गेले आहे. काही दिवसांनी मला कळलं असं मुलांची वाट बघत बसण्यात काही तथ्य नाही. माझ्याच मनाची कुतरओढ होते. निष्पन्न काहीच निघत नाही. इथे येऊन सहा महिने झाले तरी विपूलचा एक फोन आला नाही. आईशिवाय ज्याचं पान हलत नव्हतं तो इतका कठोर कसा काय झाला या विचारात मी खूप रात्री घालवल्या. त्यांचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला."

" मालती"

जानकी हळूच मालती समोर पलंगावर बसली आणि म्हणाली,
" चुकलं माझं. मी तुझ्याशी खोटं बोलले. आता मी विनयची वाट बघत माझ्या तब्येतीवर परिणाम करून घेणार नाही. पण आपलीच पोटची मुलं अशी का वागतात कळत नाही."

" जानकी टाळी एका हाताने वाजत नाही हे सत्य मला त्या दिवशी दातार काकांनी लक्षात आणून दिलं."

" दातार काका म्हणजे आपले व्यवस्थापक?"

जानकीने आश्चर्याने विचारलंं.

" हो.दातार काका मला म्हणाले.
मालतीबाई संसारात जेव्हा वादळ उठतं तेव्हा त्याच्यामागे दोन व्यक्तींचा सहभाग असतो. प्रत्येकाला आपलं वागणं बरोबर वाटतं आणि ते सहाजिकच आहे. आपल्या मराठीत म्हणतात दुस-याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. हे अगदी खरय. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का सोडलं या दु:खात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा त्यात रमायला शिका. हळुहळू तुमच्या दु:खाची बोच कमी होईल.

जानकी सुरवातीला मी यावर विश्वास ठेवला नाही पण मग हळुहळू मला ते जमायला लागलं. आज बघ मी किती हॅपी गो लकी होऊन जगतेय."

मालतीच्या या बोलण्याने जानकी अचंबित झाली.

ती काही बोलणार तेवढ्यात सुखानंदचा सेवक राम आला.
"मालती काकू आपलं विचारमंथन चा वर्ग सुरू झालाय.चलता नं?"

" हो आलोच आम्ही. तू जा."

जानकी आणि मालती विचार मंथन च्या वर्गाला गेल्या.

***
असाच एक नेहमीसारखा दिवस उजाडला. जानकी आता डायरी लिहू लागली होती. जानकीचं डायरी लेखन चालू होतं आणि मालती तिचं काहीतरी काम करत होती तेव्हाच राम आला.

" मालती काकू तुम्हाला भेटायला रामटेके वकील आले आहेत."

" आले का? पाच मिनिटांत मी येतेय सांग त्यांना"
मालती रामला म्हणाली.

" हो सांगतो." म्हणून राम निघून गेला.

जानकी मालतीने आश्चर्याने बघू लागली.
" मालती वकीलाकडे तुझं काय काम आहे?"

" माझ्याबरोबर चल म्हणजे तुला कळेल."

हस-या चेह-याने मालती सुखानंदाच्या ऑफीसमध्ये निघाली. आपल्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न घेऊन जानकी तिच्या मागोमाग ऑफीसमध्ये जायला निघाली.

****

" नमस्कार रामटेके." मालतीने रामटेके वकिलांना नमस्कार केला.

रामटेके वकिलांचा सुखानंद वृद्धाश्रमाशी जुना संबंध असल्याने इथे प्रत्येक स्त्री ला ते ताई म्हणत आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणत.
"हे सगळे वृद्ध मला ताई दादा सारखे आहेत त्यामुळे यांना सर किंवा मॅडम म्हणणार नाही." असं रामटेके वकिलांनी सुखानंद वृद्धाश्रमाशी नातं जोडतानाच जाहीर करून टाकलं होतं.

"नमस्कार ताई. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहलय. तरी एकदा नजरेखालून घाला. काही ॲड करायचं असेल तर करू नसेल करायचं तर मी हे फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो."

" काय हे मालती?"

जानकीच्या या प्रश्नावर मालती हसत म्हणाली,

" माझ्या मुलाला विपूलला घर सोडण्याची नोटीस पाठवतेय."

" काय नोटीस? अगं मालती विपूल तुझा मुलगा आहे त्याला नोटीस का पाठवते?"

" का पाठवू नाही? इथे वृद्धाश्रमात सोडताना त्याने मी त्याची आई आहे हा विचार केला का? नाही नं मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू? इथे मला आणून सोडलं हा त्याने माझ्या मातृत्वाचा, माझ्या कष्टाचा अपमान केला आहे. अपमान करून वर मी कष्टाने बांधलेल्या घरात फुकटात आणि मजेत राहतोय. त्यालाही कळू दे जरा दुनियादारी."

" मालती हे सगळं माझ्या डोक्यावरून जातंय. झेपत नाही मला."

" जानकी आपल्या मराठीत म्हणतात नं समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये."

" पण मालती हे लोकांसाठी आपल्या मुलासाठी नाही."

" मला वृद्धाश्रमात ठेवताना मी त्याची आई नव्हते का? जानकी तू ही चूक केलीस. भावनेच्या भरात सगळं मुलांना देऊन टाकलस. परिणाम काय झाला? मुलाने इथे आणून सोडलं. मुलगी तर हालचालही विचारत नाही. त्यांना तुझी गरज नाही. माझ्याकडून नकळत का होईना अशी चूक झाली नाही. आता ही नकळत झालेली चूक सुधारते आहे."

जानकी अजूनही स्तब्ध होती. मालती वकिलाला म्हणाली,

" रामटेके तो ही नोटीस बघून तयार नाही झाला तर पुढे काय करायचं?"

" एक महिना त्याच्या उत्तराची वाट बघायची. त्याने उत्तर दिलं नाही तर पुन्हा नोटीस पाठवायची. त्या नोटीसमध्ये आणखी कडक भाषा वापरायची. दुस-या नोटीस नंतर तो थांबणार नाही. या दोन नोटीस मध्ये त्याने फोन केला किंवा तुम्हाला भेटायला आला तर काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. कुठल्याही भावनेत न गुंतता त्याला सांगा की माझं म्हणणं काय आहे हे मी नोटीस मध्ये लिहीलं आहे ते समजलं असेल तर तशी कृती कर मला यावर जास्त काही बोलायचं नाही."

" ठीक आहे.असच सांगीन.बाकी लिहीलेलं सगळं योग्य आहे."

" ताई मी लगेच फायनल काॅपी करून पाठवतो. "
मालतीने होकारार्थी मान हलवली. जानकी च्या हे सगळं समजण्या पलीकडचं होतं.ती शांतच होती.

मालतीच्या चेहे-यावर मात्र समाधान होतं.आपल्या या दोन चिमण्या त्यांच्या विचारांच्या आवर्तनात गुंतून गेल्या.दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते.

_________________________________
एवढं मोठं पाऊल मालतीने उचललं.पुढे काय होईल वाचू पुढील भागात.

🎭 Series Post

View all