कशासाठी ? प्रेमासाठी ! ( भाग 1 )

About Love

"चांगला पेपर लिहीण्यासाठी तुला शुभेच्छा बाळा, आज शेवटचा पेपर ना? म्हणजे उदयापासून अभ्यास नाही तुला. मग तुझीही मदत होईल लग्नाच्या तयारीला." असे म्हणतं जुईच्या आईने जुईला आशीर्वाद दिला.

परिक्षेला जाण्यापूर्वी जुई आईचा नेहमी नमस्कार करायची.आजही नेहमीप्रमाणे तिने आईला नमस्कार केला आणि तिने आईला घट्ट मिठी मारली.

तिचे हे वागणे पाहून आईला वाटले, आपण लग्नाचा विषय काढला म्हणून जुई भावनिक झाली की काय? आणि आईनेही तिला मायेने कुरवाळत मिठी मारली व नेहमी सुखात रहा असा आशीर्वाद ही दिला.


पेपर संपल्यानंतर रोज वेळेत घरी येणारी जुई, आज नेहमीप्रमाणे घरी आली नाही, त्यामुळे आईला वाटले की, आज शेवटचा पेपर होता त्यामुळे मैत्रीणींसोबत गप्पा मारत असेल. पण बराच वेळ झाला तरी जुई घरी आली नाही. तिच्या मैत्रीणींच्या घरी फोन करून विचारावे म्हणून फोन नंबर लिहीलेली डायरी पाहण्यासाठी त्या टेबलाजवळ आल्या. तिथे डायरीखाली त्यांना जुईने त्यांच्यासाठी लिहीलेली चिट्ठी मिळाली.ती वाचून तर त्यांना आपल्या पायाखालची जमीन सरकते आहे की काय ? असे झाले. त्यांच्या साठी तो खूप मोठा आघात होता. आपली जुई असे करूच शकत नाही. असे त्यांना वाटत होते. हे जे लिहीलेले आहे ,ते सर्व खोटे आहे. कोणीतरी आपली गंमत करत आहे. असेच त्यांना वाटत होते.

'


आपली जुई आपल्याला असे फसवणार नाही. आता एक महिन्यात तिचे लग्न होते. आणि जुई हर्षल सोबत घर सोडून ,आम्हांला सोडून पळून गेली. माझा व स्वराचाही तिने विचार केला नाही.

आता तिच्या सासरच्या लोकांना काय उत्तर देवू? त्यांचीही लग्नाची तयारी होत आली असेल. इकडे आपली पण सर्व तयारी झाली आहे. हॉल,घोडा,बँड हे सर्व बुक झाले आहेत. भटजींना तारीख सांगितली गेली. जेवणाचे ठरविले गेले. कपडेलत्ते, दागदागिने घेतले गेले. लग्नपत्रिका छापल्या गेल्या. आता फक्त लोकांना द्यायच्या राहिल्या होत्या. बारीकसारीक कामे सोडली तर जवळपास सर्वच तयारी झाली होती आणि या मुलीने असा घोळ घातला,दगा दिला.

घरात एवढी लग्नाची तयारी होत होती. पण जुई एका शब्दानेही काही बोलली नाही. माझे हर्षल वर प्रेम आहे, मी हे लग्न नाही करणार असे काही. सर्व काही बघत होती. हो ला हो मिळवत राहिली. मला वाटले, या लग्नाला ती मनापासून तयार आहे . ती काही तिच्या प्रेमाबद्दल बोलली असती तर काही तरी मार्ग शोधला असता ना! मी ही किती वेडी ना.. मलाही तिच्या मनाचा ठाव घेता आला नाही. मुलगा चांगला, माणसे चांगली आणि घरबसल्या स्थळ आले म्हणून मी ही तिच्या सुखाचा विचार करता तिच्या लग्नाचा विचार केला. तिला ते लग्नानंतर पुढचे शिक्षण करू देणार होते. सर्व काही तर चांगले होते. पण जुईच्या मनात हर्षल होता हे आपल्याला कधी कळलेच नाही.लग्न जवळ आले आणि ही गेली हर्षल सोबत.

आता तर तिच्या लग्नाचे सर्वांना माहित झाले आहे. तिच्या सासरच्या लोकांना, नातेवाईकांना,ओळखीतील लोकांना काय सांगू ? त्यांच्या नजरेला सामोरे जाण्याची हिंमतही नाही माझ्यात.

ते सर्व जे प्रश्न विचारतील त्यांची उत्तरे तर मलाही माहित नाही. तर त्यांना काय उत्तर देणार?मला तर सर्व प्रश्नांची उत्तरे जुईकडूनच हवी आहेत. का केले तिने असे ?'


क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all