दोष कुणाचा?

मोडलेल्या संसाराची गोष्ट
केवळ सहा महिन्याचा संसार सोडून नेत्राचा नवरा घरातून अचानक गायब झाला होता. ऑफिसला जाण्याचे निमित्त करून राजीव गेला, तो घरी परत आलाच नाही. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर पोलीस कंप्लेंट करावी लागली. राजीवच्या आईंनी, कावेरी बाईंनी देव पाण्यात ठेवले, नवस बोलले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्यांच्या मनातला संताप, राग, दुःख, चीड सगळी नेत्रावर निघाली.

"तू आलीस आणि आमच्या घराची घडी विस्कटली. माझा मुलगा तुझ्यामुळे घरातून निघून गेला." सासुबाईंनी सारा दोष आपल्या सुनेच्या माथी मारला. "आता तुला या घरात स्थान नाही. माझ्या मुलाचं मन राखणं तुला कधी जमलंच नाही." असे म्हणत कावेरी बाईंनी नेत्राला घरातून बाहेर काढले.

"सासुबाई, या साऱ्यात माझा काय दोष?" नेत्रा दुःखावेगाने म्हणाली.

"तू आलीस आणि माझा मुलगा माझ्यापासून दूर निघून गेला. तू पुन्हा या घरात पाऊल टाकलंस तर याद राख." सासुबाईंचा आकांड -तांडव अख्खी गल्ली पाहत होती.

आता इथे थांबून काहीच उपयोग नव्हता. घरातून बाहेर पडताना नेत्रा आपल्या सासुबाईंना इतकंच म्हणाली, "सासुबाई, मान्य आहे गेल्या सहा महिन्यांत मी तुमच्या मुलाचं मन ओळखू शकले नाही. पण अठ्ठावीस वर्षापासून सहवासात असलेल्या तुमच्या मुलाचे मन तुम्हालाही ओळखता आलेले नाही. हेही तितकेच खरे आहे."

नेत्राचे बोलणे कावेरी बाईंच्या मनाला लागले. 'नेत्रा जे म्हणाली त्यात तथ्य आहे. राजीवच्या मनात काय सुरु असायचे, हे कधी कोणाला कळायचे नाही.' कावेरी बाई जाणाऱ्या नेत्राच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नुसत्याच पाहत राहिल्या. पण तिला थांबवण्याचे धाडस त्यांना झाले नाही.

------------------------------------

"मला वाटलंच होतं. राजीव घरातून निघून गेले याचा दोष माझ्या मुलीच्या माथी मारला जाणार. "खरं सांग नेत्रा, तुझी यात काहीच चूक नाही ना?"
नयन ताई आपल्या मुलीला म्हणत होत्या.

"नाही आई, आमची मन कधी जुळलीच नाहीत. मग शरीराचा प्रश्नच येत नाही. मला वाटलं, नवा संसार आहे आपला. त्यांना रुळायला थोडा वेळ हवा असेल. पण ते असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते गं. एक सून किंवा बायको म्हणून असणाऱ्या साऱ्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा मी त्या घरी सोडून आले. माझी काय चूक होती आई?"
नेत्रा ओक्साबोक्शी रडत म्हणाली. आता नेत्राच्या मनाचा बांध तुटला होता.
"रडून मन मोकळं होईल बाळा. पोटभर रडून घे. कारण तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. सारी दुःख, अपमान मागे टाकून आयुष्य आनंदाने जगायचं आहे." आईने तिला जवळ घेतलं.

राजीवनीं असे का केले असेल? हा प्रश्न राहून राहून नेत्राच्या मनाशी खेळत होता. तिला वाटत होते, तडक सासरी जावे आणि याचा जाब विचारावा. पण सासू - सासऱ्यांचे दुःखही तितकेच मोठे होते. त्यांचा एकुलता एक मुलगा असा अचानक नाहीसा झाला होता!

आता माहेरी परतलेली लेक पाहून लोकं नाही, नाही ते बोलत होते. नावं ठेवत होते. पण आई -वडिलांनी दिलेल्या भक्कम आधारामुळे नेत्राला आपल्या दुःखातून सावरायला मदत होत होती.

दिवस असेच सरत होते. एक दिवस बाबा म्हणाले, "सतत हाच विचार करत राहशील तर दुःख मनात साठवण्याची सवय होईल तुला. त्यापेक्षा आपल्या व्यवसायात माझी आणि निमिष दादाची मदत कर. न जाणो, पुढचे दिवस सुखाचे येतील!" बाबांनी माहेरी परतलेल्या लेकीच्या डोक्यावर मायेने, आधाराचा हात फिरवला.

काळानुसार दुःखाचा आवेग ओसरला. फक्त आठवणी मागे राहिल्या. राजीव सोबतच्या आठवणी तशा उत्कट नव्हत्याच. मात्र नेत्रा सहा महिने त्या घरात राहिली होती. नाही म्हंटल तरी नव्या नवरीचे क्षण जगली होती.

बाबांच्या आग्रहाखातर नेत्रा तयार झाली आणि तिने स्वतःला कामात गुंतवून घेतले.
व्यवसायातल्या अनेक बाबी शिकून घेताना ती अनेकदा धडपडली, हरली. पण हळूहळू आपल्या कामात तरबेज झाली. आपल्या लेकीची झेप पाहून बाबाही सुखावले.

एव्हाना दादाचं लग्नाचं वय उलटून चाललं होतं. आपल्यामुळे त्याला त्रास व्हायला नको म्हणून नेत्रा रेंटवर घर घेण्याचा विचार करू लागली.
पण मुली पाहताना निमिषने अट घातली, 'जोपर्यंत बहिणीचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत ती इथेच राहील. ज्या मुलीला ही अट मान्य असेल तिनेच या घरात पाऊल टाकावं.'

काही दिवसांतच निमिषचे लग्न झाले. त्याची अट मान्य करून अदिती, नेत्राची वहिनी म्हणून घरात आली आणि आपल्या नणंदेच्या पाठीशी उभी राहिली.

बघता बघता दोन वर्षे उलटून गेली.

एक दिवस निमिषच्या मित्राने, जयदीपने नेत्राला मागणी घातली. त्याने नेत्राची धडपड पाहिली होती, तिचं दुःख अनुभवलं होतं. तो म्हणाला,
"बाबा, नेत्राचा भूतकाळ आमच्या नात्याआड कधीच येणार नाही. मी आयुष्यभर तिची साथ देईन. जीवापाड जपेन तिला."
विचारांती बाबांनी या लग्नाला होकार दिला. कारण जयदीप माहितीतला मुलगा होता. स्वभावाने उत्तम होता. शिवाय नेत्रा आता बरीच सावरली होती. तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात व्हायला हवी, असे कोणत्याही आई -वडिलांना वाटणे साहजिकच होते.

नयन ताईंनी कावेरी बाईंना फोन लावला.
"तुम्ही नेत्राचे दुसरे लग्न अवश्य लावून द्या. कारण चूक माझ्या मुलाची होती. तशी माझीही चूक झाली. घरच्या लक्ष्मीला मी घराबाहेर काढले. मला एकदा माफी मागू द्या तिची." कावेरी बाईंचा आवाज कातर झाला होता.

"कावेरी बाई, कोणत्या तोंडाने माफी मागणार आहात आमच्या लेकीची? चूक तुमच्या मुलाची होती अन् भोगावं लागलं माझ्या मुलीला. तिला घरातून बाहेर काढण्यापूर्वी तुम्ही हजार वेळा विचार करायला हवा होता." नयन ताईंनी आणखी काही न बोलता फोन ठेऊन टाकला. आता बोलून काही उपयोग नव्हता.

बराच विचार करून अखेर नेत्रा या लग्नाला तयार झाली. जुन्या आठवणी पुसून, नव्या नात्याचे बंधन तिला हवेसे वाटू लागले. पण तिच्या मनात भीती होती, 'पुन्हा असं काही घडलं तर? पण स्वतःला एक संधी तर द्यायला हवी आणि अचानक राजीव परत आले तर?
नाही.. मी अशा माणसासोबत पुन्हा, नव्याने संसार करू शकणार नाही.'
नेत्राच्या मनातली चलबिचल जयदीपने ओळखली. तो म्हणाला, "तुला विचार करायला हवा तेवढा वेळ घे. यासाठी मी गडबड करणार नाही आणि तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल."

एक दिवस नेत्रा काम संपवून घरी जात असताना, ध्यानीमनी नसताना अचानक राजीव समोर आला. त्याला पाहताच नेत्राच्या मनात राग, संताप, दुःख, चीड, आनंद सगळ्या भावना फेर धरून नाचू लागल्या. 'कुठे होता इतके दिवस? तुमच्या माघारी माझे काय झाले असेल याचा विचार कधी मनात आला का तुमच्या?' ओठावर आलेले शब्द नेत्राने कसेबसे माघारी नेले. तिची नजर जेव्हा राजीवच्या कडेवर असणाऱ्या लहानग्या मुलीवर आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या स्त्रीवर गेली तेव्हा नेत्रा तिथून निघून जाऊ लागली.

"नेत्रा, थांब. मला बोलायचं आहे." राजीव तिची वाट अडवत म्हणाला.
"मला..मला तू कधीच पसंत नव्हतीस नेत्रा. कारण माझं वैदेहीवर प्रेम होतं आणि हे घरात कुणी मान्य केलं नसतं. आईच्या आग्रहाखातर मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. मी तुझ्याशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते कधी जमलचं नाही मला. मला माफ.."

"मी अनोळखी लोकांशी बोलत नाही. मग त्यांचे ऐकून घेणे तर लांबच राहिले आणि माफी मागायची ज्यांची पात्रता नाही, त्यांना मी कधीच माफ करत नाही." नेत्रा आपल्या डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाली. "तुम्ही केवळ स्वतःचा विचार केलात. मला फसवून तुम्हाला काय मिळालं राजीव?"

इतक्यात मागून येणाऱ्या जयदीपने नेत्राच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवला आणि राजीवच्या बोलण्याची वाट न पाहता ती जयदीप सोबत पुढे निघून गेली.

"जयदीप, ते क्षण कधीच निघून गेले. मला ते पुसून टाकायचे आहेत, अगदी कायमचे." नेत्राचे डोके जयदीपच्या खांद्यावर विसावले.
तिच्या या कृतीने जयदीपला त्याचे उत्तर मिळाले होते. तो आता नेत्राला कधीच अंतर देणार नव्हता.

राजीव मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू कधी गालावर ओघळले, त्याचे त्याला कळले देखील नाही.

समाप्त.
©️®️✍️सायली जोशी.