युद्धानंतर गुलाम म्हणून नामुष्कीची वेळ येऊनही जात धर्म न सोडलेला.तसेच युद्धात जखमी झाल्यावर पानिपतावर गोठलेल्या थंडीतील खंदकात मरण पावलेल्या तुमच्या माझ्या मराठा बांधवाला आजच्या दिवशी संपूर्ण रयतेचा मानाचा मुजरा
तिळगुळ घ्या गोड बोला असे लिहायला घेतले की मला आठवत राहतो बचेंगे तो और भी लढेंगे। असे बाणेदार उत्तर देणारा दत्ताजी शिंदे.
पुरणपोळी समोर आली की माझ्या मनात घुमत राहतो महाराष्ट्रातील फुटलेल्या लाखो बांगड्यांचा आवाज.
पतंग उडवताना काटकाटी खेळतात लोक तेव्हा मला दिसतात मातृभूमीच्या रक्षणासाठी उपाशी लढत असलेल्या सैनिकांची कटलेली मुंडकी.
काळे कपडे आणि संक्रांतीचा संबंध काहीही असो ,ही संक्रांत साक्षी आहे मराठ्यांच्या तेजस्वी पराक्रमाची.
ही संक्रांत साक्षी आहे हजारो मैल दूरवर अब्दालीशी कडाक्याच्या थंडीत उपाशी लढणाऱ्या आणि त्यानंतर परत कोणीही आलात तर खबरदार......अशी सिंहगर्जना करणाऱ्या महाराष्ट्र मुलुखातल्या पराक्रमी रांगड्या रणमर्दांच्या सिंहगर्जनेची.
ही संक्रांत शतकोनशतके सांगत राहील येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाला.. सावधान.महाराष्ट्र जागा आहे.जोपर्यंत महाराष्ट्र आहे इकडे फिरकुसुद्धा नका.
हरलेल युद्ध असे म्हणून हिणवू नका तुमच्या माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाला.
हरलेलं युद्ध म्हणून विसरू नका सह्याद्रीच्या जिद्दीला आणि महाराष्ट्राच्या देशाभिमानाला.
म्हणूनच ही संक्रांत आहे पराक्रमाची,त्यागाची,देशाभिमानाची आणि स्वराज्याच्या भगव्याची.
ही संक्रांत सांगते अठरापगड जातीचा महाराष्ट्र एक झाला की सगळ्या जगावर भारी पडतो.
लेखन:प्रशांत विश्वनाथ कुंजीर