वावर

Existence of human being


वावर. डॉ.अनिल कुलकर्णी
मनाचा वापर व वावर संयतपणे करण्याचं कौशल्य ज्याला जमलं तो जग जिंकेल.वावर मनाचाही असतो,व शरीराचा ही असतों.मन शरीरावर हावी होते, तेव्हा वासनेचा जन्म होतो.शरीर जेव्हा मनाला जिंकतं तेव्हा प्रेमाचा वावर सुरू होतो.
अनेक तत्ववेत्ते ज्यांचा वावर आमच्या जीवनात आजही आहे.मनाचा वावर सर्वत्र असतो. मुळात मन हे इतके चंचल आहे की ,मनात येणाऱ्या गोष्टीही तितक्याच चंचल असतात.आपल्या मनाला संभ्रम पडतो की, आपला व मनाचा वावर नेमका कुठे आहे? मन एकीकडे आहे वाटत असतानांच, कधी दुसरीकडे जातं, समजत नाही.
झटक्यात मनाच्या हिंदोळ्याचा वावर इकडून तिकडे झुलत असतो. मनाचा वावर शरीरातही असतो शरीरा बाहेरही असतो. माणूस प्रेमाचं नाटक करता करता, त्याचा वावर अचानक वासनेच्या प्रांतात कधी होतो हे त्यालाही कळत नाही. माणसातला राक्षस जागा कधी होईल सांगता येत नाही.
अनिर्बंध वावर रोखण्यासाठी संयमाचा लगाम हवांच. वावर हा चांगल्यातून चांगल्या कडेच व्हायला हवा. मनाला वावर करण्याचे स्वातंत्र् हवे.
संस्कारांचा योग्य वावर आजूबाजूलाअसेल तरच व्यक्तिमत्व घडतें. घरात काही गोष्टींचा वावर आवश्यक आहे. भरल्या घरात प्रत्येकाचं असणं एक संस्कार देऊन जातं. माणसांचा वावर असतो तो संस्कारातून आलेला असतो आणि त्यामुळेच आपण आपल्यात मूल्ये रुजवून घेतो. अनुवंशिकता चांगली असेल तर आपणही चांगले होतो. प्राप्त परिस्थितीत आपल्या वरही चांगल्या वातावरणाचा प्रभाव असेल तर परिणाम चांगला होऊ शकतो.
आपल्या गुणसूत्राचा वावर ठरवतो,आपण कोण होणार.
बाह्य परिस्थितीत हि कोणत्या गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात करून घ्यायचा, ह्याच्यावर सुद्धा व्यक्तिमत्त्वाचा विकास अवलंबून आहे.
भवताल महवाचं आहे .अनेक दृश्य-अदृश्य गोष्टीचा वावर आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकाचे मूल्य वेगळे, संस्कार वेगळे, विकार वेगळे. आत्मा अदृश्य असला तरी तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. मागील पिढ्यांचा वावर आपल्यात शरीराने नसला तरी वारसा रूपाने असतोच.
कोणत्या गोष्टीचा वावर होऊ द्यायचा व कोणत्या गोष्टीचा नाही हे आपल्या हातात जरी असलं तरी, काही गोष्टींवरआपले नियंत्रण नसते.
असंख्य विचार चांगले-वाईट, असंख्य स्वप्न यांचा वावर मानवाच्या आयुष्यात सतत चालू असतो. अनेक गोष्टीचा वावर, दुःखदायक असतो, अनेक गोष्टींचा वावर सुखावह असतो,अशा वेळेस जीवनात ही घडी अशीच राहू दे असं वाटतं.
माणसे नाहीसे होतात पण त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यामध्ये असतो. चांगल्या गोष्टीचा वावर असेल तर चांगलीच कृती घडते. विकृत गोष्टींचा वावर असेल तर विकृती निर्माण होते.
चांगल्या वाचनाच्या वापराने व्यक्तिमत्व परिपक्व होते. विचारांचा ,आचारांचा वावर चांगला असेल, तर विवेकानंद निर्माण होतात. अतिरेकी संघटनांचा वापर असेल तर ओसामा बिन लादेन निर्माण होणार. अनेक गोष्टींचा वावर आपल्या हातात नाही पण त्याचा वापर आपल्या हातात निश्चित आहे.चांगुलपणाचा वावर चांगली व्यक्ती निर्माण करते.
जसा वावर तसा संस्कार. कोणत्या गोष्टीचा वावर आपण होऊ देतों, याच्यावर आपल्या आयुष्याच्या गुलमोहर होणार की निवडुंग होणार हे ठरतं.
तंत्रज्ञानाचा वावर एवढा वाढला की मरणासन्न माणसाला वाचवण्याचे सोडून लाईव्ह चित्रीकरण करून वायरल करण्यात धन्यता मानली जात आहे.
कुटुंबात भावनेचं पालनपोषण नाही. माणसात घरांचा वावर कमी झाला. नाती समजावून सांगावी लागतात. मुलें पोकळीत वाढत आहेत. घरात वावर आहे तो फक्त यंत्रांचा. यंत्राचा वावर असेल तर भावनाशून्य, कोरडी माणसें रोबोट सारखी होतील.हे थांबायला हवं.
दुःखाचा वावर असूनही यशोशिखराकडे जाण्यांतच खरं कौशल्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षाच्या मुशीतून अनेक महिला, पुरुष सामर्थ्यवान ठरलें आहेत.
भवतालचा वावर प्रतिकूल असला तरीही त्याच्यातून आरपार जाऊन, त्याला छेद देऊन यश गाठलंच पाहिजे, यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
लता, पु.ल.शेक्सपियर,यांचा वावर आजही व्यक्तिमत्त्वाला आकार देतो.
डॉ.अनिल कुलकर्णी.९४०३८०५१५३anilkulkarni666@gmail.com