फिरूनी नवी जन्मेन मी भाग-5
©®राधिका कुलकर्णी.
सुखदा ठरलेल्या वेळेप्रमाणे आवरून तयार होऊन सुहास यायची वाट पहात होती.
सुहासच्या गाडीचा डबल हॉर्न ही खूण असायची ती खूण पटताच सुखदा आई मी निघते गं म्हणत पायात चप्पल सरकवतच बाहेर पडली.आदि गाडीतुन उतरतच होता.त्याच्या हातात खूप सारी खेळणी खाऊ आणि बलुन्स होते.तो खूप आनंदात ते सगळे गेट मधेच सुखाईला दाखवु लागला तसा तिने त्याचा गोड पापा घेतला आणि म्हणाली,"आत्ता नाही हं पिल्लू मी कामासाठी बाहेर चाललेय ना..आल्यावर बघते.तु आजीकडे जा आणि कपडे बदलुन घे.बाय पिल्लूऽऽ"
आदिने गेट ओलांडून घराच्या आत प्रवेश केल्याची खात्री होताच सुखदा गाडीत येऊन बसली.
एक ओळखीचे स्माईल देत सुहासने गाडी स्टार्ट केली आणि रेडीओवर ऑटोमॅटीक गाणे लागले…….
"ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र
कोई समझा नहीं कोई जाना नहीं…..
है ये कैसी डगर चलते हैं सब मगर
कोई समझा नहीं कोई जाना नहीं…..".
किशोर कुमारच्या दर्दभऱ्या आवाजातली गीताची हर एक ओळ जणु आपल्या करताच लिहीलीय असे वाटुन गेले दोघांनाही.असले फिलॉसफीकल सॅड आत्ता नको म्हणुन सुहासने चॅनल बदलले.तर दुसऱ्या चॅनेल वर ….
"पानी दा रंग वेख के…."
आयुष्यमान खुरानाचे गाणे लागले.
त्याने मनातल्या मनात हसतच कप्पाळावर हात मारून घेतला.सगळीच गाणी जणु सिच्युएशन अजुन गंभीर करण्याचे ठरवुन लावल्यागत लागत होती.
शेवटी त्याने गाणे बदलण्याचा नाद सोडला आणि गाडी 'कॅपिचिनो कॅफे' कडे घेतली.
नुकताच पाऊस पडून गेला होता.
वातावरण मस्त थंड कुंद झालेले.
रस्त्याच्या दुतर्फा लागलेली झाडे पाऊस पिऊन चिंब न्हाऊन नव्हाळीच्या उत्साहात डोलत होती.
एखाद्या करंजाची पिवळी धम्म फूले पाण्याचा सडा टाकुन गाडीवर मधेच जोरात टपकन पडत होती.
जणु हिरव्याकंच्च पिवळ्या किनारीचा भरजरी शालू नेसुन धरीत्री नव्या नवरीचा शृंगार करून सर्वत्र मुक्तहस्ताने आनंदाची जल्लोशाची पखरण करतेय की काय असे वाटावे इतके ते दृश्य मनाला मोहवणारे.
सृष्टीने असा सगळा ल्यायलेला साज मन तृप्त करत होता.
खरे तर नेहमीची सुखदा असती तर ह्या सुंदर रोमँटिक वातावरणात आत्ता पर्यंत कितीतरी बडबड गप्पा मजा-मस्ती केली असती पण आज मात्र ती शांत शांतच होती.
सृष्टी एकीकडे आपल्यातल्या सौंदर्याने मुक्यालाही बोलके करेल इतका आनंद पसरवत होती तर ही मात्र आतुन शष्क कोरडी ...जणु वैराण वाळवंट झालेली.
तिच्यापर्यंत हे निसर्गाचे आल्हाददायक रूप जणु पोहोचतच नव्हते.
सुहासही अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होता की नेमके काय चाललेय हिच्या मनात.काय बोलु इच्छितेय ही आपल्याशी.
कदाचित ज्या विषयावर आपण बोलु पहातोय तोच तर बोलायला ही आपल्याला बाहेर घेऊन आली नसेल ना!!!"
सुहासच्या मनात स्वत:शीच संवाद चाललेले.विचार करेपर्यंत ते कॅपिचिनो कॅफेला पोहोचले देखील.
हा कॅफे म्हणजे सगळ्या तरूणाईंचा आणि ह्यांचा खास अड्डा.
बाकी सगळे स्नॅक्स आयटम्स मिळत असले तरी हे कॅपिचीनो म्हणजे कॉफीच्या प्रकारांसाठी फेमस.
घरापासुन अगदी दोन चार किमी अंतरावर असल्याने अर्थातच सगळ्यांचे फेव्हरीट ठिकाण.
सुहासने संपदाला पहीले प्रपोजही इकडेच केलेले.डालगोना कॉफी आर्चिजचे ग्रिटिंग कार्ड आणि हातात खूप सारे चॉकलेट्स आणि रोजेसचा स्पेशली बनवुन घेतलेला बुके.कोणतीही मुलगी न पटली तरच नवल.अगदी गुडघ्यावर बसुन पद्धतशीर रीति रिवाजा प्रमाणे.
कुठल्याही प्रसंगी मदतीला धावुन येणाऱ्या मित्रासारखाच हा कॅफे…
मग सपुला मनवायचे तरी कॅपिचीनो,तिघांची एखादी सेलिब्रेशन पार्टीही इथेच आणि दोघी बहिणीही चील करायला म्हणुन इकडेच येत असत.इतकेच काय दोघींच्या लग्नानंतरही चौघे मिळुन पहिल्यांदा इथेच भेटलेले.
जणु ह्यांचे दुसरे माहेरच हा कॅफे..
टाईमपाससाठी तर ही अगदी उत्तम जागा…...
तिथे पोहोचताच दोघांनाही सगळ्या जून्या आठवणींनी घेरले.त्यांचा टेबलही ठरलेला असायचा.काचेला लागुन असलेला चार नंबर टेबल.तिथुन बाहेरचे सगळे दृष्य दिसायचे.
कधी दोन प्रेमी युगुलांची भांडणे तर गुलुगुलू गप्पा.कधी एखादा गृप पार्टी करायला आलेला त्यात गृपला लपवुन एक दोघांच्यात चोरून गुपचूप चाललेली नेत्रपल्लवी.हा सगळा बीन पैशाचा तमाशा बघायला मिळणे ही एक पर्वणी असायची त्यात ह्या दोघींचे अॅडिशनल डायलॉगही असायचेच.
"एऽ सपूताई तो ग्रे कलर हाफ पँट बघ ना त्या फुलदाणीकडे कसा बघतोय??"
"तिला कळले ना तर आईऽऽ शप्पथऽऽ त्याची ग्रे कलर पँट रंग बदलणार.."असले पांचट विनोदही करायच्या.
काचे आडुन कॉमेंट्री चालल्याने त्याचा कुणाला त्रास व्हायची शक्यताही नसायची...
ह्या दोन बहिणींना आणखी एक खोड होती.
असे दुरून दोन प्रेमात पडलेले लाडीक कपल बसलेले असेल तर त्यांच्या लिप मुव्हमेंट वरून ते काय बोलत असतील ह्याचा अंदाज घेऊन त्या इकडे ते संवाद आपल्या स्टाईलने ऐकवणार.
अशी सगळी धमाल मस्ती घडवुन त्यांचे आयुष्य समृद्ध केले होते ह्या कॅफेने..
हा कॅफे त्यांच्या सगळ्या भूतकाळातल्या गोड आठवणींचा साक्षीदार होता.
आणि आज आयुष्याच्या अवघड वळणावर जेव्हा काय निर्णय घ्यावा सुचत नाही तेव्हा त्या वाटेवरही हाच मुकपणे एखाद्या वडिलधाऱ्याच्या मायेने सोबत करत होता.
नकळत सुखदाला त्या आठवणींनी डोळ्यात पाणी तरळले.
आयुष्यातली किती उलथापालथ हा रोज बघत असेल नाही…!!
कधी ह्याला वाचा फुटली तर ….??"
आपल्या विचारांनी तिलाच कापरे भरले.विचारांच्या उधळणाऱ्या बेलगाम वारूला आवर घालत डोळ्यातले पाणी हलकेच टिपून ती नेहमीच्याच टेबलवर सवयीने जाऊन बसली.आज लकीली ते टेबलही रिकामे होते. सुहासने काय हवे ते विचारून सगळी ऑर्डर प्लेस करून तो सुखदाच्या समोरची खुर्ची ओढुन बसला.
कॅफेमधे नेहमीप्रमाणेच गर्दी होती.संथपणे कुठल्यातरी इंग्लिश गाण्याची धून मंद आवाजात बॅकग्रांऊंडला वाजत होती.
कुठे कपल्स बसलेले तर कुठे पाच सहा जणांचा गृप चेष्टा मस्करी करण्यात दंग दिसत होते.वातावरण तरूणाईने भारलेले होते.एकंदर सगळा रोमँटिक मामला..
त्यात हे दोघे खरे तर ऑड मॅन आऊटच होते.
म्हणजे हे दोघेही यंगच दिसत होते पण तरीही वय,परिस्थिती आणि गुदरलेल्या प्रसंगांनी वागण्यात येणारी मॅच्युरीटी त्यांना इतरांपासुन वेगळे करत होती.
दोघेही आपल्या आजुबाजुच्या कपल्सचे प्रेमभरे चाळे बघुन उगीचच नजर चोरत होते.
ह्या सगळ्यात पाच एक मिनिटे गेली असतील.
सुखदा आल्यापासुन काहीच बोलत नव्हती.
तिला बोलते करायला मग सुहासनेच पुढाकार घेऊन सुरवात केली,"किती मस्तय ना इथले वातावरण.एकदम युथफूल.इकडे नुसते येऊन बसले ना तरी सगळे ताण तणाव मरगळलेपण क्षणात नाहिसे होते,तुला नाही वाटत असे?"
सुखदाला बोलते करायला म्हणुन सुहासने तसे विचारले त्यावर सुखदाने हम्मऽऽऽ एवढीच प्रतिक्रीया दिली.
आता मात्र सुहासने जरा गंभीर होत विचारले,
"काय झालेय सुखदा?काल पासुन पाहतोय तु खूप तुटकपणे त्रयस्थासारखी वागतीएस.काय झालेय बोलणारेस?"
त्यावर मात्र सुखदाने त्याच्यावर नजर रोखुन विचारले," काय झालेय हे तु मला विचारतोएस तुला माहित नाहीऽऽ?"
सुहास आता मात्र बुचकळ्यात पडला.त्याला तिचा रोख अजुनही नीटसा कळला नव्हता.
"म्हणजे,मी समजलो नाही?"
तेवढ्यात त्यांची ऑर्डर आली.
ग्रील्ड सँडविच सुखदाला आवडतात हे माहित असल्याने न विचारताच त्याने दिलेली ऑर्डर सर्व्ह झाली होती.सोबत कॅपिचीनोचे मग्ज.
आता बोलण्याला जरा विराम देत दोघांनीही सँडविचचा आस्वाद घेतला.
आरामात कॅपिचीनोचे सिप घेत काहीतरी आठवुन तो सुखदाला म्हणाला,"तुला माहितीय सगळ्यात महागडी कॉफी कोणती आहे?"
तीने आश्चर्यानेच विचारले,"नाहीऽ..कोणतीऽऽ?"
त्यावर सुहासने सांगितले,"सगळ्यात महागड्या कॉफीचे नाव आहे 'ब्लॅक आयव्हरी कॉफी' म्हणजे एक मग कॉफी साधारण 3 ते 4 हजार रूपयाला असते.."
सुखदाला एकदम ठसकाच लागला ते एेकुन,"काय!!! इतकी महाग..एवढे काय सोने मिसळलेले असते त्यात?"
तिने उत्सुकतेपोटीच विचारले.
त्यावर सुहास बोलला,"सोने नसले तरी भाव सोन्याइतकाच महाग आहे.त्याचे कारण ऐकशील तर तुही चकीत होशील."
"काय कारण बरे…!"सुखदाही विचारातच पडली.
सुहासने आपल्या सामान्य ज्ञानाची पोतडी लगेच उघडुन दाखवत तिला सांगितले,अगं ह्या कॉफी बनवण्याच्या पद्धतीमुळेच ती अत्यंत महाग बनते.
उत्तरी थायलंड मधे ब्लॅक आयव्हरी कॉफीचे उत्पादन होते.ती बनवण्यासाठी रॉ कॉफी बीन्सला आधी हत्तींना खायला घालतात.त्यांच्या शरीरातील एन्जाईम्स कॉफीतील पुर्ण कडुपणा शोषुन मग विष्ठेद्वारे बाहेर फेकतात.
विष्ठेद्वारे बाहेर फेकलेल्या ह्या कॉफी बीन्सला स्वच्छ करून तिच्यावर पुढील प्रक्रीया केली जाते.अशी ही कॉफी अजिबातच कडू नसते आणि जवळपास 33 किलो कॉफी फळे खायला घातल्यावर फक्त एक किलो कॉफी अॅक्च्युली तयार होऊन मिळते म्हणुन ती इतकी महाग असते..कळले का सुखदा मॅडम.."
"बापरेऽऽ हत्तीच्या विष्ठेतुन...याक्ऽऽ!ऐकुनच कसेतरी झाले..त्यापेक्षा आपली गरीबाचीच कॉफी बरी बाबा.."
त्यावर सुहासही हसुन म्हणाला, "यस...अॅक्च्युअली!"
"आणखी एक माहितीय का तुला!"
सुखदाने कॅपिचीनोचा सिप घेतच प्रश्नार्थक नजरेने विचारले…
"पुर्ण भूतलावर जितके देश आहेत त्यात कॉफी पिणारा अग्रक्रमाचा देश कोणता असेल तर अमेरिका.म्हणजे तिथे एका दिवसाला 400 मिलियन्स कप इतकी कॉफी प्यायली जाते रोज.आहे ना इंटरेस्टींग…!"
सुखदा विस्फारल्या नजरेनेच हे सगळे ऐकत होती.
मनातल्या मनात खूप कौतुक वाटत होते सुहासच्या हुशारीचे.
किती माहिती आहे ह्याला.नुसताच अभ्यासु किडा नाहीये तर इतर अवांतर ज्ञानही कितीय ह्याला.उगाच नाही सपुताईची विकेट पडली ह्याच्यापुढे.मनातच विचार आला आणि पुसटशी हसली ती.
"हॅलोऽऽ..काय. कुठे हरवलीस!!"
सुहासच्या बोलण्याने सुखदा भानावर आली.
"तुला कसे माहिती रे एवढे सगळे?"
"असेचऽऽ.वाचनाच्या सवयीतुन नवनवीन माहिती कुठेतरी वाचायला मिळते आपोआप."
हम्मऽऽऽ…यु राईट!!"
"पुस्तकांसारखा दुसरा चांगला मित्र नाही आणि विशेष म्हणजे हा आपल्याला कधी धोका देत नाही."
वातावरणातला तणाव थोडा कमी झाला होता ह्या संवादाने.तिचाही मुड आता बऱ्यापैकी नॉर्मलवर आला होता तरीही शेवटचे वाक्य टोचणी देऊन गेलेच सुहासला.
सुहासने कितीही शिताफीने विषय बदलायचा प्रयत्न केला असला तरी तिला तिच्या मनातला विषय त्याच्याबरोबर बोलल्या खेरीज चैन पडणार नव्हते.
तिच्या मनात पुन्हा खळबळ माजली कसे विचारू ह्याला???
तिची चलबिचल सुहासला जाणवली.मग गंभीर होत तो बोलला,
"हे बघ सुखदा जे काही मनात असेल ते नि:संकोच बोल.आपली मैत्री इतकी जूनी नक्कीच आहे की तुला माझ्याशी बोलण्यासाठी कोणतीही भूमिका बांधायची गरज नाही.तेव्हा काय असेल ते बोलुन मोकळी हो."
सुखदा-"आहे ना.?.आहे ना आपली मैत्री जूनी.?मग तूला एकदाही मैत्रीच्या नात्याने माझ्याशी बोलावे नाही वाटले?का?का केलेस असे सुहास?"
बोलताना पाणी तरळले तिच्या डोळ्यात.
आपल्या रूमालानेच तिने ते हलकेच टिपले.
"अगं तुु नेमके कशाबद्दल बोलतीएस कळेल का मला."
सुहास अजुनही क्लुलेस.
"अरे सुहासऽऽ तुला काय स्मृतिभ्रंश झालाय का?मी कोणत्या विषयाबद्दल बोलतेय हे खरच तुला कळत नाहीये की तु समजत नसल्याचे नाटक करतोएस?"
सुखदा वैतागुनच बोलत होती.
तिचा त्रागा बघुन सुहासने जरा विचार केला आणि त्याला मागच्या आठवड्यातला आई बरोबरचा संवाद आठवला.ते एकमेव कारण असु शकणार होते सुखदाच्या चिडण्यामागचे.
तरीही तिच्याकडुनच जाणुन घेण्यासाठी तो बोलला, " तु नेमके कशा संदर्भात बोलतीएस नीट सांग.मला असे काहीच कळत नाहीये."
त्यावर इकडे तिकडे बघत आपल्या आवाजावर शक्य तितका कंट्रोल ठेवत पण चिडुन सुखदा बोलली,"आता मी स्पष्टच बोलते….मला सांग वेणूताईच्या प्रस्तावावर तु होकार दिलास?"
"हम्म….ऽऽऽ..होऽऽ."
"अरे मग मी तेच विचारतेय,तु का केलेस असे?आणि मुळात तुला मैत्रीच्या नात्याने हे जाणुन घ्यावे नाही वाटले की मी तयार आहे की नाही?"
"आधी माझ्याशी बोलुन मग ठरवावे असे नाही वाटले तूला?परस्पर होकार देऊन मोकळा झालास..काय समजतोस रे तु स्वत:ला?"
आणि मुळात हे ठरवले कोणी हे मला आधी कळु दे.मग पुढच्या गोष्टी…"
"तुला हे कोणी सांगीतले आधी सांग?"
सुहासने तिचे बोलणे शांतपणे ऐकुन घेतले.
नीटपणे विचार केला आणि मग बोलायला सुरवात केली……
" हे बघ सुखदा तु गैरसमज करून घेतलाएस.मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये.मी फक्त आईने माझ्यापुढे एक विषय ठेवला आणि त्यावर विचार करून माझे मत कळवले.आणि हेही सांगीतले की जोपर्यंत सुखदा बरोबर हा विषय मी बोलत नाही आणि तिचे मत कळत नाही तोपर्यंत ह्याबाबतीत कुठलाही निर्णय होणार नाही."
"तुला विश्वास नसेल तर आत्ता आपण आईशी बोलुन ह्याची शाहनिशा करू शकतो.बोल लावू का फोन?"
विचारता विचारताच सुहासने फोन हातात घेऊन आई म्हणजेच वेणूताईंचा नंबर डिरेक्टरीतुन ओपन केलाही.
त्यावर सुखदा घाईने त्याला थांबवत म्हणाली,"नको त्याची काही गरज नाहीये.मला माहीतीय हे सगळे.पण माझा मुळातला प्रश्न वेगळाच आहे.तुला समजतेय का मी नेमके काय बोलतेय?"
"हंऽऽऽ बोल...मी ऐकतोय."
अरे तु म्हणतोस की हा विषय तु सुरू केला नाही, मीही केलेला नाही मग आपल्या लग्नाचा प्रश्न नेमका आला कुठुन?"
"खरच गं...हा विचार तर मी ही केला नाही.."
अच्छा म्हणजे तुला ह्या बाबतीत बोलायचे होते होय.बापरे!! मला किती दडपण आलेले. आता तु काय बोलणार न् काय नाही. जाम टेंशन आलेले.बाकी टेंशन देण्यात दोघी बहिणी सारख्याच हं तुम्ही.."
"युऽऽऽ...थांब तुला बघतेच.."
क्षणभरा करता सुहासवरचा सगळा राग विसरून प्रतिक्षिप्त क्रियेतच तिने सुहासला चापट मारण्याची अॅक्शन केली.हे असे सगळे चिडवाचीडवी मस्करी त्यांच्यात आधी फार चालायची.आत्ता थोड्यावेळ करता का होईना ती पुन्हा त्या काळात जाऊन आली.
सुखदाला नॉर्मल करण्याकरता तेवढ्या गंभीर डिस्कशन मधेही सुहासने विनोद साधुन वातावरण थोडे सहज करण्याचा प्रयत्न केला.
त्याचा प्रयत्न सफल झाला हे सुखदाच्या वागण्यातुन दिसतच होते.
आता सुखदा वरमली.पुन्हा ती गंभीर झाली.
त्यावर सुहासने मनाची तयारी केली आणि आजच ह्या विषयाचा द एंड निदान त्याच्या बाजुने तरी करायचा निश्चय केला," हे बघ सुखदा तुला एक सांगु….हा विषय 'कोणी' काढला ह्यापेक्षाही जास्त महत्त्व मी ह्याला दिले की 'का' काढला.
आणि 'का' चा विचार केला तेव्हा लक्षात आले त्यामागेही आपल्याच कोणाची तरी आपल्याप्रती असलेली काळजी आणि तळमळच आहे. आपले/मुलांचे भले व्हावे ही कळकळ दिसली मला.
किमान माझा एवढा तरी मुद्दा तुला पटतोय का ते सांग आधी..?"
सुहासचा मुद्दा अगदीच न पटण्यासारखा नव्हता त्यामुळे तिने मानेनेच होकार भरला.
त्यावर समाधानाने तो तिच्या पुढच्या मुद्दयाबद्दल बोलु लागला,"आता तुझा दुसरा मुद्दा की मी डायरेक्ट होकार कसा काय दिला तर त्याचे कारण आदि.आदिने मदत केली मला इनडायरेक्टली ह्या निर्णया पर्यंत पोहोचण्यासाठी."
एेकुन सुखदाला धक्काच बसला.
"काय? आदिऽऽऽ!! त्याने कशी मदत केली सांगु शकशील?साऊंड्स क्वाईट इन्टरेस्टींग,राईट!!"
तिचे ते सरकास्टीक स्टेटमेंट सुहासलाही चांगलेच लागले.
"होऽऽ तेच सांगतोय.मला कम्प्लिट तर करू दे माझे बोलणे."
"मधे मधे बोललीस तर काय सांगणार?"
सुखदाही वरमली त्याच्या बोलण्यावर..
"अॅम सॉरी!ठिक आहे,बोलऽऽ"
"हम्मऽऽऽ..! दॅट्स लाईक अ गुड गर्ल..!"
"तर त्याचे असे झाले मागच्या सोमवारी तुझा उशीरा फोन आला आठवतेय.त्याच्या दहा मिनिट आधीच आई माझ्याशी (त्या वीकमधे जवळपास सहाव्यांदा) हा विषय बोलायला येऊन गेली होती.आमचे बोलणे झाले आणि आदिकरता तुझा फोन झाला.आदि रागावला होता मी आलो नाही म्हणुन,प्रॉमिस करून त्यांना वॉटरपार्कला नेले नाही असे सगळे बोलणे चाललेले.
पण त्या सगळ्या कॉनव्हर्सेशन मधे एक गोष्ट जी मी प्रकर्शाने मार्क केली ती ही की तो तुला
'द बेस्ट' समजतो.कारण तु त्याच्या प्रत्येक गरजा पुर्ण करतेस ज्या खरे तर वडिल म्हणुन मी करायला हव्यात आणि मग विचार केला की खरच मुलांच्या आयुष्यात तु नसतीस तर त्यांचे काय झाले असते?आई गेल्यावरही त्यांना तु आईची कमी जाणवू दिली नाहीस म्हणुन ते दोघेही इतके आनंदात आहेत आणि मीही थोडा रिलॅक्स होऊन माझ्या कामावर फोकस करू शकतोय कारण मुलांची सगळी जवाबदारी तु त्यांची आई बनुन पुर्ण करते आहेस.
मग मुलांनीच जर ते पद तुला त्यांच्या आयुष्यात ऑलरेडी बहाल केलेय तर मी नाही म्हणणारा कोण आहे!!
मी त्या रात्री हाच सगळा विचार करून आईला माझा होकार कळवला.
आणि जे आईला सांगितले तेच मी तुलाही बोलुन सांगायचे ठरवलेच होते पण त्याआधीच तु हा विषय काढलास म्हणुन आता सांगतोय.
"हे बघऽऽ मी जरी हो म्हणालो असलो तरी तुझा निर्णय तु घेऊ शकतेस.तुला कुणाचेही बंधन किंवा प्रेशर घ्यायची गरज नाही.मी फक्त मुलांसाठीचा योग्य पर्याय म्हणुन ह्या नात्याकडे बघितले बाकी मला तुझे सगळे विचार माहित आहेत.ते मी मुळीच विसरलेलो नाहिये & I respect your thoughts विश्वास ठेव.
जरी उद्या भविष्यात तु होकार दिलास तरी आपले नाते हे फक्त चांगले मित्र असेच राहील believe me..
बसऽऽऽ मला इतकेच सांगायचे होते.
मला वाटते तुझ्या सगळ्या शंकांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत.आता तु स्वतंत्र आहेस तुझा निर्णय घ्यायला आणि कोणताही निर्णय घेतलास तरी हा मित्र कायम त्यात तुझ्या सोबत राहील…This is gentleman's promise..."
किंचित स्माईल देत सुहासने आपले बोलणे संपवले.
दोन मिनीट पुर्ण शांतता झाली.
सुखदा ऐकुन पुर्ण शांत झाली होती.तिच्या मनातली सगळी वादळे सुहासच्या बोलण्याने शमली होती.प्रश्न संपले होते म्हणजे आता राग करायला कारणही उरले नव्हते पण आता तिला सुहासबद्दल उगीचच गैरसमज करून घेतल्याची बोचणी लागली होती.त्यामुळेच ती शांत बसली होती.कॉफीही एव्हाना संपली होती.बराच वेळ झाला असावा कारण आसपासची गर्दी कमी झाली होती.
सुहासनेच भानावर येत विचारले,
"चल निघायचे,खूप उशीर झालाय,आई बाबा वाट पहात असतील तुझी.."
सुहासच्या बोलण्याने तीही भानावर आली.
दोघेही तिथुन बाहेर पडले.
गाडीतही ती शांतच होती.पण ही शांतता तृप्ततेची होती.मनातली सगळी वादळे शमल्यानंतरची शांतता होती.
पुन्हा रेडीओ मिर्चीवर गाणे वाजायला लागले
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
हर फिक्र को धुँवे मे उडाता चला गया……"
सुखदाने हलकेच स्मित करून सुहासकडे बघितले.सुहासही तिच्याकडे सुचक नजरेने किंचितसे हसला.
दोघांचीही परिस्थिती सध्या त्या गाण्यासारखीच होती.
"Both were sailing in the same boat…….!!"
-----------------------(क्रमश:5)----------------------------
क्रमश: -5
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार वाचक मित्र/मैत्रिणींनो.
कसा वाटला भाग पाच?
कथा आवडतेय का?
सुखदाच्या सर्व शंकांचे निरसन तर झाले पण तरीही ती काय निर्णय घेईल ?
लग्न न करताही ती मुलांची आईच झालीय मग लग्न करण्याची खरच गरज काय आहे??
हे सगळे विचार मनात घेऊन सुखदा काय ठरवेल?
काय वाटते तुम्हाला हे कमेंट्स मधे जरूर कळवा आणि पुढे काय घडणार
हे जाणुन घ्यायचे असेल तर *फिरूनी नवी जन्मेन मी* चे पुढचे सर्व भाग नक्की वाचा..
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.परंतु साहित्याची कृपया चोरी करू नये.साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे आणि असे करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते तेव्हा लेखिकेच्या नावासहीत कथा शेअर/पोस्ट करा.)
धन्यवाद.
@राधिका कुलकर्णी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा