अव रमाकाकी काय करत व , चालन मायी आई बलवत हाय , धावतच आलेली हिरुबाई म्हणाली ,
कुट व , आं कुट मनत हाय , काय मायीत ,
पुढ बोलशीन ? का अटकले बोल तुये घशातच ,
अव काकी दम लागला न व मले , हिरु म्हणाली
मंग कोन सांगतल होत तुले धावाच , ताडासारखी वाढली न रस्त्यान धावत सुटते ,
थे सोड व काकी ,
चाल मायवाली माय तुले बोला साटी बोलावते घरी ,
मी का रिकामी हाव का ,
तुयी माय कावून नायी आली इकड बोला साटी ,
अव तिले भेटल्यावर मंग म्हणजो , माय डोस्क कायी खावू नको ,
मले जे सांगतल तुले निरोप द्याच थे दिल , याच असन थ ये , हिरुबाई रागानी म्हणाली ,
बर चाल होय पुढ येतो मी आणी काकी न्हाणीत हात धुवून कंम्बरेला खोचलेला पदर काढून डोक्यावर घेत हिरुबाईच्या घराकडे गेली ,
गावातल्या एका वेटाळ्यात राहणार्या आणी नात्यातच असणार्या लक्ष्मीबाईंची हिरुबाई मुलगी ,
जवळ जवळ दहा बारा घरांचा वेटाळा { मोहल्ला } हे सगळे एकमेकांचे नातेवाईक ,
थोडी थोडी शेती घरी पण तेवढ्याने नाही भागायचे मग दुसर्यांच्या शेतात ही कामाला जायच्या बाया ,
रमाकाकी लक्ष्मीबाईच्या घरी आली ,
काव बाई कावून बलावल तडकाफडकी ,
हे पोरगीत जशी माया गचांडीवरच{मानेवर } बसली होती ,
हो काव ! आता माय कावून व बाई तू अशी हास , हिरुची आई हिरुला म्हणाली ,
तशी हिरु तोंड वाकडे करुन बाहेर गेली ,
जावू दे तिले , मी का म्हनतो , ऊद्या च्या कामाच कस , हिरु ची आई म्हणाली ,
आॅ ! काव बाई मले हेच बोलासाटी बलावल का तुमी ?
तुमी कावुन नायी आल्या घरी बोला साटी ? रमाकाकी कंटाळून म्हणाली ,
अव म्या हिरुले म्हटल होत काकी येत नसन त मले सांगजो , मी येतो तिच्या घरी ,
हे पोट्टी ना भल्ली बाजींदी{ खोटारडी} हाय व बाई ,
रांधता रांधता { स्वयंपाक }आनल माय मले इकड ,
अस करा ऊद्यापासन माया वावरात { शेतात } निदांले{ गवत , तन काढायसाठी } या , आठ दिसाच काम हाय , काकी म्हणाली ,
माय बाई अव तेच त बोलाच होत ,
मंगाशीच सरपंच आला होता ,
त्यायच्या वावरात बाया लागतीन म्हणे ,
त्यायले म्हनल म्या ,
रमाबाईकड जाच हाये म्हनून ,
पन लयच मांग लागला थो त मंग मी जातो तिकडे निंदाले आन हिरुबाईले पाठवतो तुयाकड निंदाले ,
आन थे सदाच्या दोन पोरी येतीन , चालन ना रमा ?
तिकडच झाल का मंग येतो ना तुया वावरात , लक्ष्मीबाई म्हणाल्या ,
बर बाप्पा बरच हाय , काय करता आता , तुमी आल्या असता त लौकर झाल असत ना मायवाल काम ,
पर्हाटीले युरीया टाकाचा हाय मंग , रमाकाकी म्हणाली ,
होव ना माय सरपंचाच झाल का तुयाकडच कामाले येतो पाय मंग , लक्ष्मीकाकी अजीजीने म्हणाली ,
बर चला मी जातो , रांधांच तसच टाकून आल्ती ह्या हीरी पायी , रमाकाकी ऊठत म्हणाली ,
बर जाय मंग ,
रमाकाकी घरी आली स्वयंपाक केला मुलांना , काकांना वाढून दिले , आणी लक्ष्मणकाकांना म्हणाली ,
अव आयकता का ,
हं बोल ,
निंदन हाय ऊद्या , बाया कमी हात , तीन पोरी घेवून जातो वावरात ,
बर पन माय ,,, येन होनार नायी वावरात ,
तू पावून घे , ते सेनट्रिंगच काम कराच रायल सायबा कडच , त्यासाटी जा लागते ऊद्या पायटीच , आठ रोज मले येळ नायी , घरी याले ही येळ होईन ,
माय जेवली का व ?
काका गवंडी होते ठेक्यानी काम घ्यायचे मग घरच्या चार एक्कर शेतीचे काम रमाकाकीच सांभाळायची ,
नायी ना तुमच्या मायच कायी खर हाय का , बसतात पोट्ट्या सोट्यासंग मजाक करत , लाईट खाली बसल्या हाईत , बलावल्या शिवाय थोडी येतीन , काकी म्हणाली ,
जाय मंग बलाव आठ वाजत हाय , मी झोपतो मले सकाळीच जाच हाय , म्हणून काका झोपले ,
रमाकाकीने मुलीला म्हंटले ,
जाय बर बाई बुढीले बलाव जेवाले , सकायी मले जा लागते वावरात ,
हाव म्हणत मुलगी गेली लाईट खाली{मोहल्ल्यातला मध्यस्थळी असणारा स्र्टिटलाईट } जिथे आजी लहान मोठ्या मुलीं मुलां सोबत गप्पाटप्पा करत बसली होती ,
तिच्या बोलण्याने ती सगळ्यांचे मनोरंजन करायची ,
हिरुपण तिथेच बसून होती ,
मोहल्ल्याच्या मधोमध रिकामी जागा होती ,
गप्पाटप्पा करायला सगळे तिथेच जमायचे ,
रात्रीतर हमखास ऊशीरापर्यंत गप्पा चालायच्या त्यात जुन्याकाळच्या गप्पा सांगून आज्जी सगळ्यांना हसवायची , आज्जी तुले आई जेवाले बलावते ,
थांब व भूरे बसन इथं , हिरु तिला खाली बसवत म्हणाली , ती गोरी होती म्हणून तिला भूरी म्हणायचे ,
तिचे नाव मंदा होते ,
नाय व आज्जी पयले गोठ पूरी कर मंग जाजो घरी , हिरु ने म्हंटले ,
होव माय हिरे सांगतो ना , गोठी सांगू सांगू माया जीव जाऊ दे , मरता मरता ही गोठ सांगीन आज्जी म्हणाली ,
तश्या सगळ्याच हसल्या ,
अव बोलन व आज्जी मंग त्या नाव घेतल काव ,
होना माय सार्या बाया आपआपल्या नवर्याचे नाव घेत होत्या मलेयी येका बाईन नाव घ्याच म्हतल मंग म्या म्हतल ,
" वाकडी तिकडी बाभूय
तिले हिरवा हिरवा पाला
सखाराम मेला त
तुकाराम केला " ,
सगळे हसायला लागले , तशी मिरा तिच्या आईला म्हणाली आई व तू घे बर नाव , आज्जी ही तिला म्हणाली , घेन व नवर्याच नाव , का त्याच्या पैशावर मजाच करत ,
आता बाई , बुढी सारखत मले येत नायी पन घेतो येक ,
मीराची आई म्हणाली ,
" गजाननाच्या फोटुले हार घालतो वाकून तुया बापाच नाव घेतो बुढीचा मान राखून " , सगळे एकदमच हसायला लागले ,
तिकडून जानकी आज्जी आली , बाई सार्या गावात पायल माय बुढ्याले , काय मायीत कुट जाऊन बसला ?
अव येईन ना कायले गेली पाहाले ! सरु आज्जी म्हणाली ,
तिकडून जानकी आज्जीचा बुढा आला , मस्त हात मागे स्वतःच्या कंबरेवर धरुन जानकी आजीला म्हणतात ,
कोनाची गोठ चाल्ली !
आता माय , तुमी कुटून आले वं , दिसलेई नायी बाई !
ती तोंडाला पदर लावुन दचकून म्हणाली ,
ईतच त होतो , म्हशीच्या गोठ्याजोळ बसलो होतो ,
मायबाई सार्या गावात ढुंढाले गेल्ती ना मी !
अन तुमी ईथच होते ?
त्यावर सुंदर आज्जी लगेच म्हणाली ,
" बुढ्याले जेवा साठी
सारी ढुंढली काशी
आन बुढा बसला होता
म्हशीच्या ढुंगणा पाशी "
सगळे लेकर पोट धरुन धरुन हसले ,
आव माय हे बुढी हो का कोन हो ,
मानूस अन लेकराय समोर कश्या गोठी करते माय ,
जानकी आज्जी आणि आजोबा हसतच घराकडे गेले ,
चालाहो पोट्यांनो , चाला झोपाले ,
मीराची आई नाटकी रागाने म्हणाली ,
जाता जाता बाब्या आज्जीला म्हणाला ,
आजी व जाता जाता येक शेवटच होवून जावूदे ,
आज्जीला तर तेच पाहीजे होते ,
ती वळून त्याच्याकडे बघत म्हणाली ,
मीरी न घातला घाघरा
माय नाव सुंदरा
थुतर{ चेहरा }काय पायत माय बाब्या
जान झोपन बांदरा { माकड }
आन जावो सासूबाई जेवा आन झोपा ,
मीराची आई हसतच म्हणाली ,
तसे सर्व लेकर ऊठून हसतच आपआपल्या घरी गेलेत .
दुसर्या दिवशी ठरल्या प्रमाणे हिरु , मीरा आणी मंगला रमाकाकी बरोबर शेतात निंदन करायला गेल्या , त्यांचे छान हसत बोलत निंदन सुरु होते , दोन वाजता मिल मधल्या भोंग्याचा आवाज आला तश्या सगळ्याजणी जेवायसाठी बसल्या , जेवणे झालीत थोड्या वेळाने हिरु मी जाऊन येतो म्हणत लघवीला गेली , तिकडून आल्यावर निंदन सुरु झाले पण अचानक हिरु चुप झाली , बाप्पा काय झाल व हिरु कावून बोलत नायी , कुलुप लावल का तुया तोंडाले ,
मिरा म्हणाली ,
पण ती काहीच बोलली नाही ,
अचानक ती आपले खुरपे खाली टाकून रमाकाकी जवळ आली ,
रमा काकी ओणवी होऊन निंदन करत होती ,
तिला जवळ आलेली बघून ,
काकी म्हणाली , कावून पोट्टे जिवावर आल काव काम ,
पण तिला प्रतिसाद न देता झटकन काकीच्या पाया जवळ बसून तिचे पाय पकडलेत ,
डोळे गच्च मिटलेत आणी जोरजोराने ओरडायला लागली , काकी काकी व ,
थे पाय न व मले बलवत हाय ,
कोन तुले बलवत हाय , काकी हसून म्हणाली ,
अव काकी माया हात धरुन ओढत हाये नाव मले ,
चाल म्हंतो त्याच्या संग ,
अव काकी मले पकड ,
थो पाय मले ओढत हाये ,
काकी तर पार घाबरुन गेली ,
पण ऊसणे अवसान आणून तिला म्हणाली ,
अव पोरी नाटक कायले करत ,
कोन हाय इथ , कोनीच त नायी हाय ,
चाल ऊट बर ,
थो काय काकी तुया बाजूलेच त ऊभा हाय ,
माया हात पकडत हाय ना व काकी मले सोडू नको ,
थो घेऊन जाईन मले , डोळे घट्ट बंद करुन हिरुने काकीचे पाय ही घट्ट पकडून ठेवलेले होते ,
तिचा अवतार बघून आता मात्र दोन्ही मुली आणी काकी घाबरल्याच ,
त्यांनी मोठमोठ्याने आवाज देत शेजारच्या शेतातील लोकांना बोलावले ,
दोन तीन माणसे धावतच तिथे आलीत , त्यातील एक काका म्हणाले ,
काय झाल वयनी ,
पाहा ना बाप्पा ही पोरगी कशी माये पाय पकडून हाये , सोडतच नायी हाय ,
तिचा अवतार त्यांनी पण बघीतला ,
वयनी कुट गेली होती ती ,
त्या निंबाच्या झाडाखाली लघवीले गेली होती , मीरा म्हणाली , अस्स बराबर हाये ,
मान डोलावत ते काका म्हणाले ,
मग त्यांनी जवळ असलेल्या चरवी मधून पाणी घेऊन तिच्या चेहर्यावर शिंपडले ,
आणी हनुमान चालीसा म्हणायला लागले तशी हळूहळू ती शांत झाली मग डोळे ऊघडून इकडे तिकडे घाबरुन बघायला लागली आणी म्हणाली ,
गेला थो माणूस काकी ,
हाव का व , मग काकीने काम थांबवले आणी तिला घेऊन घर गाठले ,
क्रमशः