फिरूनी नवी जन्मेन मी- 1
©®राधिका कुलकर्णी.
"जीजा जेव बघु पटकन.तुला चीऊताईची गोष्ट ऐकायचीय नाऽऽ.मग पटपट खा."
सुखदा दीड वर्षाच्या जीजाला घास भरवता भरवता बोलत होती.
"सुखाई मला हा मॅथ्स प्रॉब्लेम समजत नाहीये गं.तु शिकव नांऽऽऽ."
बाजुलाच अभ्यास करत बसलेला सहा वर्षाचा आदि सुखदाच्या मागे लागला होता.
एकाचवेळी ती जीजाला जेवु घालत होती आणि आदिचा (म्हणजेच आदित्य लाडाने त्याला सगळे आदिच म्हणत असत) होमवर्कही घेत होती.
"झाले की नाही मंमं जीजाबाईंचे..?"
नलिनीताईंनी हॉलमधे येत लहानग्या जीजाकडे मिश्कीलपणे बघतच सुखदाला विचारले.
"छे गंऽऽ आईऽऽ,आज फारच चेंगटपणा चाललाय जीजाचा."
"आजी भरवु दे का आज जीजाला?"
जीजाला कुरवाळतच नलिनीताईंनी विचारले.
"अगं नाही, झालेय,हा शेवटचाच घास होता."
"आई जरा तिचे तोंड धुवून दे ना,मी आदित्यकडे बघते."
जीजाचे तोंड धुणे उरकुन नलिनीताई पुन्हा सुखदा जवळ येऊन बसल्या.
"मग काय ठरवलेस तु वेणुताईंच्या प्रस्तावाबद्दल?" नलिनीताईंनी सुखदाला प्रश्न केला.
"आई मला जरा विचार तर करू दे.घाईत घेण्याइतका सहज आहे का हा विषय?"
सुखदाने जरा नाराजीतच उत्तर दिले.
"अगं चार पाच दिवस झाले फोन होऊन.त्या विहिणबाई आहेत ह्या घरच्या,असे किती दिवस ताटकळत ठेवणार त्यांना?बरे दिसत नाही गं पोरी."
"काय ते नक्की ठरव बाई आता."
तिकडून निघता निघताच त्या बोलल्या आणि आपल्या खोलीकडे गेल्या.
नलिनीताई म्हणजे सुखदाची आई.
सुखदा मूळ्ये कॉलेजमधे मॅथमॅटीक्सची प्रोफेसर.
सुखदा, संपदा आई नलिनी आणि बाबा रणजित असे हे चौकोनी मध्यमवर्गीय सुखी कुटूंब.
संपदा मोठी तर सुखदा धाकटी मुलगी.दोघीही दिसायला सुंदर अभ्यासात हुशार आणि स्वभावाने लाघवी.
संपदाने इंजिनियरींग पूर्ण करून एमबीए फायनान्स करून आता एका आयटी फर्ममधे फायनांशियल कल्संटंट म्हणुन नौकरी करत होती.
एमबीए करत असतानाच सुहास मुजूमदारशी एका सेमिनार लेक्चरच्या निमित्ताने भेट झाली.
मग औपचारिक भेटीतुन ओळख/मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले त्यांचे त्यांनाच कळले नाही.
सुहास हुशार,स्मार्ट,दिसायला एकदम रूबाबदार,
घारे डोळे,तरतरीत नाक,हसतमूख चेहरा,भव्य कपाळ आणि हुशारीचे चेहऱ्यावर विलसणारे विलक्षण तेज.एकदम नजरेत भरावे असे व्यक्तिमत्व.
त्यांच्या दोघांचे बरेचसे गूण अगदी मिळतेजुळते त्यामुळे ह्या नात्याला लग्नगाठीत परिवर्तीत करण्याची ईच्छा दोघांच्याही मनाने घेतली.
वर्ष संपताच दोघांनाही चांगल्या नौकऱ्या लागल्या तसे त्यांनी आपापल्या घरी लग्नाबद्दल कळवले.
दोन्ही कुटूंब विचारांनी सुशिक्षित असल्याने सर्वांच्या संमत्तीने सुहास-संपदाचे लग्न थाटात पार पडले.
इकडे सुखदानेही आपले एमएससी मॅथ्स डिस्टिंक्शनमधे पास केले आणि नामांकित पोतदार कॉलेजला प्रोफेसरची नौकरी जॉईन केली.
सुखदा नावाप्रमाणेच सुख वाटणारी हसरी,गोड मुलगी.कॉलेजमधे शिकत असतानाच एका हौशी नाटक गृपमधुन प्रिन्सची ओळख झाली.प्रिन्स दिसायला देखणा मुलगा,नेहमी उंची कपडे महागड्या गााड्यातुन फिरणारा सुखवस्तु मुलगा.हळुहळु दोघांच्यातही काही धागे जुळले.प्रिन्स सतत सुखदाच्या मागेच असायचा.तिला कॉलेजमधुन पिकअप करणे सोडणे हे तो खूप आवडीने करायचा.खरे पाहता त्यांच्या कोणत्याच आवडी समान नसुनही त्याची आपली काळजी घेणे खूप आवडायचे सुखदाला त्यामुळेच खूप कमी काळातच हे नाते खूप घट्ट झाले होते.प्रिन्सची स्वत:ची कसलीतरी कन्सलट्नसी फर्म होती.म्हणजे थोडक्यात कमावता होता.आता दोघांनाही एकमेकांशी लग्न करावेसे वाटु लागले.वरकरणी पाहता नाही म्हणण्याजोगे वावगे असे काहीच नसल्याने आई वडिलांनीही लगेच परवानगी देऊन यथावकाश सुखादाही आपल्या संसारात मार्गी लागली.
इकडे संपदा सुहासच्या संसार वेलीवरही दोन चिमुकली फूले उमलली.मोठा आदित्य आणि लहानगी छकुली जीजा.
संपदाच्या लग्नाला सात आठ वर्ष होत होती.
पण सर्वकाही सुरळीत चालले तर ते आयुष्य कसले..?????
सुखदाच्या आयुष्यात तिच्या जीवनाला कलाटणी देणारी एक भयानक गोष्ट घडली.लग्न होऊन काही महिनेच झाले परंतु तिला प्रिन्सच्या वागण्यात चमत्कारीकपणा जाणवायचा.
तसे बघता लव्ह मॅरेज म्हणल्यावर लग्नानंतरचे दिवस किती रोमांचक असायला हवे होते पण कित्येकदा ऐन बहरात असताना अचानक तो सुखदा पासुन दूर व्हायचा.तिची खूप तडफड व्हायची पण तिला कोणाला सांगताही येत नसे ह्याबद्दल.
कित्येकदा तिने प्रिन्सला ह्याबाबत विचारले तर तो काहीतरी उत्तर देऊन तिचे तोंड गप्प करत असे.
एकदा कॉलेजला निघतानाच यायला उशीर होईल असे सांगुन ती घराबाहेर पडली पण कॉलेजला गेल्यावर अचानक डोकं खूप दुखायला लागले म्हणुन सेमिनार मिट सोडुन ती तडक घरी पोहोचली.
दार किलकिले उघडे बघुन तिला आश्चर्यच वाटले.बेडरूमचा दरवाजाही आतुन बंद.
ती हळुच आवाज न करता दरवाजाचा कानोसा घेऊ लागली तर आतुन दोन व्यक्ति हळु आवाजात काहीतरी बोलताहेत असे तिला जाणवले.
ह्यावेळी मेन डोअर उघडे ठेवुन प्रिन्स बेडरूममधे काय करतोय तेही दार लावुन???
तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
आवाज न करता किचनच्या मागच्या गॅलरीतुन ती बेडरूमच्या खिडकीपाशी गेली.ही खिडकी मागच्या बाजुने असल्याने सहसा तिकडे कोणी फिरकत नसायचे.हवा यायला म्हणुन ही खिडकी उघडीच ठेवलेली असायची फक्त पडदा लावलेला असायचा.
तिने हळूच फटीतुन पडदा थोडा बाजुला करून आत डोकावुन बघितले आणि आत जे दृश्य दिसले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.तिला मळमळुन ओकारी येतेय की काय असे वाटू लागले.
तरीही मनावर ताबा ठेवत ती पुन्हा हॉलमधे आली आणि तिने प्रिन्सला फोन लावला.प्रिन्सने घाईनेच फोन उचलला.
"हाय बेबीऽऽ कशीएस?आत्ता ह्यावेळी फोन कसा केलास?" प्रिन्सने विचारले.
त्यावर सुखदानेही तितकेच संयमित उत्तर दिले, "काही नाही रे सहज.तुझी आठवण आली,कुठेस तु आत्ता?"
"मी कुठे असणार ऑफिसला.."
"काय करतोएस? "
अगं एका क्लाएंट बरोबर मिटिंगमधे आहे.तु बोल ना."
किती धादांत खोटं बोलत होता प्रिन्स.सुखदाचा पारा चढला होता पण तरीही तिने संयमाने स्वत:ला सावरत शक्य तितक्या नॉर्मल टोनमधे बोलली, "अरे काही नाहीऽऽ अचानक डोके खूप दुखायला लागले म्हणुन मी घरी यायला निघालेय म्हणुन फोन केला की तु कुठेस."
ती घरी येतेय ऐकताच प्रिन्स सटपटला.तो लगेच बोलला, "बेबी तुझे डोके दुखतेय ना मग तु ड्राईव्ह करत येऊ नकोस.तु कॉलेजलाच थांब गेटजवळ मी पाच मि.त घ्यायला येतो तूला."
त्याचे गोडवे ऐकुन तर तिच्या मस्तकाची शीर तटतट उडायला लागली पण धीर धरून ती पुन्हा बोलली ,"अरे तु आलास तर मग माझी गाडी कोण आणणार ?"
"आणि मी कधीच निघालेय आता सेल्लारला पोहोचले पण.हे काय गाडीच पार्क करतेय,आलेचऽऽ."
तिचे आलेच शब्द ऐकुन त्याचे धाबेच दणाणले.अचानक बेडरूममधे गडबड हालचाल जाणवली.बेडरूमचे दार उघडल्याचा आवाज आला. प्रिन्स निर्वस्त्रावस्थेत बेडरूमच्या बाहेर आला पाठोपाठ आणखी एक मध्यम वयाचा तरूणही रूमबाहेर आला.
समोर अचानकपणे सुखदाला पाहुन प्रिन्सचा चेहरा पांढराफटक पडला.त्याला काय बोलावे हेच सुचेना.
तो विचित्र अवस्थेत सुखदासमोर उघडा पडला होता.तो दुसरा तरूण घाईघाईतच आपले कपडे सावरत त्यांच्या घराबाहेर पडला.
तो जाताच सुखदाने आत्तापर्यंत राखलेला संयम सोडला आणि रागातच प्रिन्सची कॉलर पकडून विचारले,"हा सगळा काय प्रकार आहे प्रिन्स?मी आज जे पाहिले ते काय होते?"
"आता बोलऽऽ,नाहितर मी काय करेन माझे मलाच माहित नाही."
सुखदा रागाने थरथरत होती.तिची प्रचंड मोठी फसवणूक झाली होती आणि तेही तिने ज्याच्यावर मनापासुन प्रेम केले त्याच व्यक्तीकडून.तिला काहीच समजत नव्हते. प्रिन्सचे एक वेगळेच किळसवाणे रूप तिच्यासमोर आले होते.तिची तर मतीच सुन्न झाली होती.
ती प्रश्नार्थक नजरेनेच प्रिन्सकडे रोखुन बघत होती.तिच्या डोळ्यात रक्त उतरले होते.
प्रिन्स घाबरून थरथरा कापत होता सुखदा समोर.
त्याची मान शरमेने खाली झुकली होती.
सुखदाने पुन्हा त्याला दरडावुन विचारले तेव्हा घाबरत घाबरतच तो बोलता झाला,
"बेबी!!"
बेबी शब्द ऐकताच सुखदा जोरात ओरडली,"स्टॉप कॉलिंग मी बेबीऽऽ.!"
"अॅम नो मोअर युवर बेबी.."
"यु हॅव्ह चिटेड मी आॅन युवर पार्ट.आय वील नेव्हर फरगीव्ह यु ओकेऽऽऽ??"
आय वील स्यु यु इन कोर्ट,यु अंडरस्टँड यु बा××××र्ड???"
"नाऊ स्पिक अप दॅट फ्ऽऽक."
ती चवताळुन किंचाळुन आपला राग ओकत होती.
अखेरीस प्रिन्सने त..त..प..प.करतच त्याच्या जीवनाचे ते कटू सत्य तिच्यासमोर कबूल केले जे त्याला कित्येक वर्ष सांगायचे धाडस होत नव्हते.
त्याला सुखदा आवडत होती तरीही त्याचे आकर्षण पुरूषांकडेही होते.
तो 'बायसेक्च्युअल' होता.
म्हणुनच कित्येक रात्री ऐन रंगात तो तिला अर्ध्यातच सोडुन दूर व्हायचा.
पतिसुखाचा पुर्ण आनंद तो देऊ शकत नसे.
"प्रिन्स तुला जर हे माहित होते तर तू माझा बळी का दिलास लग्न करून??"
"अॅम सॉरी डार्लिंग! बट आय रिअली लव्ह यु"
"सॉरीऽऽ माय फूट..!"
"मी आत्ताच्या आत्ता हे घर आणि तूला सोडून कायमचे जात आहे."
"आय वॉन्ट डिव्होर्स फ्रॉम युऽऽ...बायऽऽऽ."
भराभर हाताला येईल ते कपडे बॅगेत कोंबुन सुखदाने ते घर सोडले आणि माहेरी आली.
अशा अवेळी अचानक सुखदाला भल्या मोठ्या बॅगेसहीत घरी आलेली पाहुन आई बाबांना समजुन चुकले की दोघांचे काहितरी बिनसले असणार.रडुन सुजलेले डोळे आणि संतापलेला तिचा तो अवतार बघुन दोघेही खूप काळजीत पडले.
कुणाशी काहिही न बोलता सुखदा आपल्या बेडरूममधे गेली आणि दरवाजा धाडकन लावुन घेतला.
दोघांनाही खूप चिंता वाटायला लागली.
नलिनीताईंनी हळुच दरवाजा वाजवुन तिला बोलते करायचा प्रयत्न सुरू केला.
"सुखदा बेटाऽऽ काय झाले?अशी अचानक का आलीस तू?"
"दोघांचे काही भांडण झालेय का?"
"काहीतरी तर बोल बाळा.असा आमचा जीव टांगणीला नको गं लावुस.?"
"दार उघड बघु आधी."
त्यांच्या सततच्या विनवण्याने सुखदाने दार उघडले.नलिनीताई तिच्या जवळ जाऊन हलकेच तिच्या केसांवर हात फिरवुन म्हणाल्या," काय झाले बाळा?"
"जावईबापुंशी काही…… ?"
सुखदाने आईचे वाक्य पुरे व्हायच्या आधीच ते तोडत रागाने बोलली, "नाव काढू नकोस त्या नीच हलकट माणसाचे.किळस येतेय मला त्याची."
आईच्या आश्चर्याला पारावार उरला नाही.
ज्याचे कौतूक गाता सुखदाची जीभ थकत नव्हती,ज्याच्याबरोबर स्वखुशीने लग्न करण्याचा निर्णय घेतलेली सुखदा आज त्याच नवऱ्याला इतक्या अर्वाच्य शब्दात शीव्यांची लाखोली वहात होती.
तरीही समजावणीच्या सूरात नलिनीताई बोलल्या," अगं असे बोलु नये बाळाऽऽ.भांडणे कुणात होत नाहीत पण म्हणुन काय असे बोलतात का नवऱ्याला."
"आईऽऽ प्लिजऽऽ.तु जा ना इथुन. मला एकटे सोड थोड्यावेळ."
"बरं बाईऽऽऽ जाते.पण दाराला कडी बिडी लावु नकोस."
"संध्याकाळी प्रिन्सला इकडेच जेवायला बोलवु.काय असेल तो इकडेच साक्षमोक्ष लावू.मग दोघे सोबतच घरी जाऽ."
रूमबाहेर जाताजाताच नलिनीताईंचे शेवटचे वाक्य कानावर पडताच सुखदा बेडवरून ताडकन उठुन बसली.
"आईऽऽ..अाऽऽईऽऽ आधी इकडे ये.आणि येताना बाबांनाही बोलाव."
नलिनीताईंनी चमकुन सुखदाकडे पाहिले.
तिच्या चेहऱ्यावर कसला तरी निर्धार दिसत होता.
थोड्याच वेळात नलिनीताई आणि रणजितराव सुखदाच्या जवळ येऊन बसले.
बराच वेळ खोलीत भयाण शांतता होती.आई बाबा दोघेही सुखदा कधी बोलतेय ह्याची वाट पहात प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत होते.
ज्या प्रकारचा सुखदाचा स्वभाव होता ते पाहता ती कुठल्याही छोट्या मोठ्या कारणांनी भांडुन माहेरी येणाऱ्यातली मुळीच नव्हती पण मग कारण काय ह्याचा त्यांना अंदाज लागत नव्हता.खोलीतली ती शांतता त्यांना अस्वस्थ करत होती.
शेवटी सुखदाने आपले मौन सोडले आणि बोलायला सुरवात केली,"आई बाबा मी आता काय सांगतेय ते नीट लक्षपुर्वक ऐका.."
"आई मी प्रिन्स पासुन डिव्होर्स घ्यायचे ठरवलेय.आणि मी ते घर कायमचे सोडुन आलेय.आता मी कायमची इकडेच राहणार तुमच्या सोबत."
सुखदाची ती निग्रहाची वाक्ये ऐकुन दोघेही स्तब्द्ध झाले.काय बोलावे त्यांना काहीच सुचेना.
जे काही बोलली तेही अर्धवटच,नीटपणे सगळे सांगीतलेच नव्हते त्यामुळे तिने एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे त्यांच्यासाठी अजुनही कोडेच होते.
मग बाबाच धीर करून बोलले,"हे बघ बेटा हे घरही तुझेच आहे.तुला हवे तितके दिवस तु राहू शकतेस.पण इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला कारणही तसेच असावे लागते ना?"काय झालेय नीट सांगशील का आम्हाला?"
आता सुखदाचा धीर सुटला आणि आईच्या पोटात शिरून ती हुंदके देत रडू लागली.
तिला असे रडताना बघुन नलिनीताईंचे काळीज पिळवटले.
अग काय झाले राणी?नीटपणे काही सांगणारेस का.?केव्हाची फक्त रडते आहेस?"
आई वडिलांचे दिनवाणे चेहरे बघुन तिने धीर एकवटून प्रिन्सच्या आयुष्याचे किळसवाणे सत्य दोघांनाही सांगीतले.
"माझे नशिबच फुटके!!!"
सुखदा अजुनही रडत आपल्या नशिबाला दोष देत होती.
आई-वडील हा काय प्रकार आहे हाच विचार करत होते.त्यांच्यासाठी एक धक्कादायक प्रकार होता हा.
जगात असेही काही असते हेच त्यांना माहित नव्हते आणि आज आपल्याच मुलीच्या वाट्याला हे दु:ख यावे ह्याहुन दुर्दैव ते काय होते त्यांच्यासाठी.
तो विषय पचवणे त्यांनाच जड जात होते तर मुलीची काय समजूत काढणार होते ते.
त्यांच्यासाठीही हा खूप मोठा आघात होता.
अखेरीस दोघांच्या म्युच्युअल कसेंट्सनी सहा महिन्यातच प्रिन्स पासुन सुखदाला डिव्होर्स मिळाला.तसेही सुखदा आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने व कोणतीही अॅलिमनी
क्लेम केलेली नसल्याने लवकरच ते विभक्त झाले.
पण ह्या एका प्रसंगामुळे एके काळची हसरी खेळकर सुखदा अतिशय रूक्ष कोरडी होऊन गेली.
वरकरणी खूप शांत दिसत असली तरी आतुन खूप तुटलेली होती.त्यातुन सावरायला तिला वेळ तर लागणारच होता.
काळ हे सगळ्या दु:खावर जालिम उपाय असतो म्हणतात ते काही खोटं नव्हते.जसजसे दिवस पूढे जात होते सुखदाही स्थीर होत होती.पुन्हा पुर्ववत होण्याकडे तिची वाटचाल सुरू झाली होती.तिला फावल्या वेळेत काय करावे हा विचार करता तिच्या नृत्यकलेला पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत झाली.
एक क्षणभरही ती स्वत:ला रिकामे ठेवत नसे कारण "Empty mind devil's workshop" ह्या म्हणीप्रमाणे आपल्या मनात नको नको ते विचार येऊच नयेत म्हणुन ती स्वत:ला वेगवेगळ्या गोष्टीत अडकवुन घेऊ लागली.
त्यातच तिला कळले की एका नाईटस्कूल करता गणित शिक्षकाची गरज आहे.तिने लगेच स्वत:हून विनामुल्य ते काम करायची तयारी दर्शवली.आता तिचा बराचसा वेळ कॉलेज,डान्सक्लास,स्विमिंग आणि नाईटस्कूल मधे व्यतित होऊ लागला.
मनाच्या भळभळणाऱ्या जखमेवर काळाची मलमपट्टी होऊन आयुष्य पून्हा पुर्वपदावर येतेय असे वाटत असतानाचा काळाने पुन्हा दोन्ही घरावर दुसरा घाला घातला.
नेहमी प्रमाणे ऑफीस संपुन संपदा घराकडे येत असताना हायवे वर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने संपदाच्या गाडीला जोरदार धडक दिली.ती गाडीसहित कोलमडून विरूद्ध दिशेला जाऊन पडली.रक्ताच्या थारोळ्यात संपदा निपचित पडली होती.अपघात इतका भयंकर होता की तिच्या वाचण्याची शक्यता दुर्मिळच होती.आजुबाजुच्या लोकांनी तिला जवळच्याच हॉस्पिटलला अॅडमीट केले.पोलिसांनी तिच्या घरी कळवल्याबरोबर सगळेच धावतपळत सिटी हॉस्पीटलला पोहोचले.तिला अतिदक्षता विभागात ठेवले होते.तिची शुद्ध हरपली होती.रक्तस्राव खूप जास्त झाल्याने डॉक्टरांनीही तिची गॅरेंटी नाही हि कल्पना देऊन टाकली घरच्यांना.दोन्ही घरावर भय आणि दु:खाचे सावट पसरले.सुहासची तर सैरभैर स्थिती झाली होती.वेणुताई म्हणजेच सुहासच्या आई मुलांना घेऊन घरीच देव पाण्यात घालुन महामृत्युंजयाचा जप करत होत्या.डोळ्यातुन पाण्याचा अभिषेक चाललेला.
अखेरीस जे व्हायची भीती वाटत होती तिच बातमी डॉक्टरांनी दिली.
आपल्या दोन लहानग्या चिमुकल्यांना अर्ध्यावर सोडून संपदाने ह्या जगाचा निरोप घेतला.
सुहासला तर आभाळ फाटल्यागत झाले.कोणी कुणाला सावरावे असे झालेले.तिची अशी अचानक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावुन गेली.
मुलांना तर काय झालेय हेही समजायचे वय नव्हते.
सर्व दिवसपाणी पार पडल्यावर काही दिवस नलिनीताई दोन्ही मुलांना घेऊन आपल्या घरी आल्या.
दोन्ही मुलांच्या संगोपनाची जवाबदारी आपसुकच सुखदावर येऊन पडली.तीही त्यांची मनापासुन काळजी घेऊ लागली.तिची मुलांची हौस ह्या मार्गाने नकळतपणे पूरी होत होती.
आता तिचा दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा तिचे तिलाही समजत नसे.
कॉलेजमधे असेल तेवढा वेळच नलिनीताईंना मुलांचे पहावे लागे.बाकी वेळी सुखदाच मुलांचे सर्व पहात होती.जीजा तर सुखदालाच आई समजत होती.आदिला मात्र थोडी थोडी आठवण यायची आपल्या आईची पण सुखाई बरोबर थोड्याच वेळात त्याला त्या आठवणींचाही विसर पडायचा.तो सुखदाला 'सुखाई' म्हणायचा.
कारण एकदा संपदानेच त्याला सांगितले होते "मी आई आहे ना तशी ही सुखाई बर का तुझी.."
तिलाही हे नाव खूप गोड वाटायचे आदिच्या बोबड्या तोंडुन ऐकायला.तेव्हापासुन तो तिला मावशी न म्हणता सुखाई म्हणुनच हाक मारायचा.
असेच दिवस पूढे जात होते.काळ कुठे कुणासाठी थांबतो.हळुहळू दोन्ही कुटूंबे ह्या आघातातुनही सावरत होती.पण आता वेणुताईंना एक वेगळीच चिंता सतावू लागली.
आता सुहासच्या मुलांचे कसे होणार?सुहास तर लग्नाचे नाव काढू देत नव्हता.
मी एकटा समर्थ आहे माझ्या मुलांना वाढवायला.
मला गरज नाही कुणाची असे बोलुन तो वेणुताईंना गप्प करत असे पण तरीही विषय तिथेच संपण्याइतका सोप्पा नव्हता ना.
संपदाला जाऊनही चार पाच महिने होत आले होते.
आता आदित्यची शाळाही सुरू झाली होती.त्याला शाळेत सोडतच सुखदा पुढे कॉलेजला जात असे.येताना मात्र तो बसने येई कारण सुखदाचे कॉलेज उशीरा सुटायचे.
असेच एक दिवस दुपारची जेवणे उरकुन नलिनीताई नुकत्याच लवंडल्या होत्या तेवढ्यात फोन वाजला.वेणुताईंचा फोन बघुन त्यांनी लगेच फोन उचलला.
"बोला वेणुताई कशा आहात?"
"आता बरीच म्हणायची.घरातली दगदग झेपत नाही हो आता."
"तरी बरं मुले तुमच्याकडेच आहेत नाहितर मी एकटीने काय काय केले असते देवच जाणे."
"होय होऽऽ.खरयं तुमचं." नलिनीताईही उद्गारल्या.
"बर काय विशेष??सहजच केलात ना फोन?" नलिनीताईंनी अंदाज घेत विचारले.
वेणूताई -"होऽऽ तसा सहजच पण खूप दिवसापासुन एक गोष्ट माझ्या मनात घोळतेय.बोलू की नको म्हणुन आवरत होते स्वत:ला.पण आज ठरवले की बोलुच."
नलिनीताऊ-"अहोऽऽ मग बोला की.आपले नाते आजचे आहे का वेणुताई? जे मनात असेल ते नि:संकोच बोला."
वेणूताई-"काही नाही मनात विचार आला आता सुहासने सावरायला हवे.भविष्याचा/मुलांचा विचार करायला हवा.
मी काय पिकलं पान आज नाही उद्या गळुन पडणार तेव्हा मुलांना आपले म्हणायला आईचे छत्र नको का? "
नलिनीताई- "अगदी माझ्या मनातले बोललात.
मीही हाच विचार करत होते पण कसे बोलावे धीर होत नव्हता."
वेणूताई-"तुमची हरकत नसेल तर एक बोलु का?"
नलिनीताई-"अहोऽऽ बोला की.परवानगी कशाला मागताय.."
वेणूताई-"मला असे वाटतेय की सुखदाचा मुलांना आणि मुलांना सुखदाचा चांगलाच लळा लागलाय तरऽऽऽ…"
नलिनीताई-"तर काय वेणूताई,थांबलात का?बोला की पूढे…!"
वेणूताई-" काही नाही हेच म्हणत होते की दुसऱ्या कोणालातरी सून करून मुलांची आबाळ करण्यापेक्षा सुहास आणि सुखदाचेच लग्न लावुन दिले तर?"
नलिनीताई-"अगदी माझ्या मनातले बोललात बघा."
नलिनीताई-"पण आता सुखदा लग्नच करायचे नाही म्हणुन अडून बसलीय त्यामुळे तिच्यासमोर हा विषय काढायचीच भीती वाटतेय मला."
वेणूताई- "ह्या जगात एकट्याने जगणे किती अवघड असते ते मला विचारा नलिनीताई.सुहास फक्त दहा वर्षाचा असताना त्याचे वडिल गेले.त्यांच्या पश्चात मी कसे वाढवले त्याला माझे मलाच माहित.आता तेच दु:ख ह्या लेकरांनी भोगू नये एवढेच वाटते बघा."
नलिनीताई-"हम्म्ऽऽऽ!खरय तुमचं."
वेणूताई -"बरं मग काय विचार आहे तुमचा ह्या प्रस्तावावर?"
नलिनीताई-"माझी काहीच हरकत नाहिये पण मुलांनी तयार व्हायला हवे नाऽऽ."
वेणूताऊ-"बरं मी अस करते हा विषय एकदा सुहास बरोबर बोलते.जर तो तयार झाला तर तुम्हीही सुखदाशी बोलुन बघा.ठिक ना?"
नलिनीताई-"ठिक आहे.तसेच करू.आधी सुहास काय म्हणताहेत ते कळवा मग ठरवु पुढे काय करायचे."
सगळे महत्वाचे बोलुन नलिनीताईंनी फोन ठेवला.
आता त्या वेणूताईच्या पुढच्या फोनची वाट पहात होत्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इकडे संध्याकाळी रोजच्या वेळी सुहास ऑफीसहून घरी आला.डायनिंग टेबलवर पेपर वाचत चहाची वाट पहात बसला होता.
वेणुताई गरम चहा सोबत अळुच्या वड्या घेऊन डायनिंगपाशी आल्या.सुहासला आळूवड्या तेही आईच्या हातच्या खूपच आवडायच्या.
"अरे वाह्ऽऽ!!आळूवड्या माय फेव्हरीट.कधी केल्यास,मला वास कसा नाही आला!"
अरे सकाळीच करून ठेवल्या.आल्यावर फक्त गरम केल्या.पण आताशा दगदग होत नाही रे म्हातारीला…"
"अगं मग कशाला करायला गेलीस.स्वैपाकीण मावशी आल्या नाहीत का आज?"
"अरे वत्सलाबाई येतातच पण तूला माझ्याच हातच्या आवडतात ना म्हणुन केल्या."
"ते काही नाही इथुन पूढे तु मावशींकडून करून घेत जा.आता अजुन तुझी तब्येत नको बिघडायला."
सुहासने पेपरमधुन तोंड बाहेर काढून आळूवडी तोंडात टाकता टाकताच बोलला.
आळूवडीच्या चवीने तो पुन्हा एकदा खूष होऊन बोलला.
"आई तु ग्रेट आहेस.तुझ्या हाताची सरच नाही कुणाला.वडी तर फक्त तूच करावीस."
"आहा्हा्हा्ऽऽऽ!! अप्रतिम झालीय!!"
"बरं सुहास थोडा वेळ असेल तर बोलायचे होते एका विषयावर.."
वेणूताईंनी भीतभीतच विषय काढला.
"काय बोलायचेय?बोल नाऽ.."
"तू त्या पेपरमधुन डोके बाजूला करून माझ्याकडे बघुन बोल तरच बोलते.नाहीतर तुझे लक्ष नसणार आणि मी आपली वेडी बडबडतीय एकटीच."
जराशा रुसव्यातच बोलल्या वेणूताई.
त्याबरोबर सुहासने पेपरची घडी करून बाजूला ठेवत आईला विचारला," ह्म्म्ऽऽ.बघ ठेवला पेपर बाजुला.आता बोल,काय महत्वाचे बोलायचेय?"
"अरे मी हेच म्हणत होते की किती दिवस मला ही धावपळ झेपणार?मुले काही कायमची तिकडे नाही ना ठेवता येणार.त्यांना इकडे आल्यावर कुणाच्या तरी देखरेखीची गरज लागणारच.ह्या सगळ्यावर तू काय विचार केला आहेस?"
"करू विचार.सध्या तरी मूले तिकडे खूष आहेत.सुखदा छान काळजी घेतेय दोघांची."
"मग मीही तेच सांगणार होते की मुलांना सुखदाचा चांगलाच लळा लागलाय.इतक्या गूणी पोरीच्या नशिबात हे असे आले.आता जर तू नीट विचार केलास तर बघ सुखदा सारखी मुलगी सून म्हणुन आली तर मुलेही खूष होतील आणि तिलाही स्वत:च्या हक्काची प्रेमाची माणसे मिळतील."
"आईऽऽऽ काय बोलतीएस तू..?"
"मी कधीच तिला त्या नजरेने बघितले नाही. मी तिला बायको म्हणुन कशी काय स्विकारू?किती विचित्र आहे हे."
"हे बघ सुहास परिस्थिती प्रमाणे विचारांच्या संज्ञेत आणि संकल्पनेत बदल घडत असतो.
संपदा असताना तु असा विचार करणे अपेक्षित नव्हतेच पण आता जी परिस्थिती ओढवलीय त्यात मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातुन हाच एकमेव सुकर मार्ग मला दिसतोय.बघ विचार कर सखोलपणे आणि मग सांग तुझे मत.
घाईघाईत काहीच करायचे नाहीये त्यामुळे पुर्ण विचार कर आणि मग बोल माझ्याशी."
"बरं आई कळवतो विचार करून."
~~~~~~~~~~~~~
मुलांच्या दृष्टिने जरी हा विचार योग्य असला तरी संपदाच्या जागी दुसऱ्या कुणाला सूहास बघुच शकत नव्हता त्यामुळे हा पेच कसा सोडवायचा हाच प्रश्न त्यालाही सतावत होता.
-----------------------(क्रमश:)-----------------------------
(भाग-1)
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी.
कसा वाटला पहिला भाग?
सुहास काय निर्णय घेईल.?
वेणुताईंचा हेतू साध्य होईल का?
काय वळण घेतेय कथानक पूढे
हे पहायचे असेल तर पुढिल भाग नक्की वाचा..
तुमच्या कमेट्स जरूर कळवा..
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा