गावात आल्यावर रमाकाकी हिरुला तिच्या घरी घेऊन गेली ,
हिरु खुप थकलेली वाटत होती ,
हात पाय धुवं हिरुबाई अशीच नको बसू ,
मग हिरुने हातपाय धुतलेत आणी ओसरीत गोधडी टाकून झोपली ,
तिची आई आणि बाबा यायचे होते शेतातून ,
एवढ्या लवकर का परत आल्या म्हणून वेटाळातल्या घरी राहणार्या बाया आणी आज्जी तिला विचारायला लागल्या , मग काकीने घडलेला प्रकार सांगीतला ,
पाच वाजता लक्ष्मीबाई घरी आली हिरुचे बाबाही आलेत , घरासमोर गर्दी बघून काय झाले म्हणून विचारपूस केल्यावर घडलेला प्रकार त्यांना कळला ,
तसे ते दोघेही चिंताग्रस्त झाले ,
लक्ष्मीकाकी म्हणाली आता व माय कस ,
मंग काय करु आता ?
बोलता बोलता अंधार झाला ,
हिरुला झोप लागली होती अचानक ती ओरडायला लागली ,
अव आई माह्या गळा दाबत हाये हा ,
हा पाय माया छातीवर बसला ,
आणी ती गळ्याला हात लावून पाय आणी डोके हलवायला लागली ,
तिचा आवाज ही घोगरा आणी दबका यायला लागला ,
तसे तिचे बाबा आई तिच्या जवळ गेले ,
कोनीच त नायी हाय व हिरु ,
तुयाच हात गळ्या जोळ हाय तुया ,
काढं बरं हात , लक्ष्मी म्हणाली ,
बाबा गा पाय न हा माया गळा दाबत हाय,
त्याले पकडाना ,
थे पा थो म्हणते बाहेर चाल ,
म्हणून हिरु ओरडत होती ,
आज्जी लांबूनच ओरडून म्हणाली ,
थे देवा जवळच कुकू आनून लावा तिले ,
कुणीतरी धावतच आतून कुंकू आणून लावले तिला ,
थोड्या वेळाने ति शांत झाली ,
पण धापाच टाकत होती ,
तिला पाणी पाजले काकीने ,
लक्ष्मीबाई तिला पाहून रडायलाच लागली ,
आज्जी म्हणाली हे बाहेरच होय ,
दुपारच्या येळेले अस झाडाखालती नायी जाचं ,
मंग आता वो बाई कसं करु लक्ष्मीबाई रडतच म्हणाली ,
रडत कायले व , तुया रडन्यान कायी होनार हाये का ?
थे वरतीपुर्यात { गावातील शेवटचे वस्तीचे ठिकाण } अवधूते भजन असत ,
तिथ ने तिले ,
थो तुकाराम बुवा त्याले समजते सार ,
थो पानी{ मंतरलेले पाणी } देईन तिले ,
मग ठरले ,
आठ वाजता भजन सुरु होणार मग हिरुला तिथे घेऊन जायचे ,
रमा , लक्ष्मी काकी , तिचे बाबा आणी एक दुसरी सरुआज्जी , सगळे आप आपल्या घरी गेलेत जेवण वगैरे करुन मग हिरु ला घेऊन सगळे अवधुते भजन मधे गेलेत ,
भजन नुकतेच सुरु झाले होते ,
एका छोट्या खोली मधे चार पाच जण टाळ , मृदंग वाजवत अवधुताचे भजनं म्हणत होते ,
आणी आधीच त्या खोलीत चारपाच बाया बसलेल्या होत्या , मग कसेबसे हे चार पाच जण दाटीवाटीने बसले ,
सगळ्यांच लक्ष हिरु कडे ,
ही आता घुमेल की मग घुमेल ,
तेवढ्यात जिथे सरुआज्जी दाटीवाटीने बसली होती ,
एका दुसर्याबाईला खेटून ,
तिच घूमायला लागली ,
जोरजोरात हू हूहूहूहू करायला लागली ,
तशीच सरुआज्जी घाबरुन अवं माय व किंचाळून बाहेर पळाली ,
तिच्या मागेच लक्ष्मीचे बाबा गेले अवं काकी कायले घाबरतव , चाल नं अंदर , अंधारात कुकड जात ,
मंग सोबतच घराकडे जावू ,
बाप्पा मायात जीवाच पानी पानीच झाल्त ,
जिले खेटून बसली माय मी तिच्याच आंगात आल ,
कायर बापा तिच्या आगातल मले त नायी लागन?
अव काकी ज्याले जिथ लागाच त्याले लागते ,
तू येवढी घाबरत , त आली कायले ,
बरं चाल येतो ना बाप्पा आता अंधारात मी येकली घरी नायी जात ,
म्हणत दोघेही आत जाऊन बसलेत ,
तिथे दुसर्या दोघींच्या अंगात आले होते हुहुहुहुहु आवाज घूमत होता ,
मग थोड्या वेळाने भजन जसे रंगात आले तसेच ,
हिरुबाई ही बसल्या जागेवर घुमू लागली ,
तिच्या मागून कुणीतरी तिचे केस सोडलेत मग ति अजूनच जोरात गोल गोल घुमायला लागली ,
मग भजन थांबवून तू कोण म्हणून विचारले तुकाराम बुवांनी , मी मुंजा होय { बिना लग्नाचे मरण आलेले } ,
माया जागेवर ही आल्ती ,
आता तिले नायी सोडत ,
नेतो माया सोबत मी तिले ,
हिरुबाई पुरुषी आवाजात बोलली ,
असा कसा नेशीन तिले ,
तुले रोज या लागन बलावल्यावर ,
बोल नायीतर तुले इथच राख करतो ,
हाव येत जाईन हिरु ने म्हंटले ,
मग पुन्हा भजन जोरात सुरु झाले आणी थांबले तसे ह्या तिघीही घुमायच्या थांबल्या आणी झटक्याने मागे पडल्या ,
मग ह्या तिघींनाही तुकाराम बुवाने मंतरलेले पाणी प्यायला दिले ,
आणी घरी पाठवले पण दर आठवड्याला बुधवारी यावे लागेल हे ही सांगीतले , सगळे वेटाळात घरी परत आलेत , आज्जीचा अड्डा भरलेला होता , सगळे लहान मोठे बसलेले होते तिथे ,
ह्यांचीच वाट पहात होते ,
आल्यावर तिकडे काय झाले ते सगळे हिरुच्या बाबांनी सांगीतले ,
सरुआज्जी कशी पळाली ते ही हिरुच्या बाबांनी हसून सगळ्यांना सांगीतले ,
मग ही मोठ्ठी आज्जी म्हणाली
"घरात मारे डरकाया फोडते ,
आन बाई घूमाले लागली त
ढुंगणाले पाय लावून पयते "
त्या सरुआज्जी सकट सगळे खळखळून हसायला लागले ,
चला बाप्पा आपआपल्या घरी ,
लक्ष्मी कायजी करु नको ,
होईन पोरगी चांगली ,
जाईन तिच्याही मांगच लंचाड ,
सुंदरा आजी म्हणाली आणी तिचे लक्ष बाब्या कडे गेले ,
कार आँ ! काय म्हणत ?
जाता जाता पायजे का आजून येक !
हाव ना व आज्जी यकडाव मंग जावू घरी ,
हं आयीक मंग , आजी म्हणाली
"भर दुपारी
कुट ही नको
बसू मुताले
रोज मायी म्हन आयकायची
सवय लावून
नोको घेवू
मेल्यावरही मंग
येईन रातची
तुले सांगायले "
तसे बाब्याने कान पकडत म्हंटले ,
" अव आज्जी माफ कर बाई मले ,
तू मेल्यावर नको येजो बाप्पा
नायीतर मले जा लागन घुमायले "
आणी सगळेच थोड्यावेळा पुरते चिंता विसरुन हसायला लागले , मग घरी गेलेत .
असेच काही दिवस अवधुते भजनात रोज जावे लागायचे , दिवाळीच्या आधी एकदा भजनात हिरुबाई ला नेले , थोड्यावेळाने ती घुमायला लागली मग तुकाराम बुवांनी तिला विचारले कोन आहे ,
मी मुंज्या हावो , हिरु म्हणाली ,
मंग किती दिवस रायत पोरी च्या आंगात ,
सोडून दे तिले ,
नायीतर तुले जाळून टाकू ,
तुयी कायी इच्छा आसन त सांग थे पुरी करु ,
येत्या बलीप्रतिपदे ले तुले सोडालागन हिरुबाईले ,
ठाणावर या लागन ,
तुयी इच्छा सांग , तुकाराम बुवा म्हणाले ,
तसे हिरु म्हणाली घोगर्या आवाजात ,
मले कोंबड्याची भाजी पायजे आन भाकरी संग हातभट्टीची पायजे ,
सार देतो तुले पन हिरुबाईले सोड ,
मग थोड्यावेळाने भजन संपले आणी हिरु घूमायची थांबली , लवकरच दिवाळी आली ,
मग बलिप्रतिपदेचा दिवस ऊगवला ,
हिरुच्या बाबांनी ,
हातभट्टीचा एक बंपर आणी पव्वा ,
एक कोंबड आणून त्याची भाजी बनवली आणी सहासात भाकरी ,
हिरुला लाल साडी घालून तयार केले ,
एका मोठ्या टोपल्यामधे भाकरी , भाजी , हातभट्टीचा बंपर आणी पव्वा ठेवलेत ,
लक्ष्मीकाकीने टोपले डोक्यावर घेतलेत ,
लांबूनच भजनाचे आवाज यायला लागले ,
वाजत गाजत मिरवणूक घुमणार्या बायांसहीत येत होती ,
मग हे सगळे रस्त्यावर ऊभे राहीलेत ,
मिरवणूक जशी जवळ आली तशी हिरु हळूहळू हलायला लागली ,
त्यांच्याजवळ मिरवणूक आल्यावर ही पण घुमणार्या बायांमधे सामील झाली ,
आणी चालत चालत घुमणार्या बायांसहीत भजन मंडळी बघ्यांसहीत सगळे गोठाणावर {गावातील सगळ्या गुरांना चारायला न्यायच्या आधी , एकाठिकाणी ऊभे करण्याची जागा }आलेत ,
तिथे एका दगडावर हळक कुंकू टाकून पूजा केली तुकाराम बुवांनी ,
मग प्रत्येकाने भुतां न साठी आणलेला नजराणा तिथे ठेवला , एव्हाना भजन फारच जोरावर आले होते ,
शेवटी तुकाराम बुवांनी सगळ्यांच्या अंगातल्या भुतां ना आवाहन केले ,
शरीर सोडण्यासाठी आणी कुंकू सगळीकडे फेकले ,
मंतरलेले पाणी शिंपडले सर्वांवर आणी सगळेच घुमणारे धडाधड खाली पडलेत ,
आणी भजन ही थांबले ,
तेव्हा कुठे आप्तांनी सुटकेचा श्र्वास घेतला ,
आणी आनंदाने घरी परतलेत .
घरी जाता जाता बाब्या आज्जीला म्हणाला , आज्जी एक डाव होऊन जाऊ दे ना , का बे पोट्ट्या तुले कायी कामधंदा नायी त काय मले ही नायी काय ?
नायी व ,,,,हा,,हा,,हा,,, कोन्ते काम असतात व आज्जी तुले ,
माश्या हाकलत त बसत तिथ आंगनात ,
कवा कवा तूही त येतो ना हाकलाले ,
म्हण न वं , तू लयच रंगीली हायेस व आज्जी,,,
हा,,हा,,हा,, दोघेही हसायला लागले ,
आईक मंग ,
हिरुच्या गच्चीवर {मानेवर}
भूताच ठानं
कोंबड आन हातभट्टीची पिऊन
भूत पडल ऊतान
ओ आज्जी येक नंबर वं ,,हा,,,हा,,,हा,,,
संध्याकाळी सगळे लाईट खाली गप्पा गोष्टी करत बसले होते , अंबा काकी ने बाब्या ला म्हंटले , अरे बाब्या जाय बर माह्या घरी , थो घरात जलमर { जर्मन }च्या डब्यात चिवडा हाय थो घेऊन ये बरं फटकन , नायी व काकी मले तुमच्या गोठी आयकाच्या हात , लयच हाय येलपाड्या{ नाटकी }वं , माय बाई हे शेंबड पोट्ट पायन नायी मनते , चिवडा आनला का , कावरल्यासारखा खात बसन मंग ,
मधेच हिरु म्हणाली काकी मी आणतो वं चिवडा ,
याले घुसू दे बायाच्या गोठीत !
हो माय हिरु , शायनी बाई , जा माँ , घेऊन येजो हां , थ्या वरच्या पट्टीवर हाये डबा , घेऊन येजो ,
बरं घरी असन ना कोनी ,
नायी वं , सोन्या पोट्ट्यायसोबत गल्लीत बसला हाय , त्याचा बाप गावात गेला हाय , कडीच लावली हाय , जाय घेऊन ये , हाव , म्हणत हिरु वेगाने काकीच्या घराकडे गेली ,
कडी काढलेली होती , दार लोटून हिरु सरळ घरात घुसली आणि दार आतून लावून घेतले , तसेच तिला मागून येऊन सोन्याने मिठीच मारली , अरे काऊन बा असं करत ! थांब काकीलेच आवाज देतो , तिला आपल्याकडे वळवत सोन्या म्हणाला , अजून तुले जायाच का बा घुमाले ? आँ !
मंग बोंबल ! तसे दोघेही हसायला लागले ,
हे पा , माया राग मले लय भारी पडला बा !
मंग कावून येवढा तमाशा केला ? सोन्या म्हणाला ,
अरे त्या , थ्या मीरीले कावून पायल ?
तुले आंधीच म्हतल होत म्या ,
मले थे मटकी पोट्टी जरायी रास{ आवडत } येत नायी ,
बेज्ज्या राग येते तिचा ,
मले भेटाले आला वावरात आन निंबाखाली ऊभा रावून तिले पायत होता,,,,?
मंग मायी सटकली ,,,!
आन कसा पयाला बाबू तिथून ,,,,!हा,,हा,,हा,,
सांगीतल्यावरही थ्या पायलच त्या बांदरीकड{ माकड } ,,,
म्हणून मंग म्या,,,,,,हा,,हा,,हा,,
दोघे ही एकमेकांच्या डोळ्यात बघून हसायला लागले,,,,,आता वागशीन का असा,,,!
न्हायी बाप्पा ! कानाले खडा , मायवाल्या,,,,,!
ढोपरापासून पाया पडतो माय माजे,,,,!
फक्त मनोरंजनार्थ,,,,,,
००००००००