एक करार ! भाग -3

"मला म्हैस म्हणतो काय? यू ऽऽ." तिने घट्ट दोन्ही हातांच्या मुळी आवळल्या.

भाग -3 









भक्तीने सत्यनला होकार दिला. सत्यन विश्वराजला एक एनव्हलप देतो. त्यात मुलीचा फोटो होता तो फोटो पाहून तो नाही म्हणाला. ती फोटोतली मुलगी भक्ती होती. तो विचार करत होता.





आता पुढे -





"विश्वा, तुझ्याकडे हिच्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? नाहीतर मग रियाला बोलावं."





"नको रेऽ, ती नको." विश्वा वैतागून म्हणाला.





"मग तयार हो."





"ठीक आहे."





           सत्यनने विश्वराज कडून होकार वदवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी सत्यन भक्तीला घेऊन आला. जावळे अंकलला बोलावून त्यांनी सर्व पेपर्स रेडी करुन ठेवले होते. त्यात फक्त दोघांची सही बाकी होती. थोड्यावेळात विश्वा ही आला, जावळे अंकलने तिला सही करायला सांगितले. तिने हातात पेन घेतला, तिचा हात थरथरत होता. तिने सही केली, त्यानंतर त्यानेही लगेच सही केली. थोड्याच वेळात त्यांचे मॅरेज सर्टिफिकेटही तयार होऊन आले. त्याने तिला घरी आणले. सत्यनही सोबत होता. विश्वराज आईच्या रुममध्ये गेला.





"आई, मी तुझी अट मान्य केली. ही बघ माझी बायको भक्ती, तुझी सून." आईने दाराकडे बघितले. भक्ती दारात उभी होती. पिंक कलरचा टॉप आणि जिन्स घालून ती उभी होती. तिला पाहून तिच्या चेहर्‍यावर हसू पसरले. अंजलीने भक्तीकडे हसून पाहिले. तिला हाताने जवळ बोलावले. ती जवळ आल्यावर तिच्या हाताला पकडून बाजूला बसवून तिच्या गालावर हात ठेवला. तसे भक्तीच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. त्यांनी तिच्या गालावरचे अश्रू हाताने पुसले आणि भक्ती त्यांच्या गळ्यात पडली.





"आई,आता तुला .. म्हणजे तुम्हाला बरं वाटतयं नं." ती कचरत म्हणाली.





"तुलाच म्हणं हे आपलेपणाच वाटतं. मी आता बरी आहे. तू कशी आहेस?" अंजलीने मायेने विचारले. भक्तीने होकारार्थी मान डोलावली.





"विश्वा, हिच्या डोळ्यात मला कधीच अश्रू दिसता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी तुझी.कळलं?" अंजली धारधार आवाजात म्हणाली .





"हो." विश्वराज म्हणाला.





विश्वराज तर तिच्याकडे आवासून पाहतच राहिला. 





"आल्या आल्या काय जादू केली हिने. काय जादूगर आहे की काय? आईला लगेच आपलसं केलं." तो सत्यनच्या कानात फुसफूसला.





"याला प्रेम म्हणतात. तिला आईच प्रेम मिळाले नाही. तिला मावशीत आई दिसली. कसं आहे ना? ज्यांना आई असते.आईच प्रेम मिळते त्यांना तिची, तिच्या प्रेमाची कदर नसते. ज्यांना आई नसते त्यांना विचारावं की, आईची माया, ममता काय असते? किती तळमळता ते त्या स्पर्शासाठी, प्रेमासाठी." सत्यन म्हणाला.





"खरयं रे." विश्वा नकळत म्हणाला.





"आणि म्हणूनच तर मी भक्तीला बोलावलं." सत्यन.





"सत्या हे असं बोलताय जसं काही एकमेकांना आधीपासूनच ओळखता." त्यांना हसतांना पाहून त्याने मनात आलेली शंका बोलून दाखवली.





"तसं नाही रे पण दोघींनी एकमेकांना पसंत केलं हे चांगलेच आहे ना तुझ्यासाठी." सत्यनने विषय बदलवला.





"हे मात्र अगदी खरंय,नाहीतर सासू सुना एकमेकांना पसंत करण्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पाहावी लागते." विश्वा गालात हसत म्हणाला.





"आई, तू आराम कर, आम्ही जातो." विश्वा बोलून जाण्यासाठी वळला तोच आईने त्याला थांबवले.





"थांब. विश्वा, माझी अशी इच्छा आहे की, आज तुमचं विधिवत लग्न माझ्या डोळ्यांसमोर व्हावं." अंजली त्यांना म्हणाली.





"आई तुला त्रास होऊ नये,म्हणून तर आम्ही कोर्ट मॅरेज केले ना, आता नको आपण नंतर सर्व विधिवत करुया." त्याने कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगणे टाळले.





"माझी इच्छा आहे. नंतर वेळ मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. सत्यनचा परिवार आणि घरातील व्यक्ती बस. सत्यन सर्व तयारी झाली पाहिजे." अंजलीने सर्व ठरवून सांगितले.





"होऊन जाईल मावशी." सत्यन.





"पण आई." अंजलीने हाताचा पंजा दाखवून थांबवले.





"पण नाही बिन नाही. आज संध्याकाळी लग्न होणार म्हणजे होणार." आईचे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता. तिघेही बाहेर आले.





"हे काय आहे मिस्टर तू कसा तयार झाला लग्न करायला. तेही पूर्ण विधीवत!" ती बाहेर आल्या आल्या त्याच्यावर डाफरली.





"हे बघ तू शांत हो. आई असं काही म्हणेल याचा पुसटसा अंदाज ही मला नव्हता." विश्वराज तिला समजावत म्हणाला.





"पण आता काय?" तिने विचारले .





"आता काय, तुम्हाला दोघांना लग्न करावंच लागेल."





"क्कायऽऽ." दोघेही एकसाथ ओरडले.





"हो. एक वर्षांपर्यंत तरी एकत्र राहावं लागेल."





"ठीक आहे." दोघांनी सोबतच उत्तर दिले.





चला तुमच्या नात्याची सुरवात इथूनच होतेयं.





"नो नेवर या भांडकुदळ सोबत, शक्य नाही." विश्वराज लगेच उत्तरला.





"ये दिडशहाण्या मलाही हे शक्य नाही काय? जगातील तू एकमेव व्यक्ती नाहिये. तुझ्यासोबत सुरवात करायला. मला काही पागल कुत्र्याने चावलं नाहीये. समजलं?" ती त्याच्या चेहऱ्यासमोर एक बोट नाचवत त्याच्याकडे दोन पाऊल जवळ गेली, तसा तो मागे सरकला.





"हो समजलं पण तुला पागल कुत्र्याने नाही, तर भांडखोर म्हशीने चावल असणार म्हणून तर मारकुटी म्हैस सारखी अंगावर धावूनच येते." तो थोडा हसत म्हणाला. 





"मला म्हैस म्हणतो काय? यू ऽऽ." तिने घट्ट दोन्ही हातांच्या मुळी आवळल्या.





"ये माकतोंडया जास्त आगावपणा करायचा नाही काय? सांगून ठेवतेय. माझं वरच टक्कूर सटकल ना, आपण कोणाच्या बापाला ऐकत नसतो."





"मी माकडतोंड्या तर तू माकडतोंडी. ते तुझं टक्कूर अजून सटकायच बाकी आहे का? ऑलरेडी पहिला मजला सटकलेला आहे." तोही तिला तोंडात येईल ते बडबडत होता. सत्यन तर डोळे वटारुन आळीपाळीने त्या दोघांकडे बघत होता. त्याला फारच हसायला येत होते. पण आता हसले तर विश्वराजच्या रागाला आमंत्रण देण्यासासारखे होईल,म्हणून तो गप्प बसला. पण आतून तो दोघांचे भांडण खूप एन्जॉय करत होता.





"अरे दोघेही गप्प बसा." सत्यन त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिला. 





"अरे विषय काय?आणि भांडताय काय?" 





"तुम्ही सांगून ठेवा तुमच्या दोस्ताला."





"हो. मी सांगतो त्यालाही पण तू थोडी शांत राहशील का?" सत्यन म्हणाला तशी ती शांत बसली. विश्वा व भक्ती दोघेजण शांत बसले.





"तू काय विचार केलास?" सत्यनने विश्वराजला विचारले.





"आता आई म्हणतेय ते होऊन जाऊदे."





"ठीक आहे. तू तयार हो. बाकीच बघतो मी काय करायचं ते." सत्यनने पटापट फोन केले आणि दोन ते तीन तासात सगळी अरेंजमेंट केली. अंजलीने विश्वराज आणि भक्तीला रमाकाकू करवी (मागच्या वीस एकवीस वर्षांपासून त्यांच्यासोबत होती.) बोलवून घेतले.





"रमा" अंजलीने रमाला डोळ्यांनीच सांगितले. रमाने अंजलीच वार्डरोब उघडून त्यातील वस्तू बाहेर काढल्या. रमाने ते अंजली जवळ दिले. अंजलीने भक्तीला जवळ बोलवले.



"अंजली हे तुझे कपडे आणि दागिने आहेत." अंजलीने तिच्या हातात दिले. तिला ते उघडायला सांगितले. त्यात एक रेड कलरचा शालू आणि दागिने होते.





"आवडले का तुला नाहीतर आपण दुसरे घेऊ?"





"खूपच सुंदर आहे, मला आवडले, मी हिच साडी नेसणार आणि दागिने घालणार पण मला साडी नेसता येत नाही. शालू बघून ती खूप खुश झाली पण तिला नेसता येणार नाही म्हणून नाराज झाली.





"ब्युटिशियन आले आहेत ना मग कशाला काळजी करते."





"आई ,आजचा विषय नाही. मी रोज कशी घालणार?" तिच्या चेहऱ्यावर टेंशन दिसत होते.





"मग नको नेसू, मी तुला रोज रोज साडी नेसायला नाही सांगणार, जशी आज तू जिन्स टॉप घातलयं तसचं तू रोज असेच कपडे घाल. जशी तू आता राहतेस तसंच लग्नानंतरही राहा." 





"पण आई तुम्हाला कुणी काही म्हटलं तर? आधीच मी अनाथ आहे आणि तुम्हाला कोणी काही बोललेल मला नाही आवडणार." तिने चेहरा पाडत मनात आलेला प्रश्न विचारला.





"कुणी कितीही बोलू दे. संस्कार, स्वभाव हा वागण्यातून दिसून येतो,कपड्यावरुन नाही." अंजली हसत म्हणाली. भक्तीनेही स्मित केले.





"तुला नक्की आवडलं न हे." अंजलीने त्या वस्तूवर नजर फिरवत म्हणाली.





"जा तयार हो, रमाऽऽ." त्यांनी रमाला आवाज देऊन तिला घेऊन जाण्यास सांगितले.





"जी ताईसाहेब." रमा म्हणाली आणि भक्तीला एका रुममध्ये घेऊन गेली . ती फ्रेश व्हायला सांगून बाहेर आली, तितक्यात दोन ब्युटिशियन तिला तयार करायला रुममध्ये आल्या. ती तयार होत होती. भक्ती रुममध्ये रेडी होत होती तर अंजलीने विश्वासाठी एक शेरवानी आधीच आणली होती. अंजीलीने त्याची आवड लक्षात घेऊन तयार करून घेतली होती. त्याला ही रेडी व्हायला पाठवले. दोघेही तयार होऊन बाहेर आले. छुमछुम पैंजणाचा आवाज करीत ती बाहेर आली आणि तिला पाहताच विश्वाची विकेटच पडली. त्या नववधूच्या शालूत ती अतिशय सुंदर दिसत होती. तो एकसारखा तिच्याकडे पाहतच राहिला, त्यालाही त्याचं भान नव्हते. सत्यनने त्याच्याजवळ येऊन त्याला हलवून भानावर आणले.





"आता तिलाच बघायचं आहे तुला." सत्यन मस्करीच्या सुरात म्हणाला.



विश्वराजने एक रागीट कटाक्ष सत्यन वर टाकला आणि लग्नाच्या विधीला सुरवात झाली. भटजीबुवांनी अंतरपाट धरला आणि मंत्र म्हटले. एक एक मंत्र तिच्या कानावर पडत होते, तशी तिच्या डोळ्यांत अश्रू येत होते. अंतरपाट दूर झाला आणि दोघांनी एकमेकांना वरमाला घातली. नंतर भटजींनी सांगितल्याप्रमाणे पुढचे विधी होत होते. भटजींनी कन्यादानाला आईवडिलांना समोर या म्हणून बोलवले. हे ऐकून तिच्या डोळ्यांतील अश्रू गालांवर आले. सत्यनने पुढे होऊन तिचे कन्यादान केले. तिच्या चेहऱ्यावर हलके स्मित पसरले. डोळ्यांनीच त्याला थॅक्यू म्हणाली. त्यानेही प्रतिउत्तर म्हणून डोळे मिचकवले. लग्न झाले तसे ते अंजलीपुढे आशीर्वाद घेण्यासाठी ते खाली वाकले. खाली वाकून त्या दोघांनी आशीर्वाद घेतला. रमाकाकूंच्याही पाया पडून आशिर्वाद घेतला. नंतर ती सत्यन जवळ आली आणि ती त्यांच्या पाया पडली. त्याने तिच्या खांद्याला पकडून उठवले आणि ती त्याच्या मिठीत शिरुन रडू लागली. त्याने तिला हलकेच थोपाटले. कपाळावर हलकेच ओठ ठेवले. सत्यनने आज तिचे कन्यादान करुन मोठ्या भावाचे काम केले होते. भक्तीला नवरा, आई, भाऊ असे नाते मिळाले होते, ती खूप खुश होती.





"सुखी राहा,नेहमी खुश राहा." असा भरभरुन आशिर्वाद दिला.





"काँग्रॅट्स विश्वा." त्याला शुभेच्छा देत सत्यनने मिठी मारली. 





"गप रे ! तुला माहिती आहे न आमच्यातील बाँड, हे नात फक्त एक वर्षांपुरतंच आहे." विश्वा त्याच्या मिठीत असतांना त्याच्या कानात म्हणाला.





"विशू, हे नात वर्षभराचं नाही, तर जन्मोजन्माचं जोडले गेले आहे. लवकरच तुझा यावर विश्वास बसेल, याची मला खात्री आहे आणि तो दिवस लवकरच येईल." सत्यन मनातच म्हणाला आणि बाकीच्या तयारींना लागला.



क्रमश ..



बघूया पुढे काय होते तोपर्यंत स्टे ट्यून , वाचत राहा, हसत राहा आणि कळवत राहा.



धन्यवाद.



©® धनदिपा



टिम अहमदनगर 






🎭 Series Post

View all