Login

दोषी कोण?

दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी एका बहिणीची संघर्ष कथा!
#साप्ताहिकलघुकथास्पर्धा

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक:- दोषी कोण?

अंगणात सर्वजण जमले होते.सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. समोर एक मृतदेह ठेवण्यात आला होता. प्रत्येकजण त्या मृतदेहाच्या बाजूने जाऊन देहावर फुले टाकून पाया पडून बाजूला होत होते.

" किती गोड मुलगी होती आणि असं काही होईल असं वाटलंही नव्हतं." तिथे जमलेल्यांमधील एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणाली.

" हो ना म्हणजे एवढे थाटामाटात लग्न केलेलं होतं आणि आजचा दिवस असा येईल असे वाटले सुद्धा नव्हते." दुसऱ्या स्त्रीने लगेच आपले मत प्रदर्शित केले.

तिच्या मृतदेहाजवळ तिची सासरची मंडळी सुद्धा होती. सगळेजण शांतपणे बसलेले होते.

तिथेच एक तेवीस वर्षांची मुलगी त्या सासरकडच्या लोकांकडे रागाने बघत होती.

मनस्वी जिचा मृतदेह तिच्या माहेरी आणण्यात आला होता. तिचा ९०% भाजल्याने मृत्यू झालेला होता. तिचे आई-बाबा धायमोकलून रडत होते.

"मनू ss तू आम्हाला सोडून कशी काय गेलीस? आता आम्ही तुझ्याशिवाय कसे जगू गं?" म्हणून एक आई मुलीच्या मृतदेहाला पकडून रडत होती.

थोड्यावेळाने नातेवाईकांनी तिच्या आई-वडिलांना समजून सांगत, जोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नव्हते तोपर्यंत भावकीमध्ये कुठलेच काम करू शकत नव्हते. काही वयोवृद्ध तर लहान मुलेसुद्धा होती तसेच ज्या लोकांना नंतर काम होतं त्यांना कामावर सुद्धा जायचे होते. म्हणून काळजावर दगड ठेवत मुलीचे वडील स्मशानभूमीकडे तिचा मृतदेह घेऊन इतरांसोबत निघाले.

मनस्वी ही स्वभावाने शांत आणि गुणी मुलगी होती. एका वर्षापूर्वी तिचे लग्न मोठ्या तालेवार खानदानात झाले होते. लग्न थाटामाटात झाले होते. आम्हाला काही नको असे सर्वांसमक्ष मुलांकडच्या मंडळींनी सांगितले होते पण सुपारी फुटल्यावर पुन्हा मोजक्या लोकांची बैठक घेऊन आमचा मानपान आणि आमच्या इभ्रतीला शोभेल असे लग्न करून द्या अशी छुप्या पद्धतीने त्यांनी मागणी केली.

आयुष्यभर मुलीचे आई-वडील पोटाला चिमटा काढून पैसा गोळा करून मुलीला शिक्षण तर देतात पण लेकीच्या लग्नासाठीसुद्धा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून सर्व गोष्टी करतात. तसेच मनस्वीच्या वडिलांनीही केले.

वडिलांच्या हाताने मुखाग्नी देताना त्यांना समोरचे काही दिसत नव्हते त्यामुळे त्यांचा तोल गेला. नातेवाईकांनी आधार देत त्यांना सांभाळले होते. ज्या हाताने वाढवले होते त्याच आपल्या मुलीला अनंतात विलीन होताना पाहून एका बापाच्या काळजाला काय घाव पडले असतील हे सांगणे खूप कठीण होते.

सर्व कार्याचे दिवस झाल्यावरती सर्वजण बसलेले होते. बरेचसे नातेवाईक आपल्या घरी निघून गेले होते. काही तिथे थांबले होते. लहानपणीच्या ते आतापर्यंतच्या आठवणींनी त्यांचे डोळे वारंवार भरून येत होते.

" मला वाटतं आपण पोलिसांना सर्व खरं सांगायला हवं."  मनस्वीची लहान बहीण तेजस्वी म्हणाली.

"म्हणजे? तुला नेमकं काय म्हणायचं आहे ?"  बाबांनी विचारले.

"हेच की माझ्या ताईच्या मृत्यूला जबाबदार तिचे सासरकडचे आहेत."

"अगं, आपण तिच्या दुःखातूनही सावरलेलो नाही आणि तू काहीही काय बोलत आहेस." तिचे बाबा म्हणाले.

"तुम्हालाही सर्व सत्य माहीत आहे की ताईचा मृत्यू हा अकस्मात नसून तिला तसं करण्यास प्रवृत्त केलेले आहे." तेजस्वी म्हणाली.

"हे बघ बाळा, ती सर्व मोठी माणसे आहेत. आपण जर काही केले तर पुन्हा आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो.आता मला दुसरी मुलगी गमवायची नाहीये." तिची आई अश्रू गाळत समजावत म्हणाली.

" खरे तर माझा या लग्नाला पहिल्यापासूनच विरोध होता तुम्हाला मी सांगितलं होते पण तुम्ही कोणीही माझे ऐकले नाही. आज तुमच्यामुळेच माझ्या ताईला जीव गमावावा लागला." कोणीच तिचे ऐकून घेत नाही म्हणून रागाने तेजस्वी म्हणाली.

हे कडूबोल ऐकल्यावर तिच्या आईने रागात उठून तिच्या कानाखाली मारली.

हे बघून तिथे उपस्थित जे काही नातेवाईक होते त्यांनी तोंडावर हात ठेवला. कारण आजपर्यंत कधीच त्यांनी मनस्वी असो किंवा तेजस्वी याच्यावरती कधीच हात उगारल्याचे त्यांना आठवत नव्हते.

तेजस्वीला सुद्धा आपल्या आईने कानाखाली मारणे हे अनपेक्षित होते. ती तशीच आपल्या खोलीत निघून गेली.

तिथे काही नातेवाईकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. कारण सर्वांना आत्तापर्यंत चुकून मनस्वीच्या साडीला आग लागली आहे असंच वाटत होते पण आता तेजस्वी आणि तिच्या पालकांचे भांडण ऐकून सर्वजण वेगळे विचार करायला लागले.

थोड्या दिवसांनी पोलीस तिथे आले आणि त्यांनी चौकशी करायला सुरूवात केली.

"आम्हाला असे वाटते की काहीतरी नक्कीच कारण आहे की ज्यामुळे तुमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.त्यामुळे  तुम्ही आम्हाला थोडीफार माहिती सांगू शकता का?" इन्स्पेक्टर साहेबांनी विचारले.

"साहेब,असं काही नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा भाजल्याने झालेला आहे." तिचे वडील जड अंतःकरणाने रडत म्हणाले.

"नाही साहेब, हे सर्वजण खोटे बोलत आहेत." एक मोठा आवाज आला.

सर्वांचे लक्ष त्या आवाजाकडे गेले.बाबांच्या डोळ्यांमध्ये राग स्पष्ट दिसत होता.त्यांनी विचारणा केल्यावर ती मनस्वीची लहान बहीण आहे.हे त्यांना समजले.

तेजस्वीने आता मनाशी निर्धार केला होता की आता बोलली नाही तर काहीच होणार नाही.असेच तिचे पालक बहिणीच्या सासरच्यांना घाबरून बसतील आणि मग आपल्या बहिणीला कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळे तिने तिला जे काही माहीत होते ते सर्व पोलिसांना सांगितले.

"मला कोणतीही आणि कोणाबद्दलही तक्रार करायची नाही. त्यामुळे तुम्ही आता येऊ शकता." तिचे बाबा त्यांना हात जोडत म्हणाले.

"तुम्हाला तुमच्या मुलीला न्याय मिळावा असे वाटत नाही का? " पोलिसांसोबत एक महिला कॉन्स्टेबल होती त्यांनी तेजस्वीच्या आई-वडिलांकडे बघून प्रश्न केला.

"नाही. ते लोकं काही चांगले नाहीत. आम्ही आधीच एक मुलगी गमावली आहे. आम्ही तक्रार केली तर उद्या ह्या मुलीचे लग्न कसे होणार ?" मुलीचे बाबा म्हणून त्यांनी आपली चिंता व्यक्त केली.

"तुम्ही फक्त मध्येच माघार घेऊ नका. बाकी सर्व पुरावे आम्ही शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू." पोलिस त्यांना आश्वस्त करत म्हणाले.

मनस्वीला त्रास सहन न झाल्याने आपल्या आई वडिलांची इज्जतीची भीती वाटत असल्याने स्वतःला जाळून घेतले होते. कारण तिच्यामते असे केल्याने तिचा त्रास इतरांना होणार नव्हता.

थोड्याच दिवसांमध्ये तेजस्वीने तक्रार दाखल केली होती.  त्यामुळे मनस्वीच्या सासरच्यांना अटक करण्यात आली.
तसेच हे प्रकरण आतल्या आत दाबू नये म्हणून तेजस्वीने सोशल मीडियावर एक निनावी प्रोफाइल उघडून त्यावर  सर्व पुरावे टाकले होते.  त्यामुळे नागरिकांनी खास करून मुलींच्या वडिलांनी हे प्रकरण उचलून धरले आणि म्हणून  सरकारने सुद्धा लवकरात लवकर ह्यातून सुटावे म्हणून पोलिसांना अपराध्यांविरुद्ध ठोस पुरावे शोधण्याचे आदेश दिलेले होते.

काहीच दिवसांमध्ये पुरावे प्राप्त झाले. शारीरिक आणि मानसिक छळ, पैशाची मागणी आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल तिचा सासरच्यांना न्यायालयाने कठोर शिक्षा दिली.

तेजस्वीला तो दिवस आठवला ज्यावेळेस तिच्या बहिणीला अग्नी देण्यात येत होती तेव्हा तिने तिथे शपथ घेतलेली होती की तिच्या दोषींना शिक्षा मिळण्यासाठी ती सर्व प्रयत्न करणार आणि तिने ते वचन पूर्ण केले होते.

न्यायालयाने सासरच्या लोकांना शिक्षा केली तसेच तिच्या माहेरच्या लोकांनाही तंबी दिली की आपल्या मुलीपेक्षा कोणतीच गोष्ट महत्त्वाची नसते. ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला वस्तू द्यायला सुरुवात करता तेव्हा त्या लोकांची पुन्हा मागणी करण्याची इच्छा वाढते. त्यामुळे हुंडा घेणे जसा गुन्हा आहे तसा देणे हा सुद्धा आहे. जेवढी या गोष्टीला सासरची माणसं जबाबदार असतात तेवढी माहेरची सुद्धा जबाबदार असतात, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने खडेबोल सुनावले होते.

"गुन्हेगारांना शिक्षा होतात पण ज्या व्यक्तीचा जीव गेलेला असतो तो पुन्हा परत कधीच येत नाही. मुलीला जरी परक्याचे धन मानले तरीसुद्धा पालकांनी लग्नातील हुंड्याची कुप्रथा, तो न देता आणि घेता मोडायला हवी. गोष्ट चुकीची असल्यास ते सहन न करण्याचे धडे प्रत्येक मुलीला घरातूनच द्यायला हवेत. असे केल्यास कोणतीच मुलगी हुंड्यासाठी बळी जाणार नाही." हे तेजस्वीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहून पोस्ट केले.

तसेच तिने लग्न करताना हुंडा हा मिळणारच नाही अशी अट तिच्या लग्नातील अपेक्षांमध्ये टाकली होती.

ह्यात दोषी कोण शोधताना समाजाची चुकीची मानसिकताही काही अंशी दोषी असते. लोकांमुळे समाज घडतो आणि चांगल्या विचारांनी परिवर्तन होते. त्यामुळे चुकीचे काही होणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही ह्याची जबाबदारी स्वतःहून प्रत्येकाने घेतली तर अशा हुंडाबळीने मृत्यू होणार नाहीत.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट करुन नक्की सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

फोटो सौजन्य: साभार गुगल.